माझे सहजीवन

Submitted by वैशाली अ वर्तक on 2 January, 2012 - 06:35

डिसेंबर महिना होता. मी शेवटची उरली सुरलेली आकस्मित रजा casual leave घेण्याच्या मूड मध्ये होते. सुट्टी घेतली तरी रजेचा मूड न येऊ देता सर्व कामे ऑफिसच्या वेळेवर आटपून बरेच दिवसानंतर वा महिन्यानंतर सकाळचा कामगार सभेचा कार्यक्रम लावून मी जवळच पडलेले मासिक चाळत होते. ध्वनिमुद्रीकांचा कार्यक्रम चालला होता.ध्वनिमुद्रिका चालू होती ,
दिसते मजला सुख चित्र नवे
मी संसार माझा रेखिते .
मी गाणे ऐकता ऐकता २५ वर्षापूर्वीच्या काळात ओढले गेले .दोरीचे रीळ उलगडावे त्याप्रमाणे
काळाचे रीळ विचारांच्या तंद्रीत उलगडले गेले .व ८ जुलै साखरपुड्याचा दिवस आठवला .त्या अगोदर
एकमेकांनी "जीवनसाथी" म्हणून पसंत करण्यासाठीची पहिली भेट आठविली.लगेच साखरपुड्याच्या दिवशी सासूबाई नणंद यांचे साखरपुड्याला जमलेल्या त्यांच्या (आता माझ्या) नातेवाईकांसमोर
कौतुकाने सांगत असलेले " आमच्या घरात अगदी शोभणारी आहे हो! दोघांची जोडी अगदी साजेशी आहे .
आणि हो ! खेळाडू आहे. इंडिया रीप्रेझेंट केले आहे बर कां ! सुवर्णपदके मिळवली आहेत हो ! "
असे शब्द कानांत घुमले. मग साखरपुडा ते लग्न अवधी म्हणजे जवाबदारी नाही. नुसते तयार होणे ,खरेदी करणे ,हिंडणे ,फिरणे, हॉटेलिंग करणे .नोकरीला जाणे व तासान तास उद्याची स्वप्ने
रंगवित कधी बागेत बसून गवत खुरडत तर कधी रेतीत उगीचच रेघोट्या मारीत बसणे. तेह्वा
साखरपुडा ते लग्न म्हणजे सुवर्णकाळ ,तो पण डोळ्या समोर सरलेला आठवला.
नंतर ठरल्याप्रमाणे सुमुहुर्तावर दोन कुळांचे मिलन झाले. एका घरची लेक दुस-या घराची
मोठी स्नुषा म्हणून मी घरात प्रवेश केला. नोकरी निमित्याने आमचा संसार वेगळ्या गांवी करावा लागला त्यामुळे घरात राजाराणीचेच राज्य . स्वत:च्या मनासारखा संसार लावतांना लहानपणीचा
भातुकलीचा संसार आठविला व मग प्रत्यक्ष संसार लावतांना आलेल्या अडचणी आठवल्या . एक
एक करत पूर्ण संसार सुख वस्तूंनी भरला गेला.तो संसार लावतांना दोघांनी एकमेकांना दिलेली साथ, कधी कधी केलेली काटकसर, कधी उगीचच धरलेले स्त्री हट्ट ( आता ते हट्ट उगीचच धरले वाटतात पण तेह्वांचे जिद्दीचे हट्टीपणाचे दिवस) मग त्या हट्टापायी झालेला रुसवा, फुगवा कधी कधी वाद विवाद ,आणि मग रडणे.पण त्यावेळी सुखी संसाराची भटजींनी लग्नमंडपात सांगितलेली व रुखवतात तयार करून मांडलेली सप्तपदितली संयम, सहनशीलता, तडजोड वगैरे पावले कधी कधी माझ्याकडून तर कधी यांच्याकडून अपोआपच अनुसरली गेलेली पावले आठविली ..
अशी सप्तपदीची वाटचाल करतांना संसार वेलीवर पहिले पुष्प उमलले .मग त्या प्रथम पुष्पास गोंजारण्यात, त्याचे कोडकौतुक लाड करण्यात दोघांचे जीवन कसे रसमय झाले .त्याचे लाड करण्यात व त्याच बरोबर त्यास उत्तम संस्कार देण्यात दोन्ही कडील आजी आजोबा मागे पडत नव्हते.कारण सर्वांचे ते मन रिझवणारे पहिले वहिले खेळणे होते. असे असतांना सहजीवनाच्या वेलीवर दुसरे पुष्प पण उमलले . मग त्या दोघांकडे लक्ष देण्यात नोकरी करून,घर सांभाळून,आले गेल्याचे पहाण्यात, पाहुणचार संभाळण्यात तर कधी सामाजिक तसेच कौटुंबिक प्रसंगात भाग घेवून संसार करतांना परस्परांकडे जाणता अजाणता लक्ष देवू न शकल्याने (हो सध्याचे धावपळीचे जीवन ना!) एकमेकांत झालेली शाब्दिक वाद चर्चा मग एकमेकांचे चढते आवाज, व शेवटी कधी कधी, अंह कधी कधी कसले ? नेहमी " पदरी पडलं पवित्र झालं " असे म्हणत देखील पूर्ण केलेली भांडणे आठविली . हो खरच मला नाही वाटत भांड्याला भांड न लागता संसार होत असेल कारण कोठेही दोन व्यक्ति एकत्र आल्या की विचारांचे मतभेद होणारच तेह्वा कधी कधी "अगदी कंटाळले या संसाराला ! कुठून लग्न केले व या व्यापात गुरफुटले. त्यापेक्षा आधीचे आयुष्य किती स्वच्छंदाचे होते ! कोणासहि मला काय त्रास पडतोय त्याकडे लक्ष देण्यास वेळच नाही. साधे दोन गोड कौतुकाचे शब्द जाऊ द्या त्याची तर अपेक्षाच करु नये.फक्त नुसते दोष दाखविणे."असे म्हणत अश्रू काढीत झोपी गेलेल्या रात्री आठविल्या .पण सकाळी पहावे तर यांनी स्वत:नेच उठून चहाचे आधण ठेवून दिलेली प्रेमाची हांक ऐकली की रात्रीचे सर्व विसरून पुन्हा पूर्ववत सकाळच्या कामात व्यस्त होऊन दोघांनी ऑफिसला जातांना हसतमुखाने निरोप घेतलेली ती सकाळ पण डोळ्या समोरून सरली . .
संसारात स्त्रिला तिची मुलगी काही वर्षा नंतर मैत्रिणी समान वाटते .स्त्री स्वत:चे बालपण त्या मुलीच्या बालपणात पहात असते .तिचे लाड ,तिची हौसमौज करण्यात तिला तयार करण्यात नटविण्यात सजविण्यात स्त्री स्वत:ला पहात असते. आपली उरली सुरलेली हौस तिची हौस पुरविण्यात स्त्रिला समाधान लाभत असते .व शेवटी कन्यादानाचे पुण्य मिळते ते वेगळेच . तेह्वा मला पण कन्या रत्न लाभले असल्याने ते पुण्य पण माझ्या पदरी आहे अशा विचाराने मी हर्षित झाले.
आता हा संसार पूर्ण वटलेला आहे . पण खर पाहिले तर आता नव्या नात्याची पदवी मिळण्याचे दिवस जवळ आले आहेत . कालची बागडणारी मुले आज सुजाण झाली आहेत . त्यांना देखिल त्यांचे विचार ,मत प्राप्त झाली आहेत. तेह्वा त्यांचे पण विचार मत ऐकून पुढे तर
येणा-या गृहलक्ष्मिला घर सोपवून त्यांचे कौतुक करण्यात मोठा मनाची तयारी करायला हवी. आत्तापर्यत संसारात गुरफटल्याने समाज ,समाजसंस्था ,समाजकार्य यांच्याशी समरस व्हावयाला जमले नाही .तेह्वा आता त्यात समरस व्हावयाला हवे .तसेच कधी आर्थिक तर कधी कौटुंबिक जवाबदारीने जग निहाळता आले नाही तर आता पर्यटन करावयास हवीत .
असे विचार डोक्यात असतांना विचाराच्या तंद्रीत असता दरवाज्यावर बेल दोनदा-तीनदा दाबल्याचा आवाज कानीं आला . व तंद्रीतून जागे झाले धावत जाऊन दार उघडले. दारात "हे " उभे होते . हे म्हणाले ,"अग करतेयस तरी काय ? मी कधीचा बेल वाजवितोय झोपलेली तर दिसत नाहीस. मग काय दिवा स्वप्न पहात होतीस कि काय? मी हंसत म्हटले मी ना आपल्या झालेल्या सहजीवनाचा आढावा घेत होते.इतक्यात ध्वनिमुद्रिकेच्या कार्यक्रमात आता शेवटचे गाणे ऐका म्हणून ध्वनिमुद्रिका वाजू लागली
देवा दया तुझी ही की शुद्ध दैव लीला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला .
खरच मला वाटले की माझ्याच संसाराला. .

गुलमोहर: