“माझे यार विशेष काही नाही. काही दिवस कोलकत्त्यामध्ये एका कंपनीत होतो. आता इकडे आलो. आई-वडिलांचे चाललेच होते...आपलं प्रांत का सोडतो? पण मी विचार केला, बघावे फिरून इकडे-तिकडे! अनायासे लागला जॉब आणि इकडे आलो. चित्रकलेबद्दल म्हणावे तर सध्या काहीच नाही. मन उगीचच भरकटत असते. कशातच लक्ष लागत नाही. करायला काहीच नाही म्हणून नोकरी करतोय. बर ते जाउदे....चालतो आता.”
“अरे, जेवून तरी जा.” रामप्रसाद.
“छे रे! आता मी नवीन रस्ते शोधात लॉज वर जाणार आहे. चालणे पण होईल आणि मन पण शांत होईल!!”
सुब्रतो गेल्यावर सुचित्रा रामप्रसादला म्हणाली, “ असा एकाएकी का उठून गेला हा?”
“तो जरा तसाच आहे....एककल्ली आहे. मनात आलेकी करून टाकले!” रामप्रसाद म्हणाला. सुब्रातो lodge वर येऊन जे. कृष्णमूर्ती वाचत बसला.
सुब्रतो कंपनीत आता चांगलाच रुळला होता. पुण्याची पण त्याला बरीच माहिती झाली होती. सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी असाच एकदाएफ. सी. रोडवर आपल्याच नादात फिरत होता. तेवढ्यात एक व्यक्ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली.
“नमस्ते, सुब्रतो जी!”
समोर पाहतो तर सुनंदा......गाडीत भेटलेली!
“ओह.....नमस्ते! व्हाट ए प्लीझेन्त सरप्राईज ! आपण पुन्हा भेटू असे वाटलेच नव्हते!”
“आणिमला पण!” सुनंदा उत्तरली. “मी इथे जवळच एका मैत्रिणीकडे गेले होते. माझी स्कूटर इथून थोडीच पुढे पार्क केली आहे, तिथूनच मग घरी जायचा विचार आहे. तुमचे कसे काय चालले आहे? पुण्यात जम बसला का तुमचा?”
“माझे अगदी व्यवस्थित!” सुब्रतो, “ बरे...आपण उभ्या उभ्याच बोलणार आहोत का? वेळ असेल तर चहा-कॉफी काहीतरी घेऊया.” तिने मूक संमती दिली. दोघे मग समोरच्याच हॉटेलमधे गेले. अवांतर गप्पा-टप्पा झाल्या आणि मग बाय-बाय! ह्या भेटीत मात्र तिच्या ऑफिसचा फोन नंबरघ्यायला आणि त्याच्या ऑफिसचा फोन नंबर द्यायला सुब्रतो विसरला नाही!
सुब्रतो लॉज मधे बेडवर पडल्या पडल्या विचार करू लागला. ह्या अचानक भेटीचा आनंद तर खूप झालाच होता. एकटेपणाने आणि मोजक्याच चार-दोन मित्रांबरोबर वेळ घालवणारा सुब्रतो, आज अचानक उत्तेजित झाला होता. मनातील हुरहूर काही केल्या कमी होत नव्हती. कोणतेही पुस्तक हातात धरले तरी पुढची अक्षरे दिसत नव्हती. विचारांचा गुंता सुटण्यापेक्षा अधिकच वाढत गेला आणि त्या विचारातच कधी डोळा लागला त्याचे त्यालाच कळले नाही.
क्रमशः.......