डोह

Submitted by समीर चव्हाण on 25 March, 2013 - 08:20

कुणी येणार नसते वाट मी बघतो उगाचच
न टिकतो एक जागी ऊठबस करतो उगाचच

स्वतःला गुंतुनी घेतो न पटणा-या त-हांनी
न कुठले काम सामोरी तरी करतो उगाचच

पुढे जाऊन होइल काय, रेंगाळूनही काय
उभा राहू तरी कुठवर जरा बसतो उगाचच

कुठे जाऊ कळेना, पायही निघता निघेना
तरी वळणासवे बेखंत मी वळतो उगाचच

तुझे पाहून कौतुक केवढा अस्वस्थ होतो
जरा ओशाळतो, कोन्यात हळहळतो उगाचच

नवे आणू तरी कोठून, आणावे तरी का
कधी आटून जाइल डोह, घाबरतो उगाचच

समीर चव्हाण

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतःला गुंतुनी घेतो न पटणा-या त-हांनी
न कुठले काम सामोरी तरी करतो उगाचच

पुढे जाऊन होइल काय, रेंगाळूनही काय
उभा राहू तरी कुठवर जरा बसतो उगाचच<<< व्वा व्वा

नवे आणू तरी कोठून, आणावे तरी का
कधी आटून जाइल डोह, घाबरतो उगाचच

<<< मस्त

गझल आवडली.

सगळे शेर फार आवडले
ही देखील तुमच्या गझलेच्या खास अश्या शैलीत आहे असे जाणवले

__________________________________-

अवांतरः रेंगाळूनही कय>>>>>
लयीत वाचताना मला (..मीच..) चुकल्या-चुकल्यासारखे वाटले
इथे ,मी "बदलाची गरज" असे सुचवल्यास आपल्याला चालेल का .....

(असा एक बदलही सुचला होता ...की...<<<पुढे जाऊन होइल काय?.....रेंगाळून देखिल?>>>> पण आधी तुम्हाला विचारावे म्हणून थांबलो )

कळावे आपला नम्र(भोळसट)
~वैवकु

>> कुणी येणार नसते वाट मी बघतो उगाचच
वा! Happy

>> पुढे जाऊन होइल काय, रेंगाळूनही काय
एक लघु जास्त होतो आहे काय?

एक लघु जास्त होतो आहे काय?

<<<

होय. मागे यावर एका ठिकाणी चर्चा झाली होती. त्यामुळे आज येथे पुन्हा विषय काढला नाही. हा शेवटचा लघु अनेकदा (सूट म्हणून) घेतला जातो व अशी उदाहरणे आहेतही. (विशेषतः उर्दूत अशी उदाहरणे अनेक आहेत)

गालिबची एक ओळ!

आगही दामे शुनीदन जिस कदर चाहे बिछाये (अर्थातच, उर्दूत त्या 'ये' ची उच्चारानुसार मात्रा एक म्हणून हे उदाहरण दिले).

Happy

उपयुक्त माहीतीबद्दल धन्स बेफीजी


पण उर्दूतील व मराठीतील छंदशास्त्रात बराच फरक असतो असे ऐकले आहे मग उर्दूत चालले तर मराठीतही चालते असे काही आहे का.......... की काही वेगळे कारण असावे या मागे .
लगावली पाळायची म्हटल्यास असे करायला नाही पाहिजे असे मला वाटते (या सुटी मुळे लगक्रम चुकतोच की शेवटी!! व एखाद्दुसर्‍या लघुमुळेही वृत्त बदलतेच)
_________________________________

अवांतरः कधीकधी मलातरी वाटते की काही मोठे नावाजलेले बडे गझलकार कधीमधी अशा न कळत चुका करून बसत असतील व मग ते स्वतः किंवा कालांतराने त्यांच्या मागून आलेले लोक ही सूट आहे!!.... असे चालते!! असे म्हणत असतील व पुढे या सुटी मतप्रवाह व पुढे उपनियम म्हणून रूढ होत असतील

आणि एकीकडे एखादा नवखा असे करू पाहत असेल तर त्यास फाडून खाल्ले जाते ..... Happy

समीरजी एक श्रेष्ठ गझलकार आहेत मग मी त्याना कसे काय काही म्हणू शकतो अशीही एक बाजू असतेच शेवटी

असेच आपले वाटले म्हणून वै म व्यक्त केले कॄ गै न

मला बोलायचे नव्हते तरी बोलून गेलो मी
म्हणाले मौन माझे बडबडावे वाटते आहे
Sad

_________________________________

मलातरी ही गझल खूप आवडली याच्याशीच मतलब !!!

सगळ्यांचे आभार.

काही मते द्यावीशी वाटत आहे.
घ्यावीतच असा आग्रह नाही.
form चा नको तितका awareness चांगल्या कवितेच्या वाटेतली फार मोठी बाधा आहे.
तुकाराम सुध्दा (ओवी ह्या) form मध्ये लिहितो मात्र अर्थाची कोंडी झाली की form सोडून देतो.
अशी अनेक उदाहरणे आहेत.
मात्र तुकारामाची अशीच एक सुंदर रचना काल वाचनात आली.

घ्या रे भाई घ्या रे भाई
कोणी काही थोडे बहु
येच हाटी येच हाटी
बांध गाठी पारखून
वेच आहे वेच आहे
सरले पाहे मग खोटे
उघडे दुकान उघडे दुकान
रात्री जाली कोण सोडी मग
तुका म्हणे अंतकाळी
जाती टाळी बैसोनि

तुकाराम म्हणतो बंधूहो, (ज्ञान) घ्यायचे असल्यास आत्ताच घ्या.
कमी घ्या जास्त घ्या. मात्र घ्या.
ह्याच (विश्वाच्या) बाजारात, पारखून गाठीला बांधून घ्याल.
हवे असल्यास आत्ताच वेचा, दुकान उघडे आहे तोवर.
रात्र झाल्यावर (अंतकाळी) वेळ निघून गेलेली असेल.

आता आठवत नाही मात्र कुणाकडून तरी ऐकले (बहुतेक अनंतकडून) की
awareness हा निर्मीतीतील मोठा अडसर आहे.

पुन्हा धन्यवाद.

समीर, तुकारामांच्या रचनेसाठी आभार.
अवेअरनेसबद्दलचं मतही एका मर्यादेत पटलं.
पण मग फॉर्मला महत्त्वच द्यायचं नसेल तर रचना 'गझल' म्हणून प्रकाशित का करावी?
(तुकारामाने कुठे 'आता मी अभंग लिहिला पहा' म्हटलं होतं?)

शेर आवडले. आशय आणि मांडणी याबाबतीत सगळेच शेर छान आहेत. भरकटलेपण, अस्वस्थता इ. छानच आलेत. स्वतः गझलकाराला यातला कुठला शेर सर्वात जास्त आवडला असं विचारायचा मोह अशा वेळी उगाचच होतो.

धन्यवाद, स्वातीजी.
माझा मुद्दा एक पायरी अगोदरचा होता. निर्मीतीला धरून.
प्रकाशन हा नंतरचा इश्यू.
निर्मीतीसाठी form चा awareness घातक.
जशी कविता जाते तशी जाऊन द्या.
झाली गझल तर होऊन द्या.
एक-दोन खटके राहिले (जसे माझ्या गझलेत झालेय) तर सदोष गझल आहे असे म्हणतील.
ही गझलच नाही असे म्हणायचे कारण नाही.
बाकी, तुकारामाने लिहिलेल्या रचनेला अभंग म्हटले का गझल हा मुद्दा नाही.
एक form त्याच्या डोक्यात फिरत राहिला जो त्याने शक्यतो अर्थासाठी तडजोड न करता राबवला, हे महत्त्वाचे.

विस्मयाजी, धन्यवाद.

एक-दोन खटके राहिले (जसे माझ्या गझलेत झालेय) तर सदोष गझल आहे असे म्हणतील.
ही गझलच नाही असे म्हणायचे कारण नाही.>>>>>>>>>

मनापासून पटले हे मत गझल् कडे पाहण्याचा हा दृष्टीकोन फार आवडला कायम स्मरणात राहील

धन्यवाद स्वातीताई व समीरजी

निर्मिती करतानाची awareness हा मुद्दा जरा अधिक सखोलपणे सांगाल का समीरजी उदाहरण वगैरे देवून ? मला फारसे समजले नाही जाणून घ्यायचे आहे

आपल्याला देत असलेल्या तसदी बद्दल क्षमस्व

गझल नेहमीप्रमाणेच आवडली.

चर्चा मुद्देसूद व उपयुक्त झाल्याचे दिसत आहे हे विशेष!

आशयाची/अर्थाची गळचेपी होत असेल आणि त्या कविस फॉर्म पेक्षा अर्थ अधिक महत्वाचा आहे असे खरोखर वाटत असेल तर सुट म्ह्णून घेण्यास काहिच हरकत नाही. सुट घेणे हे स्वातंत्र्य कवीचे आहे एकदा त्याने 'सूट' म्हणून घेतल्यावर. ती का घेतली? किंवा घ्यावयास नको होती ह्या अंगाने विचार करणे निरर्थक वाटते. गझल आवडली.