साधं सोपं सरळ

Submitted by योग on 16 April, 2013 - 03:46

कोणे एके काळी..

सात च्या आत घरात हा संस्कृतीचा भाग होता, शिस्त म्हणून नव्हे. पोटभरून खेळल्यावर मग घरी आल्यावर छान अंघोळ करून वडीलधार्‍यांना नमस्कार करून देवापुढे दिवा लावून श्रीमद्भगवद्गीता, श्री रामरक्षा, हनुमान स्तोत्र ई. म्हणायचे. दूरदर्शनवर असलेले एखादे परिवार 'धारावाहिक' बघून मग सर्वांनी एकत्रीत रात्रीचे जेवण करायचे आणि दुसर्‍या दिवशीचे दप्तर भरून झोपी जायचे. पुनः सकाळी ७ वाजता दुसरा दिवस सुरू..
साधारण हाच दिनक्रम सर्वांना लागू असे. जेमतेम ५०० चौ. फूट क्षेत्रफळात (संडास, बाथरूम सकट), एक बेडरूम मध्ये पाच जणांचे कुटूंब काय मस्त रहात असे.. गोदरेजच्या दीड कपाटात सर्वांचे सर्व कपडे व्यवस्थित मावलेले, माळ्यावर काही जास्तीची भांडी कुंडी बांधून ठेवलेली, स्वयंपाघरातील मांडणीत आवश्यक तेव्हडीच भांडी वाट्या ठेवलेले, लिविंग रूम मधिल एकाच "शोकेस" मध्ये फोटो, औषधे, रद्दी, टिव्ही पासून, ते एका छोट्या कप्प्यात चपला.. मित्र, नातेवाईक, पाहुणे सर्वांचे त्याच ५०० चौ. फूट मध्ये अगदी भरभरून आगत स्वागत.. आम्हा पाच जणांच्या टुमदार संसाराला 'क्षेत्रफळ' कधी कमी पडले नाही कारण मनांचा एफेसाय अगणित होता. मधल्या भिंती नावाला मात्र- अन्यथा शेजारी म्हणजे दुसरे घर्/कुटूंबीयच होते. शेजारच्या आज्जी सकाळी सहा वाजल्यापासून देवपूजा, पोथी पाठ करायच्या आणि या मधल्या भिंती अक्षरशः बोलू लागायच्या. समोरच्या काकूंच्या स्वयंपाक घरातील सकाळच्या नाष्त्याच्या फोडणीचे वास, शाळेला, बँकेत जायच्या घाईत जिने ऊतरणार्‍या लोकांचे आवाज, अक्षरशः बसल्या जागी ईतर अनेकांची दिनचर्या, हालचाली टिपता येत होत्या. एकंदरीत एरीया मधिल ब्रेकींग न्यूज त्याही खात्रीशीर या फक्त दूधकेंद्राच्या लाईन मध्ये मिळायच्या. दूधाच्या पिशव्या नव्हत्याच- छान ताजे दूध आपल्या भांड्यात घालून मिळत असे- भेसळ वगैरे शब्द परिचयाचे नव्हते. धुणं, भांडी. ई. ला बाई नव्हती कारण स्वताचे कपडे व भांडी शक्यतो स्वताच धुवायची असा नेम होता- अगदी बाहेरगावी नातेवाईकांकडे गेलो तरी त्यात खंड पडत नसे. नियमित हॉटेलात खाणे वगैरे गोष्टी "श्रीमांतांचे चोचले" या सदरात असल्याने महिन्यातून एकदा बाहेर एखाद्या हॉटेलात खायला मुभा असे. एकत्रीतपणे अनेक नाटके, चित्रपट बघितले जायचे, शाळेतल्या शिक्षीका, शिक्षक कुठे ना कुठे दुकानात, मार्केट मध्ये, नाट्यगृहात ई. ठिकाणी आई वडीलांना भेटतच असल्याने निवळ सहामाहीचे प्रगतीपुस्तक येईपर्यंत वाट पहावी लागत नसे- आमच्या एकंदर सर्व कारवाया व बर्‍या वाईट सर्वच शिलालेखांबद्दल घरी लगेच खबरबात मिळत असे. होळी ला केलेले (चिखलाचे) 'राडे', दिवाळीला केलेला लवंग्यांचा माज, गुढीपाडव्याला घेतलेली एखादी नविन वस्तू, ऊन्हाळ्याच्या सुट्टीत जीवाचे केलेले रान या व्यतिरीक्त सभ्य, साळसूद, आटोपशीर आयुष्य होते. पण त्या सर्वात काय गंमत होती. ईतके अपरंपार सुख व समाधान होते. हे माझे ते तुझे हा भाव नव्हता, मित्रांशी कट्ट्यावर गप्पा व चेष्टा मस्करी हीच 'प्रायव्हसी' होती. पुण्याला २ मामा होते, जायला डेक्कन क्विन होती, कर्जतचे बटाटे वडे होते, लोणावळ्याची मगन चिक्की होती, खंडाळ्याला बोरे होती, मंकी हिल ला जांभळे होती, थोडक्यात शाळा, घर, मित्र या व्यतिरीक्त 'मामाच्या गावाला जाऊया' म्हणत आयुष्य कसे सुखाने 'तालात' चालले होते. त्यातही मामा ईकडे मुंबईला येऊन परतीला निघाला की आई व मामाचे ते रेलवे स्टेशन किंवा बस स्टँड वर साश्रू निरोप समारंभ हा त्या तालाच्या जोडीला लाभलेला सुरेल साज होता. आयुष्यात जटील प्रश्ण तसे काहीच नव्हते- फार तर बोर्डात किती मार्क मिळतील या वेशीवर सर्व प्रश्ण, कथा, कल्पना यांचा शेवटचा मुक्काम असे. अज्ञानातून विज्ञानाकाडे एव्हडाच प्रवास होता. अध्यात्मद्यान, अतिंद्रीयज्ञान, ही असली स्टेशनं त्या प्रवासात नव्हती. "साधी माणसं" निवळ चित्रपटात नव्हती, रोज अवती भोवती भेटत होती. 'चॅरिटी बिगीन्स अ‍ॅट होम' हे सत्य होतं. दिवे गेले तरच मेणबत्त्या इतकं साधं लॉजिक होतं. बाकी सर्दी, ताप, पडसं यावर १००% ऊपाय म्हणून अमृतांजन होतं, तापाची लस हा विनोद होता! रेशन कार्ड सोडल्यास ईतर कसलेच कार्ड नव्हते, माणसं हेच 'आधार' (कार्ड) होते. आणि माझे संपूर्ण नाव एव्हडी एकच आयडी होती व ती पुरेशी होती.

पुढे वयात आलो तशी नेमाने भांग पाडणे, कपड्याला रोजची ईस्त्री, अत्तर असली 'खुळे' लागली. ईतर ऊच्चब्रू 'सेंट' मारायचे तेव्हा आम्ही 'सेंटी' होत असू- पण तक्रार नव्हती. असेही रोज सेंट मारून कुणावरही वेगळे ईंप्रेशन मारायचे नव्हतेच. कोलगेट व पॅराशूट एव्हडेच मर्यादित वैश्विक सत्त्य असल्याने 'फूफू' कींवा 'हाहा' करून केसांची वा तोंडाच्या वासांच्या जाहिराती देण्याचे फॅड नव्हते. रू. २५५० च्या पहिल्या पगारातील १०० ची नोट जपून ठेवली होती/आहे. त्यातून आई वडील, बहिणी, देव्हार्‍यातील देव, मित्र, शाळेतील आवडते शिक्षक, ई. सर्वांना काय काय देता देता खिशात निवळ २०० शिल्लक राहिले होते ती आठवण अगदी कालची वाटते. पहिला पगार हातात घेतला तेव्हा 'Responsibility' या शब्दाचे रियल मिनींग कळले. प्रश्णांची 'ऊकल' शोधायची नव्याने अक्कल आली. मनोरंजन व चैन यातला फरक कळला होता. कुठे थांबायचे हे पूर्ण माहित नसले तरी कुठपर्यंत पोहोच (पोहचायचे) आहे हे स्पष्ट झाले होते.

'१९९२' नंतर 'नवाकाळ' आला आणि बर्‍याच गोष्टी रातोरात बदलल्या.. काही कुटील प्रश्ण निर्माण झाले खरे पण तरिही अगदी ढवळून घुसळून निघण्या एव्हडे काही गंभीर नव्हते. कारण विश्वसुंदरी ऐश्वर्या राय हिला अक्षरशः दोन फुटावरून घरीच भेटल्याच्या घटनेनंतर तर पुढील अनेक वर्षे 'ऐश्वर्यमय' गेली..

मग ऊच्चशिक्षणानिमित्त परदेशी राहिल्यावर मी, घर, समाज, माझा देश, ईतरांचा देश, ई. बद्दलचे अनेक तोपर्यंत न पडलेले प्रश्ण पडले, त्यांची ऊत्तरे शोधायचा प्रयत्न केला, नकळत त्या सर्व गुंत्याचा स्वतः एक घटक व गाठ होवून गेलो होतो.

दाण्याच्या कुटाच्या खलबत्त्या जागी मॉल च्या पिशव्यांमधील सुबत्ता आली पण साधं, सोपं, सरळ, शांत कुठेतरी गायब झालं- अगदी छोट्या गोष्टी त्रासिक वाटू लागल्या-दूध,बालवाडी, शाळा देणगी, कॉलेज प्रवेश. क्षेत्रफळेच पुरेनाशी झाली, एफेसाय करोडोने महागले, कपाटांमध्ये ऑर्गनायझर्स अपुरे पडू लागले, मित्र परिवार, नातेवाईक फक्त फेसबुकावर भेटू लागले, मामा गेल्याची बातमी फोनवर कळली- त्याचे अंत्यदर्शन घेता आले यातच धन्यता मानावी लागली, 'एक्सप्रेस' मार्गांमूळे आयुष्याची वेगमर्यादा वाढली आणि आणि सर्वच मर्यादा ओलांडल्या जाऊ लागल्या, 'मी माझा' अशा चारोळी संस्कृतीला ऊत आला, नेट भेटीवर संसार मांडले जाऊ लागले, ऊठसूठ मेणबत्त्या पेटू लागल्या, 'ऊकल' गेली 'गुगल' आली, निचर्‍या च्या चर्चा गेल्या ईलेक्ट्रॉनिक कचर्‍याच्या चिंता आल्या, आणि शेवटी हातात ऊरलय फक्त प्रत्त्येक प्रश्णावर ऊपलब्ध एखादं 'अ‍ॅप'. "An App a Day keeps the Doctor Away".

आयुष्य आजही देवाच्या दयेने ऐश्वर्यमय आहेच. फक्त ज्या वेगात पसरलोय त्याच वेगात घसरलोय का असले कुटील प्रश्ण पडतात; बरेच काही आठवतय आणि बरेच काही विसरलोय हेही जाणवते आहे; 'ईझम', 'वाद', 'लस' यांनी जीवन आंतर्बाह्य व्यापून टाकलय; रोजच्या व्यापातून 'शट डाऊन' शक्य नाहीये आणि 'लॉग आउट' केले तरी अनेक प्रोसेसेस गुपचूपणे मेमरी खातायत; कुणासाठी माझे अस्तित्व एखाद्या मॉनिटर स्क्रीन वरील एखादी आयडी एव्हडंच ऊरलय...

या सर्वाला 'मिडलाईफ क्रायसिस' असं गोंडस नाव देवून माझी समजूत घालणारे हितचिंतक आहेत हेही दिसतय..

तरीही, साधं सोपं सरळ... शोध सुरू आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रे ... ९२ बदलाची नांदी होती पण खरा 'बदल' दिसायला लागला तो ९९-२००० च्या सुमारास... २००५ मधे रिटर्नलो होतो तर बदल अंगावर आला... २००९ मधे का बदलल हे वाटुन गेल ... पण एकुणात भापो Happy

सगळच टेक्नालाजीमुळे इतकं वेगानं धावतय की... श्वास घ्यायला, मागे वळून बघायला उसंत नाहीये हे खरय. पण ज्यांना तितक्या वेगात धावायचं नाहीये, ते ठरवून त्या तांत्रिकांमधे मांत्रिक नाहीत... >> बरोबर. पण हे धावताना आता वयापरत्वे, प्रकृतीपरत्वे दमछाक होतीये असा लेखाचा सूर जाणवला नाही.
टेक्नोलोजी इज अ ग्रेट लेव्हलर. समाजातील सर्व थरातील लोकांना समान संधीचे चान्स मिळतात, आणि मुख्य मिळतो 'चॉइस'. आपल्या आनंदाचे आपण शिल्पकार झालो. शेजारच्या आज्जी आता पूजा पाठ न करता सकाळी स्काईपवर नातवंडाना रामरक्षा शिकवतात. नातवंडे नसतील तर 'नेटग्रॅनी' बनून इतर मुलांसाठी ऑर्डर प्रमाणे मोजे बनवतात...अँड सो ओन...
संस्थान खालसा झाल्यावर जसे 'गेले ते दिन' म्हणणारे नबाब होते, त्याबद्दल जेवढी आत्मीयता वाटायला पाहिजे तेवढी मला नक्कीच ह्या लेखाबद्दल वाटली. लग्नानंतर आईची आमटी आठवली पेक्षा लग्नानंतर मलाच आमटी करावी लागली आणि म्हणून दोष टेफ्लोन भांड्याचा असा सूर वाटला... (हलके घ्या.. हे माझे पर्सेप्ष्न झाले. कदाचित तुम्ही काही वेगळे मांडत असाल.)

सगळच टेक्नालाजीमुळे इतकं वेगानं धावतय की... श्वास घ्यायला, मागे वळून बघायला उसंत नाहीये हे खरय. पण ज्यांना तितक्या वेगात धावायचं नाहीये, ते ठरवून त्या तांत्रिकांमधे मांत्रिक नाहीत...
आजही अगदी कमी क्षेत्रफळात सुखाचा संसार करणारे खूप खूप आहेत... अन दहा खोल्यांच्या बंगल्यात कंप्ञूटरच्या म्हणून असलेल्या खास खोलीत दिवसाचे अठरा तास घालवणारेही.
जो तो ज्याच्या त्याच्या ठरवलेल्या प्रायॉरिटीजमधे'च' जगतोय. >>> +१

दाद,
मला वाटते माझ्या अभिप्रायात (लिहीण्यात) किंवा एकमेकाना समजण्यात घोळ होतोय.. बांध कोण कुणाला घालणार.. ? संपूर्ण लेख व्यक्तीगत अनुभवावर आधारीत आहे; त्यातील काही मुद्दे आमच्या/आपल्या पिढीसाठी (फक्त) प्रातिनिधीक असावेत व तेही 'त्या' काळाच्या संदर्भाने. मुळात लेखात काहीच पटवून द्यायचे नाहीये... Happy लेखातील काही परिच्छेदात कदाचित थोडासा तुलनात्मक ऊपरोधिक सूर आला असला तरी त्यामूळे संपूर्ण लेखाची अभिव्यक्ती बदलत नाही असे मला वाटले म्हणून तसे लिहीले.
असो. पण तुझी सूचना मान्य!- 'असल्या' प्रतिक्रीया हा शब्दप्रयोग टाळता आला असता. तेव्हा सर्वच प्रतिक्रीयांचे स्वागत आहे..

बाकी,
बहुतांशी ज्या आपल्या पिढीने प्रचंड वेगात संक्रमण अनुभवलेले व पाहिलेले आहे, थोडक्यात लंगडी च्या खेळापासून ते आता टी २० पर्यंत Happy ते एका अर्थी भयंकर नशीबवान असे मला वाटते. कारण या दोन्ही मधील मध्यबिंदू (नुसते टेक्नॉलॉजी नव्हे तर सर्वांगीण, सर्वसमावेषक) आपण अनुभवला आहे- किंवा तो मध्यबिंदू कुठे असावा याची कल्पना आहे. कंपास प्रमाणे तो मध्यबिंदू त्याच जागी असला तरी 'त्रिज्या' मोठ्या होत आहेत परिणामी आपल्याच भोवती मोठ्या व्याप्तिची वर्तुळे आपणच काढत आहोत.. तेव्हा पुढे व्यास, परीघ असल्या भूमितीत न शिरता एव्हडेच म्हणेन की साधं सोपं सरळ हे शब्द एका स्थायी अनुभवाचे प्रतिक आहेत; प्रकटीकरण दर वेळी वेगळे असले तरी मूळ अनुभवाचा आत्मा त्या वर्तुळाच्या बिंदूसारखाच कायम आहे. गायकाचा 'गळा' तोच असला तरी प्रत्येक मैफल कुठे खुलते? आणी कधितरी एखादी सहज 'बैठक' देखिल आत्मतृप्तीचा आनंद देऊन जाते- होय ना? तसेच काहीसे.. आपल्याला ती आत्मतृप्तीची बैठकच कायम भुलवत असते आणि अतीशय खडतर प्रयत्न व साधने नंतर लक्षात येतं की मुळात ती गोष्ट साधी, सोपी, सरळच होती- आपण फक्त त्याच्या व्यक्त स्वरूपाला नको ईतके महत्व देऊन त्या अचल आनंदापासून स्वताला दूर नेत असतो.
ईथे पुन्हा पंचम व किशोरदा डोकावू पहात आहेत तेव्हा हे पुराण थांबवतो..! Happy

@भारती बिर्जे डि... | 16 April, 2013 - 17:37नवीन'..
......तेव्हाही हाच क्रायसिस होता अन हा कायम राहील.. प्रगती होते तेव्हा परिस्थिती अनुकूल होते पण काही किंमत वसूल करूनच. <<

सहमत.
सर्व कांही १००% चांगले अशी परिस्थिती कधीच नसते.

Pages