जिन्याची विहिर (फोटोसकट)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 November, 2011 - 06:09

नाती म्हटलं की डोळ्यासमोर येतात रक्ताची, मैत्रीची नाती. पण आपल्या आसपासच्या ज्या वास्तू असतात त्यांच्यासोबतही आपले जिव्हाळ्याचे, भावनिक नाते जोडले गेलेले असते. अशीच एक माझ्या लहानपणापासूनची माझ्या माहेरची वास्तू म्हणजे जिन्याची विहीर.


बालपणी आजी, वडील, आई, माझा मोठा भाऊ व मी असे आमचे कुटुंब. आई प्रार्थमिक शिक्षिका, (आता रिटायर्ड) वडील कुर्ल्याला प्रिमियर कंपनीत होते (आता व्हॉलेंटरी रिटायर्ड). वडिलांना ४ भाऊ व ५ बहिणी पण आत्या लग्न होऊन गेलेल्या व सगळे काका नोकरी निमित्ताने मुंबईमध्ये स्थायिक झालेले. पण केवळ वाडीची देखभाल व्हावी म्हणून वडील रोज कुर्ला ते उरण जाऊन येऊन करत. दिवसा वाडी, शेती सांभाळायची
म्हणून त्यांनी कायमची नाइट शिफ्ट स्वीकारली. ते रोज संध्याकाळी ७ ला घर सोडून मचव्याने मुंबईला जात आणि नाइट शिफ्ट करून सकाळी १० पर्यंत घरी येत. ते दुपारी १ ते ३ झोप काढत व बाकीची झोप प्रवासात घेत. ह्या वाडीशी त्यातील वास्तुंशी जुळलेल्या जिव्हाळ्यामुळे त्यांना नाईटशिफ्टचा थकावा कधी जाणवलेला वाटलाच नाही.

वडिलांनी ह्या वाडीकडे कधी व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलेच नाही. भात पिकायचा तो पूर्णं वर्षभर पावण्या रावण्यांसकट सगळ्यांना पुरायचा. फळफळावळ वडील प्रत्येक सीझनला सगळ्या त्यांच्या भावंडांना मुंबईला स्वतः वाटायला जायचे. मळ्यातून जे उत्पन्न निघायचे ते वाडीचे डागडूगीकरण, गड्याच्या पगार भागवण्यापुरते असायचे.

आमची वाडी पाच एकराची होती. वाडीत शेती होती, दिवाळीत शेती कापली की हिवाळ्यात वडील गड्याच्या साहाय्याने भाज्यांचा मळा लावायचे. वाडीत फळफळावळही भरपूर होती. आंबे, फणस, चिकू, पेरू, नारळ, ताडगोळे, जांभळ, बोरं, करवंद, चिंचा, सीझनमध्ये अमाप यायच्या. माझे लहानपण जांभळा, बोरांच्या सावलीत जाऊन रानमेवा खाण्यात गेला आहे. ह्या सगळ्या झाडांना, मळ्याला, शेतीला ताजेतवाने ठेवणारी
आमच्या वाडीतील वास्तू म्हणजे आमची अनोखी जिन्याची विहीर.

वाडी माझ्या आजोबांनी घेतली होती. जेव्हा वाडी घेतली तेव्हा आधीपासूनच त्यात एक विहीर होती. विहीर १०० वर्षापूर्वीची असल्याचा दावा आहे. ह्या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे विहिरीत आत उतरण्यासाठी विहीरीच्या बाहेरून दोन खास जिने आहेत. जिन्याच्या सुरुवातीच्या कठड्यांना वळणदार नक्षी आहे.

जिने उतरले की एक त्यात एक आपण उभे राहू शकतो असा हौद आहे. त्याला कमान आहे. त्या कमानीखालच्या कट्यावर बसले की पाण्यात हात घालता येतात. विहिरीत उतरायचे असले की ह्या हौदातूनच उतरायचे. ह्या हौदाला व जिन्याला लागून दोन खांब बसवलेले आहेत. त्यावर बसता, उभे राहता येते. शिवाय हौदाचा कट्टा आहे. विहिरीच्या कडेलाच पूर्वी पाणी ओढण्याची मोट होती. ही मी कधी पाहिली नाही पण
थोरामोठ्यांच्या गप्पांत त्याचा नेहमी उल्लेख येतो. बैल जुंपून पूर्वी शेतीला मोटीचे पाणी दिले जाई.

कालांतराने सरकारची शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या पंपाची योजना आली. आजोबांनी तेव्हा तिथे पंप बसविला. पंपाला एक खोली केली. रहाटाच्या जागी एक थाळा बांधला. पंपाचे तोंड थेट पाणी साठवायच्या थाळ्यात.

थाळ्याला दोन भोगदे आहेत. त्या भोगद्यातून शेतीच्या दोन्ही दिशांना पाटाद्वारे पाणी जाते. पंपाला इतका फोर्स आहे की आपण त्या पाण्याखाली हात धरला की बॅलंस न राहता हात प्रेशरने खाली जातो. पाच एकरच्या जमिनीला ही विहीर पंपाच्या साहाय्याने हिरवीगार ठेवत होती. पावसाळ्यात विहीर पूर्ण भरायची कधी कधी हाताने पाणी काढता यायचे. जिन्याची शेवटून तिसरी पायरी शिल्लक राहील इतके पाणी
भरायचे. हौद तर दिसायचाच नाही.

विहिरीच्या थाळ्यात व आतील हौदात माझ बालपण गेल. ह्या विहिरीने माझ्याशी मैत्रीच नात जोडल होत. आमचे घर विहिरीपासून १. ५ किलोमीटरवर होते. तेव्हा घरात नळ नव्हता. शाळेत जायच्या आधीच आई व आजी दोघी विहिरीवरून पाणी भरून आणायच्या. डोक्यावर त्या हंड्यांच्या राशी आणि हातात एक कळशी असे त्या दोघींच गौळण रूप मला खुप आवडायच. मलाही मग अनुकरण करावस वाटायच. मी आईकडे पाणी भरण्यासाठी
हट्ट करायचे तेव्हा मग आई माझ्या हातात एक तांब्या द्यायची. तो तांब्या घेऊन मी आईसोबत पाणी आणायला जायचे. भांडी व कपडे आई विहिरीवरच्या थाळ्यातच धुवायची. भाऊ लहान होता तेव्हा तोही जायचा आईला पाणी काढून देण्यासाठी. कारण पंप सारखा लावता यायचा नाही. तो शिंपण्यासाठीच वापरात यायचा. मीही मग लुडबूड करायला जायचे थाळ्यात मज्जा करायला. काही दिवसांतच वडिलांनी विहिरीच्या बाजूला
एक पाण्याची टाकी बसवली व त्या टाकीचे पाणी पाईपलाईनद्वारे आमच्या घरातील नळात येऊ लागले. तेव्हापासून फक्त जेव्हा लाइट नसेल तेव्हाच आम्हाला पाणी भरण्यासाठी विहिरीवर जावे लागे. पण त्यामुळे विहिरीची संगत काही कमी नाही झाली. उलट जसजसे माझे वय वाढत गेले तसतशी ती वाढतच गेली.

उन्हाळ्यात शाळेतून आले की मी वडीलांच्या बरोबर शेतावर जात. मग वडिलांनी पंप चालू केला, त्याचे शिंपणे उरकत आले की मी थाळ्याच्या दोन्ही बाजूचे भोगदे दगडे, मोठी पाने लावून बंद करायचे. स्विमिंग पुल प्रमाणे थाळ्यात पाणी साचवून मनसोक्त डुंबायचे. गार गार पाण्यात सुरुवातीला थंडी लागायची पण नंतर सवय होऊन निघू नये असेच वाटायचे. हिवाळ्यात संध्याकाळी ह्याच थाळ्यात मग आई
कोथिंबीर, मुळा, मेथी ह्या लागवड केलेल्या भाज्यांची मुळे धुवायची. ती धुवायलाही मी मध्ये मध्ये लुडबुडायचे. आमच्या विहिरीत मासेपण होते. मधून मधून भाऊ आणि त्याचे मित्र गळ लावून मासेही पकडत. मलाही हा गळ ध्ररायला मज्जा वाटे. पण अजून एकही त्या विहिरीतील मासा माझ्या गळाला लागला नाही.

शाळेत जायला लागल्यावर माझी खेळाची अभ्यासाची आवडती जागा म्हणजे पायऱ्या उतरून गेल्यावर असणारा हौद. हौदात गेल्यावर गार गार वाटायच. उन्हाची झळ तिथे पोहोचत नाही. ह्या हौदात मी अभ्यास करायचे, खेळायचे. कविता, गाणी म्हणायचे. कधी कधी तर रुसून पण त्या हौदात जाऊन बसायचे. मी तशी पाहिल्यापासूनच धाडसी होते. भूत वगैरे मी कधी मानलेच नाही. त्यामुळे बिनधास्त एकटी बसायचे. तसेही वडील व
गडी वाडीत असायचे. ते मधून मधून मला बघून जायचे.

विहिरीच्या जवळच एक साखरबाठी ह्या जातीचा आंबा होता. हा आंबा सगळ्यात वेगळा. आकाराने लहान, ह्याचा रंग हिरवाच असायचा पिकला की फक्त नरम व्हायचा. आतून पांढराच. पिवळा रंग नव्हताच. पण चव मात्र साखरेसारखी गोड म्हणून तो साखरबाठी आंबा. ह्या आंब्याचे बरेचशे आंबे ह्या हौदात, जिन्यावर व विहिरीत पडायचे. हे आंबे गोळा करण्या साठी मी सकाळी जायचे व हौदातून, पायरीतून गोळा करायचे. विहिरीत
पडलेले आंबे लामण्याने मोठी माणसे काढायची. एखादा आंबा राहिलाच तर त्याचा वास हौदातील पाण्यात मिसळायचा. ह्या विहिरीने त्या आंब्याची मधुरात चाखली आहे. कालांतराने ते आंब्याचे झाड वार्धक्याने गेले. पण त्याच्या आठवणी अजून जिभेवर आहेत. विहिरीच्या पाण्यात मिसळलेल्या आहेत.

आमच्या वाडीत ताडाची भरपूर झाडे होती. ताडाच्या पेंडी उतरवणारा माणूस यायचा. तोच विकायला न्यायचा. पण एका वेळी एवढे ताडगोळे काढून विकणे शक्य नसायचे मग ते ताजे राहावेत यासाठी त्या पेंडी वडील विहिरीत टाकून ठेवायचे. ते टाकताना बघायलाही मला खुप गंमत वाटायची. त्या टाकल्या की अस वाटायच की आता बुडणार. पण त्या चक्क तरंगायच्या.

दिवाळी, मे महिन्याची सुट्टी म्हणजे आमच्याकडे काका-आत्यांच्या कुटुंबाची जत्राच. माझी २०-२५ चुलत भावंडे एकत्र यायची. मग काय दिवसा मुक्कामपोस्ट फक्त विहीर आणि वाडी. माझ्या वडिलांनी ह्याच विहिरीत माझ्या सर्व चुलत भावंडांना, भावाला पोहायला शिकवले. मी सगळ्या भावंडात सर्वात लहान. त्यामुळे मी बघत बसायचे. वडील त्या भावंडांना दोरी बांधायचे आणि विहिरीत उडी मारायला लावायचे.
एखादा घाबरला, उडी मारली नाही तर सरळ त्याला आत ढकलायचे. हे दृश्य मात्र मला खुप भीतिदायक वाटायचे. माझ्या भावाला वडिलांनी तो अवघा ४ वर्षांचा असतानाच पोहायला शिकवले. मलाही त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला. पण एकदा अशीच सगळी भावंडे विहिरीत उतरली होती. मला वडिलांनी विहिरीत टायर वर बसवून इतर भावंडांच्या हाती सुपूर्द करून वर दुसऱ्या एका भावाला दोरीने बांधून टाकण्यासाठी
गेले. वडिलांनी त्या भावाला विहिरीत ढकलले त्याच्या उडीने पाणी घुसळून माझा टायर उलटा झाला. माझे डोके खाली व पाय वरती झाले. तेवढ्यात माझ्या आत्तेबहिणीने पाहिले आणि माझे पाय घट्ट पकडून ठेवले व वडिलांना हाक मारली. वडिलांनी लगेच विहिरीत उडी मारली व मला बाहेर काढले. त्या दिवसापासून मी कधीच विहिरीत उतरले नाही. पण आतील हौदावर बसून विहिरीत पाय सोडून बसायचे.

पुढे मी मोठी झाल्यावर वडिलांना मदत करायला मी सुद्धा शिंपण करायचे. पाटात येणारे पाणी सगळ्या शेतात, झाडांना एक एक पाट उघडून फिरवायचे. अहाहा काय धन्यता वाटायची झाडांना पाणी पाजून त्यांना जीवनदान देण्यात! गावातील लोक म्हणायचे की ह्या विहिरीला मोठे झरे आहेत. पण ते कधी मला लहानपणी दिसले नाहीत. कारण दिसायची वेळच त्या विहिरीने कधी आणले नाही. सदा त्या हौदापर्यंत भरलेली
असायची. पाच एकराच्या वाडीला पाणी शिंपूनही तिने स्वतः कधी तळ गाठला नाही.

अशी ही आमची विहीर. आम्हाला सतत साथ देणारी हिने सदैव आमच्या वाडीला आपल्या जीवनाचा पुरवठा केला आहे. भाज्या पिकवल्या आहेत, शेती पिकवली आहे, फळबागा फुलवल्या आहेत. माणसे-जनावरांची तहान भागवली आहे. आम्हाला अंगा खांद्यावर खेळवले आहे.

कालांतराने माझ्या भावाचे लग्न झाले. आजीचे वय झाल्याने आजीने तिच्या मुला-मुलींमध्ये जागेचे हिस्से करण्यास सांगितले. दोन काकांचे कुटुंब रिटायरमेंटनंतर वेगवेगळी घरे बांधून वाडीत राहू लागले. वाडीत इतर लोकांची वर्दळ चालू झाली. प्रिमियरच्या कंपल्सरी व्हॉलेंटरी रिटायरमेंटमध्ये वडिलांनी सेवानिवृत्ती स्वीकारली. आई ही काही वर्षांत रिटायर्ड झाली. वाडीच्या हिश्शामुळे,
मजूर न परवडण्यामुळे शेती करणे वडिलांनी बंद केले. काही वर्षांत वार्धक्याने आजी वारली. माझेही काही वर्षांत लग्न झाले.

विहीर एका काकांच्या हिश्शांत गेली होती पण ती कॉमन ठेवायची असा निर्णय घेण्यात आला होता. ही विहीर ज्या काकांच्या हिश्शांत गेली होती ते काकाही काही वर्षांनी वारले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा त्या हिश्शाची देखभाल करू लागला. पण काही आर्थिक परिस्थिती मुळे पुढे माझ्या वडिलांनी व त्या भावाने जागेचा काही भाग विकला. नेमकी काकांच्या विकलेल्या हिस्यातील त्या भागात ती
विहीर गेली. विकत घेणारा बिल्डर आहे. त्याला विहीर कॉमन असल्याचे सांगितले. त्याने तेव्हा कबूल केले. पण कागदपत्रांत तसा उल्लेख त्याने नाही केला. व्यवहारातील पायवाटेच्या जागेवरून झालेल्या वादाचा राग त्याने विहिरीवर काढला. त्याने लगेच विहिरी भोवती तारेचे कंपाउंड लावून घेतले. वडिलांना हे कळताच वडील त्याला जाब विचारण्यासाठी गेले. पण त्याने वेडी वाकडी उत्तरे दिली व
जास्त वाद घातलात तर विहीरच तोडून टाकेन ही धमकी दिली. ही भाषा वडिलांना रुचली नाही. घरातील सगळेच विहिरीसाठी हळहळले. मी माहेरी गेल्यावर विहिरीजवळ जाणेच बंद केले. पण ह्या धक्क्याने तेव्हा वडील आजारी पडले. त्यांचे प्रेशर वाढले. त्यांना आपल्यातली एक व्यक्ती आपण गमावतोय ह्याची जाणीव होऊ लागली. आधी आई गेली आता विहीर चालली ह्या विचारांत त्यांची झोप उडाली. घरात सगळ्यांनाच
विहिरी बद्दलची खंत, हळहळ वाटत होती. मलाही माझे ह्या विहीरीसोबत गेलेले बालपण आठवून खंत वाटते. पण वडिलांना अजून दु:ख होऊ नये म्हणून आम्ही ती व्यक्त करत नव्हतो.

केवळ पैशांमध्ये ज्यांच्या भावना गुंतलेल्या असतात त्यांना अशा वस्तूंच्या मागे असलेल्या भावनांची काय कदर असणार? कसे बसे माझ्या मिस्टरांनी, भावाने आणि मी त्यांना समजावून त्या विहिरीचा विचार सोडण्यास प्रवृत्त केले. आपण सगळे मिळून त्याच्यावर दावा दाखल करू असे त्यांच्या भावंडांनी सांत्वन केले. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये ही म्हण पण आम्हाला लागू व्हायच्या आधीच
ती आम्ही लागू केली. माझे मिस्टर स्वतः वकील असल्याने त्यांना कायद्याच्या सगळे खाच खळगे माहीत आहेत. चुलत भावाने केलेल्या कागदपत्रांचे व्यवहार कोर्टाद्बारे विहीर मिळून द्यायला बाधा आणणार व त्यात वडिलांचे उतारवयातील दिवस कोर्ट, दु:ख, भांडणात जाणार म्हणून आम्ही विहिरीचा मुद्दा वडिलांना दुर्लक्षित करण्यासाठी प्रवृत्त केले. पण त्यांच्या मनात ती सल अजून खुपसतेय.

दोन पार्टींच्या चर्चेतूय हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे. तसे न झाल्यास कोर्टाद्वारे न्याय मागण्याचीही तयारी आम्ही ठेवली आहे. पण देव करो आमची ही प्रिय वास्तू आम्हाला प्रेमाने आमच्या पदरी पडो.

(मायबोलीच्या दिवाळी अंकाच्या लिखाणाच्या निमित्ताने माझ्या माहेरच्या विहीरीवरचे हे लिखाण लिहीले गेले :स्मित:)

गुलमोहर: 

प्रिंसेस, अगदी अगदी. मी तोच विचार करत होते की माझ्याघरी अशी विहिर असती तर मी एवढा मोठा आणि छान लेख लिहू शकले असते का? एक परिच्छेदही लिहू शकले नसते, मला हा विषयच सुचला नसता.

देव करो आमची ही प्रिय वास्तू आम्हाला प्रेमाने आमच्या पदरी पडो.>>> देव तुमच्या भावना समजेल नक्कीच विश्वास ठेवा Happy
लेख व आठवणी छान

बेफिकिर, कौशी, वंदना, वर्शू, राज, रुनी, श्री, नुतन, वेताल, अश्विनी, दक्षिणा, मानुषी, प्रिन्सेस, मोनालिप धन्यवाद. तुमचे सगळ्यांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा पाठीशी असल्याने नक्कीच मिळणार आमची विहीर आम्हाला.

इब्बीस, पुर्वी तिथे रहात होते. कालांतराने ते मोडकळीस आल्यने काढले. पंपाचे पाणी आता त्यात साठवुन पाटाद्वारे झाडांना दिले जात होते.

रैना थाळा म्हणजे डबक्यासारखी बांधलेली पाणी साठवायची जागा.

जागुतै - आजच्या काळात माणुसकी कमी होत चाललीय तीथे तुमचं या विहीरीवरील प्रेम हे अगदी मनाला र्स्पशुन गेलय, ही वास्तु देव प्रेमाने तुमच्याच पदरी टाको अशी मनापासुन प्रार्थना Happy

जागु
कायच्या काय छान लिहिलयस.
आतापर्यंत माशांच्या रेसिपीज वाचुन माझी समजुत होती की तु कुठेतरी समुद्राशेजारी रहातेस आणि
मासेमारी वगैरे करत असशील.

छान, नेहमीप्रमाणेच !
'ऐतिहासिक वास्तु' म्हणून दाखला नाही मिळवता येणार ? पहा आधी घरच्याच वकीलाना विचारून !
<< पण देव करो आमची ही प्रिय वास्तू आम्हाला प्रेमाने आमच्या पदरी पडो. >> होय, म्हाराजा !

आस, इनमिनतिन, चि.न्गी, सुमेनिश धन्यवाद.

निलिमा :स्मितः

भाऊ त्यासाठी ठोस पुरावा नाही ना. तरीही विचारून पाहते घरच्या वकीलाना :स्मितः धन्स.

अप्रतिम लेख ! जागु, तुझ्या वास्तवदर्शी शब्दचित्रणामुळे तुमची ती वाडी, विहीर, थाळ, हौद, तुझं माहेर........सारं काही डोळ्यांसमोर जसंच्या तसं उभं राहीलं ! Happy

तुमची प्रिय विहीर तुम्हांला लवकरात लवकर परत मिळण्यासाठी खुप खुप शुभेच्छा ! Happy

आवडला लेख आणि तुझ्या आठवणी जागू! अशी विहीर खरोखरी जिता जागता ''ठेवा'' आहे. ती अबाधित राहो आणि तुम्हाला तिचा आनंद मिळो ही सदिच्छा.

मी कधीच असली विहीर बघितली नाहीये !!
प्रचि टाकल्याबद्दल धन्यवाद!!
आणि एखाद्या गोष्टी बद्दल आपल्या मनात जर शुद्ध भावना असली ना तर सगळं चांगलंच होतं !!
त्यामुळे मी माझी भावना तुमच्यात add करतो, तेवढाच हातभार लावू शकतो सध्या तरी !!

आणि हि झाली एका विहिरीची गोष्ट पण आपल्या आसपास अश्या कितीतरी गोष्टी घडत असतात !
मागच्या वर्षी मी कोकणातून परत येत होतो, तेव्हा सहज मनात विचार आला कि पुढच्या वेळी मी जेव्हा येईन तेव्हा हे सुंदर हिरवेगार डोंगर असेच असतील???
सांगू नाही शकत!! पूर्वी रेडी हे एक सुंदर गाव होतं स्वच्छ समुद्र किनारा, सुंदर गणपतीचं देऊळ, आणि आता boxite साठी खाणकाम करता करता ते सौंदर्य कुठच्या कुठे लुप्त झालं!
तुमचा लेख वाचता वाचता मनात रेडीची आठवण आली म्हणून लिहून घेतलं....

असल्या जुन्या प्रेमळ वास्तू असल्या की भाउबंदकी असतेच... मला वाचताना तेच राहून राहून वाटत होतं, पण शेवटी हा उल्लेख आलाच ! वास्तू जितकी जुनी आणि प्रेमळ, तितके हे प्रमाण जास्त असते.

लिंबुदा धन्यवाद.

आशिगो अगदी कोकणात फिरताना माझ्या मनात हेच विचार येत होते की हे डोंगर, ही हिरवळ अशीच राहो. मी दोन तिन वेळा बोलूनही दाखवले. आमचे उरणही एके काळी कोकणासारखे हिरवेगार होते. पण औद्योगिक क्रांती झाली आणि आता सिमेंटची जंगल वाढायला लागली आहेत. थोड्याप्रमाणात अजून निसर्ग आहे मात्र आता तो तरी टिकून राहीला पाहीजे.

जागोमोहन Happy

मस्त लिहिलंय जागु,
फोटो पहाय्च्या आधी मला वाटलं राजस्थान मधल्या "बावडी" असतील.शेती-वाडी...काय पण मस्त बालपण गेलंय.आवडलं..

अप्रतिम सुरेख! एकदम आवडलं.
मनापासून लिहिले आहे त्यामुळे अत्यंत सहज आणि अकृत्रिम झाले आहे.

जुन्या वास्तूंमधील अशा वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद अत्यावश्यक आहे. आपल्याला ती विहीर पुन्हा लाभो आणि तुमच्या वडिलांचे उतारवय मानसिक समाधानात व्यतीत होवो अशा शुभेछा!

जागू, किति सहजसुंदर लेख लिहिलायस. म्हणूनच तो थेट भिडतो.
त्यामागचि तुझी कळकळ लेख वाचताना ईथपर्यंत पोहोचते.
विहिर नक्की तुम्हालाच मिळेल.

किती हृदयस्पर्शी लिहीलं आहेस..! सुरेख ..
इतकं प्रेम केलं आहेस त्या वास्तूवर, वास्तू पुरुष तथास्तु म्हणेल अन नक्की तुमची वास्तू तुम्हाला परत मिळेल..

Pages