गिरीदुर्गांच्या साम्राज्यात - भाग दोन : कण्हेरगडाचा "चकवा" आणि सप्तश्रुंगची अविस्मरणीय भेट !!!

Submitted by सह्याद्रीमित्र on 13 September, 2013 - 07:17

गिरीदुर्गांच्या साम्राज्यात - भाग एक : सर्वांगसुंदर हातगड आणि खड्या चढाईचा अचला
इथून पुढे…

पिंपरी अचला गावामधून आम्ही अहिवंतवाडीमार्गे वणी - नांदुरी - कळवण रस्त्याकडे निघालो तेव्हा दीड वाजला होता. पिंपरी अचला सोडताचक्षणी इतका वेळ मौनावस्थेत असलेलं चिन्मय आणि पकाचं तोंड गोखलेच्या दिशेने फिरलं आणि तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही असे प्रश्न 'कंपल्सरी भोगायचे भोग' या नावाखाली गोखलेच्या नशिबी आले !!! पिंपरी अचला ते कण्हेरा पायथा या सुमारे तासा - दीड तासाच्या प्रवासात गोखलेवर अक्षरश: फायर झालेले काही प्रश्न पुढीलप्रमाणे -

"गुजरातच्या नैऋत्येला काय आहे आणि गुजरात कशाच्या वायव्येला आहे ??"

"गीतेमध्ये विशद केलेला कर्मयोगाचा सिद्धांत आणि त्यावर लोकमान्यांनी गीतारहस्यातून केलेली मीमांसा यावर पाच मिनिटं बोलून दाखव. "

"सेंद्रिय खताची निर्मिती आणि गांडूळखताचे व्यवस्थापन यातले फरक स्पष्ट कर. "

"हृदयविकार आणि मलेरिया यात काय साम्य आहे याचं संदर्भासहित विश्लेषण दे. "

"राहुल रॉयचे दहा सुपरहिट सिनेमे कोणते ?? (याचं उत्तर खुद्द राहुल रॉयही देऊ शकणार नाही !!!). "

"कसाब आणि अफझल गुरुची वंशावळ सांग."

"समजा फेसबुक गुगलने टेकओव्हर केलं तर गुगल फेसबुकला किती गुडविल देईल याची बॅलन्स शिट तीस सेकंदात मांडून दाखव. "

"गब्बरसिंग,मोगॅम्बो आणि शक्ती कपूर यांचे कोणते गुण तुझ्यासाठी आदर्श आहेत ??? "

(पुढचे प्रश्न इथे सांगण्यासारखे नाहीत !!!)

पुढचा एक तास गाडीमध्ये फक्त हास्याचे स्फोट होत होते कारण हे प्रश्न ऐकून गोखले पूर्णपणे कोमात गेला होता !!! त्याची मानसिक स्थिती ढासळण्यामागे या प्रश्नांचा खूप मोठा वाटा होता. कारण उत्तर चुकलं की चिन्मय मोबाईलमधून गुगल ओपन करून असे काहीतरी प्रश्न शोधायचा की गोखलेची वेड लागण्याची पातळी अचानक वाढायची !!! हा प्रकार पार कण्हेरा पायथ्याचं सादड विहीर गाव येईपर्यंत सुरु होता. नाशिकहून थेट कण्हेराला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. नाशिकहून ओतूर मार्गे कण्हेरवाडी या पायथ्याच्या गावामार्गे किल्ला चढायचा किंवा वणी - नांदुरी - कळवण रस्त्यावरचं आठंबा हे गाव गाठून तिथून सादड विहीरमार्गे कण्हेरावर जायचं. यातला ओतूरमार्गे जाणारा रस्ता मार्कंडया आणि रवळ्या - जवळयाच्या खिंडीतून जात असल्याने ज्या ट्रेकर्सना हे किल्ले करून कण्हेरा करायचा आहे त्यांच्यासाठी सोयीचा आहे. तर सादड विहीर गावाचा मार्ग ज्या भटक्यांना अचला - अहिवंत करून कण्हेरा गाठायचा आहे त्यांच्यासाठी योग्य आहे. सादड विहीर किंवा कण्हेरवाडी कुठूनही गेलं तरी कण्हेरा आणि त्याच्या शेजारचा डोंगर यांच्यातली खिंड चढावीच लागते. दोन्ही वाटा या खिंडीत येउन मिळतात आणि पुढे दोन्हीची मिळून एकच वाट कण्हेरा माथ्यावर जाते. आम्ही आठंबामार्गे जेव्हा सादड विहीर गावात पोहोचलो तेव्हा दोन वाजले होते. आपल्या गावातला किल्ला बघायला जणू काही परग्रहावरचे लोक आले आहेत असे भाव चेहे-यावर घेऊन गावातल्या लोकांनी गाडीभोवती कोंडाळं केलं. "कुटं जायचंय ?? कनेर किल्ल्यावर का ??" उपस्थितांमधून प्रश्न आला.
"हो.वाट कुठून आहे ??"
"ह्ये काय ह्यी डावीकडची धार दिसतीये ना तिथून सरळ जायचं वरती. अर्ध्या तासात किल्ल्यावर पोचाल. दीड तासात गावात परत." कण्हेराच्या डावीकडे दिसणा-या ठळक पायवाटेकडे अंगुलीनिर्देश झाला. आम्ही आता गाडी थेट कण्हेराची पायवाट सुरु होते तिथे नेउन उभी केली.(सादड विहीर गावातून सरळ गेलेला रस्ता पिंप्रीपाडा या गावामार्गे पुन्हा वणी - नांदुरी - कळवण रस्त्याला जाऊन मिळाला आहे. या रस्त्यावरून जाताना वाटेतच डावीकडे कण्हेराच्या माथ्यावर नेणारी मळलेली पायवाट दिसते. सादड विहीर गावापासून किल्ल्याचा पायथा जवळपास २ किलोमीटर्सवर आहे. त्यामुळे नेमकी वाट समजत नाही आणि सांगायला जवळपास एखादा स्थानिक गावकरी भेटेल याचीही शाश्वती नाही. पण किल्ल्याच्या पायवाटेसाठीची एक महत्वाची खूण म्हणजे सादड विहीर गाव ते पिंप्रीपाडा रस्त्यावरून जाताना कण्हेरा अगदी जवळ येऊ लागला की वाटेत एक किंचित चढ आणि त्याच चढाचा किंचितसा उतार आहे. या उतारानंतर लगेचच, रस्त्याच्या खालून पाण्याचे पाईप नेल्याने रस्ता थोडासा पूलासारखा झाला आहे. इथेच आपण कण्हेरा आणि त्याच्या शेजारच्या डोंगराच्या खिंडीच्या बरोब्बर खाली पोचलेलो असतो. त्यामुळे त्या पूलापासून डावीकडची झाडी भरलेली पायवाट पकडायची आणि खिंडीकडे निघायचं. ठळक अशी पायवाट नाही. पण एकच वाट असल्याने अज्जिबात चुकत नाही.) अडीच वाजत आले होते. पहिला झाडो-यातून जाणारा चढ चढून आम्ही कण्हेरा आणि त्याच्या शेजारच्या डोंगराच्या खिंडीत पोहोचलो. खिंडीत पोहोचताचक्षणी पलीकडे समोर धोडप आणि ईखारा सुळक्याचं जे काही दृश्य दिसलं त्याला जवाब नाही. मागच्या काही मिनिटांचा थकवा क्षणार्धात त्या दृश्याने पार घालवून टाकला. ढगांमध्ये घुसलेलं धोडपचं ते अस्मानी शिखर म्हणजे सातमाळा रांगेचा मेरुमणीच !!!! धोडपच्या दृश्यासाठी काही मिनिटांची विश्रांती इथे आता भागच होती. कण्हेराचा बुरुज डोक्यावर दिसत होता. फक्त शेवटचा टप्पा आणि आपण किल्ल्यावर वीसेक मिनिटांच्या आत असू हा आमचा समज कण्हेरा आता खोटा ठरवणार होता !!!

सादड विहीरमधून कण्हेरा

सादड विहीर - पिंप्रीपाडा रस्त्यावरून कण्हेरा. हा डांबरी रस्ता पुढे वणी - कळवण रस्त्याला जाऊन मिळाला आहे.

कण्हेराच्या शेजारील डोंगर. याच्या आणि कण्हेराच्या खिंडीत डावीकडून येणारी वाट सादड विहीर मधून तर उजवीकडून येणारी वाट कण्हेरवाडीतून आली आहे.

खिंडीतून दिसणारा कण्हेराचा बुरुज आणि त्याकडे नेणारा खडा चढ

दुरून डोंगर साजरे म्हणतात ते काय उगाच नाही. कण्हेराच्या खिंडीतून दिसणा-या बुरुजाकडे पाहून "हे काय आलंच . आता फक्त शेवटचा अर्धा तास." ह्या आमच्या भ्रामक समजुतीचा कण्हेराच्या चढाने पहिल्या पंधरा मिनिटातच निकाल लावला. खिंडीतून बुरुजाकडे जाणारा चढ हा साठ - सत्तर अंशातला आणि प्रचंड मुरमाड घसा-याने भरलेला होता. मी चिन्मय आणि ऋतुराजने खिंडीतून वर चढायला सुरुवात केली तेव्हा पका आणि ऋग्वेद गोखलेच्या बरोबर खिंडीतच थांबले होते. जसंजसं वर जाऊ तसतसा कण्हेराचा चढ खडाच होत चालला होता. पायाखालची मुरमाड माती अजूनच खाली सरकायला लागली. वर बघितलं तर चढाचा कोन आणखीनच वाढला होता. विश्रांतीसाठी थांबू म्हटलं तर मुरमाड घसा-यामुळे जिथं धड उभं रहायला जागा नव्हती तिथे बसायचा तर सवालच येत नव्हता. इतका वेळ वाहणारा वाराही एकदम बंद झाला. सरळसोट उभी चढण आता घाम काढू लागली होती. आम्ही दोन चार पावलं पुढे गेलो आणि इतक्यात अचानक मागून पकाच्या हाका ऐकू येऊ लागल्या "अरे जरा थांबा. गोखलेला खूपच दम लागलाय. तो वर येणार नाही म्हणतोय. त्याला चक्कर येतीये….!!!" आम्ही थोडं वर जाऊन पाहिलं तेव्हा गोखले निर्जीव झाल्यासारखा त्या मुरमाड चढावर कसाबसा झोपला होता आणि ऋग्वेद त्याला पाणी पाजत होता. गोखलेची परिस्थिती फारच बिकट होती. पंधरा वीस मिनिटांची विश्रांती झाल्यावर त्याला थोडं बरं वाटू लागलं. म्हणजे निदान चक्कर येणं तरी थांबलं होतं. पण त्याने दम लागणं थोडंच कमी होतंय. दिलेरखानाच्या तोंडाला आणला नसेल इतका फेस कण्हेराने गोखलेच्या तोंडाला आणला. आमची हालत गोखलेइतकी खराब नसली तरी त्याच्यापेक्षा वेगळी नव्हती. जरा कुठे आडवी वाट घ्यायला गेलो तर मुरमाड माती पुढे सरकूच देत नव्हती. पाच - दहा पावलांनंतर पाचेक मिनिटांची उभ्या उभ्याच विश्रांती होऊ लागली. आसमंतावर संध्याकाळच्या कोवळ्या उन्हाचे कवडसे पडू लागले होते. उजवीकडे इतका वेळ दिसणारा धोडप आणि त्याच्या शेजारी दिसणारे राजदेहेर आणि कोळदेहेर आता पूर्णपणे धुक्यात बुडाले. अचला किल्ल्याच्या बरोब्बर उलटा अनुभव कण्हेरा चढताना येत होता. आम्हाला वाटला तेवढा अचला अवघड निघाला नाही आणि कण्हेराच्या आकारावर जाऊन त्याच्याविषयी बांधलेले सगळे आडाखे कण्हेराच्या दम काढणा-या चढाने धुळीला मिळवले. अखेर खिंडीतून निघाल्यापासून पाऊण तासाच्या जीवघेण्या चढाईनंतर कण्हेराच्या पहिल्या बुरुजाजवळच्या खोदीव पावट्या लागल्या आणि शेवटचे काही फुट चढून आम्ही त्या बुरुजापाशी जाउन विसावलो !!! कित्येक मिनिटं छातीचे ठोके धडधडतच होते.हा पहिला बुरुज बहुदा गडाच्या पहिल्या भग्न दरवाजाचा असावा. गडाचा दरवाजा पार झाला होता. आम्ही लढाई जिंकली होती (असा आमचा समज होता !!!).

कण्हेराच्या खिंडीतून डावीकडे ईखारा सुळका आणि उजवीकडे धोडप

कण्हेरा किल्ल्याचा पहिला बुरुज

कण्हेरा किल्ल्याचा सरळसोट खडा चढ. हा फोटो अर्ध्या चढावरून काढला आहे. बुरुजापर्यंत अजून असाच अर्धा चढ बाकी आहे !!!

बुरुजाच्या जवळच्या खोदीव पावट्या

बुरुजाच्या डावीकडून आम्ही पुढे आलो आणि समोर बघितलं तेव्हा….कण्हेराचा माथा अजून अर्ध्या तासाच्या अंतरावर होता. पायातले त्राण आता संपत आले होते. किल्ला अजून लांब आहे हे शारीरिकदृष्ट्या नाही पण मानसिकदृष्ट्या पचवणं अवघड जात होतं !!! कण्हेराच्या बालेकिल्ल्याकडे जाताना मधेच एक पाण्याचे टाके असून त्याच्याच पुढे डावीकडे गडाचं छोटेसं नेढं आहे. इथे बसलो नसतो तर स्वत:ला कधीच माफ करू शकलो नसतो. नेढ्यातून पलीकडे दिसणा-या डोंगररांगा,नांदुरी जवळच्या मोहनदरी किल्ल्याचं स्पष्टपणे दिसणारं नेढं हा देखावा अप्रतिमच होता. पका आणि मंडळी तर दिसतही नव्हती. घड्याळाचे काटे हळूहळू पुढे सरकत होते. नेढ्यापासून काही पाय-या चढून आपण वर आलो की उजवीकडची वाट नेढ्याच्या माथ्यावर जाते तर डावीकडची वाट बालेकिल्ल्यावर. बालेकिल्ल्यावर दोन छोटे दगडी स्तंभ उभे राहिलेले दिसतात. त्यांचं प्रयोजन मात्र कळत नाही.

कण्हेराची तटबंदी

कन्हेरा किल्ल्याचं नेढं. श्रमपरिहारासाठीची अप्रतिम जागा !!!

कण्हेरा माथ्याकडे जाताना लागणारं पाण्याचं टाकं

कण्हेराचा बालेकिल्ला आणि त्याच्या माथ्यावर दिसणारे दोन दगडी स्तंभ

पहिल्या बुरुजाकडून माथ्याकडे येणारा मार्ग. डावीकडे खाली सादड विहीर गाव

नेढ्यातून निघाल्यापासून वीसेक मिनिटात आपण बालेकिल्ल्यावर येउन पोहोचतो. बालेकिल्ल्यावर प्रवेश करताचक्षणी कण्हेराचं विस्तीर्ण पठार नजरेत भरतं. कण्हेराच्या माथ्यावर सुरुवातीलाच पाण्याची काही टाकी आहेत. पुढे गडाच्या मुख्य पठारावर उध्वस्त वास्तूंचे अनेक अवशेष पसरलेले आहेत. गडाच्या उजव्या बाजूच्या कड्याजवळ एक झेंडा असून त्याच्या जवळच एक वृंदावन आहे. वृंदावनाच्या मागच्या बाजुलाही एक पडक्या वाड्याचं बांधकाम दिसतं. या वृंदावनाच्या मागे गडाची माची पसरलेली असून त्याच्यावर मात्र कोणतेही अवशेष नाहीत. या माचीला धोडप किल्ल्यासारखी एक खाच असून ही बहुदा 'डाईक' प्रकारातील रचना आहे. गडाचा विस्तार ब-यापैकी असून संपूर्ण गडमाथा फिरायला एक तास सहज लागतो.

कण्हेरा किल्ल्यावरील भग्नावशेष

कण्हेरा वरील झेंडा व वृंदावनाचे अवशेष

गडावरील वृंदावन व नंदी

कण्हेरा किल्ल्यावरच्या वृंदावनाशेजारील वाड्याचे अवशेष

कण्हेरा वरील पाण्याची टाकी

कण्हेरा किल्ल्यावरून आजूबाजूचा प्रदेश आणि पायथ्याला सादड विहीर गाव

कण्हेरा माथ्यावरून दिसणा-या कळवण भागातल्या सह्याद्रीच्या रांगा. उजवीकडे चौल्हेर व डावीकडे प्रेमगिरी,इंद्रमाळ,दीर - भावजय डोंगर.

कळवण शहर व मागे चौल्हेर किल्ला

पावणेपाच वाजत आले होते. आसमंतात पसरलेल्या अप्रतिम सूर्यप्रकाशाने वातावरण मंत्रमुग्ध करून टाकलं होतं. गडावरच्या थंडगार वा-याचा झोताने गड चढताना घेतलेले सगळे कष्ट कुठल्या कुठे विसरायला लावले. आम्ही पुन्हा गडाच्या मुख्य पठारावर आलो आणि......
अचानक गडावरचं वातावरण बदललं. पहिले कधीच झाले नाहीत असे काहीतरी विचित्र भास होऊ लागले. आपल्याबरोबर काय होतंय तेच कळेना. डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. कसलाही पत्ता लागायच्या आत सहाही जणांचे पाय अचानक खेचले गेले आणि आम्ही लांबवर कुठेतरी फेकले जात असतानाच सहस्त्र मुखातून उमटलेल्या हर हर महादेवच्या रणगर्जना कानावर पडू लागल्या…. !!!!!

इ. स. १६७१ ऑक्टोबर महिन्यात औरंगजेबाच्या आदेशावरून दिलेर आणि बहादूर ही खानजोडी बागलाणात घुसली होती. मुघलांच्या सैन्याने सर्वप्रथम महाराष्ट्राच्या दुर्गेंद्राला अर्थात साल्हेरला वेढा घातला. इकडे साल्हेरच्या वेढ्यातील काही मुघल सैन्य घेऊन दिलेरखानाने रवळ्या किल्ल्याकडे मोर्चा वळवला. मुघलांच्या सवयीप्रमाणं त्याने रवळ्याला वेढा घातला. ह्या वेढयाची बातमी समजताच मोरोपंत पिंगळयांनी बारा हजारांचं सैन्य रवळ्याच्या दिशेने पाठवलं. मराठ्यांनी रवळ्याला वेढा घालून बसलेल्या मुघल सैन्यावर वेळी - अवेळी छापे टाकायला सुरुवात केली. दिलेरने हे छापे रोखण्याचे अतोनात प्रयत्न केले पण हा प्रकार काही थांबेचना. अखेर कंटाळून दिलेरखानाने रवळ्याचा नाद सोडला. आता त्याच्या डोळ्यासमोर होता कण्हेरा उर्फ कण्हेरगड !!!!
कण्हेरगड...सातमाळा रांगेतला एक छोटेखानी दुर्ग !!! नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यात वसलेला आणि ह्या परिसरातल्या इतर किल्ल्यांच्या मानाने अगदीच कमी उंचीचा असणारा आणि तितकाच अल्पपरिचित असलेला !! दिलेरखान मुघल सैन्यासह कण्हेराच्या दिशेने चालून येऊ लागला. त्या वेळी कण्हेराचा किल्लेदार होता रामाजी पांगेरा. अफझलखानवधाच्या वेळी प्रतापगडावरून इशारा मिळताच ज्या पाच मराठा सरदारांनी आदिलशाही सैन्यावर प्रचंड हल्ला चढवला त्या पाच सरदारांमध्ये कमळोजी साळुंके,तानाजी मालुसरे,येसाजी कंक,कोंडाजी वरडवले यांच्याबरोबर रामाजीही पांगेराही होता. कवींद्र परमानंदांनी शिवभारतात रामाजीला 'अग्निसारखा शूर' असं म्हणून गौरवलं आहे. कण्हेरगडावर त्यावेळी हजारच्या आसपास मावळे होते. रामाजीने कण्हेरगडावरून मुघलांचा सेनासागर पहिला. आता युद्ध अटळ आहे हे त्याला कळून चुकलं होतं. गडावरच्या मराठ्यांपुढे त्याने सवाल टाकला " निदान करावयाचे. आपले सोबती असतील ते उभे रहाणे. " सरसर सातशे मावळा उभा राहिला. रामाजीने फक्त कटीवस्त्र नेसलं. बाकीच्या मराठ्यांनी त्याचं अनुकरण केलं. मुघल सैन्य आता गडाच्या जवळ येउन पोहोचलं होतं. रामाजीने तीनशे मावळे गडावरच ठेवले. सिंहाच्या काळजाचे सातशे मराठे वीर प्राण पणाला लावून कण्हेरगडाचं रक्षण करायला सर्वार्थाने सिद्ध झाले होते !!!
दिलेरच्या मुघल सैन्याने गडाला वेढा घालायला सुरुवात केली होती. उंचीने अगदीच नगण्य असलेला हा किल्ला आपण काही तासात जिंकून घेऊ असा विचार दिलेरखानाच्या डोक्यात सुरु होता. आणि अचानक गडाचे दरवाजे उघडले गेले…. हर हर महादेव अशी रणगर्जना प्रचंड आवाज करत आसमंतात घुमली आणि हातात नंग्या तलवारी घेतलेल्या सातशे उघडयाबोडक्या काळ्याकभिन्न आकृत्या वीज कोसळावी त्या वेगाने मुघल सैन्यावर तुटून पडल्या. रामाजी आणि त्याच्याबरोबरच्या मराठयांच्या तो आवेश बघून मुघल सैन्याचा ठोकाच चुकला. महाभयंकर रणकंदन सुरु झालं. मराठयांच्या तलवारी सपासप मुघल सैन्याला कापत सुटल्या होत्या. मराठयांचा अवतार आवरणं मुघलांना कठीण जाऊ लागलं. सभासदाने तर आपल्या बखरीत या लढाईविषयी लिहून ठेवलंय की " टिपरी जैसी सिमगीयाची दणाणते तैसे मराठे कडाडले ." सिमगीयाच्या म्हणजेच शिमग्याच्या दिवशी जसं टिपरु ताडताड करत दणाणतं तसा आवाज आसमंतात घुमत होता. मराठयांनी पराक्रमाची शिकस्त चालवली होती. रामाजीच्या अंगात तर साक्षात रणचंडिकाच संचारली होती. देहभान विसरून तो समोर दिसेल त्या मुघल सैनिकाला कापत चालला होता. रामाजीचा तो आवेश बघून दिलेरखान थक्क झाला आणि पुरंदरच्या वेळी मुरारबाजीचा रणसंग्राम बघून "या अल्ला,ये कैसा सिपाही तुने पैदा किया." असं म्हणत तोंडात गेलेली त्याची बोटं आज रामाजीचा रणावेश बघून पुन्हा एकदा तशीच तोंडात गेली !!! संख्येने कमी असूनही मराठे मागे हटायला तयार नव्हते. तीन तास कण्हेरगडाच्या परिसरात हे प्रचंड रणकंदन सुरु होतं अखेर दिलेरखानाच्या सैन्यातल्या पठाणांनी मराठयांना घेरलं. एका एका मराठयाला वीस - वीस तीस - तीस जखमा झाल्या. दिलेरखान या सगळ्या प्रकाराने मात्र अक्षरश: स्तिमित झाला होता. अवघ्या सातशे मावळ्यांनी बाराशे मुघलांना नरकाचा रस्ता दाखवला. रामाजी आणि त्याच्या मराठयांनी शौर्याची कमाल केली. विस्मृतीत गेलेला कण्हेरगड मराठयांच्या अतुनलीय पराक्रमाने इतिहासात अमर झाला. सुवर्णाक्षरात कोरला गेला !!!
कण्हेराच्या माथ्यावर या लढाईचं वर्णन सांगताना माझ्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहिला आणि आज हा प्रसंग लिहितानाही सर्वांगावर रोमांच उभे राहिलेत !!! त्या प्रसंगाशी एकरूप झालेले माझे पाच सवंगडीही देहभान विसरून मराठयांच्या शौर्याची ही कथा ऐकत होते… स्वत:लाच कुठेतरी शोधत होते !!!! एखाद्या गडाच्या माथ्यावर फिरताना त्याच्याशी जडलेल्या अपूर्व इतिहासाच्या पाऊलखुणांचाही मागोवा घ्यावा आणि स्वत्व विसरून त्यात रंगून जावं. माझ्या मते कुठल्याही परिपूर्ण डोंगरयात्रेची हीच खरी फलश्रुती आहे !!

वाट रोजची चालणे; वाट रोजची पाहणे; मिळो सुख माझ्या घरा; देवा इतुकेच मागणे !!!

आम्ही नांदुरीत परतलो तेव्हा सात वाजत आले होते. नांदुरीतल्या वडापाववाल्याचा दिवसभराचा धंदा करून द्यायचा लेखी करार केल्यासारख्या धडाधड ऑर्डर्स सुटल्या. त्याची पळता भुई थोडी झाली हे वेगळं सांगायला नकोच !!! उद्या पहायचा कण्हेरगड आजच पाहून झाल्याने आम्ही सप्तशृंगच्या बरोब्बर समोर असलेल्या आणि आपल्या भव्य नेढ्यामुळे कुठल्याही गिर्यारोहकाचं सहज लक्ष वेधून घेणा-या मोहिन्द्री उर्फ मोहनदरी किल्ल्याचा आमच्या प्लॅन मध्ये समावेश केला. आजच्या दिवसाचं टार्गेट पूर्ण झाल्याने आम्ही आता एकदम निवांत होतो.
"तुम्ही वणीच्या देवीला गेला आहात ??" बोलता बोलता काकांनी विचारलं. तीन मान होकारार्थी डोलल्या आणि तीन नकारार्थी. माझं याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात सातमाळा ट्रेकच्या निमित्ताने दर्शन झालेलं होतं तर पका आणि ऋतुराज खूप आधी येउन गेले होते. त्यामुळे आमच्यात सप्तशृंगला न आलेल्यांचीच मेजॉरीटी होती. "मंदिर किती वाजेपर्यंत उघडं असतं ??" मी हॉटेलवाल्याला विचारलं. "आठ वाजता." समोरून उत्तर आलं.अवचित काहीतरी हाती गवसल्याच्या आनंदात सगळ्यांचे डोळे चमकले. सप्तशृंगच्या इतक्या जवळ येउन देवीचं दर्शन न घेण्याचं पाप मात्र आम्हाला आमच्या माथी लागू द्यायचं नव्हतं. पुढच्या सगळ्या ऑर्डर्स डायरेक्ट कॅन्सल करून आम्ही गाडीकडे धाव घेतली. वणीची सप्तशृंगी देवी म्हणजे महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ. अवघ्या महाराष्ट्राचं तीर्थक्षेत्र !!! आज दिवसभरात अचला - कण्हेरा सारखे किल्ले होऊनही त्या आदिमायेच्या दर्शनाच्या ओढीनं आम्हाला एक नवा उत्साह मिळवून दिला. गाडी आता सप्तशृंगचा घाट चढू लागली. दहा किलोमीटर्सचा तो वळणावळणाचा घाटरस्ता देखील आम्हाला आणखीनच दूर भासत होता. सप्तशृंगची अस्मानी शिखरं आता धुक्यात बुडाली होती. अंधार झपाटयाने पसरत चालला होता. संधीप्रकाशाचे अंधुकसे रंग लांब कुठेतरी पुसट होताना दिसत होते. शेवटचे दोन किलोमीटर्स राहिले. सप्तशृंगवरून परतणा-या गाडयांचे प्रकाशझोत त्या मिट्ट काळोखात डोळे दिपवून टाकत होते. आणि शेवटचं एक किलोमीटरचं अंतर पार करून आम्ही सप्तश्रुंग गावात पोहोचलो तेव्हा पावणेआठ वाजले होते. शेवटची पंधरा मिनिटं !!! अचला - कण्हेराच्या खड्या चढाईनंतर आता सप्तशृंगच्या पाचशे पाय-यांचं आव्हान समोर होतं. कसलाही विचार न करता आम्ही पाय-या चढायला सुरुवात केली. पण पहिल्या पन्नास पाय-यांनंतरच पायात पेटके येऊ लागले. हे जमेल की नाही ?? इतक्या लांब येउन दर्शन होईल ना ?? वेळेत पोहोचलो नाही तर ??? अनेक प्रश्न आणि अनेक शंका मनातून सर्रकन निघून गेल्या. त्या स्थितीतही त्या वेदना झुगारून आम्ही चढतच होतो. दर्शन झालेली भक्तमंडळी घराच्या ओढीनं पाय-या उतरत होती. शंभर…दोनशे… तीनशे… साडेतीनशे…. साडेचारशे…. आता फक्त शेवटच्या पन्नास पाय-या !!! चढ उभा होत चालला होता. छातीच्या ठोक्यांनी कमालीचा वेग घेतला. वेळ झपाट्यानं पुढे सरकत होती. आता फक्त दहा पाय-यांचं अंतर उरलं. मुख्य मंदिर जवळ येऊ लागलं होतं.वरच्या बाजूंने देवीच्या जयजयकाराचे घोष कानी पडायला लागले. आणि अखेर शेवटच्या दोन पाय-या पार करून आम्ही धपापत्या उरांनी जेव्हा गाभा-यात प्रवेश केला तेव्हा घड्याळाचा काटा बरोब्बर आठवर स्थिरावत होता !!!! सह्याद्रीच्या अभेद्य कड्यात प्रकट झालेली अठरा हातांची भव्य आकृती नजरेसमोर उभी होती !!! अंगावर रोमांचाची एक लहर नकळतपणे उठून गेली. दुष्टांचा संहार करणारं आणि भाबडया भक्तांचा कैवार घेणारं ते निर्गुण,निराकार रूप आम्ही कितीतरी वेळ बघत होतो…. मनात साठवून घेत होतो !!! पुन्हा एकदा आनंद !!!! सह्याद्रीच्या या वेडया भक्तांची आपल्याशी भेट व्हावी हे कदाचित त्या जगदंबेच्याच मनात असावं !!!! भक्तांची गर्दी आता ओसरायला लागली होती. आणि अखेर भारावलेल्या मनानी जेव्हा पाय-या उतरायला सुरुवात केली तेव्हा गाभारा बंद होण्याची सूचना कानावर पडत होती !!!! सप्तशृंगच्या या देवीवर गिर्यारोहकांची मात्र विशेष श्रद्धा आहे. ही श्रद्धा सप्तशृंगी देवी सह्याद्रीच्या कड्यात प्रकट झाली असल्याने त्याबद्दल तर आहेच पण त्याहीपेक्षा जास्त तिच्या दर्शनासाठी गिर्यारोहणाचा मूळ धर्म आचरण्यासाठीही आहे. आमच्यामध्ये सगळ्यात भाग्यवान मी ठरलो होतो कारण माझं एकाच वर्षी सहा महिन्यांच्या आत दुस-यांदा दर्शन झालं होतं. आमच्यामुळे इथे पहिल्यांदाच आलेल्या ऋग्वेद,गोखले,चिन्मय आणि काकांच्याही नशिबी देवीच्या दर्शनाचा योग लिहिला गेला !!! पावसाचे टपोरे थेंब दुकानांच्या पत्र्यावर ताडताड आवाज करत बरसू लागले. आजच्या दिवसात पावसापासून लांब राहण्याची उणीव दिवसाच्या शेवटी भरून निघाली. नांदुरीपासून फक्त दहा किलोमीटर्सचं अंतर……शेवटच्या पंधरा मिनिटांचा हाताशी असलेला वेळ….मनात उठलेलं शंकाकुशंकांचं वावटळ… आणि अखेरच्या क्षणी समोर प्रकट झालेलं आदिमायेचं मनोहारी रूप…सगळा पूर्वसंचिताचा खेळ !!! अद्भुत…अवचित आणि अविस्मरणीय !!! सध्या भक्तांच्या सोयीसाठी सप्तश्रुंगी देवी ट्रस्टने अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. गडावर सुसज्ज अशा भक्तनिवासाचीही सुविधा उपलब्ध असून सप्तशृंग गाव ते मुख्य मंदिर इथपर्यंत रोपवेचं कामही सुरु आहे. याविषयीची अधिक माहिती www.saptashrungi.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
साडेनऊ वाजता वणी - नांदुरी रस्त्यावरच्या 'गुलमोहोर गार्डन' मध्ये जेव्हा जेवणासाठी टेबल लावलं गेलं तेव्हा सगळ्यांच्या चेहे- यावर (पुण्यातून) एका दिवसात एव्हरेस्ट चढून आल्याचे भाव होते. आमच्यात सगळ्यात वाईट हालत होती ती म्हणजे गोखलेची. त्याला मळमळ,पित्त,डोकेदुखी,कसकस वगैरे वैद्यकीय व्याधी एकाच वेळी सुरु झाल्या होत्या. आमची परिस्थिती गोखलेपेक्षा जरा बरी होती. त्यात गोखलेचा दोन दिवसाचा आणि अचला - अहिवंत सारखे बलाढ्य किल्ले असलेला हा पहिलाच ट्रेक असल्याने त्याची परिस्थिती आम्ही समजू शकत होतो. त्यामुळे शेवटपर्यंत त्याला सगळ्यांनीच व्यवस्थित सांभाळून घेतलं होतं. गुलमोहोर मधलं जेवण मात्र अप्रतिम होतं. गोखले दोन रोट्या यायच्या मधल्या वेळेतही पेंगत होता आणि याला (काका धरून) बाकीची समस्त टाळकी साक्षीदार आहेत. कालपासून नसलेली झोप,आज दिवसभराचे श्रम, दुपारचं जेवण म्हणून खाल्लेले फक्त दोन चार ब्रेड - बटर,भडंग आणि बिस्किटं आणि त्या थंडीत गरमागरम दोन घास पोटात गेल्यावर येणारी गुंगी यामुळे ही अवस्था स्वाभाविक होती. पकाने त्या परिस्थितीतही एक निर्लज्ज प्रकार करून दाखवला. गोखलेने ताटात नुकत्याच आलेल्या रोटीचे दोन घास खाल्ले आणि तो पुन्हा पेंगला. पकाने नेमकी हीच संधी साधून त्याच्या ताटातली रोटी आपल्या ताटात घेतली. आठ - दहा सेकंदांनंतर गोखले उठला आणि " मी रोटी बहुतेक तुमच्या आधी संपवली आहे. माझ्यासाठी अजून एक मागवा आणि आल्यावर प्लीज मला झोपेतून उठवा " असं सांगून तो परत झोपला. त्याला जाग आली ती गुलमोहोर गार्डनचं छप्पर भेदून बाहेर गेलेल्या हास्याच्या प्रचंड स्फोटाने !!!! गोखले आत्ता सातासमुद्रापार पोहोचला आहे याचं भन्नाट उदाहरण म्हणजे हा प्रसंग होता !!! आत्ताही मला हा प्रसंग लिहिताना हसू आवरणं कठीण जातंय !!! पकाने प्रामाणिकपणे गोखलेचा वाटा त्याला परत दिला हा मुद्दा वेगळा. पण या प्रकारामुळे गोखलेला गाडीत छळायला मात्र आम्हाला आता एक नवीन विषय मिळाला होता !!!
भोजनोत्तर आम्ही पुन्हा नांदुरीत आलो. नांदुरीचा एस. टी. स्टॅंड पार करून आपण पुढे आलो की डावीकडे कनाशी,अभोणा मार्गे सापुता-याला जाणारा फाटा आहे. या फाट्यावरून डावीकडे वळालो की पाच - सात किलोमीटर्स नंतर एक छोटा चढ आहे. या चढाच्या शेवटी इंग्रजी T आकाराचा फाटा आहे. उजवीकडचा रस्ता अभोणा तर डावीकडचा मोहनदरी गावात गेला आहे. याच फाट्यावरून डावीकडे मोहनदरी गावाकडे वळताना एका झाडाखाली शेंदूर लावलेल्या काही वीरगळ आहेत. इथून थोडं पुढे गेलं की डावीकडे खालच्या बाजूला गेलेला रस्ता मोहनदरी गावात जातो तर उजवीकडचा रस्ता मोहनदरीच्या आश्रमशाळेपाशी जाउन थांबतो. मोहनदरी किल्ल्याची चढण या आश्रमशाळेपासूनच होत असल्याने गावात जायचं काही कारण नाही. या आश्रमशाळेच्या मागच्या बाजूला नव्या कॉलेजचं आणि एका सुसज्ज अशा हॉस्टेलचं काम सुरु आहे. किमान हजार विद्यार्थ्यांची सोय होऊ शकेल इतकं मोठं हॉस्टेल बांधण्याचा विचार सुरु असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. आम्ही आश्रमशाळेत पोहोचलो तेव्हा पावणेबारा वाजले होते. आता मात्र झोप आवरणं कठीण होऊ लागलं. आश्रमशाळेच्या कर्मचा-याने आम्हाला एका व्हरांड्यात जागा करून दिली आणि सकाळी चहा घ्यायला या असं आमंत्रण देऊन निघून गेला. आमच्याशिवाय त्या व्हरांड्यात आश्रमशाळेचे दोन वॉचमनही झोपले होते. अंथरुणाला पाठ टेकली टेकताचक्षणी स्वर्गीय सुख काय असू शकतं याची जाणीव मात्र मनापासून झाली !!! आजचा दिवस एखाद्या कॅलिडोस्कॉप सारखा नजरेसमोर तरळत होता. आकाराने छोटा असूनही अनेक अप्रतिम वास्तुशिल्प उराशी जपलेला हातगड…अचला किल्ल्यावरून तौला शिखराचं दिसलेलं रौद्रसुंदर रूप….कण्हेरगडावर साक्षात भेटलेला रामाजी पांगेरा आणि सप्तशृंगी देवीचं झालेलं अनपेक्षित पण अविस्मरणीय दर्शन !!!! सह्याद्रीच्या कुशीतला एक दिवस आज सत्कारणी लागला होता. सभोवतालचं सारं विश्व जेव्हा झोपेच्या स्वाधीन झालं तेव्हा दूर कुठेतरी पहाटेला जाग येत होती !!!!

क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आकाराने छोटा असूनही अनेक अप्रतिम वास्तुशिल्प उराशी जपलेला हातगड…अचला किल्ल्यावरून तौला शिखराचं दिसलेलं रौद्रसुंदर रूप….कण्हेरगडावर साक्षात भेटलेला रामाजी पांगेरा आणि सप्तशृंगी देवीचं झालेलं अनपेक्षित पण अविस्मरणीय दर्शन
>> भन्नाट रे.. खूप समाधान देणारा दिवस जगला आहात. Lucky you!!

पावसाळ्याच्या आसपास कण्हेरावर इतका घसारा असेल, तर एरवी काय अवस्था होईल..

अवघ्या सातशे मावळ्यांनी बाराशे मुघलांना नरकाचा रस्ता दाखवला. रामाजी आणि त्याच्या मराठयांनी शौर्याची कमाल केली. विस्मृतीत गेलेला कण्हेरगड मराठयांच्या अतुनलीय पराक्रमाने इतिहासात अमर झाला. सुवर्णाक्षरात कोरला गेला !!!
कण्हेराच्या माथ्यावर या लढाईचं वर्णन सांगताना माझ्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहिला आणि आज हा प्रसंग लिहितानाही सर्वांगावर रोमांच उभे राहिलेत !!! त्या प्रसंगाशी एकरूप झालेले माझे पाच सवंगडीही देहभान विसरून मराठयांच्या शौर्याची ही कथा ऐकत होते… स्वत:लाच कुठेतरी शोधत होते !!!! एखाद्या गडाच्या माथ्यावर फिरताना त्याच्याशी जडलेल्या अपूर्व इतिहासाच्या पाऊलखुणांचाही मागोवा घ्यावा आणि स्वत्व विसरून त्यात रंगून जावं. माझ्या मते कुठल्याही परिपूर्ण डोंगरयात्रेची हीच खरी फलश्रुती आहे !! >>>>> खरंचच अंगावर काटा आला आणि अभिमानाने छाती फुलून आली..

सुंदर वर्णन, सुरेख फोटो ...

स.मि., कण्हेर्‍याच्या लढाईचं वर्णन अप्रतिम!! बाकी मोहिमेचं शब्दांकन छान जमलंय. आदिमायेचा खेळ आवडला! Happy
आ.न.,
-गा.पै.

सर्व भटक्यांचे मन:पूर्वक आभार !!!

कण्हेरा छोटा असूनही आणि इतका मोठा इतिहास असूनही खूप दुर्लक्षित राहिलाय…. पण किल्ला म्हणून लाजवाब !!!

@ discover सह्याद्री : अरे कण्हेरा म्हणजे चढाईपेक्षा उतरायची जास्त मजा आहे. वरून view अप्रतिम आहे. योग्य ऋतू बघून जाणं महत्वाचं.

पुढच्या भागात तर अहिवंतगडाचा एक खूप विस्मयकारक इतिहास असणार आहे. लवकरच पोस्ट करतोय. वाचते राहा.

अ प्र ति म................... पुढचेही लवकर टाका...

>>>> भन्नाट रे.. खूप समाधान देणारा दिवस जगला आहात. Lucky you!!
+१००