आश्रम शाळेला भेट

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2011 - 15:14

मागिल उपक्रम
मायबोलीच्या संपर्कातून समाजसेवा - http://www.maayboli.com/node/25336
मतीमंद मुलांच्या शाळेला भेट - http://www.maayboli.com/node/30846

शनीवार दिनांक २६/११/२०११ रोजी इनरव्हिल क्लब ऑफ उरण आणि रोटरी क्लब ऑफ उरण यांनी संयुक्तपणे उरण चिरनेर गावातील आदीवासी मुलांच्या आश्रम शाळेला भेट दिली. काही दिवसांपुर्वीच माझ्या मिस्टरांनी रोटरी क्लब ऑफ उरणचे उपाध्यक्ष ह्या नात्याने चिरनेर ह्या गावातील आश्रम शाळेत जाऊन तेथील शाळेच्या गरजांबद्दल चौकशी केली. तेंव्हा तेथील शिक्षकांनी मुलांना खेळाच्या सामानाची आवश्यकता असल्याचे सांगितले. मिस्टरांनी हे प्रपोजल आमच्या इनरव्हिल व रोटरी क्लबच्या समोर मांडाताच सर्वांनी एकमताने ह्या शाळेला खेळाचे सामान देण्याचे निश्चीत केले. सामानाबरोबरच खाऊ, पेन आपआपल्यापरीने स्वइच्छेने देण्याचे इनरव्हिल क्लबच्या सदस्यांनी ठरवले. मतीमंद मुलांच्या शाळेला भेट दिल्यावर केवळ दोन दिवसांतच आम्ही आश्रंम शाळेला भेट दिली.

ही आश्रम शाळा १२ खोल्यांची आहे. जवळ जवळ ३०० विविध वयाची मुले ह्या आश्रम शाळेचा आसरा घेतात. सदर शाळा ही निवासीत शाळा असून आजूबाजूच्या परीसरातील गरीब मुले व बहुसंख्य आदीवासी मुले ह्या शाळेत शिक्षण घेतात व तिथेच राहतात. फक्त दिवाळी, गणपती सारख्या मोठ्या सणांना ही मुले आपल्या घरी जातात. शिक्षकांनी माहीती दिली की ह्या शाळेत ४-५ शिक्षक आहेत २ शिक्षीका आहेत. त्यापैकी आलटून पालटून दोन शिक्षक व एक शिक्षिका यांची आश्रम शाळेत वेळापत्रकानुसार रात्रपाळी ठरलेली असते.

ह्या शाळेला ग्रँट नाही. त्यासाठी ३० च्या आत एका वर्गात मुले हवी असतात पण ही संस्था येणार्‍या प्रत्येक मुलाला आसरा देते त्यामुळे दुप्पटीने मुलांची संख्या वाढते व आवश्यक तेवढी मदत सरकारतर्फे शाळेला मिळत नाही. मुलांकडून एक रुपयाही फि आकारली जात नाही. मुलांना सकाळी नाश्ता, दुपारचे साधे जेवण, संध्याकाळी हलका आहार व रात्रीचे जेवण असे नियमीत मिळते. हे सुरळीत चालण्यासाठी काही संस्था, व्यक्तींकडून मदत येते. पण ती तेवढ्या पुरतीच असते. शिक्षकांचा पगार शासनाकडून येतो.

ही झाली शाळेची माहीती. पण आम्ही जेंव्हा तिथे पाऊल टाकले तेंव्हा सगळेच सुन्न झालो व आपण ह्या जागी आलो ह्याची धन्यताही वाटली. आम्ही गेलो तेंव्हा तेथील शिक्षक आमचे स्वागत करायला आले. प्रथम त्यांनी आम्हाला त्यांच्या एका छोट्या ऑफिसमध्ये नेऊन एकमेकांची ओळख करून घेतली. एकीकडे दुसरे शिक्षक मुलांना पटांगणात आणत होते. ती मुले बाहेर येताना पाहून खरच आम्हाला भरून आले. बिचारी सगळी मुले आई-वडीलांपासून दूर राहून शिस्तीत ह्या शाळेत राहतात. मुलांमधली शिस्त त्यांच्या वागणूकीत दिसत होती. स्वछता व निटनेटकेपणाही जाणवत होता. त्याचे श्रेय तेथील शिक्षकांनाच.

सगळी मुले एका रांगेत उभी राहीली. काही मुलांच्या अंगावर गणवेश होता. मुलांना बसायला सांगितल्यावरही मुले ओळीत एकमेकांशी गप्पा न मारता बसली होती. त्यावेळी त्यांच्याकडे पाहताना एकच जाण्वत होते. की ह्या मुलांमध्ये मस्ती, मौज मजा नाही. टिव्ही, कॉम्पुटर, आधुनीक खेळणी, मॉल सारखी माध्यमे ह्यांच्यापासून १००० कोस लांब आहेत. त्यांच्या चेहर्‍यावर केवळ शांतता होती. दगड मातीच्या जागेवरच ही मुले बसली होती. त्यांना पांघरण्यासाठी सतरंजी, गोणपाटांचीही सोय शाळेत नाही. ते पाहून पुढच्या वेळी एक ताडपत्री आणून देण्याचे आम्ही ठरवले.

आपल्या मुलांच्या शाळेतील मुलांना कार्यक्रमाच्यावेळी शिक्षकांना खुपवेळा गप्प बसा म्हणून बजावावे लागते पण पुर्ण कार्यक्रमात एकाही मुलाने हु की चु केले नाही. इनरव्हिल व रोटरीच्या अध्यक्षांनी शिक्षकांचे कौतूक करून मुलांना उपदेशपर भाषण केले व सर्व इनरव्हील क्लब ऑफ उरण व रोटरी क्लब ऑफ उरणच्या सदस्यांनी खाऊ, पेन व खेळाचे सामान वाटले. कोणीही त्या सामानाची उलाढाल केली नाही की एकाही मुलाने तिथे बिस्कीट चा पुडा व चॉकलेटचे कागद फाडले नाही.

From Aashram Shala

शिक्षक चॉकले वाटत असताना

माझी मुलगी पेन वाटत होती.

सगळे वाटून झाल्यावर शिक्षकांनी आमचे आभार मानून व आम्ही आम्हाला अशी संधी दिली म्हणून त्यांचे आभार मानून कार्यक्रम संपविला. त्यानंतर आम्ही मुलांच्या राहण्याच्या खोलीत गेलो अणि पुन्हा एकदा अवाक झालो.

कुठेही पसारा न करता मुलांची पुस्तके, अंथरूणे मुलांनी व्यवस्थीत टापटीप ठेवलेली होती.

हेच त्यांचे वर्ग असल्याने भिंतीवर तक्तेही होते.

कार्यक्रम संपल्यावर मुले आपल्या वर्गाबाहेर एकत्र खाऊ खाताना दिसली.

पाच वाजता मुले अचानक समोरच्या शेतात धावली. सुरुवातीला आम्हाला कळाले नाही. नंतर पुन्हा एक दृदयस्पर्शी दृश्य दिसले. ती लहान लहान मुल स्वतःचे स्वतःच धुतलेले कपडे गोळा करून घड्या घालत होते.

कार्यक्रम संपल्यावर शिक्षक त्यांच्या अडचणी व त्यांना ही शाळा चालवताना मुलांबाबत किती सावधगीरी बाळगवी लागते हे सांगत होते. काही मुले पळून जाण्याच्या मार्गावरही असतात. काही मुले साप, जनावर दिसल्यावर त्यांना पकडायला धावतात. ह्या मुलांमध्ये आदीवसी निर्भिडता रक्तातच भिनलेली असल्याने ही मुले कशालाच घाबरत नाहीत. त्यांच्यावर तिक्षण नजर ठेवावी लागते. आपल्या मुलांना दोन वेळचे जेवण मिळावे ह्या उद्धेशानेही काही आदीवासी कुटूंब आपल्या मुलांना इथे आणुन ठेवतात. पण ही शाळा सगळ्याच निराधार मुलांना आधार देऊन शिक्षण देण्याचे कार्य करते.

मी माझ्या मुलीलाही बरोबर नेले होते त्यामुळे तिलाही त्यांच्या परीस्थितीचा अनुभव आला. ह्यापुढे ती काही फुकट घालवणार नाही अशी ग्वाही मला तिच्याकडून सहज मिळाली. जर तुम्हाला जमले तर अशा कार्यक्रमांना अवश्य आपल्या मुलांना सोबत न्या त्यामुळे त्यांना बाहेरील जगाचे रुप, सत्य परीस्थिती पाहण्याची संधी मिळते व त्यांच्या मनावर समाजाबाबत जागरूकताही निर्माण होण्यास मदत होते.

ह्यापुढे आम्ही काही मेडीकल कॅम्प, जुन्या कपड्यांची मदत, गोष्टीच्या पुस्तकांची मदत करण्याचे कबुल केले आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय आहे. मला संपर्क करा ठकुबाई-सुपरफास्ट.

मागच्याच महिन्यात जाऊन आलो आश्रम शाळेत. खाऊ व खेळाचे सामान देऊन आलो. आता त्यांना बसायला सतरंजी देणार आहोत. बिचारी मुले अशीच मातीत बसतात काही कार्यक्रम असला की.

Pages