खूप दिवसांनी एक शाळेतला मित्र भेटला.नंतर काही दिवसांनी जवळ-जवळ रोजच गाठ-भेट पडत गेली.एक दिवस म्हणाला, "सध्या भाड्याच्या घरात रहात आहे.स्वतःचे घर घ्यावे अशा विचारात आहे.एक जरा ४-५ लाख कमी पडत आहेत.मदत मिळाली तर बरे पडेल." मी म्हणालो, बघतो, काही सोय होत असेल तर. आता माझे सगळे आर्थिक व्यवहार बायकोच्याच ताब्यात.(हे असे करायचे एक कारण आहे. ते कारण नंतर पुन्हा कधीतरी. एक लेख लिहावा लागेल.)
पैसे माझे पण जमा मात्र बायकोच्या खात्यात.(माझ्याच बायकोच्या बरे!! उगाच नसत्या शंका, कुशंका काढत बसू नका.)मग हळूच तिचे पास-बूक बघितले.त्यात ७ लाख होते. चला म्हणजे, आपल्या मित्राचे घर होणार तर.आता ५ च्या जागी ६ दिले तरी हरकत नाही.आता अडचण फक्त एकच होती आणि ती म्हणजे बायकोची परवानगी.
तुम्हाला कल्पना असेलच, की ह्या सगळ्या बायकांचे सहावे इंद्रीय फार तीक्ष्ण असते. "त म्हणजे "ताकभात" की, तलवार" हे त्या फार लगेच ओळखतात.जरा वेळ काळ बघूनच विषय काढायला हवा.
दुसर्या दिवशी हळूच (मी हिच्याशी हळू आवाजातच बोलतो.तिने तशी सक्त ताकीदच देवून ठेवली आहे.एक मोलकरीण सोडली, तर इतर कुणीही तिच्याशी नोठ्या आवाजात बोलू शकत नाही.)
बायकोला म्हणालो, "अगं आपले ते धाकटे चिरंजीव यंदा १०वी ला आहेत ना?"
हा सवाल कानी पडला आणि बायको भांबावली.एक तर आपल्याला नक्की मुले किती? हे तर आपल्या नवर्याच्या लक्षात आहेच पण त्याशिवाय मुले काय शिकतात? आणि ती कितवीत आहेत? हे लक्षात रहायला लागले तर. (कारण दर वेळी मी परदेशातून घरी आलो, की माझा पहिला सवाल हाच , की हा आता कितवीत आहे? आणि तो कितवीत आहे?
ती म्हणाली, "हो." आणि लगेच पुढचा सवाल आलाच, "का हो?"
{नवर्याने एखादा सवाल केला की बायको लगेच जवाब (की जबाब) देवुन ,सवाल करते.लावणीत काहीतरी असते ना? "सवाल-जवाब" अगदी तस्सेच.आमच्या घरी हे असे रोज चालत असते बघा. मी उशीरा आलो की काही तरी बतावणी करतो आणि मग ही माझी (मित्र)गण-गौळण काढते.(तरी बरं, सध्या तरी हिला माझी एकच गौळण माहित आहे.) मग काय तिचे सवाल आणि माझे जवाब असा रोज तमाशा चाललेला असतो.}
मी." काही नाही गं, आता हे दहावीचे वर्ष ना? म्हणून विचारले." आणि मग मी सवाल केला, (हिने मला ह्या सवाल-जवाबाची फार चांगली दीक्षा दिली आहे, हे आता तुमच्या चाणाक्ष बुध्धीला पटले असेलच,)
"त्याला आपण ना कुठल्या तरी मोठ्या क्लासला घालू या. काय ते अर्धा-एक लाख लागले तरी हरकत नाही. कुठल्या क्लासला घालु या? त्या "अ ब क" मध्य्रे की " क्ष ज्ञ" मध्ये? तु फक्त सांग.आपण उद्याच प्रवेश घेवून टाकू."
इथे माझ्या बायकोला फीट यायचीच बाकी होती.आपल्या नवर्याला , फक्त क्लासची नावेच नाही , तर त्यांच्या फिया किती? हे पण माहित आहे.हे जाणवून तिच्या डोळ्यात "देव प्रसन्न झाल्याचे" भाव दिसले.बायकोच्या डोळ्यात हे असे भाव फार कमी वेळा दिसतात.
ती: अहो ह्या वेळी तो, "स प क" , क्लास लावला आहे. मागच्या वेळी, की नई, त्यांची २ मुले १०३ टक्के , मिळवून पास झाली. आणि त्याचे पैसे देवून झाले आहेत, तुम्ही ना फार चिंता करू नका. मी करते सगळे व्यवस्थित. बरे आज तुम्हाला जेवायला काय हवे?"
चला म्हणजे निदान १ लाख तरी आपण नक्की देवू शकतो, हे जाणवून मी खूष झालो आणि तिच्या साठी मसाला पान आणायला बाहेर पडलो. मित्राला १ लाख देवू शकेन म्हणून फोन केला.त्या दिवशी बायकोने भजी तळली.
मग त्यानंतर एक-दोन दिवस वाट बघून अजून एक विषय काढला.
मी: अगं ह्या वर्षी आपण तुझ्या आई-वडीलांना आणि माझ्या आई-वडीलांना चार-धाम यात्रेला पाठवु या का? काय १ लाख खर्च आला तरी चालेल.
ती: माझे आई-बाबा अमेरिकेला जाणार आहेत. माझ्या चुलत बहिणीकडे बारसे आहे.तिच सगळा खर्च करणार आहे.शिवाय त्यांना सगळी अमेरिका पण दाखवणार आहे.
(ह्या फक्त ४ वाक्यांतच तिने माझी कशी तिरडी बांधली ते कळले असेलच. माझे आई-बाबा बघा अमेरिकेला निघाले, ते पण फुकटात, अशी माणसे जोडायची असतात, त्यासाठी मन-मिळावू पणा लागतो.तो तुमच्या आई-बाबांकडे नाही, म्हणून तुम्हाला कुण्णी-कुण्णी विचारत नाही,माझ्या चुलत बहिणीचे यजमान बघा, किती हुषार आहेत, अणि शिवाय त्यांना माणसांची किंमत पण आहे.ते नुसता पैसा-पैसा बघत नाहीत , तर वेळ प्रसंगी आपल्या बायकोच्या नातेवाईकांसाठी पण खर्च करतात.माझ्या काकांशी तुम्ही कसे वागलात, ते मी अद्याप विसरलेले नाही.इ.इ.)
आणि तुमच्या आई-बाबांना तर अजिबात नको. आईचे पाय दुखतात आणि बांबांना ऐकायला येत नाही. साधं डोंबिवली ते ठाकुर्ली , जायचे म्हटले तरी त्यांना ते झेपत नाही. मागच्या वर्षी मीच नाही का त्यांना स्पेशल रिक्षा करून "कल्याणला" नेले होते.
(ह्या ६/७ वाक्यांत तिने काय-काय सांगीतले, ते बघितले. तिचं माझ्या आईवडीलांकडे किती लक्ष आहे.तिला त्यांची किती काळजी आहे.तिने कसा स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून कल्याणचे दर्शन घडवून आणले.इ.इ.)
मी: बरे बाबा. जशी तुझी मर्जी.
असे म्हणालो आणि काजु-कत्री आणयला बाहेर पडलो.मित्राला फोन करून सांगेतले की अजून १ लाख देवू शकेन. त्या दिवशी तिने घरच्या शेवयाची खीर केली होती.
एक-दोन दिवसांनी परत एक विषय काढला.
मी: अगं , हा मोठा आता १८ वर्षांचा झाला.
ती: हो खरे आहे. मग काय करू या?
मी: त्याला मोटर सायकल घेवून देवू या. १ लाखात चांगली बाईक येते म्हणतात.त्या "मिसळपाव.कॉम" वरती छान माहिती दिली आहे. त्यांना सांगीतले तर ते मदत करायला पण तयार आहेत. आपल्याच डोबिवलीतील आहेत.
ती: काही नको. आपल्या त्या सेकंडहँड कारचे अनुभव कसे आले ते माहित आहे ना? शिवाय पेट्रोलचे दर किती वाढले आहेत.शिवाय परत पार्किगचा प्रश्न आहेच.
(तुम्हाला धड सेकंडहँड कार परवडत नाही. वाढत्या महागाईचा सामना करता येत नाही. नविन जागा घ्यायची ऐपत नाही. उगाच फुकाच्या गमजा मारू नका.)
मी : ठीक आहे.
बाहेर पडलो आइस्क्रीम घेतले आणि मित्राला फोन केला. आता ३ लाख नक्की देवू शकेन.
त्या दिवशी हिने पापड तळले आणि मला आवडतात म्हणून कुर्डया पण.
एक दोन दिवस गेले आणि परत एक विषय काढला.
मी: अगं पुढल्या महिन्यात आपल्या लग्नाला १९ वर्ष पुर्ण होतील.
ती: हो ना.तुमच्या सहवासांत वर्षे कशी सरली ते कळालेच नाही.मग तुमचे काही प्लॅनिंग आहे का?
मी: हो तर, आपण युरोप टुरला जावू या का? काय २ ते ३ लाख खर्च झाले तरी चालतील.
ती: काही नको. तुमच्या बरोबर कुठेही फिरायला नको. (ह्या एका वाक्यात एक लेख दडला आहे.)
मी: बरे. राणी सरकार, जशी तुमची मर्जी.
असे म्हणून बाहेर पडलो.मित्राला फोन केला. त्याला सोय झाली म्हणून सांगीतले.येतांना बायकोसाठी गजरा घेतला.
तिने पण सातारी पध्ध्तीने कोंबडीचा रस्सा आणि तांदूळाच्या भाकर्या बनवल्या.कुठून-कुठून हे असे पदार्थ शिकते कुणास ठावूक. बहूदा "मिसळ-पाव.कॉम" ह्याच साईट वर असेल. एकदा बघितलेच पाहिजे.
एक-दोन दिवसांनी मित्राचा फोन आला.शनिवरी रात्री फ्री आहेस का? मी काय लगेच तयार झालो.रीतसर बायकोकडून परवानगी घेतली आणि रात्री त्याच्या बरोबर पार्टीला गेलो.तो परस्पर कंपनीतूनच येणार होता.स्टेशनवर भेट झाली.त्याचा चेहरा रडवेला झाला होता.कारण नेमके त्याचे पाकीट मारल्या गेले होते.म्हणाला आता पार्टी रद्द करू या. मी नको म्हणालो.पार्टी केली.मीच पैसे दिले.बोलता-बोलता तो म्हणाला.उद्याच पैसे द्यायचे आहेत.त्यांना चेक चालेल.तू मला चेक दे.आपण दोघेही उद्या जावु आणि चेक देवून टाकु.पार्टी चांगलीच रंगात आली होती.खुषीत येवून मीच म्हणालो, तुला उद्या कशाला? आत्ताच चेक देतो. माझी बायको माझे सगळे ऐकते.
तसेच घरी गेलो.त्याची आणि बायकोची ओळख करून दिली.त्याने पण त्याची सगळी कहाणी सांगीतली.मी हळूच तिला पैसे मागीतले तर नाही म्हणाली. मित्र बिचारा एव्हढेसे तोंड करून निघून गेला.
दुसर्या दिवशी....
मी: अगं आपल्या कडे पैसे असून देखील तु नाही का म्हणालीस?
ती: कुठे आहेत पैसे?
(बघा , आता तिची फक्त उत्तरे.सवाल नाहीतच.)
मी: ते ७ लाख.
ती: अहो. ते घर-खर्चा साठी ठेवले आहेत.
मी: आता कुठले खर्च? क्लासची फी तर भरून झाली.
ती: हो.पण इतरही काही गोष्टी आहेतच.
मी : हे बघ!! अशी एका वाक्यांत उत्तरे देवू नकोस.काय ते स्पष्ट पणे सांग.
ती: १०वी नंतर पुढे काय? त्याची काही सोय केली आहे का?डोनेशन साठी कुठून पैसे आणणार? ते पैसे त्यासाठी आहेत.
मी: हो. त्याला काय १ लाख लागतील. आणि मित्राची गरज तर फक्त ५ लाखाचीच आहे.मग आपण दिले तर काय बिघडले?
(मी मनांत, काल परवा पर्यंत खर्च नाहीत , असे म्हणणारी बायको , अचानक कशी काय फिरली?)
मी: आता तुझे आई-बाबा आणि माझे आई-बाबा कुठे जाणार नाही आहेत.
ती: ते पैसे मी त्यांच्या आजारपणासाठी ठेवले आहेत.
मी: बघ आता आपण काही मोठ्या मुलासाठी बाईक नाही घेणार आहोत. मग ते पैसे देवू शकतो.
ती: माझे आणि त्याचे बोलणे झाले आहे.तो सुट्टीत काही क्लासेस लावणार आहे. एकूण ४ क्लासेस आहेत.ते पैसे आम्ही त्या साठी वापरणार आहोत.
मी: आपली युरोप टूर तर रद्द केली आहे. मग?
ती: ते पण पैसे मी खर्च केले.त्याचे दागिने वगैरे काही केले नाहीत.ते पैसे मी परवाच तुमच्या आणि माझ्या पी.पी.एफ. खात्यात जमा केले आहेत. इथे माझ्या कडे तोंडाचा चंबू करून बघू नका. मी काही फक्त पा.क्रु. वाचत नाही. इतर पण लेख वाचते.आता ह्या पुढे एकच काम करायचे. तुम्ही पैसे कमवा. ते कसे राखायचे आणि कुणाला किती आणि कसे द्यायचे, ते माझे मी बघीन.नसत्या भानगडीत पडू नका.जे काही ताटात पडेल ते खा अणि गप-गुमान झोपा.तुम्हाला आयुष्यभर उपाशी न ठेवण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या मागे नसते व्याप न लावण्याची जबाबदारी तुमची.
आयला!!! काय बायको आहे की कोण? आधी म्हणते आहेत पैसे आणि कुणाला द्यायचा विषय काढला की, लगेच नाही आहेत पैसे.
पण खरं सांगू का? त्या दिवसापासुन मी तणावमुक्त झालो बघा.च्यामारी... खिशात पैसे नसतांना पण दोन वेळा चमचमीत आणि भरपेट जेवणाची मझा काही औरच...
तुमची पण बायको अशीच वागते का हो? असे असेल तर....
हे जग फार सुंदर आहे.फार सुंदर आहे.फार सुंदर आहे.
मी हिच्याशी हळू आवाजातच
मी हिच्याशी हळू आवाजातच बोलतो.तिने तशी सक्त ताकीदच देवून ठेवली आहे.एक मोलकरीण सोडली, तर इतर कुणीही तिच्याशी नोठ्या आवाजात बोलू शकत नाही.>>>>>
नवर्याने एखादा सवाल केला की बायको लगेच जवाब (की जबाब) देवुन ,सवाल करते.लावणीत काहीतरी असते ना? "सवाल-जवाब" अगदी तस्सेच.आमच्या घरी हे असे रोज चालत असते बघा. मी उशीरा आलो की काही तरी बतावणी करतो आणि मग ही माझी (मित्र)गण-गौळण काढते.(तरी बरं, सध्या तरी हिला माझी एकच गौळण माहित आहे.) मग काय तिचे सवाल आणि माझे जवाब असा रोज तमाशा चाललेला असतो
@ मुग्धा ताई, अहो संसार
@ मुग्धा ताई,
अहो संसार म्हटले की थोडे कमी जास्त असायचेच. मी जसा बायकोवर विनोद करू शकतो तसेच मी माझ्या दोषांवर पण विनोद करू शकतो.
असो.
तुम्ही लेखाचा आनंद घेतलात ना? मग झाले..तर...
(No subject)
बिचारी तुमची बायको, आता तिलाच
बिचारी तुमची बायको, आता तिलाच एक लेख लिही म्हणून सांगायला हवे, ती आहे का मायबोलीकर?
लेख चांगला लिहिलाय.
@ अंजू ताई, ती बसली आहे
@ अंजू ताई,
ती बसली आहे संसाराचा गाडा हाकत आणि मी बसलो आहे इथे लेख टाकत...
ती आत्ता आत्ता मिपाकर झाली आहे...माबोकर होईल १५/२० दिवसांनी....
तशी गुणाची आहे तुमची मैत्रीण...फारच सोशीक आणि सहनशील आहे...
छान खुसखुशीत लेख झालाय...
छान खुसखुशीत लेख झालाय... नवर्याला जरूर जरूर वाचायला देइन. (तेवढंच समसुखी/दु:खी असल्याचं समाधान त्याला
)
काही वाक्यांमधले दडवलेले बाकीचे लेखही बाहेर येऊद्यात. पुलेशु
@ ड्रीम गर्ल,,, जरूर लिहीन...
@ ड्रीम गर्ल,,,
जरूर लिहीन... पण इथले वातावरण कितपत खेळीमेळीचे आहे त्यावर पण अवलंबून आहे...
कारण मी कधीच कमरेखालचे विनोद लिहीत नाही किंवा व्यंगांवर पण टीका करत नाही..
पण दोष मात्र दाखवतो... वरील लेख ही असाच आहे,,,,,
बायको वर विश्वास टाकला तर बर्याच चांगल्या गोष्टी साध्य होतात आणि फसवणार्या मित्राला जवळ घेतले तर नुकसानच होते...
आता अशा गोष्टी लिहितांना थोडी फार बायकोवर टीका करणे साहजीक आहे...
हे जर इथे मान्य होत असेल तर मग इथे लिहायला मजा येईल...
घोड्याला लगाम हा हवाच ....!
घोड्याला लगाम हा हवाच ....! पण लगाम इतकाही खेचू नये कि घोड्याचा जीवच जायील.
छान लेख. हे लिहावयाचे राहूनच
छान लेख. हे लिहावयाचे राहूनच गेले.
@ जयदीप.... संसारात कुणीही
@ जयदीप....
संसारात कुणीही घोडे नसतात किंवा चाकेही नसतात. वेळ प्रसंगी कुणीतरी सारथी होतो तर कुणीतरी बाकीची व्यवधाने सांभाळतो...
"ज्यांना हे पटते आणि आचरणांत आणायला पण जमते " तेच खरे मनुष्य....
जयंतजी वरचे वाक्य छान आहे.
जयंतजी वरचे वाक्य छान आहे. वेळप्रसंगी कोणीतरी सारथी होतो, ते त्यातले खूप सुंदर.
@ अंजू ताई... अहो तुमचा आणि
@ अंजू ताई...
अहो तुमचा आणि माझ्या सासूचा संसार बघूनच तर ते मी शिकलो...
मला नाही कळले?
मला नाही कळले? काकूंचा(सासूबाई) ठीक पण माझा बघून, मी नाही हो इतकी ग्रेट वगैरे पण वाक्य खरंच खूप सुंदर वाटले.
जयंतजी, तो गणगौळणवाला भाग
जयंतजी, तो गणगौळणवाला भाग एकदम झकास, मनापासून आवडला
@ अंजू ताई, तुमच्या मुलासाठी
@ अंजू ताई,
तुमच्या मुलासाठी तुम्ही रात्रपाळी करता आणि तुमचा नवरा दिवसभर संसारासाठी कष्ट उपसतो......
तर माझ्या सासूबाईंनी संसारासाठी किती कष्ट घेतले आहेत ते नंतर कधी तरी लिहीन..
जरुर लिहा. पण मला एक गंमतजंमत
@ रश्मी ताई..... लागू द्या
@ रश्मी ताई.....
लागू द्या हो.. मला काही वाटत नाही..
मी पण घरजावईच आहे....
ओके, धन्यवाद, परिस्थिती जशी
ओके, धन्यवाद, परिस्थिती जशी असते त्याला अनुसरून वागायला लागते. चालायचंच.
मला माहिती आहे जयंत आणि
मला माहिती आहे जयंत आणि त्यांची पत्नी दोघेही, जयंतजी यांचे आई-वडील आणि सासूबाई ह्या सर्वांची सेवा करतात.
@ कवठी चाफा लेख आवडला असे
@ कवठी चाफा
लेख आवडला असे सांगीतल्याबद्दल ... धन्यवाद..
मस्तच.... खिशात पैसे नसतांना
मस्तच....
खिशात पैसे नसतांना पण दोन वेळा चमचमीत आणि भरपेट जेवणाची मझा काही औरच...>>>>>>>>+१
छान लेख. ..मस्त
छान लेख. ..मस्त
@ विजय आणि विनायक धन्यवाद..
@ विजय आणि विनायक
धन्यवाद..
फार सही लिहिलाय! मजा आली!
फार सही लिहिलाय! मजा आली!
@ सई केसकर.... धन्यवाद...
@ सई केसकर....
धन्यवाद...
>>ह्या बायका अशाच वागतात का
>>ह्या बायका अशाच वागतात का हो? <<
आयला फाटकसाहेब, १९ वर्षं लग्नाला होऊनसुद्धा हा प्रश्न तुम्हाला अजुन पडतो?

छान लिहिलंय.खुसखुशीत . मजा
छान लिहिलंय.खुसखुशीत .
मजा आली.
मस्त लिहिला आहे लेख
मस्त लिहिला आहे लेख ...वस्तु स्थिति आहे हे नक्कि ..... लकी आहात जयन्त आपण ......
असेच मस्त मस्त लिहित रहा....
खूप मस्त. मी पण हे अनेकदा
खूप मस्त. मी पण हे अनेकदा करून नवर्याचे पैसे वाचवले आहेत.
@ राज, "देर आए दुरुस्त आए"
@ राज,
"देर आए दुरुस्त आए"
ह्यावर माझा विश्वास आहे. हलकेच घ्या...
बर्याच लोकांना तिरडीवर जायची वेळ आली तरी हे समजत नाही.बायकोवर किती विश्वास पाहिजे...
ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे "शहाजी आणि जिजाउ ह्यांचा संसार." त्यांच्या एकमेकांच्या वर असलेल्या विश्वासामुळेच तर माझा हिंदू धर्म अद्याप टिकून आहे....
@ माशा,सुहास आणि अश्विनी मामी
प्रतिसाद दिल्याबद्द्ल मनापासुन धन्यवाद...