वाढदिवस

Submitted by श्रीकांत काशीकर on 13 May, 2012 - 08:08

'वाढदिवस', आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस. काहींना मोठं झाल्याचा आनंद मिळतो, तर काहीजण नाराज असतात एक वर्ष कमी झालं म्हणून. अर्थात, प्रत्येकाच्या मनावर हा अर्थ अवलंबून असतो. पण माणसाला सुखाची अपेक्षा असेल तर त्यानं नेहमी सकारात्मक विचार करायला हवा. भारतीय संस्कृती ही "तमसो मा ज्योति र्गमय" या पायावर उभी असल्यानं नेहमीच सकारात्मक विचार सांगते. साहजिकच वाढदिवसाला ती दिवाळी इतकाच आनंदाचा दिवस मानते. अभ्यंगस्नान, नवे कपडे, ईश्वराची प्रार्थना करणे, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे, आईकडून औक्षण करून घेणे, तिने पेढा किंवा तत्सम गोड पदार्थाने तोंड गोड करणे आणि इष्ट-मित्रांच्या शुभेच्छा स्वीकारणे असे सारे सोपस्कार भारतीय वाढदिवसात आहेत. या साऱ्यातून मिळणारा आनंद अविस्मरणीय असतो.

लहानपणी हे सारं ठीक आहे. मोठेपणी हे सारं तर व्हावंच पण त्याशिवाय आणखीही काही करता आलं तर पाहावं. म्हणजे नेमकं काय? तर थोडं मागं वळून गतवाढदिवस आठवावा. आपला हा कितवा वाढदिवस आहे? आपण आयुष्यात लोकसंग्रह, ज्ञानसंग्रह, धनसंग्रह अशा वेगवेगळ्या खात्यांमध्ये किती शिल्लक टाकली? याचा हिशोब मांडावा. माता-पिता-गुरु-समाज यांचं ऋण फेडण्याचा किती प्रयत्न केला याचा विचार करावा. मनाशी प्रामाणिक राहून आपल्या वाटचालीची दिशा कितपत बरोबर आहे हे पाहावे. शालेय प्रगतिपुस्तकात 'अ' श्रेणी अनेकांना मिळते, पण वरीलप्रमाणे गुणांकन करून जीवनाच्या प्रगतिपुस्तकात 'अ' श्रेणी मिळविण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. जे ही श्रेणी मिळवतात, त्यांचा वाढदिवस घरापुरता मर्यादित न राहता समाजाचा होतो. एवढंच काय तर इतिहासही त्याची नोंद घेतो.

भारतीय संस्कृतीत वाढदिवस साजरा करताना विशिष्ट टप्प्यांना महत्त्व देऊन त्याला नामाभिधान दिलेले आहे. त्यात वाढत्या वयाबरोबर जीवनाचीही गुणात्मक प्रगती अपेक्षित आहे. पंचविसाव्या वाढदिवसाला रौप्यमहोत्सव म्हटले आहे. चांदीपेक्षा सोन्याचे मूल्य अधिक, म्हणूनच पन्नासाव्या वाढदिवसाला सुवर्णमहोत्सव म्हटले आहे. सोन्यापेक्षा हिरा अधिक मौल्यवान, शिवाय तेजस्वी, प्रकाश देणारा. इतरांचे जीवन उजळून टाकण्याची क्षमता असणारा. साठाव्या वाढदिवसाला हीरकमहोत्सव म्हटलं जातं ते यासाठीच. देव - दानवांनी अमृतच लाभ होण्यासाठी समुद्रमंथन केलं. अमृतप्राशनाने अमरत्व प्राप्त होतं . आपल्या पंचाहत्तराव्या वाढदिवशी आयुष्याचा हिशोब मांडण्याची वेळच येत नाही. कारण आपण प्रारंभापासून भारतीय संस्कृतीप्रमाणे वाढदिवस साजरे करत गेलो, तर या वाढदिवशी आपल्याला कीर्तीरूपी अमरत्व लाभून "अमृतप्राशनाचं" समाधान लाभतं. आपला वाढदिवस इतिहासात नोंद केला जातो. शिवाय हे आपणाला करावं लागत नाही, तर समाजच सारं करतो. असा वाढदिवस हा केवळ कौटुंबिक सोहळा न राहता सार्वजनिक आनंदाचा दिवस ठरतो. काहींना यापुढे जाऊन सह्स्रचन्द्रदर्शन सोहळा (ऐंशीवा वाढदिवस) साजरा करण्याचं, शतायुषी होण्याचं भाग्य लाभतं.

भारतीय संस्कृतीत वाढदिवसाकडे पाहायला सांगितलं जातं ते असं. आता आपला वाढदिवस या पार्श्वभूमीवर कसा साजरा करायचा? 'अमृताचा मार्ग' स्वीकारायचा की नाही? हा विचार ज्याच्या त्याच्या मनावर अवलंबून.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तर थोडं मागं वळून गतवाढदिवस आठवावा. आपला हा कितवा वाढदिवस आहे? आपण आयुष्यात लोकसंग्रह, ज्ञानसंग्रह, धनसंग्रह अशा वेगवेगळ्या खात्यांमध्ये किती शिल्लक टाकली? याचा हिशोब मांडावा. माता-पिता-गुरु-समाज यांचं ऋण फेडण्याचा किती प्रयत्न केला याचा विचार करावा ...... आवड्ले विचार Happy Happy Happy