दे लिव्ह्ड हैपिली एवर आफ्टर….

Submitted by विद्या भुतकर on 6 September, 2013 - 00:38

एकंब्याच्या स्टोपवर उत्तम उतरला. पांढऱ्या धुळीच्या लोटाकडे वैतागून पहात त्याने आपला पांढराच शर्ट झटकला. मागून प्यांटही झटकली आणि कुणी ओळखीचं दिसतंय का म्हणून इकडे तिकडे पहिले. आता कुणी न्यायला आलं असलं पाहिजे असं तर नव्हतच. तो कुणालाही न कळवता आला होता. जावई म्हणून एरवी असणारा माज त्याला आज करता येत नव्हता. नाहीतर रहिमतपूरातून निघालं की फक्त कोरेगाव गाठायचं काम होतं त्याचं. बाकी मग पाटील कुणाला तरी पाठवायचेच त्याला आणायला. त्यामुळे बसने असं एकंब गाठायला त्याला जर चिडचिड झाली होतीच. पण पर्याय नव्हता. त्या वीस फुटी रस्त्यावरून मग उगाच म्हशी घेऊन जाणारी पोरं, तर कुठे शेतात खुरपत असणारा बायकांचा कळप तर कुठे शाळा बुडवून बोरं तोडणारी पोरं निरखत निघाला. त्याला आक्कीचे शब्द आठवत होते,'जावयासारखं वाग जरा. पोरीच्या नादात सौताची अशी किंमत घालवू नकोस.'

पंधरा-वीस मिनिटांनी त्याच्या जवळ एक एम-एटी थांबली. अंकुशबुवानी उत्तमला जोरदार हाक मारली, 'अवोSS जावई बापू? असं चालत का चाल्लासा? चला सोडतो तुम्हाला चावडीपतूर.' उत्तमने पडत्या फळाची आज्ञा मानून गाडीवर टांग मारली. उन्हाची वेळ असूनही गाडीच्या वेगात वारं लागून त्याचं घामेजलं अंग जरा सुखावलं. पायांनाही कसं बरं वाटलं. गाव दिसायला लागल्यावर त्याला जर बरं वाटलं. 'कुणाशी जास्त न बोलता पोचलो ते बरचं म्हणायचं' असा विचार करत होता तो तशातच त्याला गौराक्का म्हशीवरून जाताना दिसली. त्याला लग्न ठरताना काकानं सांगितलेली गोष्ट आठवली,'अरं ही गौराक्का लई खाष्ट हाय. जरा जपूनच. ' तिच्या या म्हशीच्या स्वारीबद्दलही ऐकलं होतंच पण आज प्रत्यक्षात पाहिल्यावर त्याला हसू आल्याशिवाय राहवलं नाही. अमरीला कितीतरी वेळा त्यानं चिडवलं होतं यावरून. गौराक्कानं जोरदार हाक दिली,'अन्कुशबुवाssss '. पुढं गेलेली गाडी झटक्यात थांबली. आपल्या साडीला सांभाळत म्हशीच्या शिंगाला डाव्या हातानं पकडून एमेटि वरून उतरावं इतक्या सहजपणे गौराक्का म्हशीवरून उतरली. उत्तमही उतरून गौराक्का जवळ आला.

'जावैबापू?' जरा आश्चर्याने ती उद्गारली. 'भर उन्हाचं असं न कळवता आलासा? कुनाला तरी धाडलं असतं की कोरेगावला? मी म्हशींना आंघोळीलाच न्हेत व्हतो वड्याला. राहू दे ते. चला घरीच जाऊया.' तिच्यासमोर काही बोलायची त्याची हिम्मत नव्हती. तिनं सगळ्या म्हशी घराकडं वळवल्या. मध्येच म्हशींना मार्गाला लावत, त्याच्याशी बोलत गौराक्का निघाली.

'काय म्हन्तासा? सगळं बरं हाय न्हवं? ताईबाई काय म्हनत्यात?' तिला काय बोलावं कळत नव्हतं.

जावयाला असं इतक्या दिवसांनी बघून तिची धावपळ झाली होती. गौराक्का साधारण पन्नास-पंचावन ची असावी. वयानुसार वजन वाढलेलं पण अंगातली चपळाई कमी झालेली नव्हती. घरी आल्या आल्या तिने पटापट ४-५ गोष्टी केल्या. उत्तमला बादलीभर पाणी , तांब्या आणि टॉवेल दिला आणि पटकन पाटलाना फोन लावला. 'आवं, जावैबापू आल्यात. व्हय, आत्ताच आल्यात. अकुंशबुवाच्या गाडीवर व्हतं. मी घेऊन आलोय त्यांना घरी. हां हां, बरं हाय. या तुम्ही मग.' तिने फोन ठेवून उत्तमला ओसरीवर बसायला सांगून बाहेर शेजारच्या मुलाला कनवटीचे पैसे काढून दिले,' जा चार अंडी घेऊन ये.' म्हणून त्याला पिटाळंलं. तोवर तिचा धाकटा मुलगा शाळेतून घरी आला होता. तिने त्याला आल्या-आल्याच सुनावलं, 'जा रे, अमरीताला घेऊन ये जा. पाव्हणे आलेत म्हणावं.'

ती बोलेपर्यंत उत्तमने ओसरीवरचा पुढारी चाळून झाला होता. येता- येता सासूला जे काही चार प्रश्न विचारू शकतो ते विचारून झाले होते. त्यामुळे घरी असं किती वेळ अवघडून बसायचं हे त्याला कळत नव्हतं. 'अम्या !' त्याने मेव्हण्याला हाक मारली. अम्या थांबला. 'चल मी पण येतो तुझ्याबर.' म्हणून उत्तम उठलाच. तो निघाल्यावर गौराक्काला पण जरा बरंच वाटलं. तिच्यावर त्याला कंटाळा न येऊ द्यायची नैतिक जबाबदारी नव्हती आता.

'काय म्हणताय अमितराव? कसा चाललाय अभ्यास? परीक्षा आली जवळ, पास होणार की नाही?'

'होनार तर ! चाचनी परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळालेत. बोरं खानार?' अम्याने खिशातून १५-२० बोरं काढून दाखवली. ते दोघेही मग बोरं चघळत निघाले. मध्येच अम्याने विचारलं,'तुम्ही ताईला न्यायला आलाय?' उत्तमने नुसतंच 'हम्म' केलं. आता त्याने लाख म्हटलं तरी ती तयार व्हायला पाहिजे ना? खरंतर उत्तमला कळत नव्हतं की तो कुठे चालला आहे पण अमरीला बघायची त्याला घाई झाली होती. ते शाळेजवळ येउन पोचले आणि अम्याने नजर इकडे तिकडे फिरवली. पटांगणावर २००-३०० मुलं होती आता त्यात अमरीला कुठे शोधणार? एका ठिकाणी १५-२० मुलं घोळका करून बसली होती आणि अमृता पण त्यांच्यासोबत होती. अम्या उत्तमला घेऊन तिच्यासमोर उभा राहिला आणि तिला एकदम धक्काच बसल. काय करावं, कसं बोलावं काही सुचत नव्हतं.

सहा महिन्यापूर्वी उत्तमचा डोक्यातल्या 'मला याच्यापेक्षा चांगली बायको मिळू शकते' विचाराने उचल खाल्ली होती. लग्नाला पण खूप काही वर्षं झाली होती असं नाही पण बी. एस्सी. बी. एड. झालेल्या मुलाला १२ वी पास थोडीच शोभते. अमृता दिसायला सुंदर होतीच त्यात पाटलांचा पैसा, शेवटी तो 'हो' म्हणालाच. कधी तिला रसायनशास्त्रातील गम्मत सांगावी, गणितातील कोडी सांगावी खूप वाटायचं त्याला. तिचा त्या गोष्टीतला नीरस त्याला दुखावयाचाच. कधी शाळा कॉलेजातल्या गोष्टी सांगायच्या तर तिचं जगच इतकं छोटं होतं की त्यात बाकी गोष्टींना जागाच नव्हती. एका छोट्या गोष्टीवरून झालेल्या वादातून सगळं वाढलच. अमृता घरी आली, एक आठवडा, दोन, चार सहा महिने होऊन गेले. पाटीलांनी प्रयत्न केला समजवण्याचा पण सर्व व्यर्थ. मुलीला घरी तरी किती दिवस ठेवणार म्हणून मग ती आंगणवाडीत जाऊ लागली मदतनीस म्हणून. मुलांसोबत तेव्हढाच विरंगुळा तिलाही. किती दिवस कुढत राहायचं?

शाळेत उत्तमला समोर बघून ती जरा कावरीबावरी झाली. तिने बाईंकडे बघितलं. त्यांनी खुणेनंच मान हलवली. अम्या मध्ये, एकीकडे ती आणि दुसरीकडे उत्तम अशी स्वारी परत घरी चालू लागली. आजूबाजूने बघणाऱ्या लोकांकडे बघून दोघेही थोडे अवघडले होते. बराच वेळ अम्याच बोलत राहीला. बोरीखाली आल्यावर एकदम अमृता आणि अम्या एकदम जोरात पळत सुटले आणि टपाटप बोरं वेचू लागले. एखाद्या बोरावर दोघांची नजर गेली तर भांडू लागले. शेवटी अम्याचे दोन्ही खिसे आणि तिचा पदर दोन्ही भरल्यावर दोघांनी वर पाहिले. उत्तम तसाच उभा होता. मग लाजून दोघांनीही हात पुढे केले. बोरं खाताना जरा अमृताच्या तोंडात शब्द आले.

ती, 'केव्हा आलासा?'

उत्तम,'आताच, अन्कुशबुवानी सोडलं गाडीवरनं'.

'आई काय म्हणत्यात? बराय ना सगळं?'

होय बरंच म्हणायचं. '

'शाळा कशी हाये?'

'चालूय. आता आठवीला शिकवतोय गणित. पोरं आगाव आहेत, जरा जोर द्यायला लागतोय शिकवताना. तुमी पन मास्तरीन झाला म्हणायचं की.'

अमृता लाजली. 'नाय, नुसतंच मदतीला जाते. ३-४ वर्षाची पोरं, त्यांना काय शिकवाय लागतंय व्हय.जरा फक्त खायचं, प्यायचं, रडू द्यायचं नाही इतकंच'

'आमच्या आठवीच्या पोरांपेक्षा हे काम अवघडच म्हनायचं तरी. आमची रडत तरी नायीत.'

हळूहळू अम्याला त्यांनी पुढं जाऊ दिलं. आणि त्यांची बोलणी चालूच राहिली. बोरं, चिंचा, ओढा, तिथं म्हशींवर जाणारी गौराक्का सगळ्या सगळ्या गप्पा झाल्या. संध्याकाळ कधी झाली हे दोघांनाही समजलं नाही. घर आलं तरी बोलणं सम्पेना.

'अमरे, किती वेळ गं? कव्हाशी वाट पाहतोय. ताट कर गं, पप्पा पन आल्यात बग. ' आईच्या खणखणीत आवाजानं अमृता भानावर आली. इतक्या दिवसांनी नवऱ्याशी बोलताना, पहिल्यांदाच चांगलं वाटत होतं, कुठेतरी एकमेकांना समजून घेतल्यासारखं. तिनं ताट करायला घेतली, कांदा चिरून घेतला पाटील आणि उत्तम जेवायाला बसले.

'काय म्हनताय उत्तमराव? बरं हाय न्हवं? ताईबाई काय म्हनत्यात? बराय सगळं?'

'होय, बराय.'

'शाळा काय म्हणतीय? पोरं बरी हायेत न्हवं?'

'बरी आहेत.' पाटलांसमोर त्याच्या तोंडातून शब्द काही फुटत नव्हते.

'आमची अमरी पन जातीय आता अंगनवाडीत.'

'हो पाहिलं मगाशी.' त्याने मिश्कीलपणे तिच्याकडे पाहिलं. त्याच्याकडे पाहत पटकन तिने पप्पा तर बघत नाहीयेत ना हे पण पाहून घेतलं.

'अगं, जरा ताटाकडे बघ की, पाव्हन्याना भाकरी वाढ.' गौराका भाकरी थापता थापता बोलली. जेवण झाल्यावर

बातम्या बघत दोघे बसले. प्रश्न काय आणि कुणी विंचारायचा हे कोडंच होतं.

शेवटी पाटील म्हणाले,'काय बेत मग तुमचा उत्तमराव? आजची रात्र थांबा इथेच. आज शेतावर पाणी आलंय त्यामुळं जावंच लागल. मी येईपतूर लई उशीर व्हुइल. सकाळी निवांत बोलुय. कसं?'

उत्तमने मान डोलावली. असेही या विषयावर काय बोलायचं हे त्यालाही समजत नव्हतं. पाटील बाहेर पडले आणि त्याने सुस्कारा सोडला . अम्याला चार गणितं सोडवून दिल्यावर तो बाहेर आला. अमृता दोन वह्या घेऊन बसली होती.

'हे काय म्हणायचं?' त्याने विचारलं.

'वर्गात काय लागेल ते सामान जमेल तसं नेते ना मीच. त्याचाच हिशेब हाये.'

तिच्या मन लावून हिशोब करण्याकडे तो बघत राहिला थोडा वेळ. तेव्हढ्यात त्याचा फोन वाजला.

मेसेज पाहून हळूच हसला तो. तिनं प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. त्याने तिला तो जोक दाखवला आणि मग तीही हसली जोरात.

'मी केला होता असाच विनोद तुला फोरवड.', उत्तम बोलला.

'कधी?' ती.

'मध्याच्या नंबर वरून केला होता.'

'काय नंबर हाये भौजींचा?' तिने विचारलं.

त्याने तिला नंबर सांगितल्यावर ती पळत आतून पप्पांचा फोन घेऊन आली. त्याच्यावर ५ - ६ मेसेज होते. तिने पटापटा ते वाचून पहिले आणि हसली, हसतच राहिली. त्याचे डोळे तिच्यावरून फिरले. केव्हढीशी ती! आधीच वयाच्या १८ व्या वर्षीच लग्न झालं त्यात हे असं माहेरी राहणं नशिबी आलेलं. थोडी बारीकच झाली होती ती आणि उगाचच पोक्त वाटत होती. पण हसणं अजूनही अवखळ.

'फोन कधी न्हायी केला ते? ' तिने एकदम विचारलं. तो कावराबावरा झाला.

'आता तुमच्या पप्पांचा फोन तो. माझी काय हिम्मत फोन लावायची? ' तो कसंतरी म्हणाला.

'बघू तुमचा फोन?' तिने विचारलं. 'काय प्लान हाये? पप्पांचा वोडाफोन हाय. ५० म्येसेज फ्री हायेत'.

मग तिनेही एक मेसेज त्याला दाखवला. तो हसला खळखळून.

'थांब तुला गम्मत दाखवतो', असं म्हणून त्याने एक गेम काढला. 'त्या गेम मध्ये साप कसा वाढत जातो हे त्याने तिला दाखवलं. मग तिला म्हणाला 'हे घे.' तिला काही ते जमेना सापाला पकडायला. मग तो आपल्याच शेपटीला टेकला की गेम संपला. मग ती हिरमुसली. हे बघ मी शिकवतो म्हणून त्याने तिच्यासोबत आपलीही बोटं लावली फोनला. त्याच्या स्पर्शाने ती एकदम बावरली. चटका लागल्यासारखी झाली. पण त्याची बोटं तिच्या बोटांवर पक्की बसली होती. सापासोबत तीही मग फिरू लागली, तिचं लक्ष फोनवर कमी आणि त्याच्याकडे जास्त होतं. तोही गेल्या काही दिवसांत वाळला होता. त्याचे डोळे थोडे खोल गेले होते. एरवी दिसणारा तजेला कमी झाला होता. मधेच साप तुटला आणि त्याच्या आवाजाने ती परत फोनवर लागली. मग तिने आपल्या अंगणवाडीतील पोरांच्या गोष्टी सांगितल्या. एका रडक्या मुलाने तिलाच कसे रडवले त्याचीही. मग त्याच्या गोष्टी, आठवीतल्या मुलांच्या. किती त्रास देतात, 'मी पण काही कमी नाही' या आवेशातल्या त्याच्या यशगाथा.

बोलता बोलता त्याने तिचा हात हातात घेतला. म्हटला,'चुकलंच माझं. लोकांच्या बोलण्याला मीही बळी पडलो. मीच किती भारी म्हणून विचार करत होतो. मागच्या महिन्यात शेजारच्या मावशीनी सांगितलं तू अंगणवाडीत जातेस म्हणून. वाटलं मी इतका शिकून पण छोटाच राहिलो तू मात्र आहे त्यातून मार्ग काढून पुढे जात राहिलीस. बरेच दिवस हिम्मत होत नव्हती यायची. येताना आक्की पण होतीच आडवायला. शेवटी आज ठरवलंच जायचं म्हणून तुला भेटायला. तुला शाळेत पाहिलं, छान वाटलं एकदम.'

'मी पन हट्टानेच आलो की घरी. वाटलं तुम्ही याल म्हनून. आई-बाप हायेतच मदतीला. पन स्वत:च सर्व आपनच करावं लागतं. शिकावं-सावरावं लागतं. हे शाळेत जायला लागल्यापास्न तुमची लई आठवन काढली, तुम्ही काय बोलत व्हतात ते सगलं आठवलं. मग मन लावून काम करायचं ठरवलं.'

तिच्या खांद्यावर हात टाकून तो तिला जवळ ओढून म्हणाला,',मग मास्तरीणबाई तुम्ही, जमणारच सगळं तुम्हाला.'

तीही त्याच्या खांद्यावर डोकं टेकून विसावली होती, विश्वासाने, प्रेमाने. त्याच्या डोक्यात मित्राचे शब्द घोळवत होते,' अरे बायको कमी शिकली तरी काय झालं? पोरं झाली ना मग बास. त्यांना किती शिकवायचं हे तुझ्याच हातात हाये की?'

-विद्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलेय.

डोळ्यासमोर सगळा गाव, ती म्हैस, बोरीच झाड, रात्री गप्पा मारणारे ते दोघे ... सहीच वाटल सगळ वाचून.
मलापण माडगुळकरांच्या व्यक्तीचित्रांची आठवण झाली.

किती छान गोष्ट आहे..लग्नानंतरच पहील भांडण..पहीला अबोला..पहीली तगमग..सगळच खुप गोड आणि आयुष्यभर जपुन ठेवण्यासारख असत! तुमच्या गोष्टीतुन खुप छान रित्या साकार झालय हे सगळ.
झक्की+१

सहज सुंदर कथा ..... लेखन शैलीही छानच

पण शीर्षक मात्र कथेतील ग्रामीण बाजाला अगदीच विसंगत (वैयक्तिक मत)

छान Happy

मी तसा तिथे पाहुणाच असल्याने एखाद्या मताला विरोध करायचाच झाला तर सौम्य भाषा वापरावी लागत असे. पण मतभेदाचे काही प्रकार तर मस्तकात तिडीक उभी करत..... फार कमी लेखत असत स्त्री आणि स्त्री शिक्षणाला काही ठिकाणी.....पण हल्ली मात्र हा प्रकार खूपच कमी झाल्याचे आशादायक चित्र दिसत आहे.>> अशोकजी अगदी अगदी...

पण अजूनही पायातली वहाण वगैरे सर्रास वापरलं जातं.... ते फार डोक्यात जायचं... हॉस्टेलला राहणारी आणि पुण्यामुंबईकडून आलेली मुलगी म्हणजे ती काय लायकीची मुलगी असेल हे त्यांच्या कुजबुजत्या टिप्पणींतून आणि हास्याच्या फवार्‍यातून वेळोवेळी जाणवून यायचं... असो... देश तसा वेश घ्यावा हेच खरे.

विद्या विषयांतराबद्दल क्षमस्व!

ड्रीमगर्ल ~ हे तुम्ही अगदी बरोबर टिपलं आहे की हॉस्टेलला राहणारी आणि पुण्यामुंबईकडून आलेली मुलगी म्हणजे आपल्याकडील तीन जिल्ह्यात तिच्याकडे बघताना कायम डाव्या डोळ्यानेच पाह्यचे [आजही पाहात असतील]. माझ्या नात्यातील एक मुलीचे लग्न तर ती एम.ए. साठी विद्यापीठाच्या हॉस्टेलवर राहात होती या कारणावरून मुलाच्या चुलत्यानेच नव्हे तर खुद्द मुलानेही नाकारले होते.....आणि दुर्दैव म्हणजे त्या मुलाचे स्थळ मी सुचविले होते कारण राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात त्याला 'उत्कृष्ट स्वयंसेवक' म्हणून पारितोषिक मिळाले होते. पण प्रत्यक्ष व्यवहारात मात्र हा नर्मदेतील गोटाच राहिला होता....अशी सारी परिस्थिती आहे; आपल्याकडील मुलींची, निदान लग्नाच्याबाबतीत.

विद्या भुतकर यांच्या मनीही ही कथा लिहिताना हे विचार नक्कीच असणार कारण मला वाटते त्याही मूळच्या ग्रामीण भागातीलच असतील. रहिमतपूर कासेगाव ह्या सातारा जिल्ह्यातील गावांचा कथेत उल्लेख करतात....त्याना तिथल्या मुलींची सामाजिक अवस्था माहीत असणारच....त्यामुळे ही चर्चा बिलकुल विषयांतर नाही.

@ झक्की ~ भारतातील मोबाईल वापराचा मुद्दा तुम्हाला पटला हे वाचून समाधान झाले.

अशोक पाटील

शिक्षणाचा आणि संसाराचा नेहमीच संबंध असतो का? मुली शिकत नाही याची बरीच कारणे असतीलही, पण केवळ शिक्षणानेच एखाद्या व्यक्तीची किंमत करावी हे चुकीचे वाटते. त्यामुळे केवळ १२वी पास बायको आहे, याचं वाईट वाटणारा शिकलेला म्हणावा का १२ वी शिकलेली?

खुपच चांगली कथा. पुलेशु.

तुमच्या लघुकथाही येऊ द्या इथे.

बाप रे ! दोन दिवसात इतके प्रतिसाद ! Happy हे प्रतिसाद पाहून खूपच छान वाटत आहे. प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. माझ्या काही जुन्या कथा माझ्या ब्लॉगवर वाचायला मिळतील, http://vidyabhutkar.blogspot.com येथे.
या पुढे नवीन कथा इथे नक्किच पोस्ट करत जाईन.
अशोक सर, मी कोरेगावचीच आहे. Happy

विद्या.

सुरेख.............
काही नवर्‍यांना बायकोचा इतका कमीपणा का वाटतो तेच कळत नाही................???
पु.ले.शु.

Pages