पुण्यात भीमथडी यात्रा

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 25 January, 2013 - 13:36

पुण्यात कालपासून भीमथडी यात्र सुरू झाली. त्याला आज प्रचंड गर्दी झाली होती. यात्रेत बराच भटकलो. लोक हरखून गेले होते यात्रेमध्ये. गारुडी, गोंधळी, वासुदेव, पिंगळा, कुडमुड्या असे अनेक लोककलाकार आजुबाजूला फिरत होते. लोकांनी त्यांची आणि त्यांच्यासोबत स्वत:ची छायाचित्रे काढली. प्लॅस्टर अॉफ पॅरीसच्या गाय वासरावरून हात फिरवताना अनेकांच्या डोळ्यांत आगळा आनंद होता. जुन्या काळचे ग्रामीण स्वयंपाकघर लोक रांगा लावून पाहत् होते. नंदीबैलाचे गोठ्यातील गाई-म्हशींचे फोटो काढत होते. सगळीकडे छान वातावरण होते. माझ्या मनात एक विचार चमकून गेला की ही खरी आपली मराठमोळी संस्कृती. लोकांना त्याचे अद्याप अप्रूप आहे. आपल्या परंपरा, संस्कृतीचे त्यांना या भौतिक युगातही अपार आकर्षण आहे, आपलेपण आहे. विकासाची कास धरताना, जागतिकीकरण, औद्योगिकीकरणाच्या या युगामध्ये आपणच आपली संस्कृती विसरलो आहोत. एकविसाव्या शतकाकडे झेप घेताना आपणच आपली मुळे सोडून दिली आहेत का? याचा आपण सर्वांनी गांभिर्याने विचार करायला हवा. विकास, विकास करीत पुण्याची वाट लागली. वाडे पडले. सिमेंटच्या जंगलात गगनचुंबी टॉवर्स उभे राहीले. पेठांमधील आपलेपणा विरळ झाला. मूळच्या पुणेकरांनाच पुण्यात घर घेणं अशक्य झालं. अहो जोशी ..(क़िंवा कुलकर्णी, देशपांडे) असं जरा जोरात बोललं तरी चटकन चार नजरा पुण्यात कधीही आपल्याकडे वळत. ते मूळचे सदाशिव,स् हनवार, नारायण, कसबा पेठेतील जोशी, देशपांडे,कुलकर्णी आता पुण्याबाहेर लांब उपनगरांमध्ये गेले. ओसवाल, शाह, खिंवसरा सरळ सदाशिव पेठेचा पत्ता सांगूलागलेत. सदाशिव पेठेतील परवा दिड कोटी रुपयांच्या फ्लॅटची परवाची जाहिरात पुणेकरांचे डॉळे दिपवून गेली. पुण्याची संस्कृतीच बदलली. मॉलमुळे कोप-यावरचा वाणी संपला. पिठाच्या गिरण्याही शेवटचे आचके देत आहेत. चाळ संस्कृती जवळपास संपलीच. पाहवं तिकडं माणसं आणि त्याहीपेक्षा चहुबाजूंनी गाड्या हे आता पुण्याचं प्रातिनिधीक चित्र बनलंय. या नव्या वातावरणात पुणेकर त्रासून गेला आहे. त्याची मन:शांती हरवलीय. हा गजबजाट आता असह्य झालाय. त्यामुळेच जुन्या संस्कृतीची आठवण करून देणा-या
भीमथडी सारख्या यात्रा त्याला आपल्याशा वाटत असतील.....

* आधारित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users