शिव श्रावण आणि आपण

Submitted by अनिल तापकीर on 13 August, 2013 - 09:24

नमस्कार सज्जनहो, सध्या श्रावण महिना चालू आहे सर्व साधकांसाठी पर्वकालच जणू या महिन्यात कुठल्याही देवतेची केलेली साधना अधिक फलदायी असते. परंतु त्यातल्या त्यात हा श्रावण महिना भगवान शिवशंकरासाठी खूपच महत्वाचा मानला जातो .
नेहमी म्हणजे रोजच्या जीवनात प्रत्येकजण 'जो आस्तिक आहे तो' सकाळी स्नानानंतर पूजा जमली नाही तर देवाला नुसता नमस्कार का होईना करूनच घराच्या बाहेर पडतो.
परंतु श्रावण महिन्यात प्रत्येकाच्या या कृतीत जास्त सुधारणा होत असते. म्हणजे उपवास किंवा ठराविक दिवशी देवाला जाऊन येणे आदी. जमले तर एखाद्या सद्ग्रंथाचे वाचन आणि दिवसातून जमेल तसे देवाचे नामस्मरण अश्या गोष्टी आपोआपच होतात.
भगवान शंकराचा आवडता असा हा श्रावण म्हणजे तृप्तता परिपूर्णता आणि समाधान याचा सुरेख मेळ असलेला आहे. धरणीमाता वरुणराजाच्या आगमनाने तृप्त झालेली असते. शिवाय झाडे, वेली, शेतातील पिके परिपूर्णतेच्या अवस्थेत असतात. आणि सर्व जीव त्यामुळे समाधानी असतात. आणि साधना हि मन जेव्हा समाधानी असते तेव्हा खूप चांगली होते. म्हणूनच श्रावण महिना भक्तीसाठी विशेष ठरला जातो.
भगवान शिव, एकांतप्रिय, सतत ध्यानमग्न, भक्तांवर कृपेचा वर्षाव करणारे आणि संपूर्ण विश्वाकरिता स्वत हलाहल प्राशन करून विश्वाला परोपकाराचा मार्ग दाखविणारे आहेत. देवादिदेव महादेव असूनही पर्वतावर एकांतात रमणारे स्मशानात जाऊन अंगाला राख फासणारे आणि मूर्तिमंत वैराग्य काय असते त्याचे उदाहरण म्हणजे भगवान शिव.
आजच्या धकाधकीच्या जीवनात शांती, स्वास्थ्य, समाधान हरविले आहे. भगवान शंकराच्या आचरणाकडे पहिले तर आपल्याला नक्कीच शांती समाधानाचा मार्ग सापडू शकतो .

आज या स्पर्धेच्या युगात जो तो नुसता धावत सुटला आहे. स्वताच्या नावलौकिकासाठी आणि पैसा कमाविण्यासाठी काहीही करत आहे. जो तो सुसाट सुटला आहे. आपली हि सुसाट धाव केव्हा थांबणार आहे कुणास ठाऊक?आणि याच्यातून नक्की काय साध्य करायचे हेही माहित नाही.
*इथे भगवान शिवांचा विचार केला तर अष्टमहासिद्धी, सर्व देव, यक्ष,किन्नर ,गंधर्व आणि गण हे सर्व दारात सेवेसाठी उभे असूनही भगवान शिव जे वैराग्यपूर्ण जीवन व्यतीत करतात ते विचार करण्यासारखे आहे. आणि आपणसुद्धा विचार करून त्यातून काही घेण्यासारखे आहे का हे बघायला हवे .

*भगवान शंकरांची एकांतप्रियता यावर सुद्धा आपण विचार करायला हवा. आजच्या स्पर्धेच्या युगातील मानव किती मिनिटे एकांतात घालवतो.? जर एखाद्याला विचारले कि तुम्ही किती वेळ एकांतासाठी घालविता, तर तो म्हणेन -अरे बाबा ह्या काय एकांताच्या गोष्टी करतोस इथे जेवलो तर हात धुवायला वेळ नसतो.

*भगवान शिवाची ध्यानमग्न अवस्था आपल्याला हे तर सुचवत नसेल ना? कि बाबा दिवसभर खूप धावपळ केलीस आता जर पाच मिनिटे का होईना पण एका जागी डोळे मिटून शांत बस आणि काही दिवसांनी तुझ्यातील बदल बघ.

* भगवान शिव सतत भक्तांवर कृपेचा वर्षाव करतात त्यातून त्यांना हे सुचवायचे असेल कि आपल्यापेक्ष्या (आपण जो कोणी आता आहे तो ) कमी गरीब दुर्बल आहेत त्यांच्यावर मदतीचा वर्षाव करा. मग बघा तुमच्या जीवनात किती फरक पडतो ते. दिनदुबळ्यांच्या अडी अडचणीमध्ये मदत करा त्यांच्या दुखात सहभागी होऊन त्यांचे दुख:कमी करण्याचा प्रयत्न करा. हे त्यांनी हलाहल प्राशन करून दाखवून दिले आहे.

एकंदरीत काय तर श्रावणात धरणीमातेने , निसर्गाने, ईश्वराने जे काही भरभरून दिले आहे त्याची प्रत्येकाने जान ठेवली पाहिजे कितीही धावपळीचे जीवन जगात असलो तरी दिवसातून पाच दहा मिनिटे का होईना शांत डोळे मिटून विचार न करता बसले पाहिजे. प्रसिद्धी ,पैसा यांच्यामागे न लागता अंती काय साध्य करणार आहोत याचा विचार करायला हवा. आणि विचार करूनही उत्तर सापडले नाही तर ज्ञानेश्वरी गीता वाचा समजून घ्या कारण तिच्यामध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. आणि एकदा का तुमचे सर्व प्रश्न संपले कि मग जीवन किती सुंदर आहे हे समजेल . आणि त्याबरोबर सर्वच महिने श्रावणासारखे सुंदर, परिपूर्ण शांतता समाधान देणारे असतील.
भगवंताच्या साधनेसाठी वेळ काळाचे, दिस मासाचे , व अन्य कसलेही बंधन नाही.
"जीवाचे शिवात एकरूप होणे हाच तर खरा जीवनाचा हेतू असतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users