"खासबाग" - शंभर वर्षांच्या कुस्तीची परंपरा

Submitted by अशोक. on 23 April, 2012 - 07:04

काल रविवारी सायंकाळी करवीर नगरीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत क्रिडा क्षेत्रातील एका शानदार सोहळ्याचा परंपरेच्या अभिमानाचा सोहळा संपन्न झाला. प्रतिवर्षी देशात विविध ठिकाणी 'हिंदकेसरी' पदासाठी कुस्तीगिरांच्या अटीतटीच्या लढती झडत असतात. पण २०१२ या सालातील या पदाच्या गदेसाठी 'मैदान' एकमुखाने निश्चित झाले होते कोल्हापूरचे 'शाहू खासबाग मैदान' ! कारण हे मैदान चालुवर्षी आपल्या स्थापनेचे १०० वे वर्ष साजरे करणारे होते.

maidan2" title="One">

प्र.चि. १ - स्पर्धेच्यावेळी गर्दीने तुडुंब भरून गेलेले खासबाग मैदान

maidan3" title="Two">

प्र.चि.२ : एरव्ही "शांत हिरवेगार" दिसणारे खासबाग मैदान

१९१२ ते २०१२ ~ शंभर वर्षाचा प्रदीर्घ काळ. या काळात देशातील अनेक लहानमोठ्या शहरांचे रुपडे नित्यनेमाने बदलत गेले, बदलत चालले आहेच. आधुनिक काळाला अनुसरून अगदी विद्युतवेगाने शहरांच्या चेहर्‍यात आमुलाग्र बदल होते गेले. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली, वाढत्या रहदारीच्या प्रश्नामुळे, उपनगरांची बेसुमार झालेली वाढ आदी अनेक कारणानी शंभर वर्षापूर्वीच्या अवाढव्य वास्तू जमिनदोस्त झाल्या, नवनवीन साम्राज्ये उदयाला आली, काही अस्ताला गेली. पण इतक्या प्रपातातही सत्तेवर आलेल्या कोणत्याही घटकाने कोल्हापूरातील कुस्ती परंपरेची अखंड चालत आलेली ही जागा नष्ट होण्याचा वा करण्याचा पुसटसाही विचार केला नाही..आणि त्याच परंपरेत २०१२ हे साल 'खासबाग मैदाना'ची शताब्दी साजरी करीत आहे. त्या निमित्ताने मैदानाची लेखाद्वारे ओळख.

खासबाग कुस्तीचे मैदान म्हटले की साहजिकच कोल्हापूरचे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांची आठवण येणे क्रमप्राप्त. त्यानीच या मैदानाची स्थापना केली होती. ते स्वतः अगदी लहानपणापासून निष्णात असे कुस्तीगीर होते. कोल्हापूरचे छत्रपती बाबासाहेब महाराज याना शाहू दत्तक गेले होते आणि १८९४ मध्ये ते करवीर गादीवर "छत्रपती" म्हणून विराजमान झाले. त्यांच्या सामाजिक सुधारणा तसेच बहुजन समाज शिक्षणविचारावर/कारकिर्दीवर इथे काही लिहिणे अप्रस्तुत होईल म्हणून फक्त त्यानी "कुस्ती परंपरा" जपण्यासाठी काय कार्य केले हेच प्रामुख्याने या लेखासाठी विचारात घेतले आहे. त्यांच्या काळात (जवळपास २६-२७ वर्षाचा काळ होता) महाराष्ट्राच्या कुस्तीसाठी हा सुवर्णकाळ होता. कोल्हापूरच नव्हे तर सार्‍या राज्यात कुस्तीगिरांच्या तालमींचा हा उत्कर्षाचा काळ होता. त्यानी हिंदुस्थानातील कोल्हापुरात कुस्तीसाठी निमंत्रित केले. काहीजणांना वाड्यावर आणि गावात कायमचा आश्रयही दिला. पैलवानांच्या आहारासाठी [पैलवानी भाषेत 'खुराक'] महाराजांनी लाखो रुपयांची अनुदाने दिली होती.

Maidan1" title="Three">

प्र.चि.३ - खासबाग निर्मितीपूर्वी राजवाड्याच्या प्रांगणात उभा केलेल्या तात्पुरत्या मैदानातील कुस्ती

असे असले तरी ह्या कुस्त्या व्हायच्या त्या भवानी मंडपात तात्पुरत्या बांधलेल्या आखाड्यात. पाहाण्यासाठीही विशाल जागेअभावी काही निमंत्रित, सरदार-उमराव-जहागिरदार-इनामदार अशी शेलकी मंडळी व आजुबाजूने जागा मिळेल तितक्यापुरती रयत. तर मंडपाबाहेर "गण्यागंप्यांची' ही गर्दी. पाहायला तर मिळत नव्हते, फक्त आतल्या बाजूने येणार्या जयजयकाराच्या आवाजासाठी ही जनता आतुर असायची. हे महाराजांना कुठेतरी खुपत असायचे. पुढे सन १९०२ मध्ये युरोपात 'रोम' येथील सम्राटच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी शाहू महाराजांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले गेले. तेथील वास्तव्याच्या दरम्यान महाराजांनी आपल्या ज्येष्ठ साथिदारांच्यासमवेत रोममधील गोथिक शैलीतील इमारत बांधकामांची पाहणी केली. खुली नाट्यगृहे तशीच सभागृहेही पाहिली पण त्यांचे मन रमले ते भव्य अशा रोम ऑलिम्पिक कुस्ती स्टेडियमध्ये. अगदी त्याच धर्तीवर आपल्या कोल्हापूरतही असे भव्यदिव्य कुस्तीचे मैदान बांधण्याच्या विचाराने त्यांच्या मनाने उचल घेतली आणि त्याच्या जोडीलाच कोल्हापुरातील कलाकारांसाठी तितकेच भव्य असे एक नाट्यगृहही ["पॅलेस थिएटर...आजचे 'केशवराव भोसले नाट्यगृह] बांधायचे त्यानी प्लॅन्स करवून घेतले. सन १९०६ मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. संबंधित इंजिनिअर्सना त्यानी त्यांच्या ओव्हरसीअर्ससह मथुरेतील विविध आखाडे पाहण्यास पाठविले होते [कृष्णाचा मामा 'कंस' हा मल्लविद्येसाठी प्रसिद्ध होता व त्याच्या नावाने आजही मथुरेत कित्येक आखाडे प्रसिद्ध आहेत]. अन्य तज्ज्ञांसमवेत प्राचीन काळातील कुस्ती आखाड्याची वैशिष्ट्ये चर्चेला घेतली. मथुरा आणि तत्सम गावातील मैदान बांधणीची वैशिष्ट्ये, बैठक व्यवस्था नीटपणे तपासल्यावर अंती महाराजांनी उंच आखाड्याऐवजी मैदान म्हणजे हौदा बांधायचा निश्चित केले. मथुरेतील मैदाने सपाट त्यामुळे कुस्ती बघणार्यांना तासनतात उभे राहूनच कुस्त्या पाहाव्या लागत; म्हणून मग रोम धर्तीने उतरत्या शैलीचे 'खासबाग' मैदान बांधण्याचा निर्णय झाला. मैदान पूर्वाभिमुख असून ढाचा त्रिकोणी आहे. तिन्ही बाजूंनी ८० फुटापर्यंत पूर्ण उतरते बांधकाम असल्याने लाखाची गर्दी झाली तरी त्याचे लक्ष थेट तांबड्या मातीकडेच जाणार शिवाय शेवटपर्यंत जमिनीवर बसूनच मल्लांच्या हालचाली टिपता येणार. प्रमुख कुस्तीच्या अगोदर लहानमोठ्या पाचपंचवीस कुस्त्या लागतात, तरीही कुठेही गदारोळ नाही. सर्वच्या सर्व कुस्त्या नजरेच्या एका टप्प्यात येतत अशी देखणी व्यवस्था. मैदानाचा व्यास ६० फूट तर बांधकाम जमिनीपासून तीन फूट उंचीवर. बाजूच्या तटबंदीच्या भिंती २० फूट उंचीच्या. तेथील चौथर्यावर रणभेदीसारखी वाद्ये वाजवित पैलवानांच्या जिद्दीत अंगार फुलविण्याचे काम वाजंत्री करीत. खास निमंत्रितांना बसण्यासाठी मैदानाच्या पूर्वेस आखाडाभिमुख दुमजली इमारत. तर लालमातीत प्रेक्षकांनी घुसखोरी करू नये यासाठी सारा तांबडा हौद लोखंडी सळ्यांनी वेढून टाकण्यात आला आहे.

6" title="Four">
प्र.चि. ४ : एप्रिल १९१२ 'खासबाग मैदान' उदघाटन सोहळा

अशा विविध विचारांनी आणि आराखड्यांनी १९०६ साली बांधकामास सुरुवात झालेले हे मैदान २० एप्रिल १९१२ मध्ये पूर्ण झाले. त्या दिवशी शाहू महाराजांनीच मैदानातील लालमातीत प्रथम पाऊल उमटविले व मुहूर्ताचा नारळ प्रदान केला. कोल्हापूर तर त्या दिवशी गुढीपाडव्यांनी सजून गेले होते आणि गावातील सारे वातावरण मंगलमय झाले होते. त्या दिवशी संध्याकाळी मुहूर्ताची पहिली कुस्ती म्हणून लाहोरचा जगज्जेचा पहिलवान इमामबक्ष, जो सुप्रसिद्ध गामाचा धाकटा भाऊ होता व त्याच्याविरुद्ध गुलाम मोहिद्दिन पैलवान यांच्यात पहिली सोनेरी कुस्ती लावली गेली. ती केवळ कुस्तीच पाहण्यासाठी नव्हे तर महाराजांनी सार्‍या देशात चर्चेचा विषय केलेले ते 'खासबाग कुस्तीचे मैदान' पाहाण्यासाठी कोल्हापूरच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातून कुस्तीप्रेमी रसिक कोल्हापूरकडे धाव घेत होते. ती पहिलीवहिली कुस्ती. सायंकाळी ५.०० च्या सुमारास महाराज खास बग्गीतून मैदानात आले आणि तोपर्यंत लाल मातीत व्यायामाचा सराव करीत राहिलेले ते दोन अक्राळविक्राळ देहयष्टीचे पैलवान त्यांच्या इशार्‍याचीच वाट पाहात होते. ती कुस्ती आणि मैदान पाहायला आलेल्या लाखो कुस्तीप्रेमींचा उत्साह खवळलेल्या सागरासम होता. शिट्ट्या आणि आरोळ्या यानी मैदानच नव्हे तर आकाशही भरून गेले आणि महाराजांनी दोन्ही पैलवानांचा एकमेकाच्या हातात हात दिला. आणि पुढील दोन तास अक्षरश: जादूमयरित्या कुस्ती झाली आणि अपेक्षेप्रमाणे इमामबक्षने मोहिद्दीनला धूळ चारून १९१२ ची या मैदानातील ती पहिलीवहिली कुस्ती अमर केली. दोन्ही कुस्तिगिरांना महाराजांनी स्वतः मैदानात येऊन रोख रकमेची पारितोषिके दिली आणि सार्या राज्यातून जमलेल्या रसिक क्रीडाप्रेमींनाही अभिवादन केले. दुसर्‍या दिवसापासून 'खासबाग' मैदान जनतेसाठी खुले झाले.

पुढे दरसाली देशातील नामवंत पहिलवान आपल्या कुस्ती कौशल्याच्या कस खासबागच्या मैदानातच लागला पाहिजे या जिद्दीने या गावात येऊन इथल्या स्थानिक मल्लांपुढे रोखठोक आव्हाने ठेवू लागले.

कल्लू गामा आणि गुंगा पहिलवान, स्थानिक मल्लापा तडाखे आणि लाहोरचा जिजा पंजाबी, गोगा, अक्रम, सादिक पंजाबी विरूद्ध मारुती माने, अस्लमविरुद्ध विष्णू नागराळे. ह्या सार्‍या कुस्त्या जणूकाही पंजाब विरूद्ध महाराष्ट्र अशाच होत्या....त्यावेळी "पंजाब" हा अखंड हिंदुस्थानाचा भाग असल्याने या पैलवानांना कुणीही 'पाकिस्तानी' पैलवान म्हणत नव्हते, समजत नव्हते, कारण त्याकाळात पाकिस्तान निर्मितीचा प्रश्नच नव्हता. पुढे मात्र पूर्व पंजाब नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानात गेल्यावर तेथील पहिलवानांची, राजकीय अस्थिर वातावरणामुळे, इकडच्या येण्यातील वारंवारीता प्रकर्षाने कमी होऊ लागल्यावर मग महाराष्ट्रातीलच पैलवानांच्या कुस्त्या खासबाग मैदानात घुमू लागल्या आणि गाजूही लागल्या. त्यात सर्वप्रथम नाव येते ते मारुती माने विरूद्ध विष्णू सावर्डे यांच्यातील साडेतीन तास [अंधार पडू लागल्यावर मोठाल्या गॅसबत्त्या आणाव्या लागल्या मैदानात] चाललली आणि तितकीच गाजलेली मारुती मानेच्या विजयाची आरोळी. या एकाच कुस्तीमुळे मारुती माने हे नाव सार्या भारतात गाजले आणि त्या किर्तीमुळे दिल्लीतील हनुमान आखाड्यातील पहिलवानांना 'खासबाग मैदानाचे' व पाठोपाठ कोल्हापूर नगरीचे आकर्षण वाटू लागले.

महमद हनिफ, गणपत आंदळकर, दिनकर दह्यारी, मारुती वडार, श्रीपती खंचनाळे, चंबा मुत्नाळ, लक्ष्मण काकती, चंदगीराम, लक्ष्मण वडार, युवराज पाटील आदी अनेक मल्लांनी इथली तांबडी माती आपल्या अंगाखांद्याला लागल्याशिवाय आपल्या कुस्तीचे सार्थक झाले नाही असेच मानले. पुढे ऑलिम्पिक कुस्तीत "मॅट" आले आणि नवीन पिढीतील पैलवानांनी तिकडे आपल्या कलेचे लक्ष स्वाभाविकपणे केन्द्रीत केले असले तरी त्यानाही 'खासबाग'ची भुरळ होतीच.

त्यामुळेच ज्यावेळी जीन पॅण्ट व टॉप घालून एक खाली मान घातलेला विशीतील नवी दिल्लीचा एक गोरापान युवक आपल्या गुरुसमवेत मैदानात आला आणि बाहेरील पाहुण्यांसाठी केलेल्या वेगळ्या बैठक व्यवस्थेतील शेवटच्या खुर्चीच्या मागे जाऊन उभा राहिला आणि मैदानात सुरू असलेल्या पाचसहा कुस्त्यांकडे अनिमिष नेत्रांनी पाहू लागला त्यावेळी 'मी इथल्या करवीरकरांच्या गळ्यातील ताईत होईन'...असे स्वप्नही त्याच्या मनी आले नसेल...कोल्हापूरकरांनीही या कॉलेजकुमार पैलवानाकडे '...आला आहे असाच एक दिल्लीतून कोल्हापूर बघायला' अशा नजरेनेच पाहिले.

हा युवा पैलवान होता - "सतपाल".

वर्ष होते १९७७-७८ आणि 'रुस्तमे-हिंद' किताबासाठी लढत देणार्‍यांमध्ये देशातील नामवंत बलदंड पहिलवानांनी एकच गर्दी केली होती कोल्हापुरात. तर २१ दिवस चालणार्‍या या भव्य मैदानातील कुस्त्या पाहण्यासाठी मैदानाबाहेर तिकिटांसाठी उसळलेली रसिक क्रीडाप्रेमींची तोबा गर्दी. तिसर्‍या दिवशी 'सतपाल' युवीने आपल्या अंगवरील टॉप आणि जीन बाजूला काढली आणि लांगेवरच आपले गुरु हनुमान याना नमस्कार केला आणि कसलीही घोषणा न करता शांतपणे मैदानात येऊन आपल्या प्रतिस्पर्ध्याची वाट पाहू लागला. पंचांनी शाहूपूरी तालमीच्या त्याच्याविरुद्धच्या पहिलवानाला पुकारून पाचारण केले आणि त्याच्या मित्रांनी त्याच्याबाजूने एकच गिल्ला केला...तसा इथला प्रघात आहेच. सतपालने नम्रपणे सलामी दिली आणि पंचाने दोघांना हस्तांदोलन करायला लावून कुस्ती सुरूचा इशारा दिला...इशारा देऊन एकच सेकंद झाला असेल नसेल आणि ठासून भरलेल्या मैदानातील सुमारे पन्नास हजार प्रेक्षकांनी पाहिले की शाहूपुरीचा तो लाडका नंबरी पैलवान चारीमुंड्या चीत होऊन आकाशाकडे डोळे विस्फारून पडला आहे. तर दुसरीकडे विजयी सतपाल...ज्याच्या अंगाला अजून चिमुटभरही माती लागलेली नाही; तो परत एकदा प्रेक्षकांकडे पाहात लवून नमस्कार करीत आपल्या गुरुच्या खुर्चीकडे वंदनेसाठी निघालाय.

त्या क्षणापासून सतपाल कोल्हापूरकरांच्या मनात असा काही बसला, भरला की ज्याचे नाव ते. पुढील प्रत्येक कुस्ती सतपालने त्याच आविर्भावात जिंकली आणि दोनेक आठवड्यानंतर झालेली अंतिम लढत : सतपाल दिल्ली विरूध्द दादू चौगुले कोल्हापूर. ह्या कुस्तीच्यावेळी प्रथमच सतपालच्या अंगाला विरूध्द बाजूच्या पैलवानाकडून अंगाला थोडी का होईना पण माती लागली. तितकेच, कारण वीस मिनिटाच्या आत सतपालने दादू चौगुलेसारख्या हत्तीएवढ्या पहिलवानाला असे काही मेटाकुटीला आणले की दादूने पराभवानंतर जवळपास पहिलवानकी सोडलीच. विजयी सतपालला खासबाग मैदानातच चांदीची गदा आणि लाख रुपयाचे पारितोषिक तर दिले गेलेच शिवाय त्याची महाराजांच्या वाड्यावरील 'बर्चीबहाद्दर' या हत्तीवरून कोल्हापूरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. खासबागेतील या कुस्तीतील विजयामुळे पैलवान सतपालचे नाव सार्‍या देशात तर झालेच शिवाय पुढे त्याला कोल्हापूर आपलेच वाटू लागले. अनेकवेळी इथे त्याच्या कुस्त्या झाल्या...अनेकाना त्याने इथे व अन्यत्र धूळ चारली. पण तो पराभूत झाला तो खासबागेत युवराज पाटील आणि पुढे मुंबईत हरिश्चंद्र बिराजदार या इथल्या [मूळ गाव लातूर] पैलवानाकडूनच.

खासबाग मैदान....मॅट ग्रीको रोमन आदी अनेक प्रकारच्या नवनवीन प्रकारांना पुरून उरले आहे ते काल संपलेल्या हिंदकेसरी २०१२ च्या मैदानावरून सर्वांना दिसलेच....पुढील अगणित वर्षे शहराच्या जडणघडणीत विविध रुपाने आपले रंग दाखवितील, पण करवीरकर शंभर वर्षांची दिव्य परंपरा असलेल्या या मैदानाला कसलीही ढाळ लागू देणार नाहीत हेही तितकेच खरे.

[लेखातील मैदानाची नवीजुनी चित्रे जालावरून साभार]

गुलमोहर: 

कोण ? मंदार ? का बरे ?
अरे मी त्याला स्पेशल फोटो पाठविणार नसून फोटो स्पेशल असे पाठविणार आहे. कोल्हापूरातील खासबागेचे फोटो त्याला दिसले नाहीत म्हणून. पण मंदार जिथे कामाला आहेत त्या ठिकाणी काही साईट्स बॅन आहेत असे त्याचे म्हणणे दिसते. [फायरवॉल असा काही प्रकार असतो ना ?]

अशोकराव.. खुप मस्त लेख आणी फोटो.. मी कुस्ती पाहिली नाही पण सतपालला हरवल्यावर युवराजची कोल्हापुरातील जंगी मिरवणुक पाहिली आहे.. Happy

रामराव आणि कौतुकराव ~ धन्यवाद

युवराजने सतपालला पराभूत केले होते इथे याच खासबागच्या तांबड्या मातीत. मी प्रत्यक्ष पाहिली होती ती कुस्ती. हिंदकेसरी मारुती माने सरपंच होते या कुस्तीचे. त्यानी कुस्तीचा निकाल जरी युवराजच्या बाजूने दिला असला तरी सतपाल आणि त्याच्या साथीदारांना तो मान्य नव्हता. युवराजने एकलंगी डावावर सतपालला जरूर खाली घेतले होते वर उरावर बसून त्याची 'सवारी' खेचून त्याला पाठीवर खेचण्याच्या तो प्रयत्न करीत होता....युवराजने निव्वळ अफाट ताकदीच्या जोरावर सतपालला नक्की पालथे केलेही असते, पण रेलिंगभोवती अचाट गर्दी केलेल्या मोतिबागच्या पठ्ठ्यांनी सतपाल खाली आला एवढ्यावरच दंगल करीत लोखंडी गजातून मातीत प्रवेश केला. माने पंचही हतबल झाल्यासारखे वाटले आणि त्यानी कुस्ती निकाली झाल्याची हात उंचावून खूण केली.....मग तो जल्लोष आणि मिरवणूक वगैरे प्रकार.

नंतर दिल्लीत परतल्यावर सतपाल आखाड्याने तो पराभव मान्य केला नव्हताच. तरीही पुढे हरिश्चंद्र बिराजदार यानी मात्र आपल्याला चारीमुंड्या चीतपट केले होते याची जाहीर कबुली सतपालने दिली....ते सत्यही होते.

वा अशोकजी..... मस्त माहिती व मस्त फोटो - काही पहेलवानांचे फोटो हवे होते असे वाटले.
अवांतर - अग्नेल निग्रो पण कोल्हापूरचाच का ?

क्या बात है अशोकजी : लेखन , कथन अन छायाचित्रे - सगळच अप्रतीम! तुमच्या रुपाने मायबोलीला एक व्यासंगी, अभ्यासू सदस्य अन चार्मिंग लेखक मिळालाय हे मी आता खात्रीन सांगू शकतो !
आपले या लेखासाठी धन्यवाद !

तुमच्या रुपाने मायबोलीला एक व्यासंगी, अभ्यासू सदस्य अन चार्मिंग लेखक मिळालाय हे मी आता खात्रीन सांगू शकतो !
>>>+१००

अशोककाका... परवा झालेल्या कुस्तीचे वर्णन कुठे आहे पण????

हा लेख मस्तच झालाय...

पहिलवानांच्या गोष्टी म्हणून एक पुस्तक आहे माझ्याकडे.. त्यात गामा, गुंगा, झिबिस्को, दारासिंग, सतपाल, मामा बिराजदार ह्या सगळ्या मल्लांबद्दल माहिती आहे..

@ शशांक ~
होय. माझ्या मनातही काही गाजलेल्या पैलवानांचे फोटो या निमित्ताने इथे द्यावे असे आले होते. पण झाले असे की मूळ लेख जरासा लांबत चालल्याचे वाटू लागले शिवाय फोटो देण्याचाही प्रोसेस [निदान मला तरी] काहीसा वेळखाऊ वाटू लागला, तेव्हा चारच फोटो - जे थेट मैदानासंबंधी असल्याने - दिले.

अ‍ॅग्नेल निग्रो हा पैलवान मूळचा कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील हल्याळ गावचा. सांगितले तर आश्चर्य वाटेल पण या गावात घरटी मराठी बोलले समजले जाते. अ‍ॅग्नेल कोल्हापूरातील शाहुपूरी तालीममधील महमद हनिफ यांचा चेला झाला. इथे तो रमला असल्याने कुस्तीच्या हॅण्डबिलमध्ये अ‍ॅग्नेल निग्रो - कोल्हापूर - असेच छापले जायचे. बर्‍याच कुस्त्यात याने चमक दाखविली पण हिंदकेसरी होऊ शकला नाही....कारवार इथेच त्याचे निधन झाले.

@ गिरीश कुलकर्णी आणि राम ~ काय बोलू तुमच्या प्रतिसादावर ? फक्त थॅन्क्स म्हणतो.

मस्त माहिती. फार छान वाटले वाचून. अनेक धन्यवाद अशोक.
गामा बद्दलची विकीवरची माहिती वाचतांना पठ्ठ्याने साहेबाच्या देशात जाऊन सगळ्यांना ओपन चॅलेंज केले होते आणि मिनिटांमध्येच झिबिस्कोसहित सगळ्या पट्टीच्या पाश्चात्य पहिलवानांना धोबीपछाड केले.
केवढा तो आत्मविश्वास. फार भारी वाटले वाचून. आयुष्यात (अगदी वय झाल्यानंतरही) एकही लढत हारला नाही तो. खराखुरा चँपियन.

शाळेच्या पुस्तकात हरबान सिंग(की हरबन्स) आणि बहूधा झिबिस्को ह्यांच्या लढतीबद्दलचा एक धडा होता.
पण नेटवर शोधले असता काही माहिती मिळाली नाही.

@ हिम्सकूल ~
यंदाच्या हिंदकेसरी स्पर्धेबाबतच्या सविस्तर बातम्या झाडून सार्‍या वर्तमानपत्रातून आल्याने [कदाचित प्रमुख पाहुणे म्हणून दस्तूरखुद्द मुख्यमंत्रीच मैदानात उपस्थित राहिले असल्याने] आल्यामुळे मी त्याविषयी जास्त लिहिले नाही. तरीही सविस्तर वृत्तांताची फोटोसहीतची खालील लिंक आपण जरूर पाहावी.

http://72.78.249.107/Sakal/23Apr2012/Enlarge/Kolhapur/index.htm

@ चमन ~
"गामा" हे नाव एक 'लीजंड' बनून गेले होते आणि या क्षेत्रात नाव कमाविणार्‍या प्रत्येकाचा तो एक आदर्श राहिला आहे. 'गामा, गुंगा, भोला, गोगा, अक्रम' ही सारी पंजाबी पठाणी नावे या मातीत अशी काही रुजली आहेत की यांच्या उल्लेखाशिवाय कुस्ती विषयावरील कोणतेही पुस्तक पूर्ण होऊच शकत नाही.

@ रुनी ~ थॅन्क्स.

आबासाहेब....

तुम्ही जर तुमच्या ऑफिसमधून हा धागा पाहात असाल तर अशाठिकाणी काही साईट्सवरील प्रकाशचित्रांना फायरवॉल्सचा प्रतिबंध येतो. काल मंदार जोशीनाही हीच अडचण आली होती. तुमच्या घरी हे इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर मग ओके...तिथे जरूर फोटो दिसतील....ते तुम्ही पाहाच. फोटोशिवाय या लेखाला मजा नाही.

शाळेच्या पुस्तकात हरबान सिंग(की हरबन्स) आणि बहूधा झिबिस्को ह्यांच्या लढतीबद्दलचा एक धडा होता.
>> एक धडा होता खरे पण त्यात फक्त झिबिस्को आठवतोय. दुसरा पेहेलवान नाही आठ्वत.

एकदम नादखुळा......
आम्ही फक्त रिकामे मैदानच पाहीले आहे आजवर Sad कधी कुस्त्या बघायला जायचा मौकाच नाही मिळाला.
आज या लेखातुन अनुभवला तो सोहळा !
मनापासून आभार काका !!

नमस्कार,
मला चक्क माझ्या विद्यार्थीदशेत केव्हां नेलेत ते समजलेच नाही. आम्ही त्या काळात पुण्याच्या सकाळमध्ये खासबागेतील अंतीम कुस्त्यांची वर्णने उत्सुकतेने वाचायचो! यातील बरीच नावे व त्या कुस्त्यांचे सकाळमध्ये आलेले फोटो आठवले. सत्पालचा काळ तर खूपच आठवला. त्यावेळी गुरु हनुमान यांचा आलेला फोटो आणि मुलाखत आठवतेय!
मोजकेच पण महत्वाचे फोटो देऊन तो काळ जिवंत केलात. फक्त हत्तीवरील महाराजांचा फोटो नीट दिसत नाही. जुना फोटो असल्याने तसे झाले असावे.
लेखातील भाषेचा डौल अप्रतीम! केवळ त्यासाठी लेख पुन्हा एकदा वाचला.
गिरीश कुलकर्णी यांच्या मताशी पूर्ण सहमत.

धन्यवाद दामोदरसुत ~ मला फार भावली आपली प्रतिक्रिया. त्या फोटोबद्दल म्हणायचे झाल्यास, एकतर तो बरोबर १०० वर्षापूर्वी काढलेला आणि त्यातही आम्हाला तो (राजवाड्यावरील लायब्ररीमध्ये) हातात घेण्याची अनुमती तिथल्या कारभार्‍यांनी दिली नाही, पण तेथील फोटो काढू दिले....तसे सर्वानाच देतात. शेकडो फोटो आहेत माझ्याकडे त्या काळातील.....संस्थान कोल्हापूरचे, विविध प्रसंगाचे. खासबाग आणि पॅलेस थिएटरचे जितके मिळाले त्यातील कुस्तीचे आणि मैदानाचे त्यातल्या त्यात बरे म्हणावेत.

सतपालचा तो काळ सर्वार्थाने त्याचा होता....स्थानिक मल्लांनी त्याच्या भाग्याचा हेवा करावा इतके कौतुक त्याच्या मापात करवीरकरांनी टाकले होते. ही शुअरली वॉज अ डिझर्व्हिंग कॅन्डिडेट टु दॅट मच प्रेज.

Pages