दशग्रंथी ब्राह्मण कोणास म्हणावे?

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 27 April, 2013 - 02:27

दशग्रंथी ब्राह्मण हे मुख्यत्वेकरून ऋग्वेदसंहितेशी जोडले गेले आहे आणि जे ऋग्वेदसंहितेच्या सर्व अंगात पारंगत असत त्याना ही अतिशय मानाची पदवी पूर्वी काशीला अथवा पैठणला जाउन अभ्यास करून आणि परीक्षा देऊन मिळत असे. आता ते दशग्रंथ आणि दशांगे कुठली ती बघू यात . रावण हा दशग्रंथी होता.

१] ऋग्वेदसंहिता: त्यामध्ये ऋग्वेदसंहिता मंडल १ ते १० ज्यामध्ये ९८५३ ऋचा येतात,ही सगळी संहिता मुखोद्गत असावी लागते.

२] ब्राह्मणसंहिता: प्रत्येक वेदाबरोबर "ब्राह्मण " संहिता असतात, ब्राह्मण संहिता ह्या त्या त्या वेदाबद्दल भाष्य करते आणि यज्ञ करताना काय काळजी घ्यावयाची ही माहिती देते. हे पुस्तकाचे नाव आहे आणि ज्याचा ब्राह्मण जातीशी काहीही संबंध नाही.
ऋग्वेदाबरोबर दोन ब्राह्मण संहिता आहेत "ऐतेरीय " [५० अध्याय]आणि 'सांख्यायन "[४० अध्याय] ब्राह्मण संहिता.
या पैकी ऐतेरीय ब्राह्मणसंहिता ही सोमरस, त्याची आहुती आणि उपयोग ही माहिती देते.

३] आरण्यक : प्रत्येक ब्राह्मणाबरोबर आरण्यक [अरण्यात जाउन गाण्याचे ] पुस्तक असते. ऋग्वेदाबरोबर जे आरण्यक आहे त्याचे नाव एतेरीयारण्यक आहे .त्यात अरण्यात जाऊन करण्याची काही "महाव्रते " दिली आहेत .यातच एतेरीय उपनिषद आहे जे काही तत्त्वज्ञान चर्चेत आणते .
दुसरे ऋग्वेदी आरण्यक आहे कौशितकी आरण्यक .यातील १५ अध्यायात कौशितकी उपनिषद आहे ,तसेच काही थोडे तत्त्वज्ञान ,अग्निहोत्र अशी माहिती आहे .

४] शिक्षा: वेदाबरोबर सहा वेदांगे आहेत त्यापैकी एक शिक्षा आहे. वेदांत उच्चार आणि उच्चारशास्त्र फार महत्वाचे आहे .कारण मंत्रांची शक्ती ही त्यांच्या योग्य उच्चारावर अवलंबून असते हा समज होता.प्रत्येक वेदाला अनुसरून त्याच्या उच्चाराचे पुस्तक मौखिक स्वरुपात आहे त्याला शिक्षा असे म्हणतात. त्यापैकी दशग्रंथी ब्राह्मणाला शिक्षेची ऋग्वेद शाखा ज्याचे नाव “ऋग्वेद प्रतीशाख्य” आहे हे पाठ असावे लागते.

५] कल्प : हे सुध्दा ६ वेदांगापैकी एक आहे. यज्ञामध्ये आहुती आणि बळी देण्याची जी पध्दत होती त्यामुळे त्यासाठी अनुरूप ऋचा यात दिल्या आहेत .
कल्पसुत्रे ही दोन प्रकारची आहेत
१] वेदासाठी: ज्याला श्रुतीसुत्रे म्हणतात.
२] स्मृतीवर आधारलेल्या समारंभासाठी : ज्याना स्मार्तसूत्रे म्हणतात. स्मार्तसूत्रात पुन्हा दोन उप प्रकार आहेत अ] गृह्यसुत्रे : ज्यात घरगुती समारंभ जसे जन्म,नामकरण,लाग इ.वेळेस लागणारे मंत्र ब] धर्मसूत्रे ; ज्यात सामाजिक व्यवहार ,वाळीत टाकणे,सामाजिक जबाबदाऱ्या इ. गोष्टींची सूत्रे आहेत.प्राचीन भारतातील बहुतेक कायदे या सूत्रातून आले.
याशिवाय यजुर्वेदात यज्ञाचा मंडप,वेदी इ. गोष्टींच्या बांधकामाचे गणिती नियम आणि सूत्रे आहते ज्याचे नाव शुल्ब सूत्रे आहे.

दशग्रंथी ब्राह्मणाला ऋग्वेदाशी सलग्न अशी श्रुतसूत्रे पाठ करणे अनिवार्य असे ,जसे आश्वलायन आणि सांख्यायानाची सूत्रे

६] व्याकरण : ऋग्वेद हा मौखिक असल्याने त्याचे उच्चार ,ऱ्हस्व -दीर्घ ,शब्द कसे झाले . त्याचा व्याकरणदृष्ट्या विचार इ. शास्त्राला व्याकरण म्हणतात. यात रूढीला फार महत्व आहे.दुर्दैवाने ऋग्वेदकालचे बहुतेक सर्व ग्रंथ नष्ट झाले आहेत. ऋग्वेदाचे व्याकरण [ज्याला पदपथ अर्थात पायवाट हा मोठा गोड शब्द आहे] ते आहे साकल्यमुनींचे ऋग्वेद पदपथ .
याशिवा संपूर्ण पाणिनी पाठ असणे जरुरी होते.

७]निघंटु: हा जगातला कदाचित पहिला शब्दकोश [dictionary and thesaurus ] आहे . ज्यामध्ये शब्दाचे अर्थ जे रूढ कार्य ,धर्मासाठी लागतात ते विस्ताराने दिले आहेत याचे ५ भाग आहेत . अर्थात याला शब्दकोश म्हणणे तितकेसे योग्य होणार नाही शब्दाच्या अर्थाबरोबर त्याची रूपे, धातू,संधी इ. सर्व दिले आहे. उदाहरण द्यावयाचे तर उदक या शब्दाची १०० रूपे दिली आहेत . अर्थात हे सगळे मौखिक असल्याने पुन्हा पदरुपात आहे. चौथ्या भागात एका शब्दाला समानार्थी शब्द दिले आहेत . या पुस्तकातील पद संख्या १७७० आहे.

८] निरुक्त: अर्थ: व्याख्या, व्युत्पत्तिसंबंधी व्याख्या)शब्दांची व्युत्पत्ती [Etomology ] हे एक नवीन शास्त्र आपल्या लोकांनी तयार केले होते .
निरुक्त पाच प्रकारचे असते १]वर्णागम (अक्षर वाढविणे ) २] वर्णविपर्यय (शब्दातील अक्षरे मागेपुढे करणे ), ३]वर्णाधिकार (अक्षरे बदलणे ), ४] नाश (अक्षर गाळणे ) ५] धातुच्या अनेक अर्थापैकी एक अर्थ सिद्ध करणे. निरुक्तावर यास्क या मुनीनी फार काम केले आणि त्यामुळे त्याना निरुक्तकार म्हणतात. यास्कांच्या पुस्तकात अर्थ काढण्यासाठी छोटी छोटी सूत्रे पद रुपात दिली आहेत कारण हे सगळे मौखिक असल्याने लक्षात ठेवणे पदरुपात सोपे जाते. याशिवाय कठीण शब्दांचे अर्थ आणि वैदिक शब्दांचे अर्थ संदर्भासहित दिले आहेत.

९] छन्द: आपले हे सगळे ज्ञान हे पदरुपात मौखिक मोठ्याने घोकायचे असल्याने ज्ञान संपन्न ब्राह्मणाला कवितेचे नीरनिराळे प्रकार,ते ओळखणे ,तालासुरात म्हणणे आणि तशी पदे रचणे हे सगळे माहित असणे आवश्यक आहे .एकट्या ऋग्वेदात जगती,त्रिष्टुभ,गायत्री ,विराज आणि अनुष्टुभ हे छन्द आहेत .त्यामुळे हे सगळे शास्त्र हे छन्द या नावाखाली येते. छन्दामध्ये अक्षरसंख्या, मात्रा ,गती ,यति [pause ] ह्या कसौट्या असतात आणि त्यामुळे हे खूप कठीण शास्त्र आहे. ऋग्वेदात याची चर्चा आहे. दशग्रंथी ब्राह्मण हे पदे रचण्यात वाकबगार असत.

१०] ज्योतिषशास्त्र : हेही वेदान्गापैकी एक आहे आणि याला शास्त्र हे त्याच्या खालील उपविभागामुळे म्हणतात पण आपल्याकडे अज्ञ धार्मिक फक्त फलज्योतिष हेच ज्योतिष समजतात . ज्योतिषशास्त्रचे प्रकार आहेत
अ] खगोलशास्त्र [ astronomy ]
ब] सिद्धान्तज्योतिष अथवा 'गणित ज्योतिष' (Theoretical astronomy)[कधी ग्रहण होईल हे ठरविणे ]
क] फलितज्योतिष (Astrology)
ड] अंकज्योतिष (numerology)

आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले असेल की दशग्रंथी ब्राम्हण होणे हे का महाकठीण काम आहे ,कारण हे सगळे समजून घेणे आवश्यक होते त्याशिवाय ही सगळी अफाट पदसंख्या पाठ करणे आणि धर्मपीठापुढे त्याची परीक्षा देणे आवश्यक असे. इतके काही करून हे सगळे ज्ञान मौखिक स्वरूपात आपल्या पूर्वजांनी जतन केले म्हणजे ते काय तैल बुद्धीचे असतील याचा विचार तर करा.....

<<आधारित - https://www.facebook.com/groups/kbvsdb/- >>

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रावण हा विश्रवा मुनीन्चा मुलगा व कुबेराचा भाऊ. >>> हे विश्रवा मुनी म्हणजे ब्रह्मदेवपुत्र पुलस्त्यमुनींचा तितकाच श्रेष्ठ पुत्र.
रावण हा कलासक्त व तपसामर्थ्य असलेला. पण हे तपसामर्थ्य कुकर्मांसाठी वापरलं गेल्याने भ्रष्ट झाला. किंबहुना तपसामर्थ्य / वरदान मिळवण्याचा हेतू स्वतःची कुकर्मे पार पाडता यावीत हाच होता. ह्याने कुबेराचा पवित्र मुकुट हिसकावून घेतला व लंकेवर वर्चस्व प्रस्थापित केले. कुबेराच्या सुनेवर म्हणजे स्वतःच्याही सुनेवर वाईट नजर ठेवली. बाकी आपल्याला रामायण माहित आहेच.

रावणाची आई कैकसी ही राक्षस कुळातील. कैकसीचा अर्थ 'तुलना'.

रावण आणि कुबेर हे सख्खे भाऊ की सावत्र?
रावणाच्या आईकडे मातृसत्ताक होती म्हणून तो तिथे मोठा झाला का? -- हा फक्त एक अंदाज.
पुलस्त्यमुनींची आई कोण? ही कथा विसरले.
ऋषी आणि मुनी यात फरक काय?

मला खरा ब्राह्मण कोणास म्हणावे हा प्रश्न पडला आहे. धर्मशास्त्रात या बाबत काय सांगितले आहे? ते निकष लावले तर आज केवळ जन्माने ब्राह्मण असलेले किती टक्के लोक त्यातून गळून पडतील? असे अनेक प्रश्न आहेत. पण याची उत्तरे काही या चर्चेत मिळाली नाहीत. आता या धाग्याला 9 वर्षे झाली.

Pages