II माऊली II

Submitted by स्मितहास्य on 19 June, 2012 - 02:22

आजकाल आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्र टाईम्स मधे डॉ. रामचंद्र देखणे यांचं "पालखी" हे सदर प्रकाशीत होतंय. रोज घरून ऑफिसला कितीही लवकर निघालो किंवा घरी येण्यास कितीही उशीर झाला तरी मी ते वाचतोच वाचतो. ते वाचलं की दिवसाचा सगळा थकवा कुठल्याकुठे पळून जातो. आजचं ते सदर वाचूनंच ही पोस्ट सुचली.

पालखीला वेळेत पोहोचलोच नसतो जर किश्या ने मदत केली नसती तर. त्याचे खास आभार.
आदल्या दिवशी म्हणजे गुरूवारी ऑफिसमधून संध्याकाळी ६.०० ला निघालो तेव्हा मनातली धाकधूक वाढली होती. कारण घर गाठून मग पुणं गाठायचं होतं. घरी पोहोचेस्तोवर १०.०० झाले होते. तसंच थोडं जेवण पोटात ढकलून, वंदनाहून ११.३० ची एस्.टी (स्वारगेट) पकडली. किश्याला फोन करून सांगितलं होतं की यायला पहाटेचे ३.३० - ४.०० होतील. बरोब्बर ४ ला चांदणी चौकात उतरलो. किश्याला फोन केला. थोडा मागे उतरलो होतो पण तो म्हणाला कि थांब तिथेच "शून्य मिनिटांत" पोहोचतो. तेव्हा समजलं की, पुणेकरांची "शून्य" मिनिटे म्हणजे १५ मिनिटे असतात ते :). हवेत गारवा होता. प्रसन्न वातावरण होतं. नुकताच घेतलेली नविन बाईक घेऊन स्वारी आली. हाय हॅलो केल्यावर समजलं की, हा रात्रभर झोपलाच नाही. डकटेल्स बघत होता. मग रूमवर गेल्यावर थोड्या गप्पा मारून फ्रेश होऊन भवानी पेठेकडे मार्गस्थ झालो. म्हात्रे पुलावर मग थोडी फोटाफोटी झाली. वाटेत एक फक्कड चहा मारून पुढे झालो. दिंड्यांची लगबग सुरू झाली होती. किश्याचा निरोप घेऊन संध्याकाळी भेटण्याचे आश्वासन दिलं, आणी पालखीतल्या माऊलींसोबत मिसळलो गेलो.

मनात पांडुरंगाला भेटण्याची आस..., टाळ-मृदंगाचा गजर आणि मुखी ज्ञानोबा-तुकारामांचे नाव अशा भक्तीमय वातावरणात भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. दोन दिवस पुण्यनरीतील नागरिकांचा पाहुणचार घेऊन निघालेल्या पालखीला निरोप देण्यासाठी शुक्रवारी पहाटेपासूनच पालखी मार्गावर भाविकांनी मोठी गदीर् केली होती. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातून सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराजांची, तर नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरातून सकाळी सात वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

कित्येक लाख वैष्णवजन जवळपास तीनशे किलोमीटरची पायी वाटचाल करुन सावळ्या विठूमाईच्या भेटीला एका अनामिक ओढीने जातात. कसला गोंधळ नाही, गडबड नाही, पण संपूर्ण वाटचाल निर्विघ्नपणे पार पडते.
संपूर्ण वारीमध्ये प्रत्येकजण एकमेकांना माऊली संबोधतो. अगदी बंदोबस्ताचा पोलिस आणि सार्वजनिक आरोग्यसेवा पथकातले डॉक्टर आणि इतकेच काय आम्ही फोटोग्राफरदेखील माऊलीच.

आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवडमध्ये शहरवासियांनी उत्साहाने स्वागत केले. वारकऱ्यांसाठी सर्वत्र विविध सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. कितीही पायपीट करुन थकवा आला आणि भूक लागली तरी “बोला पुंडलिका…” चा गजर झाल्याशिवाय एकही वारकरी मुखी अन्नाचा घास घेत नाही. प्रत्येकाच्या दिंड्या ठरलेल्या असतात.

सर्वजण एका अनामिक ओढीने पंढरपूरच्या दिशेने चालत राहता. कोणाच्याही चेहर्‍यावर कसलं दुखं: नाही ना कसल्या तक्रारीची जाणीव. मनी असतो फक्त एकच ठाव.. "पाडूरंग". माऊली म्हणजे अगदी दिड वर्षाच्या लहान मुलापासून ते अगदी जराजर्जर झालेल्या आजोबांपर्यंत सगळेजण. कोणी अनवाणी, कोणी अपंग... पण मनातला उत्साह कमी पडत असेल तर शप्पथ. हाच उत्साह, आणि मनातली ओढ मला सलग दुसर्‍या वर्षीही सासवडपर्यंत घेऊन गेली. एकटा जरी होतो तरी कुठेही एकटेपण जाणवलं नाही. दिंडीबरोबर चालत जातांना, अभंग, ओव्या, वारीची माहीती अशा बर्‍याच गोष्टी समजल्या. त्या सर्व गोष्टी आता सांगत बसलो तर शब्द संपणार नाहीत.

सासवडहून परत पुण्यात आल्यावर किश्या आणी गिरीला भेटलो. आणि मग मुंबई.
घरी आल्यावर ना कसला थकवा होता ना काही. हो पण, मनात एक वेगळा आनंद होता. एक उर्जा होती. जी मला पुढच्या वारीपर्यंत नक्कीच उमेद देईल.

पण एक मात्र नक्की की, पांडूरंगाच्या आशिर्वादाने आजवर संपूर्ण वारीदरम्यान एकही दुर्घटना घडल्याचे उदाहरण ऐकिवात नाही आणि खात्री आहे की असे कधी होणारही नाही. सर्वांसाठी वारी म्हणजे एक शिस्तीचा सुंदर दाखला आहे. तो शब्दबद्ध करण्याचा हा माझा एक खुजा प्रयत्न. घ्या गोड मानून. नाही आवडला तर मीच म्हणेन,
“भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी, विठ्ठला… मीच खरा अपराधी”

॥ रामकृष्ण हरी ॥

================================================================================

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६
वारी २०१४ मधून..

गुलमोहर: 

सहिच रे...... लेख आणि प्रची.... पालखी सोहळा डोळ्या समोर दिसतो आहे Happy

सुंदर माहीती आणि फोटो तर अप्रतिम.

दिंडीबरोबर चालत जातांना, अभंग, ओव्या, वारीची माहीती अशा बर्‍याच गोष्टी समजल्या. त्या सर्व गोष्टी आता सांगत बसलो तर शब्द संपणार नाहीत.

हळू हळू येउद्या ही माहीती पण. वाचायला आवडेल.

पहिल्या प्र.चि.पासुन ते शेवटच्या प्र.चि.पर्यंत माऊलिच्या व्यक्तिमत्वाचि विविध रुपे....अवर्णनिय.

वाह अमोघ!
काय नजर आहे, किती सुंदर क्षण टिपलेस...एक एक चेहरा नि त्याचे एक्स्प्रेशनस महानच टिपलेस!
सुरुवातीचा आणि शेवटाचा फोटो आणि त्यात वारीची/ वारकर्‍यांची अद्भुत दुनिया..खास खास!!! Happy

मान गये उस्ताद!
एक से एक जबरी प्रचि.
पोस्ट एडिटीग तर खुपच खास.
सलाम तुझ्या क्रियेटिव्हीटीला _____/|\_____

छान लेख अणि प्र . ची.
मुंबई वरून येउन , वारी चा आनंद लुटला !!!
केवढा उत्साह !!!

खरच कौतुकास्पद !!!!

Pages