झोंका हवा का था वो ....
खरंच माणसं आयुष्यात येतात आणि निघुनही जातात.
वाऱ्याच्या झुळूकीसारखी.
ह्या झुळूकी कधी मंद तर कधी तीव्र असतात.
कधी अवखळ तर कधी गंभीर.
कधी आपल्यासाठी आनंदाचे सिंचन, तर कधी ठेऊन जातात ओल्या सुक्या हुंदक्यांचे सण.
अशीच एक झुळूक... किर्ती.
..........
"कोण रे हा उंदीर ?"
एका बुटक्या, काळ्यासावळ्या, तुडतुडीत मुलाने आमच्या वर्गात प्रवेश करताच, संज्याने मला कोपरखळीच्या दणक्यासह हा प्रश्न विचारला.
"अरे सिस्टरबाईंचा किर्ती नाही का हा?" आमचा आख्खा गाव त्याच्या आईला सिस्टरबाईच म्हणायचा.
"आयला वाटतोतं पाचवीचा आन बारावीच्या वर्गात?" या वेळी मी संज्याच्या कोपरखळीचा नेम हुकवला होता.
संज्या, वाक्य कोणतही बोलला तरी दणका ठरलेला. त्याला भिंतीच्या बाजूने बसवून पाहीलं तर त्याने उजव्या ऐवजी डाव्या हाताचं शस्र केलं, पण आपला खाक्या काही सोडला नाही. त्याच्या या सवयीने मी पुरताच बेजार झालो होतो आणि म्हणून प्रसंगावधानानं मी किर्तीला हाक मारून आमच्या बेंचवर आमंत्रीत केलं. सरांनीही ना केलं नाही. आणि तो मुळातच बारीक असल्याने आम्हालाही दाटी वाटली नाही. त्याला आमच्या दोघांच्यामधे बसवून मी निर्धास्त झालो. हळूहळू आमची मैत्री घट्ट होऊ लागली. त्याच्या येण्याने मी तर खूपच सुखावलो होतो. कारण संज्याचा हल्ला आता डायव्हर्ट झाला होता.
एकदा वर्गात न्युटनचा क्रिया-प्रतिक्रिया बलाचा सिद्धांत चालू होता. सरांच्या अंगात प्रत्यक्ष न्युटन संचारला होता. तेवढ्यात संज्याचा अकस्मात हल्ला झाला. आजचा हल्ला विशेष ताकदीचा असावा.
“आयो $$$”...
किर्त्याने डोळे पांढरे केले आणि मान बेंचवर टाकली. संज्या मनातून खूप घाबरला. त्या हल्ल्याने न्युटन उडी मारून वर्गाबाहेर पळाला आणि सर आमच्या जवळ आले. मला बाजूला करत त्यांनी किर्तीला उठवले. हातापायात त्राण नसल्या सारखा तो लोंबकळत होता.. त्याच्या तोंडावर पाणी मारले तरी शुद्ध येईना. संज्या थरथर कापत होता. क्षणाक्षणाला घाम पुसत होता. शेवटी किर्त्याला दवाखान्यात हलवले....
“काय झाले?” डॉक्टरच्या प्रश्नाने संज्याची गाळण उडाली.
“काय माहित. अचानक ओरडून बेशुद्ध पडला” सरांनी सांगितले.
“ठीक आहे” म्हणून डॉक्टरांनी तपासून इंजेक्टिव दिले आणि औषधे आणण्यासाठी आम्ही मेडिकलकडे निघालो..
“काय केलं रे त्याला?”
“अरे सहज खुणवलं होतं कोपरानं”
“अरे त्याचा जीव कितीसा?... तुला कळायला हवं होतं. आणि तुझी ही सवय जाणार कधी, एखाद्याचा जीव गेल्यावर?” संज्यापुरता खजील झाला होता.
“नाही, आता नाही करणार मी तसं. देवामारुतीराया, शुद्धीवर आण रे त्याला, तुला नारळ फोडीन” संज्या काहीबाही बरळत होता.
आम्ही परत येईपर्यंत किर्त्या शुद्धीवर आला. संज्याचा जीव भांड्यात पडला.
“बरं वाटतय का रे?” मी विचारलं.
“हो, बराये”
संज्या मख्ख उभा होता...
संज्याची सवय मोडण्यासाठी किर्त्याने हे सगळं नाटक केलं होतं हे समजेपर्यंत संज्याची सवय खरोखरच मोडली होती. त्याच्या डोक्यात कधी काय येईल याचा नेम नव्हता.
................................
डब्ब्यात बटाटा सोडून इतर कोणतीही भाजी त्याने कधीच आणली नाही... चटणी, चकल्या, कधी उकडून, कधी किस, बटाट्याचे सगळे प्रकार खाऊनही किर्त्या कधीच बटाट्यासारखा झाला नाही.
"बाप्या, यार आपलं नशीबच फुटकं. आर्टच्या पोरी बघ एकेकीकडं नुसतं बघत रहावसं वाटतं.
नायतर साला आपला वर्ग. निम्मा तर चष्म्यांनीच भरलाय..
ती मनिषा वाघ... दुधी भोपळा
रुपाली काळे... सिडलेस
मैत्रेयी पगार... वालवड साली..."
"ये ती भापकर मात्र बटाट्या सारखीये आ.." त्याची लिस्ट मध्येच थांबवून मी म्हणालो.
माझ्या बोलण्याने किर्त्याचा चेहरा एकदम उतरला. तो गप्पच झाला. काहीच बोलेना.
मागे एकदा बोलताबोलता मी निल्याजवळ त्याच्याच बहिणीबद्दल काहीबाही बोललो होतो. चार महिने गालफुगवून होता साला. तसंच काही झालं की काय या भीतीने माझाही चेहरा हिरमुसला झाला.
“सॉरी यार.. माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ कर.. विसरून जा... प्लीज” मी किर्त्याला विनवू लागलो.
“हे बघ बाप्या, तू कोणाविषयी काहीही बोल पण बटाट्याचा असा अपमान केलेलं आपल्याला नाही सहन होणार”.....असं म्हणून अचानक फुटावा तसा जोरजोरात हसत सुटला.
कमालीचं रसायन होतं किर्त्या म्हणजे.
..............................................
डिसेम्बर महिना आला आणि वर्गात सहलीचे वारे वाहू लागले. मुरूड, जंजिरा, श्रीवर्धन, हरिहरेश्वर....आमची स्वप्नातली गावं आम्हाला बोलावू लागली.
“ज्याला सहलीला यायचे आहे त्याने ३०० रुपये सहल मंत्र्याकडे जमा करावे”
सरांनी सूचना वाचून दाखवली आणि वर्गात सहलीच्या चर्चा झडू लागल्या.
‘बाप्या, तू येणार ना सहलीला?”
“नाही रे इतके पैसे देणार नाहीत दादा, म्हणजे ते तरी कुठून आणतील. नोकरीला नाहीत ते.”
”आयला म्हणजे आमचे आईबाप नोकरदार आहेत ही काय आमची चूक का काय?” किर्त्या फन्कारला.
“तसं नाही यार, पण खरोखर तुमचं नशीब चांगलये की तुमचे आईबाप पगारदार आहेत. माझेही आई-दादा चांगले आहेत पण ते नोकरीला नाहीत इतकंच”
“ठीके मग आम्ही भरू पैसे. तू चल, काय संज्या?”
“हो हो आम्ही भरतो, चल”
“नाही, मला यायचंच नाहीये” मी माझ्या परीने विषय थांबवला.
....................
वर्गात सहलीला जाणाऱ्यांची यादी वाचून दाखवली गेली. त्यात माझं नाव ऐकून मला कळून चुकलं की या दोघांनीच पैसे भरले असणार.
“मला नाही यायचं सांगितलं होतं ना?” मी आवेशाने विचारु लागलो.
“पैसे मी नाही किर्त्याने भरलेत” संज्या कळवळला.
“का रे, जास्त झालेत?”
“तू काहीही समज, भाव खाऊ नकोस, चल आता”
खरं तर अशा उपकार ओझ्यांना मी फार घाबरून होतो. कुणाशी मन मोकळं करायला जावं आणि त्याने गरिबीचा कळवला की श्रीमंतीची मिजास म्हणून पैसे हातावर टेकवावेत... असा प्रकार मी खुपदा भोगला होता.
त्याने घरी सांगितलं नसणारच, असं वाटून मी त्याच्या घरी हा प्रकार सांगायचं ठरवलं.
मी संध्याकाळी त्याच्या घरी गेलो. त्याची आई आणि दोन बहिणी स्वयंपाकात गुंतलेल्या होत्या.
सिस्टरबाईंनी प्रेमविवाह केलेला होता. किर्ती, जयश्री, आणि गुड्डी तीन अपत्ये. मुले झाल्यावर त्यांना पतीच्या पहिल्या पत्नी विषयी कळले होते. केवळ पैशाच्या मोहापायी त्याने सिस्टरबाईंना फसवले होते. शिकलेली बाई, पण कशी फसली कोण जाणे. आता फक्त पगाराच्या दिवशी यायचं, भांडायचं, पैसे घ्यायचे आणि जायचं. एव्हढ्यावर त्यांचा संसार येऊन ठेपला होता. मुलांशी बोलणं सोडाच पण ‘ही माझी नाहीतचं’ असंही म्हणायचा तो. हे सगळं ओझं माथ्यावर घेऊन किर्त्या इतका आनंदात कसा राहू शकतो याचं मला नेहमी नवल वाटायचं. एवढ्या दुबळ्या शरीरात हे बळ कुठून आलं असेल देवच जाणे... संकटांना धैर्याने तोंड देणारी अनेक माणसं मी पाहिली आहेत मात्र अवखळ वयात स्वतःबरोबर आपल्या आईला आणि बहिणींनाही धीर देण्याचं मानसशास्र कुठून शिकून आला होता हा कुणास ठाऊक.
मला दारात पाहताच...
“मम्मी, बापू आलाय” गुड्डीने निरोप दिला.
“अरे बस बापू , किर्ती बापू आलाये, बाहेर ये”
“त्यालाच इकडं पाठव“ किर्त्या आतूनच ओरडला.
.............................
“मम्मीला सांगायला आलास?” मी आत जाताच किर्त्या दात खाऊ लागला.
“मला कुणाचे उपकार नाकोयेत”
“तुला काय वाटलं? माझ्या मम्मीने पैसे दिलेत भरायला. स्वत:च्या मुलांना कोणी देत नाही सहज, तुला देईल ती.”
“मग भरले कुठून तू’’
“ते सोड न यार, तू चल बस्स”
“पैसे कुठून आलेत कळाल्या शिवाय नाही”
“माझी जुनी सायकल होती ना? विकून टाकली साली.. पण मम्मीला सांगू नकोस प्लीज.
वाढदिवसाची होती... वाढदिवस काय?... दरवर्षीच होतात. सायकल मिळेल पुन्हा कधी. पण मम्मीची बदली झाली तर पुन्हा आपण कधी एकत्र येऊ की नाही काय सांगावं.” किर्त्या डोळ्यात पाणी आणून बोलत होता
त्याच्या डोळ्यातली धार थांबत नव्हती.
मला माझा मित्र क्षणात आभाळाहून उंच वाटू लागला होता. त्याची उंची पाहताना माझी मान खाली जाऊ लागली.. देण्यामागे इतकी निर्मळ भावना असू शकते हे पहिल्यांदाच जाणवू लागलं. त्याच्या पुढच्या बोलण्याकडे माझं अजिबात लक्ष नव्हतं. त्याला मिठीत घेऊन मी माझा खुजेपणा लपवू पाहत होतो. माझ्यातला “मी” माझ्याच डोळ्यांतून झरझरत होता. मैत्रीचं नवं क्षितीज मोकळं होत होतं. धाग्याच्या भिजलेल्या गाठी अधिक घट्ट होतात तसं घट्ट बांधलं जात होतं आत आत एक नातं.
........................
“ नाही, मला ‘डी.एड’च करायचंय मम्मी” बारावीच्या निकालानंतर किर्त्या आईला सांगत होता.
“बापू, तूच समजाव ह्याला”
“तो काय सांगणार? तो जाणारे, म्हणूनच मी पण जाणारे”
“आमच्या खात्यात मेल नर्सिंग केलेले मिळत नाहीत म्हणून म्हणतेय. आणि मी काहीतरी करून तुला घेऊ शकते इकडं”
“तरी पण मला डी.एड करायचेय”
त्याचं काहीही न ऐकताने सिस्टरबाईंनी त्याला फॉर्म भरायला लावला. आता आमची ताटातुट नक्की होती.
पण सुदैवाने त्याला ससून हॉस्पिटल मिळालं आणि मला कोथरूडचे कॉलेज... पुन्हा दोन वर्षे आम्ही एकत्र... शनिवार – रविवारच्या भेटी...सोबत येणं-जाणं.. दुरावा असा नव्हताच...हसत खिदळत दिवस कधी सरले कळलंसुद्धा नाही.
मधल्या दिवसांत किर्त्याने केलेली प्रगती घरापर्यंत पोहचली.
प्रगतीही नार्सिंगलाच होती. सिस्टरबाईंच्या विरोधाचा प्रश्नच नव्हता कारण त्यांनी स्वत:च लव्ह मॅरेज केलं होतं. शिवाय त्या खूप मनमोकळ्या होत्या.
“तुला नाही भेटली का कोणी?” बाईंनी एकदा सहज मला विचारलं.
पोटामागे धावणाऱ्या आयुष्याला असली मखमली स्वप्न पडत नसतात. आणि पडली तरी त्याचा शेवट पुन्हा आयुष्याच्या जखमांमध्ये एका नव्या जखमेची भर घालूनच होत असतो. मी मानेनेच नाही म्हणालो.
“ ती जया बोलत होती मला एकदा, की बापू आमिरखान सारखा दिसतो ना?”
“हो तर, अरे मित्र कुणाचाये?
नाक, कान, डोळे, ओठ, ..... म्हणजे चेहरा सोडला तर डिक्टो आमिरखानच”
एव्हढे बोलून नेहमीप्रमाणे कीर्त्याचा फुगा फुटला...
“माझं सोड, तू लग्न केंव्हा करतोयेस?” मी त्याला गंभीरपणे विचारले.
“नाही यार, आधी नोकरी , मग थोडे पैसे जमले, की जयडीचं लग्न. मग मी करेन. प्रगतीही तोवर थांबेन म्हटलीये.”
“थांबणार कशी नाही एव्हडा परमनंट कलर कुठे मिळणार तिला?”
सिस्टरबाईंच्या या वाक्यावर मीही मनमुराद हसून घेतले.
.......................
“बाप्या जॉब मिळालाय”
विक्रोळीच्या एका हॉस्पिटलचं पत्र भिरकावत किर्त्याने आनंदाने उडी मारली.
आत्ता खऱ्या अर्थाने आम्ही वेगळे होणार होतो. बसमध्ये चढताना हमसून हमसून रडला.
“पत्र पाठवत जा रे”
असं म्हणताना मीही गुदमरत होतो. जाता जाता, ’आई आणि बहिणींकडे लक्ष असू दे’ अशी सूचक नजर करून त्याने चेहरा सीटमागे दडवला.
......................
गाडी येत जात राहिली. कधी बहिणीसाठी ड्रेस, कधी आईसाठी साडी, कधी भरपूर खायला तर कधी घरात एखादी वस्तू.....
मलाही बाहेरगावी नोकरी मिळाली मग फक्त सणासुदीला भेटी, संज्यानेही डी.एम.एल.टी करून गावातच लॅब उभारली. मी नसलो की दोघांच्या मैफिली होतं.
असंच एकदा जत्रेला आला तेव्हा भेट झाली.
“नोकरी सोडावी वाटतेय आता”
“का रे”
“ ’एड्स’चा वार्ड मिळालाय”
“मग घाबरायचं काय त्यात? आपली आपली काळजी घ्यायची म्हणजे झालं”
“तू नुसतं आत येऊन दाखवं, गप्पा करतोय’’
“किती दिवसासाठीये?”
“सहा महिने” खूपच घाबरलेला वाटत होता किर्त्या.
‘‘काळजी तरी किती घ्यावी, परवा एकाला आयव्ही लावताना नस मिळेना एकदोनदा सुई टोचून पहिली आणि मिळाल्यावर घाईघाईत ती सुई माझ्याच हाताला लागली”
“माय गॉड ..........!
चेक केलंस?”
“तीन महिने झाल्यावर... लगेच नाही कळणार”
“ ये असा कसा होईल ... तू काळजी नको करूस”
माझ्या बोलण्याकडे त्याचं लक्ष नव्हतं, मनातूनच हादरला होता....
त्याने नोकरीचा राजीनामा पाठवला. त्याची अस्वस्थता काही केल्या कमी होत नव्हती. मी संज्याला त्याच्या बरोबर थांबायला सांगितले. मीही अधेमधे येऊन त्याला धीर देत होतो.. आलेला दिवस घालवत तो संज्याच्या लॅबमधे बसू लागला. गावात अफवांना उधाण आलं होतं. लोक नाहीनाही त्या चर्चा करू लागले होते. तो अजूनच ढासळत होता. प्रगतीलाही हे कळले असावे तिने पत्रव्यवहार , फोन सगळं बंद केलं. तो सारखा शून्यात बसू लागला. जेवण-खाणं कमी झालं. त्याला झोपही लागेना. कंटाळून त्याने संज्याला झोपेचे इंजेक्शन द्यायला सांगितलं. त्याला फक्त झोपून राहावंस वाटत होतं. तो दिवसातून दोन-दोन इंजेक्शन्स घेऊ लागला.....
अखेर तिसऱ्या महिन्यात त्याची तपासणी संज्याच्याच लॅबमधे केली. रिपोर्ट होईपर्यंत त्याची उलघाल होत होती.. घामाघूम झाला होता. आणि संज्या रिपोर्ट घेऊन बाहेर आला........
“Nill..... you are safe my dear!”
संज्या आणि मी आनंदाने एकमेकांना टाळ्या देत होतो.
किर्त्या मात्र सुन्न होता. हसेना की बोलेना. फक्त डोळ्यातून पाणी येत होतं.
“ किर्ती $$$, किर्ती $” सिस्टरबाईंनी त्याला दंडाला धरून हलवले तसा तो स्टूलवरून कोसळला...
“ये नाटक सोड आता, चल उठ”
किर्त्यावर काही परिणाम होत नव्हता. त्याला लगेच मोठ्या दवाखान्यात हलवले. दोन दिवस आय.सी.यु.त काढून किर्त्याने कोणालाही न सांगता या जगाचा निरोप घेतला.
.......................
त्याला अंगणात सोडून अॅम्ब्युलंस निघून गेली. सगळे हंबरडे हळूहळू शांत होत गेले,
अंघोळ घालून त्याला हळद लावली गेली. नवीन कपडे घातले गेले. मुडांवळी बांधली गेली.
“बघता काय साल्यांनो नाचाकी” असं उठून म्हणेल, इतका सचेत दिसत होता.
तिरडीवर टेकवला आणि तिरडी निघाली...
किर्त्या पुन्हा मला सोडून निघाला होता... यावेळी काहीही न सांगता, न बोलता...
झोपेचे ओव्हरडोस त्याच्या मृत्यूचे कारण होते. त्याला माहित असूनही आणि संज्याने विरोध करूनही तो स्वत:च हे इंजेक्शन्स घेत होता. चूक कोणाचीही आणि काहीही असली तरी....
एका मानी आईने तिचा आधार कायमचा गमावला होता. निरागस बहिणींनी राखीचा धागा आणि हक्काची जागा गमावली होती.
आमची मात्र, आपल्यातल्याच गळालेल्या हिरव्या पानासाठीची इतर पानांसारखी नुसतीच ओली सळसळ होती, आपापल्या देठांना नीटनेटकं सावरत,,,,
....................................................शाम
अग आईग्ग... चटका लावणारी
अग आईग्ग... चटका लावणारी कथा...
कमाल आहे शाम .कसं हे जीवन !
कमाल आहे शाम .कसं हे जीवन ! त्याची निर्दय कथानकं फक्त पचवत रहायची. एका मैत्रीचं जे चित्रण केलंत,ती मर्मबंधातली ठेव.
हे खर असेल तर खूप दुर्दैवी
हे खर असेल तर खूप दुर्दैवी आहे.
शाम, तुमची लेखन शैली प्रभावी आहे.
लिहित रहा.
स्पीचलेस !!!!!
स्पीचलेस !!!!!
(No subject)
जबरी लिहीले आहे. सहज उघडले ते
जबरी लिहीले आहे. सहज उघडले ते संपेपर्यंत थांबू शकलो नाही.
जबरदस्तं लिहिलय, शाम...
जबरदस्तं लिहिलय, शाम... गोष्टं खरी-काल्पनिक... काहीही असेल... पण वाचून झण्णं झालं.
बापरे! काय शेवट उदार आनंदी
बापरे! काय शेवट उदार आनंदी जीवाचा!
बापरे...सुन्न झालं वाचून.
बापरे...सुन्न झालं वाचून. काल्पनिक किंवा खर्या - जी काय असेल ते - पण हा शेवट अनपेक्षित होता.
छान लिहिल आहे. शेवट चटका
छान लिहिल आहे. शेवट चटका लावुनच गेला.
जबरदस्त लिहिले आहे...
जबरदस्त लिहिले आहे...
अतिशय प्रभावी
अतिशय प्रभावी
आमची मात्र, आपल्यातल्याच
आमची मात्र, आपल्यातल्याच गळालेल्या हिरव्या पानासाठीची इतर पानांसारखी नुसतीच ओली सळसळ होती, आपापल्या देठांना नीटनेटकं सावरत,,,, >>>> अगदी .
अफाट ताकद आहे तुमच्या शब्दात.
अफाट ताकद आहे तुमच्या शब्दात.
केवळ! मस्त!!
केवळ! मस्त!!
काय लिहितोस रे तू ....... कधी
काय लिहितोस रे तू ....... कधी खळखळून हसवता हसवता एकदम डोळ्यात पाणीही आणतोस.... लेखनशैलीला सलाम आहे तुझ्या....
शेवटचे वाक्य तर केवळ, केवळ यार.......
कोण हा दुर्दैवी जीव - ना ओळख ना पाळख - पण चटका लावून गेला यार काळजाला......
आईगं ... शेवट अनपेक्षित...
आईगं ...
शेवट अनपेक्षित... सुन्न करणारा!
लेख जबरदस्त लिहिला आहे!!!
(No subject)
उत्तम कथा!
उत्तम कथा!
अतिशय प्रभावी लेखन!
अतिशय प्रभावी लेखन!
खूप खूप आभार दोस्तांनो!
खूप खूप आभार दोस्तांनो!
आज वाचले... अतीशय प्रभावी
आज वाचले... अतीशय प्रभावी लिखाण!
जुने मित्र मैत्रिणी
जुने मित्र मैत्रिणी आठवले.
चटका लवलात जीवाला
खूप भावलं.
खूप भावलं.
काल्पनिक आहे ना ही कथा. उगाच
काल्पनिक आहे ना ही कथा.
उगाच जिवाला घोर लागलाय.
आमची मात्र, आपल्यातल्याच
आमची मात्र, आपल्यातल्याच गळालेल्या हिरव्या पानासाठीची इतर पानांसारखी नुसतीच ओली सळसळ होती, आपापल्या देठांना नीटनेटकं सावरत>>>> अप्रतिम!
मस्त..
मस्त..
सुन्दरच.....!
सुन्दरच.....!
च्च!
च्च!
धन्यवाद! दोस्तांनो!!!!
धन्यवाद!

दोस्तांनो!!!!
Pages