अनवट आशा

Submitted by दिनेश. on 19 June, 2013 - 10:56

अनवट हा शब्द सहसा अप्रचलित रागांसाठी वापरतात. गुणक्री, रायश कानडा असे काही राग आपण नियमित
ऐकत नाही, आणि त्या रागांतील रचना कानावर पडल्या तर काही खास ऐकतोय असे वाटते.

पं. मालिनी राजूरकरांचे "चाल पहचानी", जयमाला शिलेदारांचे " कोपला का ", रामदास कामतांचे "संगीतरस सुरस" अशा काही रचना ऐकल्या, कि असेच हरखून जायला होते.

पण आपली आशा ( आशा भोसले, आपलीच ती ) पण काही कमी नाही. पण होतं काय, अशा अवघड रचना ती
इतक्या सहजतेने गाते कि आपल्याला वाटतं, फारच सोप्प आहे कि हे, पण ज्यावेळी आपण गुणगुणायला जातो
त्यावेळी मात्र, त्यातले अनवटपण जाणवते. तर अशा काही रचना, मला आठवतात त्या. आणि अर्थातच
तूम्हाला ज्या आठवतील, त्या तूम्ही लिहायच्याच आहेत.

१) सुकतातची जगी या

दिनानाथ मंगेशकरांचे हे नाट्यगीत, आशांनी गायलेय. दिनानाथ त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात कसे गात
असावेत, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. पण आशाने मात्र ती चमकदार गायकी, अशी काही
सादर केलीय, कि ज्याचे नाव ते. खरं तर तिला थेट तालिम फारशी मिळालीच नसावी. तिच्या अंगात आहेत
ते अलौकिक कलागूण. शिवाय तिचे स्पष्ट शब्दोच्चार. गाण्यातला प्रत्येक शब्द लिहून घ्यावा, असे खणखणीत.

२) बाई गं माझ्या पायाला बांधलाय भवरा

आनंदघन म्हणजेच लताच्या संगीतात, आशाने गायलेली हि लावणी. ( चित्रपट बहुतेक मराठा तितुका मेळवावा )
गुलजार गुलछडी
नटुनी मी खडी खडी
नाचते मी घडीघडी
करते नखरा नखरा
बाई गं माझ्या पायाला
बांधलाय भवरा

असे काहीसे शब्द आहेत. या लावणीत भिर्रर्रर्रर्र........................... अशी एक लांबलचक भिरभिरणारी तान
तिने घेतलीय. ती तानच काय तेवढा दमसासही आपल्याला अवघड आहे. पडद्यावर नर्गिस बानू आहे,
पण तिलाही ही तान अवघड गेलीय. आणि याच गाण्याबाबत नव्हे तर इथे लिहितोय त्या सर्वच
गाण्यांच्या बाबतीत खरे आहे, कि या गाण्यांचा वाटेला नंतर कुणी गेलेलं मी ऐकलेले नाही.

३) देव नाही जेवलेला

धर्मकन्या हा हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत असलेला एक चित्रपट. "सखी गं मुरली मोहन मोही मना,"
हे गाणे त्यातले ( पडद्यावर जयश्री टी. ) हे गाणे जरा नेहमीच्या ऐकण्यातले म्हणून परिचित. पण
त्यातली ग या अक्षरावर घेतलेली तान, भल्या भल्या गायिकांना जमणारी नाही. याच चित्रपटात
"पैठणी बिलगून म्हणते मला, जानकी वनवास गं संपला" अशी पण रचना आहे. तीदेखील आशानेच
गायलीय. ( पदद्यावर अनुपमा ) तीसुद्धा सुंदर आहेच. पण सरताज अशी रचना आहे ती, "देव नाही झोपलेला"
सगळ्यांच्या भुकेची जबाबदारी घेतलेला तो देव, आपल्याला उपाशी ठेवून झोपलेला नाही, तर रात्रीच्या अंधारात
तो आपली झोपडी शोधतोय, अशा भावार्थाचे हे गाणे, ऐकल्यावर अक्षरश: भान हरपते. इतके आर्त गाणे
असूनही त्याचे कुठेही रडगाणे झालेले नाही ( तूलना गैर आहे, पण लताने "अम्मा रोटी दे, बाबा रोटी दे" या
गाण्याचे रडगाणे केलेले आहे. ) उलट देवावरची अढळ निष्ठाच त्यात दिसते.

४) कवडसा चांदाचा पडला

जिद्द या नावाचा एक मराठी चित्रपट आला होता. श्रीराम लागू, जयश्री गडकर, उषा चव्हाण, संजय जोग
असे कलाकार होते. पण वरची लावणी, उषा चव्हाणवर नव्हे तर सहनायिका, संजीवनी बीडकरवर चित्रीत झाली
होती.

बाहेर चांदणे, खिडकी होती बंद
बिलगून सख्याला मिठीत होते धुंद
निलाजरा तो खट्याळ वारा आला
खिडकी उघडून, पडदा सारून गेला
कवडसा चांदाचा पडला,
अन साजण माझा खुदकन गाली हसला

अशा शब्दांनी सुरु होणारी हि लावणी, आशाने फारच सुंदर गायलीय. यातले बाई गं, बाई गं हे शब्द
तर खासच. अगदी चांदण्याचा शिडकावा झाला असे वाटते, हि लावणी ऐकून.

५) बेबसी हदसे जो गुजर जाये

ओ.पी. नय्यरच्या संगीतात आशाने हे गाणे कल्पना या चित्रपटासाठी गायलेय. ( पडद्यावर रागिणी )
हि रचना ओपीनी, बेगम अख्तरच्या एका ठुमरीवर बेतलीय असे म्हणतात, तरीही आशाची कामगिरी
बेजोड आहेच. मेरे नग्मोंसे उनका दिल ना दुखे, या ओळीवर तर तिने अप्रतिम काम केलेय.

चित्रपटात मरणासन्न नायिका हे गाणे म्हणतेय असा प्रसंग आहे, तरी हे गाणे करुण वगैरे झालेले नाही.

६) अकेली हूँ मै पिया आओ

संबंध या ओपीनीच संगीत दिलेल्या चित्रपटातली हि रचना. पडद्यावर नाजनीन. हाही एक मुजराच
आहे. पण अनेक रागरागिण्यांशी खेळत आशाने या रचनेला उंचीवर नेऊन ठेवलेले आहे. उस्ताद अमीर
खाँ साहेबांनी पण या रचनेची तारीफ केली होती.

७) सूनी सूनी साँस कि सितार पर

शंकर जयकिशनने नेहमीच लताला झुकते माप दिले पण लाल पत्थर चित्रपटात मात्र लताचे गाणे नव्हते.
आशा आणि मन्ना डे यांनी गायलेली, रे मन सूर मे गा, ही रचना पण यातलीच. पण त्यात मन्ना डे असल्याने
आशाचे कर्तृत्व जाणवत नाही. ते जाणवते ते या गाण्यात.
मनमोहना बडे झूठे या गाण्यातील लताच्या आलापांचे ( आणि नूतनच्या अभिनयाचे ) नेहमीच कौतूक
होते, पण त्यात तोडीच्या ताना आशाने या गाण्यात घेतल्यात ( दुर्दैवाने राखीला पडद्यावर त्या साकार
करता आलेल्या नाहीत. )

८) कतरा कतरा मिलती है

इजाजत मधल्या, मेरा कुछ सामान या रचनेचे यथायोग्य कौतूक होतेच. पण त्याच चित्रपटातली हि
रचनाही त्याच दर्ज्याची है. प्यासी हू मै प्यासी रहने दो, मधली आर्तता काय वर्णावी. ( पडद्यावर रेखा, संगीत आर्डी )

९) काली कमली वाले कि

आर्डीनेच आशाकडून, नमकीन या चित्रपटासाठी हि रचना गाऊन घेतलीय. पडद्यावर शबाना आझमी आहे, पण ती मूक असल्याने गाने तिच्या तोंडी नाही. फिर से ऐयो, बदरा बिदेसी पासून जे गूढ वातावरण तयार होते,
ते पुढे पुढे जवळजवळ भारूनच टाकते. ( मला आठवतय त्या प्रमाणे शबाना या गाण्यानंतर स्वतःला संपवते.)

१०) जी चाहता है चूम लू

बरसात कि रात हे नाव घेतले कि, ना तो कारवाँ कि तलाश है, हि कव्वालीच आठवते. ती अप्रतिम आहे हे खरे आणि त्यात आशाचा पण आवाज आहे, हेही खरेय. पण निदान उत्तरार्धात तरी ती मन्ना डे आणि रफीनी
खाऊन टाकलीय. त्याच चित्रपटात, जी चाहता हे चूम लू, अपनी नजर को मै.. अशी पण एक कव्वाली आहे,
आणि त्यात आशा आणि सुधा मल्होत्रांने खुपच रंगत आणलीत. त्यातल्या एका आलापात तर दोघी
इतक्या सुरेल शिरल्यात, कि दोन वेगवेगळे आवाज ओळखता येत नाहीत.

११) माँग मे भरलो रंग सखी री

मुझे जीने दो मधे, जयदेव ने लताला, रात भी है कुछ भिगी भिगी, अशी सुंदर रचना दिलीय, पण आशाला
मात्र दोन गाणी दिली आहेत. एक आपल्या नेहमीच्या ऐकण्यातले, नदीनाले ना जाओ श्याम.. ( चित्रपटातली
यातली चाल वेगळी आहे. शिवाय संग सवतीया ना लाओ, असे जास्तीचे कडवेही आहे. ) पण दुसरे, जरा कमी
ऐकण्यातले, आँखमे भरलो रंग सखी री, ऑंचल भरलो तारे. ( पडद्यावर वहीदा रेहमान )

या गाण्यातल्या मिलन रुत आ गयी वर आशाने सुंदर कारीगिरी केलीय शिवाय एकंदरच या गाण्याची चाल,
खास करून तिच्या ओळी फारच कठीण आहेत.

यातली बहुतेक गाणी नेटवर आहेतच, पण मी मुद्दाम लिंक्स देत नाही, कारण अशी रत्ने स्वतः शोधून
काढण्यातच मजा आहे, आणि काय सांगावे तूम्हाला आणखीही अशा रचना सापडतीलच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण जनता, ' जयशंकर प्रसाद' रचित, 'तुमुल कोलाहल' कसे विसरलात? Happy>>>>> खूप सुंदर गाण्याची ओळख करून दिलीत सामो. धन्यवाद.
सध्या रिपीट मोडवर हेच गाणं ऐकत आहे.

Pages