मुलांच्या हक्काची 'सावली'

Submitted by मंदार शिंदे on 19 October, 2012 - 08:56

नितेश बनसोडे हा तरुण अहमदनगरमध्ये अनाथ, निराधार मुलांसाठी 'सावली बालसदन' चालवतो. 'बदलाची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे,' हे त्याचं ब्रीद आहे. मी जर बदल करू शकलो तरच सर्वजण बदल करायला तयार होतील, असं तो मानतो. लहानपणापासून नितेश फक्‍त विचार करायचा - समाजाचं परिवर्तन झालं पाहिजे, समाज बदलला पाहिजे, गुंडगिरी संपली पाहिजे, वगैरे वगैरे. पण हे कसं होणार, कोण करणार ते कळत नव्हतं. आपण काय करू शकतो, हेही कळायचं नाही तेव्हा. फक्‍त काहीतरी केलं पाहिजे एवढंच कळायचं.

लहानपणीच आई हे जग सोडून गेली. अनाथपणाच्या वेदना स्वतः सोसत मोठा झाला. 'मी बदल करायला हवा' या भावनेतून, २००१ साली कॉलेजमध्ये शिकताना विचार केला - अनाथ मुलांची स्वप्‍नं पूर्ण करण्यासाठी काम करायचं! नुसत्या चर्चा करून काहीही बदलणार नाही, हे जसं लक्षात आलं, तसं स्वतःहून कामाला लागला. महाराष्ट्राच्या अहमदनगर शहरात जेव्हा काम सुरु केलं तेव्हा सोबत काहीही नव्हतं - ना मित्र, ना संस्था, ना टीम, ना इन्फ्रास्ट्रक्चर. फायदा मिळवून देणारी जात नव्हती, प्रसिद्धीचं वलय नव्हतं, राजकीय संबंध नव्हते, सेवादल-आरएसएस सारख्या संघटनांशीही संबंधित नव्हता - एकटा होता. घरातून मिळालेल्या तुटपुंज्या रकमेतून एवढं मोठं स्वप्‍न कसं पूर्ण करायचं, हा प्रश्न त्यावेळी पडला. पण आपली भारतीय संस्कृती म्हणते ना - 'आपल्या घासातला घास दुसर्‍याला भरवायचा.' २००१ मध्ये अहमदनगरला महिना सव्वादोनशे रुपये भाडं देऊन एक खोली घेतली आणि तीन अनाथ मुलांना घेऊन कामाची सुरुवात केली. पुढचा प्रवास अतिशय अडचणींचा आणि खडतर आहे, याची जाणीव होतीच.

आसपासच्या भागातील काही प्रस्थापित संस्थांशी संपर्क साधला, मदत आणि मार्गदर्शनाच्या अपेक्षेतून. परंतु वलयांकीत संस्थांकडून मदत सोडाच, माहितीही मिळू शकली नाही. शहरातील धनवान लोकांना भेटून या कार्याबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितलं, 'आधी तू स्वतः खूप पैसे कमवून श्रीमंत हो आणि मग अनाथ मुलांना सांभाळ.' अशा अनुभवांनी मन खच्ची व्हायचं. पण आतला आवाज पुन्हा पुन्हा ऐकू यायचा - 'मला हे सगळं करायचंय आणि मीच हे करणार आहे!' मग मनात विचार आला, जर या क्षणी माझा मृत्यू झाला तर काय होईल? मग कुठला पैसा, कुठली श्रीमंती, कुठली स्वप्‍नं, आणि कुठल्या समस्या? आणि मग कळून चुकलं की, आयुष्यातली सर्वात मोठी समस्या 'मृत्यू' हीच आहे. त्याच्याआधी येणार्‍या समस्या खूपच छोट्या आहेत. या विचारानं मनाला पुन्हा उभारी आली आणि त्या तीन अनाथ, निराधार मुलांसाठी काम चालू ठेवलं. स्वतः जेवण बनवायचं, मुलांना खाऊ घालायचं, आणि दुपारी कॉलेजला जायचं, संध्याकाळी परत येऊन संस्कार वर्ग चालवायचे, असं काम चालू राहिलं. २००३ पर्यंत अशाच पद्धतीनं रोजच्या भाकरीचा प्रश्न सोडवत काम चालू ठेवलं.

२००४ साली एक अनपेक्षित वळण मिळालं. काही स्‍नेह्यांच्या मदतीनं वीस मुलांना रायगड-दर्शनाला नेलं होतं. खिशात फक्‍त वीस रुपये होते, ज्यातून सगळ्या मुलांसाठी पाणीसुद्धा विकत नसतं मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत या अनाथ मुलांना घेऊन प्रवेश केला. ज्या राजानं साडेतीनशे वर्षांपूर्वी 'आपल्या' माणसांसाठी स्वराज्य उभं केलं, त्या राजाच्या राजधानीत या निष्पाप मुलांना प्यायला पाणीसुद्धा मिळणं किती अवघड आहे, याची जाणीव होऊन मन विषण्ण झालं. आजूबाजूला सधन पर्यटकही होते आणि ही निर्धन मुलंही होती. समाजातील विषमतेचं मूर्तिमंत दर्शन होऊन नितेश निराश झाला. पण हीच आपली परीक्षेची वेळ आहे, आता खचून चालणार नाही, असाही विचार आला. सोबत असलेली ही वीस मुलं अनाथ आहेत आणि एवढ्या तरुण वयात हा या निराधार मुलांचा सांभाळ करतोय, यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. कुणाला सांगून हा विश्वास मिळवण्यापेक्षा, लोक जेव्हा स्वतः बघतील तेव्हाच विश्वास ठेवतील, हेही पटलं.

आणि खरोखर तो काम करत गेला, लोकांचा विश्वास बसत गेला. हळूहळू मुलांची संख्या वाढत गेली. तीन मुलांपासून सुरु केलेलं काम आधी वीस आणि आता पन्नास मुला-मुलींपर्यंत वाढलं. ज्यांना आई-वडील नाहीत किंवा एकटी निराधार आई सांभाळ करु शकत नाही, अशा पंचवीस मुली 'सावली'मध्ये दहा वर्षांपासून अगदी आनंदानं राहतायत. त्यापैकी काही बारावी झाल्या, काही दहावीला आहेत. काही मुलं 'आयटीआय'ला शिकतात. या सगळ्या मुला-मुलींना एक घरासारखं वातावरण दिलंय. हेच स्वप्‍न घेऊन कामाला सुरुवात केली होती - अनाथ मुलांना हक्काचं घर द्यायचं. 'सावली' हे या मुलांचं स्वतःचं घर आहे. या घरात त्यांना कसलीही आडकाठी नाही. संस्थेचं, अनाथाश्रमाचं स्वरुप न देता, स्वतःच्या घराचं वातावरण बनवण्यात यश आलं, जिथं मुलं अगदी आनंदानं बागडतात. या घराला भेट देणार्‍यांना देखील हे वातावरण खूप भावलं. इथं येणारे पाहुणे स्वतः गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातले होते. पण ही घासातला घास देणारी माणसं होती. आणि ह्याच भावनेतून गेली दहा वर्षं 'सावली'च्या स्‍नेह्यांनी इथल्या मुलांची पोटं भरली.

असं असलं तरी रोजचा भाकरीचा प्रश्न सुटला असं म्हणता येणार नाही. रोज सकाळी उठलं की पहिला विचार हाच असतो - आज मुलांच्या जेवणाची सोय कशी करायची? हे घर कसं चालवायचं? लाईटची, फोनची बिलं कुठून भरायची? आपण आपल्या स्वप्‍नासाठी काम करतोय, पण इतर लोक जे इथं काम करतात त्यांच्याही गरजा असतात. त्यांना कामाचा मोबदला, मानधन कुठून द्यायचं? या सगळ्या गोष्टींच्या विचारांमध्ये खूप वेळ जातो आणि लवकर शीण येतो. आणि मग आपल्या मुलांशी बोलायलासुद्धा वेळ मिळत नाही. आठवड्यातून थोडाफार वेळ ठरवून मुलांशी गप्पा मारतो. त्या गप्पांमधून, संवादातून मुलं उमलतात. हा संवादच मुलांचं 'सावली'शी नातं टिकवून ठेवतो. अभिमानाची गोष्ट आहे की, आजतागायत या घरातून एकही मूल पळून गेलेलं नाही. एकाही मुलाला किंवा मुलीला इथं परकं, निराधार वाटलेलं नाही. 'सावली'च्या ऑफीसलाही कुलुप नाही आणि स्वयंपाकघरातही प्रवेश-बंदी नाही. मुलं हवं तेव्हा स्वयंपाकघरात जातात, हवं ते हातानं घेऊन खातात. इतकंच नाही तर स्वतः स्वयंपाकात मदत करून एकमेकांना जेवायलाही वाढतात.

एक गोष्ट मुलांना आवर्जून शिकवली - कधीही लाचार व्हायचं नाही. स्वाभिमानानं जगायचं. आपल्याला आई-वडील नाहीत, हा भूतकाळ झाला. आज आपण सशक्‍त आहोत. केवळ आई-वडील नाहीत ही गोष्ट सोडली तर आपण कुठल्याही अर्थानं आज अनाथ राहिलेलो नाही. समाजानं अनाथपणाचा शिक्का मारल्यानं अशा मुलांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो. अनाथाश्रमांमध्ये त्यांना आश्रितासारखं, उपर्‍यासारखं वाटतं. त्यामुळं 'सावली'मध्ये स्वतःच्या घरासारखंच वातावरण ठेवण्याची धडपड केली जाते.

आज आजूबाजूला नजर टाकली तर अशा अनेक संस्था कार्यरत दिसतील. आपापल्या परीने प्रत्येकजण प्रयत्‍न करतोय बदल घडवण्याचा, काहीतरी करण्याचा. परंतु प्रत्येकाला आवश्यक तेवढी मदत किंवा पाठबळ मिळेलच असं नाही. जगण्याच्या लढाईत या मुलांना जिंकून द्यायचा प्रयत्‍न नितेश करतोच आहे, पण आता पुढची स्वप्‍नं आणखी मोठी आहेत. या मुलांपैकी काहींना कलेक्टर व्हायचंय, कुणाला डॉक्टर, कुणाला इंजिनियर, तर कुणाला पोलिस... या सगळ्या मुलांची स्वप्‍नं पूर्ण करायची आहेत आणि आदर्श भारताचे आदर्श नागरिक या मुलांमधून घडवायचे आहेत. एक आदर्श सावली उभी करायची आहे - जसं एखादा माणूस कितीही अस्वस्थ, त्रासलेला असला तरी एखाद्या झाडाच्या सावलीत गेल्यावर शांत आणि प्रसन्न होतो, तसंच ह्या 'सावली'त येणार्‍या प्रत्येकाला शांत आणि प्रसन्न वाटावं, अशी प्रार्थना तो मनापासून करतो.

नितेशला आधी असं वाटायचं की, आपण 'सावली'तल्या मुलांसाठीच काम करतोय. पण हळूहळू लक्षात आलं की, हे काम त्याहून मोठं आहे. ही अनाथ, निराधार मुलं किती सहज वाईट मार्गाला लागू शकली असती. व्यसनाधिनता आणि गुंडगिरीमुळं किती सहज समाजाला त्रासदायक आणि नकोशी ठरली असती. या मुलांना वाईट मार्गावर जाण्यापासून रोखण्याचं काम 'सावली'नं केलंय. काही संभाव्य गुन्हेगार व समाजकंटकांपासून समाजाला वाचवलंय, असंही म्हणायला हरकत नाही. या कामाचा खरा फायदा संपूर्ण समाजाला होतोय. समाजातील लोकांनी प्रेरणा घ्यावी असंच या मुला-मुलींचं यशस्वी जीवन आहे. समाजातील सुखवस्तू कुटुंबातून मुलं इथं येतात आणि बघतात, कशी ही पन्नास मुलं छान, गुण्यागोविंदानं राहतात. हीच मुलं शिव्या देऊन बोलायची, हीच मुलं चोर्‍या करायची, हीच मुलं मारामारी करायची, हीच मुलं म्हणायची की, आम्ही खून करू... 'सावली'त येऊन या सवयी, ही हिंसकता हळूहळू कमी झाली. एकदाही छडी न उगारता, मार न देता या मुलांमध्ये परिवर्तन घडून आलं.

सुरुवातीला दहा बाय दहा च्या जागेतही सारे आनंदानं रहायचे. पण मुलांच्या गरजा ओळखून नितेशनं मदतीचं आवाहन केलं. एका पुरस्काराच्या रकमेतून 'सावली'साठी जागा विकत घेतली. काही सुहृदांनी मदत केली. एक-एक वीट गोळा करत मुलांसाठी मोठं घर बांधलं. मुलांना बागडायला जेवढी प्रशस्त जागा मिळेल, तेवढीच त्यांची मनंही विशाल होतील, या भावनेतून शंभर स्क्वेअर फुटापासून दोन हजार स्क्वेअर फुटांपर्यंत विस्तार केला. आता अजून मोठं स्वप्‍न बघितलंय - पाच एकर जागेचं. इतकी जागा की जिथं मुलांची स्वप्‍नं पूर्ण करणारी सगळी साधनं असतील, शाळा असेल, मैदान असेल, वाचनालय असेल, प्रयोगशाळा असेल, आणखी बरंच काही असेल... पण अजून तरी हे स्वप्‍न स्वप्‍नच आहे. ते सत्यात उतरवण्यासाठी समाजाकडून मदत मिळणं आवश्यक आहे. आणि ती मिळेल यावर विश्वासही आहे!

संपर्कः नितेश बनसोडे, 'सावली बालसदन', अहमदनगर. फोनः ९८९०९६९३१५

savalee_balsadan_ahmednagar_nitesh_bansode_ngo.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप चांगलं काम करतायत नितेश बनसोडे. त्यांना खूप शुभेच्छा.
मायबोलीच्या माध्यमातून काही मदत करण्याचा नक्की प्रयत्न करु.

मंदार शिंदे

आपण दिलेल्या या माहितीबद्दल मी आपला ऋणी आहे. दान देऊ शकणा-या अनेक मित्रांकडे ही माहिती पोहोचवायला मला आनंदच होईल. मात्र तन, मन देऊन मदत करता येत नसल्याने वाईट वाटतंय.

'सावली'बद्दल इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद मंदार शिंदे. फार चांगलं काम करत आहेत नितेश बनसोडे.

खूप स्तुत्य उपक्रम ,
काही संभाव्य गुन्हेगार व समाजकंटकांपासून समाजाला वाचवलंय >>>>अनुमोदन