तुक्याचा बोल - ४

Submitted by समीर चव्हाण on 24 July, 2013 - 00:35

संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, डॉ. समीर,
खूप सुंदर अभंग सादर केलेत.

लटिके अभंगाबद्दल - सर्वच संत या जगाबद्दल असेच बोलताना/सांगताना दिसतात.
आदि शंकराचार्य - भ्रमेणं अहं पासून भ्रममूल इदं जगत
अरे जे झालेचि नाही | तयाचि वार्ता पुससी कायी | - समर्थ.

तुका म्हणे जाण, सुख दु:ख ते समान >>> हा योगीच किंवा स्थितप्रज्ञच. अशी मंडळी सोडली तर सर्वसाधारण लोक सुखाच्या मागे जीव तोडून धावतात व दु:ख नकोच म्हणून आक्रोश करतात/ दु:खापासून लांब पळू इच्छितात. योगी काहीच करीत नाही - दोन्ही ठिकाणी तो समत्व भावानेच रहातो.

दुडीवर दुडी चाले मोकळी गुजरी >>> हे फार सुंदर उदाहरण तुकोबांनी दिलेले आहे. आपल्या डोक्यावर पाण्याचे एकावर एक हंडे घेऊन ही स्त्री चाललेली आहे, हाताला मूल आहे, आजूबाजूला असलेल्या सख्यांशी बोलत आहे - पण मुख्य लक्ष आहे त्या हंड्यांवर -एवढ्या लांबून पाणी आणायचे मग ते किती सांभाळून आणावे लागत असेल. असेच माझेही लक्ष तुझ्याकडेच लागलेले राहो - या प्रपंचाच्या गडबडीतही तुझे सूक्ष्म अनुसंधान माझ्याठिकाणी असू देत.
सर्व संत आपल्याला हीच शिकवण देतात-
संसार त्याग न करिता | प्रपंच उपाधी न सांडिता | जनामधे सार्थकता | विचारेचि होय || समर्थ.

अवांतर - चु भू दे घे
बिजवर - पहिले लग्न होऊन गेलेला
येरयेरा - एकमेका
येरु - हा / तो

व्वा, आणखी एक सुंदर लेख.

बीजवर बद्दल शशांक ह्यांच्याशी सहमत! कवितेत तसाही अर्थ घेतला तरी चालण्याजोगेच आहे.

धन्यवाद शंशाकजी आणि विजय.
बीजवर बद्दल सहमत.
आपण सांगितलेला अर्थ अधिक योग्य वाटतोय. तसा बदल केलाय.
शशांकजी आपले भाष्य आवडले.

समीर

नव्हे जोखाई जोखाई मायाराणी मेसाबाई
बळिया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव >>>> सर्व संत यावर फार परखड विचार व्यक्त करतात.
समर्थ अशा दैवतांना हेंदरी दैवते म्हणतात -
देवशोधन या समासात समर्थांनी देवाची नेमकी व्याख्या केलेली आहे -

जें शस्त्रें तोडितां तुटेना | जें पावकें जाळितां जळेना |
जें कालवितां कालवेना | आपेंकरूनी ||१६||
जें वायूचेनि उडेना | जें पडेना ना झडेना |
जें घडेना ना दडेना | परब्रह्म तें ||१७||
ज्यासि वर्णचि नसे | जें सर्वांहूनि अनारिसें |
परंतु असतचि असे | सर्वकाळ ||१८||
दिसेना तरी काय जालें | परंतु तें सर्वत्र संचलें |
सूक्ष्मचि कोंदाटलें | जेथें तेथें ||१९||
दृष्टीस लागली सवे | जें दिसेल तेंचि पहावें |
परंतु गुज तें जाणावें | गौप्य आहे ||२०||
प्रगट तें जाणावें असार | आणि गुप्त तें जाणावें सार |
सद्गुरुमुखें हा विचार | उमजों लागे ||२१||
उमजेना तें उमजावें | दिसेना तें पहावें |
जें कळेना तें जाणावें | विवेकबळें ||२२||
गुप्त तेंचि प्रगटवावें | असाध्य तेंचि साधावें |
कानडेंचि अभ्यासावें | सावकाश ||२३||
वेद विरंचि आणि शेष | जेथें शिणले निःशेष |
तेंचि साधावें विशेष | परब्रह्म तें ||२४||
तरी तें कोणेपरी साधावें | तेंचि बोलिलें स्वभावें |
अध्यात्मश्रवणें पावावें | परब्रह्म तें ||२५||
पृथ्वी नव्हे आप नव्हे | तेज नव्हे वायु नव्हे |
वर्णवेक्त ऐसें नव्हे | अव्यक्त तें ||२६||
तयास म्हणावें देव | वरकड लोकांचा स्वभाव |
जितुके गांव तितुके देव | जनांकारणें ||२७||
ऐसा देवाचा निश्चयो जाला | देव निर्गुण प्रत्यया आला |
आतां आपणचि आपला | शोध घ्यावा ||२८||

मुख्य देव हा निर्गुण, निराकार असून सर्वसामान्य लोक प्रपंचातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जी दैवते पुजतात त्याला अनुलक्षून हा अभंग आहे. एवढेच काय पण सकाम बुद्धीने पांडुरंगाची भक्ति करणेही संतांना मान्य नाही.

आधीं अध्यात्मश्रवण | मग सद्गुरुपादसेवन |
पुढें आत्मनिवेदन | सद्गुरुप्रसादें ||४०||
आत्मनिवेदनाउपरी | निखळ वस्तु निरंतरी |
आपण आत्मा हा अंतरीं | बोध जाहला ||४१||
त्या ब्रह्मबोधें ब्रह्मचि जाला | संसारखेद तो उडाला |
देह प्रारब्धीं टाकिला | सावकाश ||४२||
यासि म्हणिजे आत्मज्ञान | येणें पाविजे समाधान |
परब्रह्मीं अभिन्न | भक्तचि जाहला ||४३||
अशाप्रकारे समर्थ या समासाचा शेवट करतात. समर्थ, तुकोबा, ज्ञानोबा यासारखे सर्व संत आत्मज्ञान, समाधान याकरताच भक्ति करताना दिसतात.

समीर ,तुकाराम वाचणे,अभ्यासने त्याचा आनंद घेणे. या सारखे सुख नाही.तुम्ही ते घेत आहात आणि देत आहात.भाग्यवान आहात .
शशांक त्याच मार्गातील कापडी आहे , सुंदर शशांक !

शशांकजी:

आपण दिलेले उर्वरित दोन अर्थ तपासले.
शब्दांसाठी माझे मुख्य संदर्भ मोल्सवर्थ, खाप्रे, आणि नरहरि पणशीकर ह्यांचे शब्दकोश आहेत.
येरु चा चुकीचा अर्थ मी नक्की कुठून घेतला आठवत नाही. चूक सुधारलीय.
तर येरयेरा चे मोल्सवर्थ मध्ये दोन अर्थ दिलेत एक आपण सांगितलेला आणि एक माझ्या अर्थाच्या जवळ जाणारा. दोन्ही दिलेत.

मनापासून धन्यवाद.
विक्रांतजी आपलेही आभार.

'लटिके' खूपच सुंदर अन वैशिष्ट्यपूर्ण.
लटिका तुका लटिक्या भावे
लटिकें बोले लटिक्यासवे
येथे 'सर्वच माया' या विचाराचा लॉजिकल शेवट म्हणून तुकाही लटिका , त्याचे संवादणे लटिके, अन ज्याच्याशी संवादणे तो ईश्वरही लटिकाच इथपर्यंत जाऊन भक्तीभावनेचाही विलय एकाकारतेत केलेला जाणवतो.

सगळ्यांचे मनापासून आभार.
भारतीजी, आपले इन्टरप्रिटेशन फार फार भावले.

धन्यवाद.

आहा... सुंदर विवेचन, समीर. केवळ अप्रतिम आहेत हे लेख.
जोवर द्वैत आहे तोवर सारं लटिकंच आहे... भक्तंही लटिका, भाव लटिका, देवही लटिकाच.
ज्याक्षणी द्वैत संपलं त्याक्षणी... नुस्तच "आहे"!!!... इथेच सारं सुरू होतं अन संपतंही.

तुकारामांच्या अभंगांना कुणी कालाच्या अक्षावर रेखलं असतं तर?.. तर एका भागवताचा ऐहिक ते पारमार्थिक ... असा प्रवास ध्यानी आला असता नाही? कुणी केलय हे काम?

दाद,
मनापासून आभार.

तुकारामांच्या अभंगांना कुणी कालाच्या अक्षावर रेखलं असतं तर?.. तर एका भागवताचा ऐहिक ते पारमार्थिक ... असा प्रवास ध्यानी आला असता नाही? कुणी केलय हे काम?

अगोदरचा प्रतिसाद संपादित करीत आहे. वरील मत/प्रश्न समजून घेण्यात चूक झाली. वैभवचे धन्यवाद.
तुकारामाच्या अभंगांची काळानुसार (समाधानकारक) मांडणी माझ्या मते उपलब्ध नसावी.
विषयाला अनुसरून अनेकांनी केली आहे. त्यातून तुकारामाची वैचारिक जडण-घडण, त्याचा कवी म्हणून प्रवास स्पष्ट होत असला तरी गाथा वाचताना अधूनमधून अडखळल्यासारखं होतं.
इतरांची मते समजून घ्यायला नक्कीच आवडेल.

समीर

व्वा, अस अर्थ अन विश्लेषणासहित वाचायला मस्त वाटते Happy
धन्यवाद.

लटिका चा अजुन एक अर्थ "अपुरा/अर्धा" असा काहिसा होतो का? तसा होत असेल, वा तशा अर्थाने तो शब्द घेतला, तर एकुणात अर्थ भलतीच उंची गाठतो.

दुडीवर दुडी चाले मोकळी गुजरी >>> हे फार सुंदर उदाहरण तुकोबांनी दिलेले आहे. >>>> असेच माझेही लक्ष तुझ्याकडेच लागलेले राहो - या प्रपंचाच्या गडबडीतही तुझे सूक्ष्म अनुसंधान माझ्याठिकाणी असू देत. <<<<<
मस्त Happy अगदी कुणालाही सहज समजुन घेऊन आचरणात आणता येईल असे उदाहरण अन अशी कृती! Happy

लटिका चा अजुन एक अर्थ "अपुरा/अर्धा" असा काहिसा होतो का?

माझ्या वाचण्यात तरी नाही.
प्रतिसादांसाठी धन्यवाद.

लिंबू, लटीका म्हणजे भासमय. म्हणजे खरे आहे असे भासवणे पण तसे नसणे. 'खोटे' याहून ही अर्थछटा थोडीशी निराळी आहे. नीट न पाहिल्यास लटकी गोष्ट खरी वाटू शकते.

ज्ञानप्राप्तीचे एकमेव साधन म्हणजे आपली बुद्धी. पण तिला पण मर्यादा आहेत. शिवाय बुद्धी ज्यांच्या मार्फत माहिती मिळवते ती ज्ञानेंद्रिये पक्की मायेची गुलाम आहेत. त्यामुळे बुद्धीने कितीही सारासार-विवेक केला तरीही तो पूर्ण सत्य होऊ शकत नाही. त्यामुळे सहाजीकच तिच्या कर्मेंद्रियांना जाणार्‍या आज्ञा आणि त्यांची त्यानुसार होणारी कार्ये यातही असत्याचा अंश उरतोच. पण ते सगळे पूर्ण असत्य पण नसते.

लटीका म्हणजे भासमय. म्हणजे खरे आहे असे भासवणे पण तसे नसणे. 'खोटे' याहून ही अर्थछटा थोडीशी निराळी आहे. नीट न पाहिल्यास लटकी गोष्ट खरी वाटू शकते. >>>> हा अर्थ खूपच बरोबर वाटतोय ......

मला मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास हा अभंग हवा आहे तसेच विंचु आला देव्हार्‍यापाशी देवपुजा न आवडे त्यासी हा अभंग हवा आहे तो कोठे मिळेल ते कळू शकेल का?

मला खालच्या अभंगाचा अर्थ सांगाल?
"पाया जाला नारू । तेथें बांधला कापूरु ।
तेथें बिबव्याचें काम । अधमासि तों अधम ॥1॥
रुसला गुलाम । धणी करीतो सलाम ।
तेथें चाकराचें काम । अधमासि तों अधम ॥ध्रु.॥
रुसली घरची दासी । धणी समजावी तियेसि ।
तेथें बटकीचें काम। अधमासि तों अधम ॥2॥
देव्हा†यावरि विंचू आला । देवपूजा नावडे त्याला ।
तेथें पैजारेचें काम । अधमासि तों अधम ॥3॥
तुका ह्मणे जाती । जातीसाटीं खाती माती ॥4॥"

मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास | कठीण वज्रास भेदू ऐसे |
मेले जित असो निजोनिया जागे | जो जो जे जे मागे ते ते देऊ |
भले तरि देउ गांडीची लंगोटी | नाठाळाच्या काठी देऊ माथा |
मायबापाहुनि बहु मायवंत | करु घातपात शत्रुहुनि |
अमृत ते काय गोड आम्हापुढे | विष ते बापुडे कडू किती |
तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड | ज्याचे पुरे कोड त्याचेपरी || ९८१ -अभंगगाथा ||

विंचु आला देव्हार्‍यापाशी देवपुजा न आवडे त्यासी >>> हा अभंग तुम्हीच वरती व्यवस्थित दिलाय की ...

पाया जाला नारू । तेथें बांधला कापूरु ।
तेथें बिबव्याचें काम । अधमासि तों अधम ॥1॥
रुसला गुलाम । धणी करीतो सलाम ।
तेथें चाकराचें काम । अधमासि तों अधम ॥ध्रु.॥
रुसली घरची दासी । धणी समजावी तियेसि ।
तेथें बटकीचें काम। अधमासि तों अधम ॥2॥
देव्हा†यावरि विंचू आला । देवपूजा नावडे त्याला ।
तेथें पैजारेचें काम । अधमासि तों अधम ॥3॥
तुका ह्मणे जाती । जातीसाटीं खाती माती ॥4॥

प्रयत्न करतो. अधमासि तो अधम मला काट्याने काटा काढणे सारखे वाटते.
पायाला नारु (एक रोग) झाला. कापूर बांधल्याने काय होणार (कापूर चोळल्याने नासतो असेही दिसून आले).
अश्यात बिब्ब्याची (एक औषधी फळ) भूमिका आहे. बिब्ब्याचे इतर प्रचलित अर्थ (बिब्बा घालणे) कामात हरकत आणणे अश्या अर्थाचे. इथे नारु जसा अधम तसा त्याला आवरणारा बिब्बाही अधम. अधमासाठी अधमच हवा.
इतर ओळींचा अर्थ असाच लावता येईल.
शेवटची ओळ फारच अर्थपूर्ण आहे. खरंतर पूर्ण कवितेचा निष्कर्ष आहे:
तुका ह्मणे जाती । जातीसाटीं खाती माती
जाती म्हणजे विशिष्ट गुणधर्माचा.
काही शब्दार्थ अडल्यास खाप्रे किंवा मोल्सवर्थ पहाल.
तरीही अडचण आल्यास कळवाल.

धंन्यवाद समीर पण खालच्या ओळीन मध्ये काय अर्थ दडला आहे ते कळेल का?

रुसला गुलाम । धणी करीतो सलाम ।
तेथें चाकराचें काम । अधमासि तों अधम ॥ध्रु.॥
रुसली घरची दासी । धणी समजावी तियेसि ।
तेथें बटकीचें काम। अधमासि तों अधम ॥2॥

रुसला गुलाम । धणी करीतो सलाम ।
तेथें चाकराचें काम । अधमासि तों अधम ॥ध्रु.॥
रुसली घरची दासी । धणी समजावी तियेसि ।
तेथें बटकीचें काम। अधमासि तों अधम ॥2॥

मला वाटलं अर्थ स्पष्ट आहे. म्हणून दिला नाही.
असो, गुलाम रुसलाय, काम व्हावे म्हणून मालक तडजोड करतो (सलाम करतो हा उपहास झाला).
गुलामाला वठणीवर आणण्याचे काम मालकाच्या हाताबाहेरचे आहे. तिथे दुसरा चाकरच हवा.
अशी म्हण आहे, चाकराला भाई बटीक बटिकीला समजावी
पुढच्या दोन ओळी समांतर आहेत गुलामा ऐवजी दासी आणि चाकरा ऐवजी बटकी, तेवढाच काय तो फरक.
तरीही शंका असल्यास कळवावे.
तुकारामाच्या ओवी समजण्यासाठी तुम्ही जो इन्टरेस्ट दाखवला. फार आनंद झाला.

समीर

धंन्यवाद समीर
आता शेवटचीच तसदी देतोय या खालच्या ओळीनंचा अर्थ काय आहे

साधुनी बचनाग खती तोळा तोळा । आणिकाने डोळे न पाहवे ।
साधुनी भुजंग धरितिल हाती । आणिके कापती देखोनिया ।
असाध्यते साध्य सायस । कारण अभ्यास तुका म्हणे ।

साधुनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकाते डोळा न पाहवे ।
साधुनी भुजंग धरितिल हाती । आणिके कापती देखोनिया ।
असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।

आपण दिलेल्या ओवीत काही टायपोज होते. ते वर बरोबर केलेत.
बहुतेक ओव्यांमधे शेवटाला तुकाराम पूर्ण ओवीचा सार सांगतो.
इथेही तसेच आहे. अभ्यास केला तर मोठ्या कष्टाने असाध्य वाटणारे साध्य होते, असे तो म्हणतो.
ही गोष्ट उदाहरणाने समजावून सांगत आहे.
बचनाग हे एक विषारी झाड असते.
बचनागाची मुळे विषारी असली तरी त्याचा औषधात वापर होतो.
असो, तुकाराम म्हणतो जिथे सामान्य लोक बचनागाला टाळतात तिथे साधक हे विष रिचवण्याचे सामर्थ्य साधनेने राखतात.
पुढे तो म्हणतो, गारुडी (साधक) परिश्रमाने भुजंग (कोब्रा) ताब्यात करतो तर आम लोक भुजंगाला पाहून थरथर कापतात.

धन्यवाद.

असाध्य ते साध्य । करिता सायास । कारण अभ्यास । तुका म्हणे ।।

मी ही ओवी कुठेतरी अशी ऐकल्याचे स्मरते व शिवाय ह्या ओवीत करिता हा वाक्य पूर्ण करण्यासाठीचा व लयीसाठी छंदासाठी आवश्यक शब्द तुकाराम विसरेलच कसा असा प्रशनही माझ्या बुद्धीला पडतो

ह्या पेक्षा महत्त्वाचे जे ..या वरून लक्षात आले की अश्या प्रकारे जुन्या संतांच्या हस्तलिखित रचना हल्ली उपलब्ध असलेल्या छापील ग्रंथांमधून मूळ ओळी जश्या आहेत तश्या न येण्याची /अपभ्रंश इत्यादी होवून येण्याची किती शक्यता आहे नै !!!!
इतक्या जुन्या काळी संतांनी लिहून ठेवलेले त्यात काळाच्या प्रवाहात /तडाख्यात काही बदल झाले असतील काय ??