विषय क्र. ३.- माझ्या अपेक्षेतला मराठी चित्रपट

Submitted by लसावि on 18 August, 2012 - 06:23

मराठी चित्रपटाकडून सर्वात पहिली आणि सर्वात अवघड अपेक्षा म्हणजे त्याला स्वतःचा सूर सापडावा. हिंदी सिनेमाला, दाक्षिणात्य सिनेमाला अगदी भोजपूरी सिनेमालाही स्वतःचा एक आवाज आहे, रंग-रुप आहे. ते चांगलं-वाईट, व्यावसायिक-कलात्मक इत्यादी पैकी काय आहे तो वेगळा मुद्दा. पण स्वतःची अशी स्वतंत्र ओळख असणं ही माझ्या दृष्टीने सर्वात मूलभूत गरज आहे. 'कोंबडी पळाली' सारखं गाणं मराठी सिनेमात जरुर असावं पण त्याचं चित्रिकरण इतकं दाक्षिणात्य असणं फार त्रासदायक आहे. अमराठी माणसालाही एका झटक्यात, एका चित्रचौकटीतच 'हा मराठी सिनेमा आहे' हे जाणवलं पाहिजे.

हे तेंव्हाच शक्य होईल जेंव्हा मराठी निर्माते आणि दिग्दर्शक स्वतंत्र विचार करु लागतील, मुख्यतः हिंदीचित्रपटनिरपेक्ष विचार. जो भालजींच्या, शांतारामबापूंच्या अगदी दादा कोंडकेंच्या चित्रपटातही होता. आज मराठी कलाकार हिंदीत काम मिळालं की सुखावतो, त्यासाठी जीव टाकतो. हिंदीत यशस्वी झालेले मराठी कलाकार परत ढुंकूनही पहात नाहीत किंवा 'मी उत्तम स्क्रीप्ट् आले तर नक्की काम करेन ' इत्यादी बकवास करतात. हिंदी सिनेमा आपल्यापेक्षा मोठा आहे आपण त्यापुढे क्षुद्र हा न्यूनगंड याच्या मुळाशी आहे. तो झटकून टाकणं ही देखील एक अपेक्षाच.

मराठी मातीतल्या, इथला 'इथॉस' असणार्‍या कथा चित्रपटात येणे अत्यावश्यक आहेत. मराठी साहित्यविश्व यादृष्टीने समृद्ध आहे पण या कथा पडद्यावर आल्याने आपोआप मराठी सिनेमाला त्याचा आवाज मिळेल ही अपेक्षा बालीश आहे. कथा-कादंबर्‍यांच्या शब्दशः, हुबेहूब सादरीकरणाने उत्तम चित्रपट बनत नाही (उदा. कैरी, बनगरवाडी). तसेच इतर भारतीय भाषा, जागतिक साहित्य यातही काही अजोड कथासूत्रे आहेत त्यांचाही धांडोळा घेतला जावा. त्या कथेचा आत्मा चित्रभाषेच्या रुपात मांडता यावा ही देखील अपेक्षा.

मराठी मनावर नाटकाचा प्रचंड पगडा आहे. पण त्यामुळे आमचे चित्रपटही पडद्यावरची नाटकेच बनून राहतात. खणखणीत संवादाच्या आकर्षणात, सिनेमा कॅमेर्‍याच्या भाषेत बोलतो या मुद्द्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते. मराठी चित्रपटाची दृष्यात्मकता वाढावी, जास्त प्रभावी व्हावी, सगळं काही संवादातूनच सांगण्याचा सोस कमी व्हावा ही अपेक्षा.

चित्रपटाने सामाजिक-वैचारिक भान आणले पाहिजे, संदेश वगैरे दिला पाहिजे, विचार करायला लावला पाहिजे तर'च' तो ग्रेट.
निव्वळ मनोरंजन करणे, गल्लाभरु असणे, व्यावसायिक असणे वाईट.
मराठी चित्रपट बनवणार्‍यांनी आणि त्याहूनही त्याच्या प्रेक्षकांनी स्वतःवरच लादून घेतलेली ही झापडे गळून पडावी ही अपेक्षा. आम्ही अमुक-तमुक ज्वलंत सामाजिक प्रश्नावर सिनेमा बनवला आहे ज्यात सामाजिक चळवळीत भाग घेणारे/मदत करणारे हे महानट आहेत. एवढ्याचसाठी तो थिएटरमध्ये पहा, त्याने समाजजागृतीच्या कार्यात तुमचा हातभार लागेल (तो सिनेमा म्हणून कसा का असेना आणि महानटाचा अभिनय कसाही असेना). हा ढोंगीपणा संपावा आणि मराठी चित्रपट, चित्रपट म्हणून किती चांगला अथवा वाईट आहे एवढ्याच बळावर गाजावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटच्या परिच्छेदाला खरंच टाळ्या.
(करायचेत ते आरोप करा आणि ठेवायचीत ती नावे ठेवा याबद्दल! who cares!)

अजून बरंच काही म्हणता येईल त्या अनुषंगाने पण जौद्या.

.

अगदी खरे मांडले.... Happy

जुने मराठी चित्रपट तेही कृष्ण धवल संताचे सिनेमे.. आजही बघावेसे वाटतात..:स्मित:

Pages