एखादं नवीन प्रकरण ऐन रंगात येत असताना जुन्या प्रेयसीची सारखी सारखी आठवण येत राहावी ,तशी मला जी.एं. ची पत्रं वाचताना सारखी सारखी गझलेची आठवण होत राहाते.(म्हणजे ती काही जुनी प्रेयसी झाली असे नव्हे ,तिची सोबत नेहमी टवटवीतच !!)
जी.एं.ची निवडक पत्रं किंवा चार्ल्स डिकन्सची A tale of two cities ही फार आवडायला लागलेली पुस्तकं ; पण ही वाचतानाच 'गर्दीत एखादी नजर का ओळखीची वाटते' असा एखादा मिसरा साद घालून जातो आणि मनाच्या माहोलात अगदी निराळेच रंग भरून जातात.मग या मिसर्याला न्याय देणारा मिसरा खरंतर फार दूरवर कुठेतरी आपली वाट बघतोय हे जाणवायला लागतं आणि त्याला न्याय देण्यासाठी आपलं मन थोडं अधिक उकरून पाहिलं पाहिजे ,या ओळीचं बोट धरून थोडं अजून फिरून आलं पाहिजे, ,हे सुध्दा जाणवतं .दोन निष्ठांच्या मध्ये निर्माण होणार्या ताणामुळे असं होत असावं का ?? तशी त्यातली कुठलीच अवस्था खोटी नाही .
असं वाटतं की,चुंबकाला ज्याप्रमाणे दोरीने टांगून मोकळं सोडल्यावर ,ते जसं उत्तर-दक्षिण दिशेला स्थिरावतं,तसं माणसाने स्वतःला विश्वाच्या पसार्यात असलेल्या अमर्याद दिशांना मोकळं सोडून द्यावं ,नंतर आपण ज्या दिशेला नैसर्गिकपणे स्थिरावू ,ती 'आपली' दिशा!!
.
.