इथे वैशाख आला ना, शिशिरही गोठवत नाही

Submitted by प्राजु on 21 February, 2013 - 23:44

अताशा जीवनी माझ्या नवे काही घडत नाही
नवेसे स्वप्नंही आता मनाला भाळवत नाही

नव्या वाटा नको आता नवे काही नको वाटे
अता पाऊलही माझे नव्या साठी अडत नाही

तिथे श्रावण बरसलेला, कधी गोष्टी वसंताच्या
इथे वैशाख आला ना, शिशिरही गोठवत नाही

कुणी यावे, कुणी जावे.. सुतक नाही न सोयरही
पुरणपोळी नको वाटे, नि भाकर मोडवत नाही

मनाची बागही माझ्या जशी आहे तशी आहे
कुणीही नासवत नाही, कुणीही बागडत नाही

कशाचे दु:ख वाटावे, कशाने सौख्य नांदावे
असे काही कधी घडले, मला ते आठवत नाही

असे हे बाड शब्दांचे, गझल-कविता नसे काही
जरी जपले न मी त्याला, तरीही फ़ेकवत नाही

-प्राजु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनाची बागही माझ्या जशी आहे तशी आहे
कुणीही नासवत नाही, कुणीही बागडत नाही

असे हे बाड शब्दांचे, गझल-कविता नसे काही
जरी जपले न मी त्याला, तरीही फ़ेकवत नाही<<<

वा प्राजक्ता, चांगले शेर. छान गझल.

मतला ठीक-ठाक आहे ..
'भाळवत' शब्द तितका रुचला नाही..
मन स्वप्नाला/वर भाळले असे म्हंटले जाते..पण स्वप्नाने मनाला भाळवले - ही शब्दरचना पटत नाही. ( चुकत असल्यास जरूर सांग )

मनाची बागही माझ्या जशी आहे तशी आहे
कुणीही नासवत नाही, कुणीही बागडत नाही

हा शेर खूप सुंदर आहे...पण नुसते 'मनाची बाग' असे पाहिजे होते.. 'बागही' असे का वापरले आहे ? वृत्तासाठी असावे बहुधा...
'बाग ही' असे फोडून लिहीले तरीही ते भरीचेच वाटेल...
हा.. जर असे म्हणायचे असेल की 'माझ्या प्रमाणे माझ्या मनाची बागही आहे तशीच आहे' तर बरोबर ठरेल..पण असा अर्थ सहजपणे उलगडत नाहीये शेरातून...

मनापासून सांगतो, बाकी शेर तितके भावले नाहीत..
माझ्या मते या गझलेत वृत्त सांभाळताना थोडी ओढाताण झाली आहे...

पुलेशु प्राजुताई.

<<<मनाची बागही माझ्या जशी आहे तशी आहे
कुणीही नासवत नाही, कुणीही बागडत नाही

कशाचे दु:ख वाटावे, कशाने सौख्य नांदावे
असे काही कधी घडले, मला ते आठवत नाही

असे हे बाड शब्दांचे, गझल-कविता नसे काही
जरी जपले न मी त्याला, तरीही फ़ेकवत नाही>>>

शेवटचे तीनही शेर छान आहेत Happy

@ वैभव,
मी बोलावले त्याला तसेच.. तो मला बोलवत्/बोलावत... होता.. ही जशी शब्द रचना आहे तशीच भाळवत. समोर हजार स्वप्ने आहेत.. पण ती मला भाळवत नाहीत.. किंवा त्यांची पूर्तता करायची मला इच्चा मला होत नाही. त्यामुले भाळवत ही शब्द रचना मला चुकीची वाटत नाही. मी त्यावर भाळले.. किंवा त्याने मला भाळवले.. चुकीचे वाटत नाही मला.

मनाची बागही माझ्या...
माझ्याप्रमाणेच माझ्या मनाची बागही... असाच अर्थ आहे. आणि तो उलगडतो आहे असे वाटते.

वृत्ताची नक्की ओढाताण कुठे होते आहे हे सांगाल का? कारण कुठेही मी र्‍हस्वाचे दिर्घ वा व्हाईस व्हर्सा केलेले दिसत नाहीये. आणि म्हणताना लय सुद्धा बिघडत नाहीये. त्यामुळे प्लिज सविस्तर सांगा.

सुरेख.

नव्या वाटा नको आता नवे काही नको वाटे
अता पाऊलही माझे नव्या साठी अडत नाही

कुणी यावे, कुणी जावे.. सुतक नाही न सोयरही
पुरणपोळी नको वाटे, नि भाकर मोडवत नाही

कशाचे दु:ख वाटावे, कशाने सौख्य नांदावे
असे काही कधी घडले, मला ते आठवत नाही

हे शेर आवडले.

प्राजू,

तुमची आणि वैभवची चर्चा वाचत असूनही या विशिष्ट गझलेबाबत (तुमची हरकत नसल्यास) मला जे म्हणायचे आहे ते जर विस्तृत स्वरुपात सांगायचे झाले तर ते खालीलप्रमाणे असेल.

(मी वर 'छान गझल' असे म्हणालेलो आहे. पण प्रत्येक गझलेत अधिक काहीतरी होण्यासारखे असू शकते. अनेकदा ते दुसर्‍यालाही सुचू शकते. त्यामुळे 'छान गझल' हा प्रतिसाद तसा अयोग्य आहे, पण प्रत्येक वेळी विस्तृत प्रतिसाद देणे शक्यही नसते आणि त्यातून नवेच वादसंवाद निर्माण होतात म्हणून 'जेवढे आवडले तेवढे नोंदवून पुढे चला' ही भूमिका घेतली जाते).

आपल्या या गझलेबाबतः

(आशा आहे की आपण सकारात्मकरीत्या बघाल)

(टीप - काही खयाल बदललेले वाटतील. पण गझलेचा शेर सपाट होण्यापेक्षा किंचित खयालाचा रंग बदलला व तो कंगोरी झाला तर अधिक उत्तम मानले जावे. याचे कारण गझल हा थेट भिडणारा काव्यप्रकार आहे. त्यात शब्द व आशयाची गंमत रंगीनता आणते जी मला व्यक्तीशः आवश्यक वाटते. तेव्हा 'हे मला म्हणायचेच नव्हते' असे म्हणणे सोपे असले तरी 'असे म्हणण्याऐवजी असे म्हंटले गेले असते तर कसे वाटले असते' असाही विचार आवश्यक आहे असे माझे मत! मी पर्यायी गझल देत नसून योजलेल्या वृत्तात खयाल अधिक आकर्षकरीत्या कसा बसवता येईल याबाबत वैयक्तीक मत देत आहे. तेव्हा कृ गै न).

======================

अताशा जीवनी माझ्या नवे काही घडत नाही
नवेसे स्वप्नंही आता मनाला भाळवत नाही

दुसर्‍या ओळीतील स्वप्न हा शब्द 'जस्टिफाय' होण्यासाठी पहिली ओळ काहीशी अनुकुल असायला हवी होती असे वाटले. शेर सपाट झालेला आहे. 'साधारण' एकच मनोवस्था दोन्ही ओळीत प्रकट झालेली आहे.

अता झोपेतसुद्धा झोप माझी चाळवत नाही
अता स्वप्नातसुद्धा स्वप्न एखादे पडत नाही

======================

नव्या वाटा नको आता नवे काही नको वाटे
अता पाऊलही माझे नव्या साठी अडत नाही

पहिल्या ओळीत सर्व काही सांगून झालेले वाटत आहे. दुसरी ओळ नसतीच तरी पहिली ओळ शेर पेलायला एकटी समर्थ वाटत आहे. आशयाची हुकुमी पन्नास : पन्नास विभागणी अशी अपेक्षा नाहीच, पण दुसरी ओळ वाचा / ऐकायला सबळ कारण पहिल्या ओळीत असायला हवे. (बाय द वे, 'नव्यासाठी' हे जोडून लिहीले जाते) Happy

नव्या वाटा नवी ध्येये प्रवाही हो म्हणाली पण
झर्‍याचा डोह होण्याची मजाही सोडवत नाही

==============================

तिथे श्रावण बरसलेला, कधी गोष्टी वसंताच्या
इथे वैशाख आला ना, शिशिरही गोठवत नाही

अश्या शेराऐवजी:

कुठे श्रावण बरसलेला कुठे नांदी वसंताची
मला वैशाख वा साधा शिशिरही ओळखत नाही

===============================

कुणी यावे, कुणी जावे.. सुतक नाही न सोयरही
पुरणपोळी नको वाटे, नि भाकर मोडवत नाही<<< हा शेर भरीचा वाटत आहे. तसेच, एक शेर म्हणून सपक आहे.

===============================

मनाची बागही माझ्या जशी आहे तशी आहे
कुणीही नासवत नाही, कुणीही बागडत नाही

वैभव यांनी 'बागही' अथवा 'बाग ही' बाबत जे लिहिले आहे ते पटण्यासारखे आहे. पण त्याला साधा पर्याय आहे.

मनाची बाग केव्हाची जशी आहे तशी आहे - अशी ओळ सुलभ होईल.

नासवत व बागडत यांची अदलाबदल अधिक प्रभावी ठरेल. कारण कवीला आपल्या मनाची बाग जर तिथे कोणी बागडत नसेल तर निदान नासवली तरी जावी असे वाटणे हे अधिक प्रभावी व 'गझलसारखे' आहे.

==============================

कशाचे दु:ख वाटावे, कशाने सौख्य नांदावे
असे काही कधी घडले, मला ते आठवत नाही

पहिली ओळ छान आहे. मला दुसरी ओळ अशी सुचली.

कसे आता जशी होते तशी व्हावे कळत नाही

==============================

असे हे बाड शब्दांचे, गझल-कविता नसे काही
जरी जपले न मी त्याला, तरीही फ़ेकवत नाही

दुसरी ओळ सुंदर आहे.

=============================

फुकटच्या सल्ल्याबद्दल क्षमस्व!

-'बेफिकीर'!

प्राजुताई,
गैरसमज नसावा..मी फक्त माझी मते मांडली आणि इथेही मांडतो आहे.

'भाळवत' विषयी अजूनही मी संदिग्ध आहे..

बागही बद्दल - तुझा मुद्दा मान्य आहे..

या गझलेत वृत्ताची ओढाताण अशासाठी म्हटले होते की काही मिसरे चपखल शब्दरचना न झाल्याने सुटसुटीत किंवा सहज आलेले नाहीयेत..
काही मिसर्यांमध्ये भरीचे शब्द आहेत..

असे हे बाड शब्दांचे, गझल-कविता नसे काही
जरी जपले न मी त्याला, तरीही फ़ेकवत नाही
या शेरात 'असे' शब्द मला तरी भरीचा वाटतो आहे..

'असे काही कधी घडले, मला ते आठवत नाही' हा मिसरा 'असे काही' आणि 'ते' या दोहोंच्या वापरामुळे कमी सफाईदार वाटला.
माझ्या मते 'घडले' ऐवजी 'घडलेले' घेऊन 'ते' शब्द न वापरल्यास( अर्थात वृत्त सांभाळून) जास्त सहजता येईल. ( वै.मत )

मतल्यात 'नवेसे स्वप्नंही' असे ही वृत्तासाठीच केल्यासारखे वाटत आहे..कारण सरळ 'नवे' असेही वापरता येईलच की....

दुसऱ्या शेरात 'नव्या वाटा नको' ऐवजी अचूकतेसाठी 'नव्या वाटा नकोत' असे हवे...

वरील सर्व विश्लेषण तू मागीतलेस म्हणून आणि माझे विधान पटवून देण्यासाठी देत आहे ( बाकी चुका दाखवायचा हेतू नक्कीच नाही ).

काही चुकत असल्यास क्षमस्व.

गझल छान आहे मला आवडली

सर्व प्रतिक्रिया वाचल्या बेफीजींची प्रति़क्रिया योग्य आहे (बदल सुचवणारे शेर त्यांनी द्यायला हवे होते की नाही हे समजत नाहीये)
पण जवळजवळ त्यांचे सर्व शेर आवडले (मी वेगळी अन् एक स्वतंत्र रचना म्हणून पाहिले )

फक्त एक ओळ्व आवडली नाही ...........<<<कसे आता जशी होते तशी व्हावे कळत नाही>>>>

या ऐवजी असा बदल कसा वाटतो ?<<<<<<<

कशाचे दु:ख मानू मी, कशाने सौख्य मानू मी
असे घडले.कुठे काही... मलातर आठवत नाही

बेफींची पोस्ट आवडली.

प्राजु...."भाळवत" शब्दाबद्दल ......
"भाळणे" हे क्रियापद आहे पण "भाळवणे" हे नाही ऐकलं. कोणी कोणावर "भाळू" शकतं...पण "भाळवतं"...??

बेफिजी,
आपण केलेल्या सुचना आवडल्या. प्रत्येकाची अभिव्यक्ती वेगवेगळी असू शकते. ही गझल पुन्हा नव्याने लिहिन मी. आपण लिहिलेले शेर चांगले आहेत. पण त्यामध्ये बेफिकिर दिसत आहेत. "मी दिसले नाही मला. त्यामुळे ही गझल पुन्हा नव्याने लिहिन मी.

जयू ताई, भाळवत असा शब्द का असू नये? जर तो त्याला असलेले अर्थ पूर्ण करत असेल आणि त्यातून मिळणारा संदेश सुद्धा यथायोग्य पोहोचवत असे तर भाळवत हा शब्दप्रयोग चुकीचा ठरू नये. मी भाळले किंवा.. कुणीतरी मला भाळवले..म्हणजे मी भाळावे असे काहीतरी त्याने केले.. असा अर्थ जर त्यातून सहज समजत असेल तर हा शब्द चुकीचा ठरू नये.

"कशाचे दु:ख वाटावे, कशाने सौख्य नांदावे
असे काही कधी घडले, मला ते आठवत नाही" >>> हा सर्वात आवडला.

वैवकुंना वृत्ताची ओढाताण का वाटली ते मला समजलं नाही.
कदाचित दोन लघु = एक गुरु असे अधिक वेळा वापरल्याने तसं झालं का ?

प्राजु,
प्रांजळ प्रतिसादांचा मोकळेपणे स्वीकार करायची वृत्ती आवडली.

सोसणार नाही म्हणून काहीही बोलत नाही, सुचवत तर नाहीच नाही!
वा! छान! बहुत खूब! शब्दांच्या अलिकडचे पलिकडचे सर्वकाही आले!

वैवकुंना वृत्ताची ओढाताण का वाटली ते मला समजलं नाही.>>>>

ओ उकाका मी त्याबद्दल कै बोललोच नैये
ते वैभव फाटक आहेत

Happy

सॉरी नका म्हणू काका .............

अहो काका 'वैभव' मुळे असा घोळ माझाही होतो कधी एखादी गझल पेश केल्यावर ती चांन्गली आहे असे लोक मला म्हणतात त्यावेळी Happy
पण काका ते खाली प्राजुताई लिहिलेलं वाच्लं नाहीत का तुम्ही त्यावरून तरी ओळखायचत मी कधी प्राजूला ताई म्हणेनतरी का ? Wink Proud

सुंदर गझल. कुलगुरूंचा प्रतिसाद नाही आला अजून?<<<<<<<<<<<
का बरे? गझल सुंदर आहे यात काही शंकाबिंका आहेत काय, की, कुलगुरूंची आठवण व्हावी?
चिलटांकरता तोफा अनावश्यक असतात!

अ‍ॅडमिन, काही तरी करा हो या स्मायलीसमंधाचे. वाटल्यास डॉ. ची फी, धरून नेणारे वार्डबॉय यांची फी आणि इलेक्ट्रीक शॉकचे बिल आम्ही देतो.

उमेश,

Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl

प्राजू गझलेवर प्रतिसाद विपूतून देतो

Rofl

उमेश कोठीकर,
अ‍ॅडमिन, काही तरी करा हो या स्मायलीसमंधाचे. वाटल्यास डॉ. ची फी, धरून नेणारे वार्डबॉय यांची फी आणि इलेक्ट्रीक शॉकचे बिल आम्ही देतो.<<<<<<<<<<

एवढे सगळे दिल्यावर, मग तुला विजेचे धक्के द्यायच्यावेळी काय करणार?

गझले बद्दल कोणीच बोलत नाहीये ....................

Sad

कोठीकर साहेब "खाजवून अवधान आणणे " अशी म्हण आहे आमच्याकडे ...............त्यातला प्रकार

Pages