वर्षाविहार २०११ : दवंडी !!

Submitted by ववि_संयोजक on 7 June, 2011 - 04:10

VaVI2011.JPG
"ढिंक चिका..ढिंक चिका...ढिंक चिका ढिंक......"

आधी तर कळेच ना, भर हापिसात एवढ्या जोरात कुठला रेडा, रेडीला आळवतोय ते. समोरच्या क्युबिकलमधली बकरी (हो बकरीच, रेडी म्हणावी इतकी वाढलेली नाहीये अजुन) डोळे विस्फारून माझ्याकडे बघायला लागली. मी चाट पडलो, पटकन पेपर स्टँडला लटकवलेला गॉगल हातात घेतला आणि माझा चेहरा बघीतला. व्यवस्थित होता. (अजून तरी पिताश्रींनी जा तोंड काळे करा असा हुकूम या आज्ञाधारक बालकाला दिलेला नाहीये). मी तिला डोळ्यांनीच खुणा करत विचारलं..

"काय्ये?"

तोपर्यंत हापिसातले इतर थोबडे माझ्याकडे लागले होते.

"तुम्हारा सेलफोन बज रहा है पागल."

तीने आनंदाने सांगितले आणि लक्षात आले की आपला पोपट झालाय. माझाच बोंबल्या बोंबलत होता. सकाळी बहुदा नेटवरून हे गाणं डाऊनलोड करुन घेतलं तेव्हाच चुकुन रिंगिंग टोन म्हणून सेट केलं गेलं होतं आणि त्यानंतर हा पहिलाच फोन असल्याने लक्षातच आलं नव्हतं. मी बावळ्यासारखा तिच्याकडे बघत उभा राहीलो. तीने डोळे मोठे केले तेव्हा भानावर आलो आणि फोन घेतला...

"मगु, .... दिना मनिगे बा. मुख्यवागिरदु केलसा इदे. " (चिरंजीव, .... तारखेला घरी या, महत्त्वाचं काम आहे?) त्या बाजुला आमचे परमपुज्य पिताश्री होते.

"याव दिना ? इल्ला, इल्ला आगुदिल्ला. आगुदिल्ला आगुदिल्ला. रजे शिगुदिल्ला. मत्तोंदु दिना नोडी." ( कुठली तारिख? नाही, नाही शक्य नाही? जमणार नाही? रजा नाही मिळणार? नंतरचा एखादा दिवस ठरवा.) मी ठामपणे नकार कळवला. आतुन मात्र हललो होतो. आता फुले पडणार..........!

मग फोनवर जे काही ऐकावं लागलं त्यापेक्षा ही जमीन दुभंगून मला पोटात घेइल तर बरे असे वाटले. पण हापिस चौथ्या मजल्यावर असल्याने तेही शक्य नव्हते. पण शेवटी पिताश्रींना माझे म्हणणे ऐकावेच लागले. प्रसंगच तसा होता....

माझ्यात " मर्दानो, परतीचे दोर मी केव्हाच कापून टाकले आहेत. आता लढा नाहीतर मरा!" असे पळणार्‍या मावळ्यांना ठणकावून सांगणारा सुर्याजी मालुसरे संचारला होता ना.

********************************************************************

"ढिंक चिका..ढिंक चिका...ढिंक चिका ढिंक......"

यावेळेस मात्र मी लगेचच बोंबल्याचा गळा दाबला. (सायलेंट केला) आणि कॉल उचलला...

"अबे चिकणे, तय्यार हो जा...!" (हा नक्की आमचा येडा असणार, प्रत्येक वेळी मला चिकण्या म्हणून विनाकारण काँप्लेक्स देण्यात याला काय आनंद (आसुरी) मिळतो कुणास ठाऊक?

मी पटदिशी बोलून गेलो की "मी कायम रेडीच असतो." तशी पुढची बकरी परत माझ्याकडे बघायला लागली. तसा मी पटकन सावरून घेतले. म्हणजे मी तयारच असतो बे, पण कशासाठी?"

"बॉस, पुन्हा एकदा बाईक टूर... यावेळी थेट राजस्थान!"

"हल बे, येडा झाला का काय? भर पावसाळ्यात सह्याद्री पालथा घालायचा सोडून , वाळवंटात काय गठुडं पुरलय व्हय? आपण नाय 'रेडी'! म्हणजे जमणार नाही यावेळेस? तुमचं तुम्ही जा....! मला रजा नाही मिळणार आता."

तसा तिकडून क्षणभर फोन नि:शब्द झाला. गेले दोन महीने मीच मागे लागलो होतो राजस्थानला बाईक टुर काढुया म्हणून आणि आता मीच नाही म्हणत होतो.

"अबे, ठिक आहेस ना? का मारला सकाळी-सकाळीच एक चपटी?"

"तसं नाही बे, त्या दिवशी नाही जमणार... ! त्याच्यानंतर महिन्याभराने ठरवा."

मी आधीच मार्जीन घेवून ठेवले कारण सकाळीच पेटलेले पिताश्री कुठली तारिख ठरवताहेत काहीच कल्पना नव्हती, त्यावेळीही नाही म्हणलो असतो. तर पुण्यात येवुन बायकोसमोर काढली असती आमची त्यांनी.

********************************************************************************

च्यायला यांना पण आत्ताच काढायची होती ही टूर?

मंडळी ....... या तारखेला तुम्हीही काही कार्यक्रम, टूर, सहल ठरवली असेल तर आत्ताच सांगतोय कॅन्सल करा. नाहीतर माबोच्या अप्सरेच्या जागी घारुआण्णांना दंड घेउन ढिंक चिका..ढिंक चिका...ढिंक चिका ढिंक...... करायला लावीन आणि सक्तीने सगळ्यांना बघायला बसवीन.

मग...? सोलापूरचा गब्बर म्हणत्यात आपल्याला!

अरे हो आण्णा, कितने आदमी होना रे तुमको ववि के लिये? मेरी बंदुक लाव तो इदरको...

अभ्भी के अभ्भीच सबका रजिस्ट्रेशन कर डालते है!

चला माबोकर्स , तय्यार व्हा...

यंदाच्या पावसाळ्यात मायबोलीकरांच्या हक्काच्या वर्षाविहाराला.........

स्थळ आणि दिनांक लवकरच जाहीर केले जाईल.

"कोण बे तो जागा आणि दिनांक कळल्याशिवाय यायचं का नाही कसं ठरवायचं म्हणणारा?" सोलापूरी गब्बरशी गाठ आहे. कुठं जायचं ते लवकरच सांगतो. तोवर आपापल्या जागा इथंच पक्क्या करून ठिवा. नायतर ठाकुरअण्णालाच नाव सांगीन. कळ्ळं?

ववि संयोजक

विषय: 

जे लोक वविला येणार नाहित त्याच्यासाठीच हा गेमः

वविचे ठिकाण कुठले असेल यावर आकडे लावा बघू!

Pages