विषय क्र. १ : "पाऊस - हिंदी चित्रपटसृष्टीतला आणि आपल्या मनातला".

Submitted by अश्विनी के on 17 August, 2012 - 15:49

"पाऊस - हिंदी सिनेमातला आणि आपल्या मनातला"
---------------------

BarsaatKi4.jpg

निसर्गातली नवजीवन फुलवणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे पाऊस. रखरखलेल्या धरेला शांतवणारा, तिच्या शुष्क भेगाळल्या ओठांवर थेंबांचा शिडकावा करत तिला सृजनाची शक्ती परत मिळवून देणारा, हसरी बाळे परत तिच्या मांडीवर खेळवणारा. हाच पाऊस मना मनाला तृप्त करतो, हाच पाऊस प्रेमीजनांच्या हृदयात एक वेगळीच ऊब निर्माण करतो, विरहाचा अग्नी चेतवतो. हाच पाऊस बच्चेकंपनीला कारंज्यांसारखे उत्साहाने बेभान व्हायला लावतो तर सरत्या पिढीला "अजून एक पावसाळा" असं म्हणत अनुभवांचा लेखा जोखा घ्यायला लावतो. हाच पाऊस आपल्या अन्नदात्याच्या डोळ्यांत सरींवर सरी उभ्या करतो, तर हाच पाऊस छप्पर फाडून आभाळ आत घुसल्याने जमवलेली काडी काडी उद्ध्वस्त झाल्याने डोळ्यांतील अश्रूही सुकून जातील अशी वेळ आणतो.

खर्‍या आयुष्यात प्रत्येकाच्या अनुभवाला हे सर्वच्यासर्व येईलच असं नाही. पण तरीही माणसाने आभासी जगात एक प्रतिसृष्टी निर्माण केलेली आहे जिच्यात आपण हे सगळे पाहिजे तेव्हा म्हटलं तर त्रयस्थपणे आणि म्हटलं तर समरस होऊन अनुभवू शकतो. ही प्रतिसृष्टी म्हणजे आपणा सगळ्यांच्या जीवनाचा कमीजास्त प्रमाणात अविभाज्य भाग झालेली चित्रपटसृष्टी.

हा पाऊस जेव्हा जेव्हा सिनेमात हजेरी लावतो तेव्हा नेहमीच एक विशिष्ट भूमिका साकारत असतो.

ऑस्कर पारितोषिकासाठी प्रवेशिका मिळवून सर्वोत्तम विदेशी सिनेमाचं नामांकन मिळवलेला आशुतोष गोवारीकरांचा "लगान" तर पावसाच्या येण्या न येण्यावर आपला कथेचा डोलारा सांभाळून होता. ब्रिटिशांनी दुष्काळाने हैराण झालेल्या खेडुतांवर दुप्पट शेतसारा लादणे ही पार्श्वभूमी होतीच पण त्यांच्याबरोबरच दुसरा खरा खलनायक हा पाऊस होता. आमिर खान आणि त्याच्या क्रिकेट टीमला भरपूर परीक्षा द्यायला लावून तो मित्र म्हणून येऊ पाहतो तेव्हा "घनन घनन घनन घनन घनन घनन गिरी गिरी आये बदरा" असं वाजत गाजत त्याचं स्वागत केलं जातं. कित्येक वर्षांपुर्वी त्याचं स्वागत आपण "मदर इंडिया" मध्ये "दुख भरे दिन बिते रे भैया अब सावन आयो रे... देख रे घटा घिरकर आयी रस भर भर लायी" म्हणत केलं होतं. तर "दो बिघा जमीन" मध्ये "धरती कहे पुकारके, बीज बिछाले प्यारके, मौसम बीता जाए" पाहून आपणही कळवळलो होतो आणि "हरियाला सावन ढोल बजाता आया" पाहून आपल्याही मनात सावनके झुले बांधले गेले होते. "दो आँखे बारह हाथ" मधले "उमड घुमड कर आयी रे घटा". यामधली भरत व्यास आणि वसंत देसाईंची कमाल आणि क्रांतीकारी जेलर, एक खेळणी विकणारी स्त्री, दोन छोटी मुलं आणि सहा कैदी यांनी उजाड जमिनीत केलेल्या मेहनतीवर खरोखरचं पाणी पडल्यावर आता चांगलं पीक येणार ह्या आनंदाने केलेला जल्लोष असं सगळंच भारी होतं.

याच पावसाने "घोडे जैसी चाल हाथी जैसी दुम, ताक झुम झुम ताक झुम झुम" या गाण्यावर "दिल तो पागल है" या नृत्यसंगीतमय सिनेमात माधुरी दिक्षित, शाहरुख खान आणि बच्चे कंपनीला मस्त भिजवून काढलं होतं.

आणि आईग्गं! हा पाऊस कधी कधी अशी काही भयानक भूमिका निभावतो की अंगावर काटा उभा राहतो. त्याचे संवाद म्हणजे "टप टप टप", "थाड थाड थाड" किंवा "रिप रिप रिप" असेच काहिसे असतात पण कमीत कमी शब्दांत प्रेक्षकांमध्ये जास्तीत जास्त उत्कंठा, घबराट अगदी "चांगलीच फाटली" म्हणण्याजोगी मनस्थिती निर्माण करण्याचं कसब याच्यात आहे. आठवला का दिलिपकुमार, वैजयंतीमालाचा "मधुमती"? साधना, मनोजकुमारचा "वो कौन थी?". पडद्यावरची पात्रं दिसायच्या आतच या कसबी कलाकाराने आपल्याला घाबरवायचं, आपली धडधड वाढवायचं काम फत्ते केलं होतं. आपले हात, ओढण्या, पदर डोळ्यांवर घेऊन हळूच किलकिल्या नजरेने ते दृष्य पाहणे ही एक नंतर हसू आणणारी क्रिया आपल्याकडून नकळत होत जाते. चित्रपटांतील ज्या मारहाणीची, पाठलागाची दृष्ये या पावसाच्या उपस्थितीत चित्रित केली गेली त्या दृष्यांचा कित्येक पटीने वाढलेला परिणाम आपल्याला श्वास रोखायला, नखं कुरतडायला लावतो. १९९८ सालच्या 'सत्या' मधलं सुरुवातीचं भिकू म्हात्रेच्या सहकार्‍यांचा- विठ्ठल मांजरेकर आणि बापूचा थरारक पाठलाग आणि खूनाचं भर गजबजलेल्या रस्त्यात आणि मुसळधार पावसातलं दृष्य असंच थरकाप उडवून गेलं होतं.

आता वळूया चित्रपटांमधल्या ज्या प्रांतामध्ये या पावसाने धूम उडवून लावली आहे त्याच्याकडे..... रोमान्स, प्रणय. एका नाजुक भावनेला हा पाऊस नेहमीच हात घालत आलेला आहे ती म्हणजे प्रियकर प्रेयसीचं प्रेम. प्रत्यक्षात पावसाळी पार्श्वभूमीवर प्रेम व्यक्त करण्यातली खुमारी काही औरच, पण त्यापेक्षा कितीतरी कल्पक रितीने ते चित्रपटांमध्ये व्यक्त झालेलं आपण पाहतो. हा बूस्टींग फॅक्टर असतो, तो म्हणजे पावसातला सुरेल रोमान्स. विचार करा हो, तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती पावसात किंवा पाऊस दिसेल अशा खिडकीत पावसाची मजा अनुभवता आहात, भलताच रोमँटिक मूड आहे, हात हातात घेतलेले आहेत, खांद्यावर हलकेच डोके टेकवले गेले आहे आणि अचानक.... तुमच्या प्रेयसीला किंवा प्रियकराला स्वतःच गाणं म्हणायचा मूड आला.... डिझास्टर होईल की हो! भयानक आवाजामुळे तो रोमँटिक मूड बीड पळून जाईल आणि फिदीफिदी हसायचा मूड आवरायची तुम्हाला पराकाष्ठा करावी लागेल (खरंच सुरेल गाणार्‍या प्रेमीजनांनी माफ करा बरं का, तुमच्यासाठी नव्हे हा टोमणा! Proud ). अशावेळी तुम्ही गप्प बसायचं शहाणपण बाळगा आणि चुपचाप आवडत्या पावसाळी गाण्यांची सिडी लावून वेळ निभावून न्या कसं!

तर, ऑल टाईम पावसाळी रोमँटिक गाणं कुठलं असं विचारलं तर "बरसात की रात" मधल्या मधाहूनही गोड अशा मधुबालेचं आणि रिकाम्या पोळ्यासारख्या (काही उपमा सुचतच नाहिये!) भारत भुषणचे "जिंदगी भर नही भूलेगी वो बरसात की रात" हे पहिल्या नंबरवर येईल. ओलेती तरीही शालीन दिसणारी मधुबाला पाहणं जितकं भारी होतं तितकं चिंब भिजलेला आणि जॅकेटवाला भारत भूषण पाहणं आपल्याला झेपणार नाही म्हणून दिग्दर्शकाने तसे न दाखवल्याबद्दल अनेक कालातीत धन्यवाद! (भारत भूषणच्या पंख्यांनो माफ करा... हे काय ! सगळे अजून मधुकडेच बघतायत वाट्टं!, जाऊद्या झालं.)

असंच एक संयत पावसाळी रोमँटिक गाणं म्हणजे राज कपूर आणि नर्गिस ह्या जबरदस्त केमिस्ट्री असलेल्या जोडीचं 'श्री ४२० "' मधलं "प्यार हुवा इकरार हुवा है प्यारसे फिर क्यूं डरता है दिल". एकच छत्री, एकाच वेळी दोघांना सारखाच भिजवणारा पाऊस, इतकं जवळ असूनही कुठेही अधाशी प्रेमाचा मागमूसही नाही. ह्या गाण्यांना शारीर प्रेम दाखवायची गरजच भासली नाही इतकी ताकद त्या शब्दांमध्ये, मुद्राभिनयामध्ये आणि संगीतात होती. तसेच "बरसात" सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार्‍या निम्मीचं "बरसात में.. ताक धिना धिन.." ही असंच गोड होतं.

अशीच शांत पावसाळी रोमान्स दाखवणारी गाणी म्हणजे 'हसते जख्म' मधील 'तुम जो मिल गये हो', संजीवकुमार तनुजाचं "मुझे जा ना कहो मेरी जाँ", अमिताभ आणि मौसमीचं "रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन" आणि तसं हल्लीचं '१९४२- अ लव्ह स्टोरी' मधलं "रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम, भीगी भीगी रुतमें तुम हम हम तुम".

पावसाला खट्याळ रुप दिलं ते "चलती का नाम गाडी" मध्ये किशोर कुमार आणि मधुबालाच्या "एक लडकी भीगी भागी सी..." तसेच 'चालबाज' मधल्या श्रीदेवीच्या "किसी के हाथ ना आयेगी ये लडकी" ने. किशोरदा आणि मधुबालाची "उसका कोई पेच भी ढिला है" म्हणत निर्मळ चिडवाचिडवी आणि श्रीदेवीचा एकटीचाच भन्नाट बेभान आणि तरीही निरागस डान्स हे दोन्ही आपल्या चेहर्‍यावर मिश्कील स्टँप उमटवून गेले.

कित्येक वेळा ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट हे हिरो हिरॉईनला त्यांच्यामधल्या प्रेमाचा साक्षात्कार घडवून द्यायचे. ती घाबरलेली... त्याचे तिला सावरणारे रुंद खांदे.. बास.. बाकीचं प्रेमात पडल्याचं कळवायचं काम त्यांच्यातली केमिस्ट्री करुन टाकायची. "दिल तेरा दिवाना" मध्ये तिकडे ढगांचा कडकडाट, दचकून शम्मी कपूरच्या उत्सुक बाहुपाशात शिरणारी माला सिन्हा आणि नंतर तिची लाजून चोरटी झालेली नजर आणि त्याचे काहीतरी सुचवणारे कटाक्ष. दोघांची धपापणारी हृदयं आणि आपल्या वाट्याला आलेलं धमाल "दिल तेरा दिवाना है सनम... जानते हो तुम... कुछ ना कहेंगे हम... मुहब्बत की कसम मुहब्बत की कसम". कित्ती सोप्पं करून दिलं बघा त्या पावसाने!

नायक नायिकेमधलं आकर्षण दाखवायला पाऊस हा कॅटालिस्ट म्हणूनही वापरला गेला आणि 'आराधना' मधलं चिंब भिजलेल्या राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांचे "रुप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना.. भूल कोई हमसे ना हो जाए" हे खूप काळ लक्षात राहिलेले गाणे घडले. बाहेर हवेतला पावसाळी गारवा आणि आतला नैसर्गिक मानवी भावनांचा धगधगलेला विस्तव दिग्दर्शकाने अचूक चित्रित केला होता. आम्ही हे सगळं न कळत्या वयात टिव्हीवर पाहिलं होतं आणि डोक्यावरुन गेल्यामुळे आम्ही त्या गाण्याचं विडंबन पाठ केलं होतं "रुप तुला नसताना, दातांची कवळी असताना, कोण हिरॉईन तुजला करील गं".

नंतर काळाच्या ओघात खास पावसाळी गाण्यांसाठी नायिका प्लेन शिफॉन वापरु लागल्या किंवा शुभ्र ड्रेस वापरु लागल्या. नायकाच्या अंगात थोडे ट्रान्स्परंट असे शर्ट आले. एकमेकांना अजूनच प्रेमात पाडण्यासाठी लटके, झटके आणि मटके आले. धबाधब उड्या डान्स आले. या प्रकारच्या नाचांचे आद्य नर्तक बहुतेक जितेंद्र आणि लीना चंदावरकर असावेत. दोघांनी "हमजोली" मधल्या "हाय रे हाय.. नींद नही आय" गाण्यावर पावसात बसून, झोपून, उड्या मारून धमाल नाच केला होता. तो नाचाचा अनोखा प्रकार प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतला होता. आजही भेंड्या खेळताना 'ह' अक्षर आलं की हे गाणं म्हटलं जातंच आणि जितेंद्र, लीना आठवतातच.

नंतरच्या काळात श्रीदेवी अँड कंपनीने हा कित्ता साड्या नेसून गिरवला. नायकाला मोहात पाडण्यासाठी हेलकाव्यांची कवायत आणि अशा नावापुरत्या साड्यांची गरज असते असे दिग्दर्शकांचे ठाम मत बनत चालले होते. असो... श्रीदेवी गोड दिसली 'चांदनी' मधल्या "लगी आज सावन की फिर वो झडी है" मध्ये, पण काही नायिका मात्र बघवायच्या नाहीत.

पावसाचा अजून एक रोल आपल्याला विसरून चालणार नाही तो म्हणजे पाण्यानेच विरहाचा अग्नी चेतवणारा लबाड. 'परख' मधे साधनावर चित्रित झालेल्या "ओ सजना बरखा बहार आयी" या गाण्याच्या "तुमको पुकारे मेरे मन का पपीहरा, मीठी मीठी अगनीमें जले मोरा जियरा" या ओळी खल्लासच आहेत.

अशा या पावसाचा सिनेमातला रोल पुढे पुढे जात राहिला आणि आपण तो आपापल्या नजरेने पाहात राहिलो, स्वीकारत राहिलो.. नाकारत राहिलो. अजून कितीतरी आहे ह्या सिनेमातल्या पावसाबद्दल सांगण्याजोगं, पण तुम्हीच आपापल्या स्वभाव प्रकृतीप्रमाणे तुम्ही अनुभवलेला, साक्षीदार ठरलेला सिनेमातला पाऊस आठवा. आठवताना नक्की गालातल्या गालात हसू येईल, कधी डोळे भरुन येतील, कधी धडकी भरेल तर कधी काळजात हलकीशी कळ उठेल. कुठल्याही भावना असल्या तरी त्या या चित्रपट सृष्टीने जागवल्या याबद्दल मनात आपोआप कृतज्ञतेची भावनाही अंकुरेल.

अरे! एवढा वेळ गेला आपण एवढ्या पावसाच्या गप्पा मारतोय पण पाऊस आहेच कुठे? चला तर... तंद्रीतून जागे होऊया आणि गरमागरम कांदाभजी आणि वाफाळलेला चहा घेऊन टिव्हीसमोर बसून खोटा खोटा का होईना, पाऊस अनुभवूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशोक यांच्या ओ सजना बद्दल+१.लेख संपत आलातरी हे गाण येतच नव्हत. लेख छान..सुरुवातीला मधुबालाला पाहुन छान वाटल.

मस्त लेख अश्विनी.
रिकाम्या पोळ्यासारखा>> Lol
ललिता +१ Happy
सशल, लगी आज सावन की मधे आहे न श्री Happy सुरवातीलाच पिवळ्या साडीत. तिला पावसात भिजताना बघून तर विनोद खन्नाला त्याची गर्लफ्रेंड आठवते.

अजून काही माझ्या लिस्टमधली गाणी-
सनीपाजींच 'बादल यूं गरजता है', चमेली मधलं 'भागे रे मन कहीं', राजेश खन्ना+झीनत अमानचं 'भीगी भीगी रातोंमें', सरफरोश मधलं' जो हाल दिलका' इजाजतमधलं 'छोटी सी कहानीसे' फना मधलं 'ये साजिश है बूंदोंकी',
गुरुमधलं' बरसो रे मेघा' , कोई मिल गया मधलं 'इधर चला मै, उधर चला'.

अश्विनी के..मस्त लेख!! Happy
मी पण काही रोमांटिस पावसाळी गाणी अ‍ॅडायला आले होते
लेकिन बिल्वा ने मेरी लिस्ट पूरी कर दी.. Happy

वा, मन ओतून लिहिलं की असं होतं! रंजक आणि महत्वाचा लेख, कारण चित्रपटातला पाऊस हा विषय खूप वेगळाच!

खूप छान लिहिलंय!

मस्त मस्त..मला सत्यामधला पाऊस फार भावतो..ते एक पात्रच आहे ईतका सुरेख वापर केला आहे . अजून एक म्हणजे तेजाब मधल "सो गया ये जहा"... त्यात सुद्धा मुंबईतल्या पावसाळी रात्रीच छान चित्रण केल आहे.

सुंदर लेख, सिनेमातल्या पावसाच्या किती आठवणी जाग्या झाल्या यानिमित्ताने.........

पाऊस म्ह्टले की बर्‍याच जणांना रोमँटीक गाणेच आठवत असणार.. मला मात्र एखादया टोळीयुद्धाची पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटात भर पावसात झालेला मर्डर आठवतो.. आणि आठवतो तो पावसाच्या पाण्यात हळूहळू मिसळत जाणारा रक्ताचा ओहोळ... असते एकेकाची आवड.. Happy

छान ओलाचिंब लेख झालाय. Happy

फार पूर्वी सत्या या चित्रपटातील (मुंबईतील) पावसाबद्दल कुठल्याश्या वर्तमानपत्रात असाच एक छान लेख वाचला होता त्याचीही या निमित्ताने आठवण झाली.

अक्के, लेख 'दी बेस्ट' !!!!

रिकामा पोळा <<< Rofl

पावसाची एक से एक सुंदर सुंदर गाणी तु आणि इतर सर्वांनी लिहिली आहेत Happy

मस्त मन झिम्माड झालं एकदम!!! Happy

लेखावर निवांत होऊन प्रतिक्रिया देतो.

सर्वप्रथम राहवलं नाही म्हणून प्रचिबद्दल
साक्षात मधूबाला आणि तीही भिजलेली सोबत असताना ज्याच्या चेह-यावर कसलेही भाव उमटत नाहीत अशा या नटश्रेष्ठाचा खरोखर शनिवारवाड्यावर सत्कात व्हायला हवा होता. विश्वामित्राच्या जागेवर भाभू असते तर मेनकाही रिकाम्या हाताने माघारी गेली असती यात अजिबात शंका वाटत नाही. प्रचि मधे तो भाभू मधूबालाच्या कानात माझं पोट बिघडलंय घरी लवकर जाऊयात का असं सांगत असावा असे भाव (!) आहेत.

मधूबाला पेक्षा भाभूकडेच लक्ष जातंय राहून राहून Lol

किरण.... Lol

मस्त ...

मस्त लेख ..

पावसा मधील नर्गिस चे गाणे प्यार हुआ इकरार हुआ, जबरदस्त आवडते आहे Happy

छान लेख अश्वे Happy आपला सिनेमा प्यार इश्क मोहोब्बत आणि पावसाभोवती विणलेला असतो.

हाय रे हाय.. नींद नही आय">> हे गाणं एकदा म्यूट करून पाहिलं आणि तेव्हा पास्न ते तसंच पहात आलोय Proud ज्याम मजा येते.

Pages