शांघाय

Submitted by मी मुक्ता.. on 11 June, 2012 - 11:00

गेल्या बर्‍याच दिवसांत आवर्जून पहावा असा हिंदी चित्रपट प्रदर्शित न झाल्यामुळे 'दिवाकर बॅनर्जीं' च्या 'शांघाय' विषयी जरा जास्तच उत्सुकता होती. चित्रपट पाहिल्यानंतर बॅनर्जींनी पुन्हा एकदा त्यांच्या लौकिकाला साजेसं काम केलय आणि करवुन घेतलय असं वाटलं.
आतापर्यंत सगळ्यांना माहिती असल्याप्रमाणे चित्रपट हा पॉलिटिकल थ्रिलर आहे. पण आतापर्यंत बॉलिवूड कडून आलेल्या मसाला थ्रिलर पेक्षा बराच वेगळा. थ्रिलर आहे पण प्रसंग अंगावर धाड धाड कोसळत नाहीत. पॉलिटिकल आहे पण यातल्या राजकिय व्यक्ती बीभस्त भाषेत आणि आविर्भावात, टिपिकल लूक देत संवाद बोलत नाहीत. हाणामारी आहे पण अतिरिक्त हिंसाचार टाळूनही समाजातली विदारक स्थिती-परिस्थिती व्यवस्थित दखवलिये. जो विषय फार भडक आणि डायलॉगबाजी करुन मांडण्याचा पर्याय निवडला जातो त्या विषयाला भडकतेशिवाय आणि डायलॉगबाजीशिवाय मांडूनही त्याची तीव्रता आणि गंभीरता पूरेपूर प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी हा चित्रपट पार पाडतो.
भारतच्या कोणत्याही नगरात घडू शकेल अशी ही घटना. कोणत्याही शहराचं कॅलिफोर्निया, शांघाय आणि न्यूयॉर्क बनवण्याच्या घोषणा आता काही नवीन नाहीत. अशीच एका शहरात राबवली जाणारी योजना. त्यासाठी विस्थापित होणारे झोपडपट्टीवासी, त्यांच्यासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्या म्होरक्याचा भर सभेत अपघाती मृत्यू होतो, त्याची साथिदार शालिनी (कल्की) च्या मते हा पूर्वनियोजित कट आहे. लोकांची तोंडं बंद करायला म्हणून एक कमिटी नेमली जाते. त्याच्या प्रमुख कृष्ण्न् (अभय देओल) आणि या सगळ्या लढ्यांशी खास काही घेणंदेणं नसलेला पण हळूहळू त्यात अडकत जाणारा एक सामान्य फोटोग्राफर, जोगिंदर (इम्रान हाश्मी).. हे सगळे एकमेकांत गुंतत जातात आणि आपल्यासमोर घडतं एक नाट्य - शांघाय.
सगळ्यांचा अभिनय उत्तम. कल्की चा प्रश्नच नाही. डॉ. अहमदींची सहकारी-शिष्या, त्यांच्यासोबतचे तिचे वैयक्तिक नाते, वडिलांचं नाव घोटाळ्यात असल्यामुळे वैतागलेली मुलगी, अहमदीच्या अपघातानंतर त्याच्या चौकशीत झोकून देणारी कार्यकर्ती तिने चांगलीच उभी केलीये.. इम्रान चा मी पाहिलेला पहिला चित्रपट आणि तो खरच पूरेपूर जोगिंदर वाटतो. त्याचं बोलणं, वागणं, विचार करण्याची पद्धत, देहबोली अगदी त्याच्या व्यक्तिरेखेला साजेशी.. अभय देओल चा अधिकारी शेवटी डोक्यात पक्का रहाणारा. चित्रभर त्याच्या वाट्याला आलेले मोजकेच संवाद.. फारसं आक्रमक न होता त्याने व्यक्त केलेली तगमग पोहचते. काम करताना पडणारी बंधनं स्विकारणारा आणि शेवटी योग्य वेळ येताच माईंड गेम खेळणारा अधिकारी खरा वाटतो तो याच मुळे.
चित्रपट शेवटाकडे येताना एक छोटासा सस्पेंस पण असाच अस्वस्थ करणारा. अहमदीवर ट्रक चालवणारा माणूस आणि त्याचा साथिदार यांचे प्रसंग पण चित्रपटभर एक वेगळा धागा गुंफत राहतात. त्याचा शेवटही परिणामकारक.
कॅमेराने वेगळ्या अँगलमध्ये घेतलेले क्लोज अपस कधी परिणामकारक वाटतात तर कधी डोळ्यांना त्रासदायकही वाटू शकतात. चित्रपटाचं संगीत आणि गाण्यांचे बोल चित्रपटाला साजेसे. एक साधी कथा आहे, छोटासा सस्पेंस आहे पण परिणामकारकता तितकीच. एका रेग्युलर थ्रिलर ला लागणार्‍या वेगापेक्षा चित्रपटाचा वेग कमी वाटतो पण त्यामुळेच चित्रपट जास्त खरा वाटतो.
तर माझ्या मते एकदा तरी नक्की बघावा असा हा शांघाय..! Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे हा चित्रपट! सगळ्यांची कामे छान झाली आहेत. चित्रपटाचा वेग पाहणार्‍याला खिळवून ठेवतो. अभय देवोल्,कल्की, प्रसेनजीत यांच्याबरोबरच इम्रान हशमीचही अभिनयाच्या बाबतीत कौतुक करावस वाटतं.

मी आताच पाहुन आले. मला आवडला.

चित्रपटाचा वेग पाहणार्‍याला खिळवून ठेवतो. अभय देवोल्,कल्की, प्रसेनजीत यांच्याबरोबरच इम्रान हशमीचही अभिनयाच्या बाबतीत कौतुक करावस वाटतं. >>> अगदी. बाकी सगळे मस्तच, पण इम्रानकडुन अपेक्षा नव्हती. त्यानेही फार छान काम केलं आहे. प्रसेनजीत फारच हॅन्डसम आहे. Happy अभय देओलने म्हणे त्याच्या कृष्णन रोलसाठी दाक्षिणात्य उच्चार शिकुन घेतले आणि एका दाक्षिणात्य जाणकाराला शुटिंगच्या वेळेला सेटवर बसवुन ठेवले त्याचे उच्चार ऑब्जर्व करायला. कुठेही बेअरिंग न जावु देता तो दाक्षिणात्य ढंगाचं हिंदी छान बोलला आहे. मी त्याची परत एकदा फॅन. सुप्रिया पाठक फुटेल आता एवढी प्रचंड जाड झाली आहे. तिला फारच छोटा रोल मिळाला आहे. आपला चिन्मय मांडलेकर पण छोट्याशा तरीही लक्षात रहाणार्‍या रोलमधे आवडला. अनंत जोग बर्‍यापैकी सेट झाले आहेत हिंदी सिनेमामधे. इथे छोटीशी पण चांगली आणि वेगळी भुमिका मिळाली त्यांना. ( सिंघम नंतर अशा साध्याशा रोलमधे फार छान वाटले. )

माझ्या ओळखीत ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांना "चित्रपट दळभद्री आहे" असे शेरे दिल्याने आयत्या वेळी जाण्याचे कॅन्सल केले! इम्रान हाश्मी ला वेगळ्या प्रकारच्या भुमिकेत पहायला आवडले असते.

कल्कीने चेहर्‍याची प्लास्टीक सर्जरी करवून घेतली आहे का? तिचा सुरुवातीच्या काळातला "A girl in yellow boots" पाहिला त्यात तिचा चेहरा निरागस, गोड दिसला आहे अगदी. नाकही चाफेकळीसारखे नाजुक होते त्यात. आणि जिंदगी मिलेगी ना दोबारा किंवा शांघाय मधे नाक पोपटाच्या चोचीसारखे का दिसते आहे? Uhoh

निंबुडा,
Sad कोणी दिला असा शेरा?

माझ्यामते तरी दिवाकर बॅनर्जी इज वन ऑफ द फाइन डायरेक्टर्स इन इंडस्ट्री.. त्यांचे सगळे चित्रपट वेगळेवेगळे होते. हाताळणीही वेगळी आहे. टिपिकल मसाला पहायची सवय असली तर हा चित्रपट आवडणं अवघड आहे. होतय असं की फॉरेन क्राईम सेरिज पाहून पाहून नाट्यमय आणि वेगवान थ्रिलर्स ची सवय झालीये काही लोकांना. म्हणजे एखाद्यावर संशय निर्माण करायचा आणि मग तो खरा नसतोच हे दाखवायचं. अर्थात मसाला आणि लोकप्रियता यासाठी हे आवश्यक आहे पण रिअल लाईफ इन्व्हेस्टिगशन असं नसतं. म्हणूनच चित्रपट स्लो वाटतो पण खराही.. Happy

माझ्यामते तरी दिवाकर बॅनर्जी इज वन ऑफ द फाइन डायरेक्टर्स इन इंडस्ट्री.. >>> अनुमोदन. दिबांकरचे 'ओये लक्की' आणि 'खोसला का घोसला' दोन्ही सुंदर मुविज होते. दोन्हीला नॅशनल अ‍ॅवॉर्ड पण मिळालं होतं. तिसरा ' लव, सेक्स और धोका' पहायचा राहिला आहे. मला अनुराग कश्यप ही असाच वेगळा वाटतो. पण त्याचे मुवीज फार हिंसेने भरलेले असतात. त्यातलं वास्तव अगदी अंगावर येतं. दिबांकरने मात्र शांघाय मधे हिंसा दाखवणं शक्य असुनही संयम राखला आहे.

निंबुडा, शांघायचे प्रोमोज पाहिलेस का? काल्कीचं नुसतं नाकच नाही तर तिने अपर लिप प्लंम्पिंग पण केलं आहे. इतकी भयानक दिसली आहे क्लोज अप्समधे. नेहमी आवडते मला, पण शांघाय मधे नाही.

मनिमाऊ,
येप... Happy सेम हिअर.. ओय लक्की आणि खोसला.. पाहिला. एलएसडी राहिला. पण दिबाकर बॅनर्जी भारी हे नक्कीये.. Happy

ह्म्म.. अनुराग कश्यप अंगावर येतो खरा पण त्याचे चित्रपट आवडतात. कधी खूप फ्रस्ट्रेट व्हायचं असेल तर मी आवर्जून पाहते.. Wink

आनंदयात्री..
Happy

काल्कीचं नुसतं नाकच नाही तर तिने अपर लिप प्लंम्पिंग पण केलं आहे. इतकी भयानक दिसली आहे क्लोज अप्समधे.

तिला मुद्दाम अग्ली लुक दिलाय चित्रपटात असे कुठेतरी वाचले गेल्या आठवड्यात.
मलाही पाहायचाय.

कालच पाहिला. चांगला आहे.पण <<अभय देओलने म्हणे त्याच्या कृष्णन रोलसाठी दाक्षिणात्य उच्चार शिकुन घेतले आणि एका दाक्षिणात्य जाणकाराला शुटिंगच्या वेळेला सेटवर बसवुन ठेवले त्याचे उच्चार ऑब्जर्व करायला>. ह्याची तेव्हडी गरज वाटली नाही.तो कोणी पंजाबी, मराठी व इतर कोणी दाखवला असता तरी चालून गेलं असतं.साउथ इंडियन च दाखवायला पाहिजे असं काही नव्हतं. इम्रान हश्मीकडून अनपेक्षितरीत्या चांगलं काम !! चिन्मय मांडलेकरचा रोल काही खास नव्हता. फक्त अशोक सराफ, बेर्डे सारखं हिंदीत काम मिळतंय म्हणून कुठलाही फालतू रोल नाही केला हे छानच.dr अहमदी आणि कल्की यांचं affair दाखवायचं काय कारण? नुसती मैत्री दाखवली असती तरी चाललं असतं.

<<चित्रपट शेवटाकडे येताना एक छोटासा सस्पेंस पण असाच अस्वस्थ करणारा. अहमदीवर ट्रक चालवणारा माणूस आणि त्याचा साथिदार यांचे प्रसंग पण चित्रपटभर एक वेगळा धागा गुंफत राहतात. त्याचा शेवटही परिणामकारक>> पटलं १००%.

चैत्राली,
.dr अहमदी आणि कल्की यांचं affair दाखवायचं काय कारण? नुसती मैत्री दाखवली असती तरी चाललं असतं.>> मी दिबाकर बॅनर्जी चा इंटर्व्हू पाहिला. तुमचं हे वाक्य आलं आणि मला त्यांच्या ह्या वाक्याची आठवण झाली. ते म्हणालेले की, " अहमदी ला तसं दाखवणं हे ते पात्र उभं करण्यातला एक भाग आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसा आहे याचा त्याच्या कामाशी काय संबंध? त्याची त्याच्या कामातली सच्चाई खरी आहे. आणि आपल्याकडच्या लोकांना हे बघायची सवय नाही. म्हणजे चांगला माणूस सर्वतोपरी चांगलाच दाखवला जातो आणि मग त्याच्या डार्क शेडस् आपण सहन करु शकत नाही. पण अ‍ॅक्च्युअली जगात असं नसतं. मोठ्या लोकांना पण चांगली आणि वाईट अशी बाजू असते. समाजात जे घडतय ते पात्र खरच तसं आहे हे दाखवायच म्हणून मुद्दाम अहमदी तसा दाखवला."

मी मुक्ता...धन्यवाद. तरी हे उत्तरही नाही पटलं. कारण खून तर राजकीय कारणांनी होतो, वैयक्तिक आयुष्यातील कारणांसाठी नाही. त्यांच्या affair चा संदर्भ पुढे कुठेच येत नाही. तेच कारण असतं त्यांच्या खुनामागाचा तर पटलं असतं.

<< तर माझ्या मते एकदा तरी नक्की बघावा>> माझ्याहि मते.

काल शांघाय पाहिला, बॅनर्जींकडून लई अपेक्षा ठेऊन पिक्चरला जाऊन बसले आणि खरंतर अपेक्षाभंगच झाला... मुळात डॉ. अहमदीचं पात्र म्हणावं तसं इफेक्टीव वठलं नाहीये त्यामुळे त्याच्या हत्येचा प्रयत्न मनात कुठे घरच करत नाही... कलकी म्हणजे सहन करण्याच्या पलिकडे दिसते... अभिनयात सुद्धा कुठे छाप ( छापच काय काटाही!) पाडत नाही..... एकंदर घिसीपिटी कथा पठडीतल्या मांडणीने निभावून नेता आलीही असती पण इथे मांडणीही प्रचंड विस्कळीत आणि संथ........

पूर्ण पिक्चरभर सतत कसले तरी उत्सव-नाचगाणे बॅक्ग्राउंडला दाखवले आहेत ते उगाचच वाटतात. पिक्चरचा सांधा जुळल्यासारखाच वाटत नाही कुठे आणि म्हणूनच तो पकडच घेत नाही.

अभय देओल चा कृष्णन मात्र बेस्टे... तसेच इमरान चा जोगीही... इमरान त्याच्या इमेज मधून बाहेर पडायचा प्रयत्न करतोय हे बघायला बरं वाटतंय..... बाकी फारूख शेख, अनंत जोग हे तर कसलेले कलाकार आहेत... अनंत जोग ला पूर्ण पिक्चर मधे मोजून ४-५ वाक्य असतील पण फेशियल एक्स्प्रेशन्स काय देतो तो, कमाल आहे........

आज पाहिला अखेर. मला आवडला. सगळ्यांचीच कामं चांगली झाली आहेत. फारूख शेख, सुप्रिया पाठक, अनंत जोग हे कसलेले कलाकार सफाईने कामं करून जातातच पण अभय देओल आणि इम्रान हाश्मी कांकणभर सरसच (या अशा वाक्यात माझ्या हातून कधी इम्रान हाश्मीचं नाव लिहिलं जाईल असं वाटलं नव्हतं). दोघांनी त्यात्या व्यक्तीरेखेची देहबोली अचूक पकडलीये. मी कल्कीला या आधी पाहिलेलं नसल्याने सुंदर/ कुरूप असं काहीच म्हणू नाही शकणार. पण प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीरेखा दिसायला चांगलीच असली पाहिजे असं काही नाहीये..

जाताजाता पडलेला एक अवांतर प्रश्न - तरुण, धडाडीचा, आदर्शवादी कल्पनांवर स्वतःची करियर बळी न चढवणारा, वास्तवात पाय घट्ट रोवून असलेला पण अजूनही एक 'कोअर इंटिग्रिटी' (नेमका मराठी प्रतिशब्द आत्ता सुचत नाहीये - सचोटी/ प्रामाणिकपणा??) शाबूत असलेला आणि ठेवणारा असा नोकरशाहीतला अधिकारी दाखवताना दक्षिण भारतीय दाखवावासा वाटला. ही एक सहज कल्पना होती का या मागे आपली एक राष्ट्रीय मानसिकतेतली 'स्टीरिओटिपिकल' विभागणी दिसते? की पंजाबी, उत्तर भारतीय, बिहारी अशा प्रांतातून आलेल्या अधिकार्‍याच्या व्यक्तिरेखेची, स्वभावाची काही कथेला अनावश्यक अशी इंटरप्रिटेशन्स आपसूक आली असती आणि ती टाळायची होती?

ही एक सहज कल्पना होती का या मागे आपली एक राष्ट्रीय मानसिकतेतली 'स्टीरिओटिपिकल' विभागणी दिसते? >>> वरदा, अचूक निरीक्षण! कहानी च्या वेळेस स्पॉईलर नको म्हणून मी लिहीले नव्हते, पण त्या एका पोलिस अधिकार्‍याचे नाव 'खान' आहे हे कळाल्यावर तो नक्कीच व्हिलन नसणार याची मला खात्री पटली होती. चित्रपटात जर एखादाच 'खान' असेल तर तो पाकी असेल तरच वाईट असू शकतो आपल्या चित्रपटांत. काही व्यावसायिक रिस्क न घेण्याचे ठोकताळे सहज लक्षात येतात त्यातील हा एक.

ते ग्रे एरिया/डार्क शेड्स मुद्दामून दाखवणे आता फार बोअर झाले आहे. बॉलीवूड मधे नवीन आहे पण इंग्रजी चित्रपटांत गेल्या काही वर्षांत मुद्दाम घुसडल्यासारखे 'कॅरेक्टर फ्लॉ' दाखवतात एक "चेकमार्क्/टिकमार्क" केल्यासारखे. बहुधा हॉलीवुडी मंडळींमधे आपल्याला जुन्या स्टाईलचे समजले जाऊ नये असे वाटून करत असतील. पुलं हिप्पी का कोणाबद्दल म्हंटले होते तसे बंडखोरांनाही त्यांची एक परंपरा जपावी लागते, तसे काहीसे Happy

<<पण त्या एका पोलिस अधिकार्‍याचे नाव 'खान' आहे हे कळाल्यावर तो नक्कीच व्हिलन नसणार याची मला खात्री पटली होती>> +१ फारेण्ड.
पण मला इथे व्यावसायिक ठोकताळा/ रिस्क आहे असं वाटत नाहीये. इथे मानसिकता दिसतेय एका सर्वसाधारण पातळीवरची, कदाचित नकळत. की दक्षिण भारतीय अधिकारी स्वच्छ, सचोटीचे असण्याची शक्यता जास्त आहे, किंवा अशी व्यक्तिरेखा जास्त विश्वसनीय वाटते. याच ऐवजी जर झा, पांडे तत्सम कुणी आलं असतं तर मग ते इतके सचोटीचे असू शकतात का? हा एक प्रश्न जवळजवळ प्रत्येक प्रेक्षक स्वतःला/ चित्रपटाला विचारणार. सत्य इतकं काळं-पांढरं नक्कीच नाही पण आपल्या मानसिकतेतले प्रांतीय आडाखे असे झालेत खरे आणि ते या व्यक्तीरेखेच्या पटात दिसतात असं मला मनापासून वाटलं.

बंडखोरांची परंपरा>> अगदी अगदी पटलं Happy

कालच पाहिला हा चित्रपट. आवडला. थोडासा स्लो आहे. पण कथा, पात्रं मस्तच. भारतीय राजकारण व नोकरशाही यांचा सहभाग असलेला थ्रिलर आवडला. अभय देओलचाच, 'मनोरमा', 'कहानी', आणि आत्ता शांघाई. काही काही प्रसंग अनावश्यक वाटतात तर काही प्रसंग, (स्पॉइलर अलर्ट मुळे लिहित नाही Happy ) सत्याच्या अगदी जवळच. आपणही हे दररोज बघतो अनुभवतो. एकदा तरी नक्की बघा.

काल पाहिला अखेर. आम्हाला दोघांनाही आवडला. एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे.
वरच्या सगळ्यांना अनुमोदन. इम्रान हाश्मी आश्वर्च्याचा धक्का होता.
गाणी (?) अगदी चपखल.

ओरिजिनल असे सांगीतल्यामुळे विकत घेतलेली परंतु प्रत्यक्षात भिकार पायरेटेड प्रिंट होती, त्यामुळे परत एकदा पाहणार.

अनुमोदन वरदा
तुझे पोस्ट वाचून 'शूल' आठवला सहज अपवाद आठवायला गेले तर. त्यातला मनोज बाजपेयीचा 'समर प्रताप सिंग'.

शेवटी पाहिला एकदाचा!
दिबाकर बॅनर्जीचा आत्तापर्यंतचा सर्वात कमकुवत सिनेमा वाटला. नोकरशाहीमधला ताण उत्तम दाखवला आहे. अहमदीला मारण्याचे लॉजिक समजत नाही, अहमदीला हाय-फ्लाईंग स्नॉब दाखवायचेय की जेन्युईन याचा गोंधळ झालाय असे वाटले.
मी हाश्मीचा कायमच पाठिराखा होतो त्यामुळे त्याला त्याचे कॅलिबर दाखवायची संधी मिळाली याचा आनंद झाला, ही इज मच मोअर दॅन 'सिरिअल किसर'!
पण हा सिनेमा अभय देओलचा आहे, निव्वळ अप्रतिम काम!

अभय देओलचाच, 'मनोरमा', 'कहानी', आणि आत्ता शांघाई. >>> कहानी मधे अभय देओल कुठे आहे? Uhoh