तुम्हे याद हो के न याद हो - ३

Submitted by बेफ़िकीर on 27 May, 2011 - 04:13

राहुल - तुला आता कमी करायला लागेल विन्या दारू

विनीत - का?

राहुल - आता तू एकटा राहणार मुंबईला ... मग फार होईल.. आत्ताच नियंत्रण ठेवावे लागेल..

प्यासामधली आज ही शेवटची भेट होती. विनीत मुंबईला जाणार म्हणून! एका आठवड्यात तो निघणार होता. अक्का एका डोळ्याने हासत होत्या आणि एका डोळ्याने रडत! भुमकर काकू मात्र पहिल्या दिवशी वचावचा ओरडल्या तेवढ्याच! नंतर अचानक गंभीर होऊन टिकूटुकू बघत फक्त होत्या.

मुंबई! महिना तीन हजार! मागे कधीतरी दिलेल्या आणि विसरूनही गेलेल्या मुलाखतीचे आज मिळालेले फळ!

अप्पा - आज शेवटचे! आजची फायनल भेट प्यासामधली.. यानंतर प्यासाला तेव्हाच यायचं जेव्हा विन्या पुण्याला येईल.. आता मलाही गंभीरपणे बघायला हवं आयुष्याकडे..

सगळेच गंभीर होते. आज निवेदिता हा विषयही नव्हता चर्चेत!

चीअर्स!

चीअर्स म्हणून ग्लास किणकिणताना ग्लासांमधून जसे थेंब थेंब ड्रिन्क चुकून बाहेर ओघळते... अगदी तसेच... अदृष्य अश्रू बाहेर ओघळले होते.. विनित गुजर! विनित गुजर मुंबईला चालला होता कायमचा! वीस बावीस वर्षांची अभेद्य मैत्री आज तुटणार होती कायमची.. फॉर एव्हर! यानंतर असे दिवस पुन्हा कधीच येणार नव्हते. कदाचित विन्या पुन्हा कायमचा पुण्याला आलाही असता दोन तीन वर्षांणि! पण तोवर रास्ते वाड्यात खूप खूप बदल झालेले असते... अप्पाला काही ना काही काम करावेच लागले असते.. राहुल आणि उमेश यांच्याही नोकर्‍या चालू झालेल्या असत्या.. अप्पाला स्थळे बघत असता त्याचा मोठा भाऊ..

एका परिपक्वतेच्या शक्तिशाली आवरणाखाली एकवीस वर्षांची गोंडस, लोभस आणि अपरिपक्व मैत्री झाकून ठेवावी लागणार होती..

असे कधीतरी होतेच हे सगळ्यांना माहीतच होते.. पण.. ते जेव्हा होते तेव्हा जे वाटते... त्याला शब्द नसतात..

उमेश - विन्या... हे.. आमच्या तिघांतर्फे... तुला..

शांतपणे विन्याने ते छोटेसे गिफ्ट पॅक उघडले... सोनेरी डायलचे एक सुंदर घड्याळ... त्याही जमान्यात असेल चारशे पाचशेचे! अर्थातच, सगळे पैसे यांनी कसे जमवले असतील याची विन्याला कल्पना होतीच.. कुणी पॉकेट मनीतून, कुणी आईवडिलांकडून उधार घेऊन!

टप्प!

एक अश्रू! विन्याच्या डोळ्यातून! घड्याळाची डायल भिजून अधिक सोनेरी दिसायला लागली. प्यासाच्या वेटर्सना गंभीर झालेले हे चौघे बघायची सवय नसल्याने दोन वेटर्स चक्क काही अंतरावर पाहात उभे राहिले..

विन्या - आमच्या तिघांतर्फे तुला.. म्हणजे... आपण आता... चौघे नाही आहोत ना??

उमेश - काय बोलतोस विन्या?? आणि रडतोस कसला?? आज लेका साजरे करायचा दिवस..

विनीत - काय साजरं करू?? सांग ना काय साजरं करू???

नि:शब्द शांतता! आजूबाजूला मात्र नेहमीचीच धांदल! ऑर्डर्स, सर्व्हिस आणि दारू प्यायल्यानंतर येणारा चेव व त्यातील गप्पा! एक चार जणांचा ग्रूप आज कायमचा तुटणार याचे प्यासातील गिर्‍हाईकांना काही नसले तरी प्यासाच्या भिंतीही ओलावतील अशा भावनांच्या लाटा या चौघांच्या मनात!

विनीत - काय साजरं करू?? आठ वर्षांचा असताना दिवाळीत तू अन मी फटाके उडवत असताना मला पायाला भाजलं तेव्हा तू माझ्याहीपेक्षा जास्त रडलास आणि यापुढे तसा रडणार नाहीस.. हे साजरं करू?? पहिली सायकल आणल्यावर मला धरून धरून अप्पाने कसब्यातून रोज एक तास ती सायकल शिकवली आणि त्याच सायकलवरून चुकून तो मात्र पडला तेव्हा मी हासलो तसे पुन्हा हासताच येणार नाही.. हे साजरं करू?? शैलाताई राहुल्याची सख्खी बहीण! पण मी चौथीत असताना मला गणीत शिकवताना मी चुकल्यावर माझ्या पाठीत धपाटा मारताना ती मला माझीच मोठी बहीण वाटू लागली हे आता होणार नाही... हे साजरं करू?? क्षमा तुझी लहान बहीण! पण तुझी आई आजारी, तुझे बाबा कामावर आणि आजोबा गावाला गेलेले असताना सलग पंधरा दिवस मी तिच्या डोक्यावर छत्री धरून तिला शाळेत सोडायचो ते आता करावंच लागणार नाही... हे साजरं करू?? मला... मला मुंबईला तीन हज्जार रुपयांचा जॉब मिळाला आहे आणि अशी संधी पुन्हा मिळणार नाही म्हणून... खस्ता खाऊन.. मला.. मला जीवापाड जपून वाढवणार्‍या आणि प्रसंगी मलाच फटकेही देणार्‍या आईला... मी .. मुंबईला नेऊ शकत नाही.. हे... हे सा... जरं क... रू?? आणि... ज्या नात्याला कुठलेही नांव नाही... जे नाते अस्तित्वात आहे हे कुणालाही माहीत नाही.. आणि जे नाते किती काळ टिकेल यावर.. कुणाचेही नियंत्रण नाही... ते माझे आणि... वर्षाचे ... नाते... आता केवळ दैवाच्या हवाली करावे लाग... अरे????????

विन्याने चमकून पलीकडे पाहिले तसे सगळेच दचकले आणि चौघांच्याही माना तिकडेच वळल्या...

इतकेच काय! प्यासामधील यच्चयावत माना तिकडेच वळलेल्या होत्या...

.... मूर्ख कुठली! अशा ठिकाणी... अशा वेळेस... एकटे येतात का?? तेही एका मुलीने???

"क्षमा?????"

ताडकन हाक मारून उमेश तिकडे धावला तसा चौघेही धावले. चक्क क्षमा प्यासामध्ये आली होती. जळजळीत नजरेने उमेश तिच्याकडे पाहात असतानाच ती त्याला म्हणाली...

"विनितदादाशी बोलायला आले आहे... तू चिडू नकोस... सगळे बाहेर या.... वर्षा बाहेर उभी आहे.."

एक अशक्यप्राय प्रसंगाला तोंड द्यावे लागणार होते.

खिळलेले पाय कसेबसे उचलत चौघे बाहेर आले आणि... आणखीन एक चक्रावून टाकणारी बाब!

यांची हिच्याशी कधी आणि कशी काय मैत्री झाली??

क्षमा आणि वर्षाबरोबर... चक्क निवेदिता!

प्यासाच्या वेटर्सना बिलाची काळजीच नव्हती. आठवड्यातून दोनद येणारा ग्रूप! त्यात आज तीन मुली भेटायला आल्या चक्क या एरियात! काहीतरी गंभीर असल्याचे आधीपासूनच वाटत होते. आता तर नक्कीच झाले. गेले असतील कुठतेरी! येतील पुन्हा दोन एक दिवसात! वेटर्सनी तर टेबलवरची आवराआवरीही केलि आणि ते टेबल दुसर्‍या गिर्‍हाईकासाठी तयारही केले.

हे सात जण एक अक्षरही न बोलता त्या एरियातून पहिले बाहेर पडले आणि चालत चालत बाजीराव रोडला येऊन शनिपारापाशी बसले. एका दुकानाच्या कट्यावर! रहदारी तुरळकच होती. रात्रीचे पावणे अकरा वाजलेले होते. निवेदिता कशी काय आली हेच कुणाला समजत नव्हते.

शेवटी अप्पाने मोठा असल्यामुले विषयाला तोंड फोडले.

अप्पा - क्षमा.. तिथे कशाला आलात तुम्ही?? इतकं कळत नाही??

क्षमा - सॉरी.. पण... महत्वाचं आहे..

अप्पा - काय??

क्षमाने वर्षा आणि निवेदिताकडे पाहिले. वर्षाने चटकन विनीतकडे बघत मान खाली घातली. आणि निवेदिताने कसलीशी खुण केली.

क्षमा - वर्षाचं...

पुन्हा एक असह्य गॅप! वर्षा तर आता इतकी मान खाली घालून बसली होती की असे काय बोलणार आहेत असे वाटावे.

क्षमा - वर्षाचं म्हणणं असं आहे की... विनीतला जायचंच असलं तर... त्याने काय ते... स्पष्ट करून जावे.. वाड्यात!

एका मुलीचं धाडस हे! मुलगा असून विनीतचे साहस झाले नाही. पण या तीन मुलींनी ते साहस केले.

क्षमाचं हे वाक्य ऐकून पटकन उमेशची नजर निवेदिताकडे गेली. तिनेही पटकन त्याच्याकडे पाहात खाली बघितले.

अप्पा - काय ते स्पष्ट म्हणजे??

क्षमा - म्हणजे.. तो कधी येणार परत.. काय करणार आहे पुढे... कारण.. पुढच्या वर्षीपासून हिला.. दाखवायला लागणार म्हणतायत काकू..

चपापलाच विनित! आपलं दोघांचं असं काही आहे हे वर्षाने बिनदिक्कत या दोघींना कधी सांगितले??

अप्पा - हो पण... म्हणजे.. हे.. तिला मान्य आहे का?? काय गं वर्षा?

वर्षाने पुन्हा मान खाली घातली.

क्षमा - तेच सांगायला आलोयत आम्ही.. की.. वर्षाला.. म्हणजे तिच्या मनात... आहे विनीतदादाबद्दल..

विनितची आणि वर्षाची ती नजरानजर म्हणजे खोल खोल प्रेमाचा वरवरचा आविष्कार वाटावा!

अप्पा - विन्या... बोल आता...

विन्या - मी काय बोलू?? ... माझं तेच मत आहे की??

सगळेच असल्यामुळे आणि विषय आपल्याला हवा तिथेच चाललेला असल्यामुळे विनीतला आता जरा जीभ आली होती.

अप्पा - तुझं तेच मत आहे म्हणजे काय मुलगीयस का तू?? ती तुला भेटायला येते.. ती स्वतःचं मन मोकळं करते... आता उत्तर दे... तुझा काय काय प्लॅन आहे ते... तुझ्या आणि तिच्या आईला हे मान्य होणार आहे का?? नसले होणार तर तुम्ही काय करणार आहात?? अजून तुझं नसलं तरी तिचं लग्नाचं वय आहे.. तिला आता पुढच्या वर्षापासून मुलं बघायला लागतील काकू.. मग तू काय करणारेस??

वर्षा डोळ्यात प्राण आणून बिचारी विनितकडे पाहात होती.

विनित - अप्पा.. माझी इच्छा आहेच की.. पण.. मी आत्ता कुणाशी काय बोलणार??

राहुल - विन्या... आत्ता कुणाशी काय बोलणार म्हणून बसलास तर नंतर बोलायचा वेळ तरी राहील का?? अप्पा... आपण सांगायचं का रे अक्कांना आणि भुमकर काकूंना??

अप्पा - छे छे... काही झालं तरी असे विषय फार खासगी असतात.. भुमकर काकूंना जर कळलं की आपल्या मुलीसंदर्भात वाड्यात असं मत आहे... तर त्यांना काय वाटेल..

वर्षा रुमालाने डोळे पुसत मुसमुसू लागली.

अप्पा - तू रडू नकोस गं बावळट! रडायला काय झालंय?? असं मत म्हणजे मला असं म्हणायचंय की कुठल्याही आईला वाटणारच ना??

निवेदिता वर्षाच्या पाठीवर थोपटत होती. उमेश मात्र निवेदिताच्या येण्यानेच अवाक झालेला होता. तिचा याबाबतीत काय स्टॅन्ड आहे ते त्याला जाणून घ्यायची फार फार इच्छा होती.

राहुल - तुम्ही आत्ता या वेळेला बाहेर कशा काय पडलात पण तिघी??

क्षमा - फिरून येतो म्हणून सांगीतलं..

विनित - वर्षा.. मला.. मला तू.. तुझी काय अपेक्षा आहे ते सांग.. मी.. मी बोलायला तयार आहे माझ्या आईशी... मग ती तुझ्या आईशी बोलेल..

वर्षा - तुझी आई मला कशी पसंत करेल विनित?? किती भांडतात दोघी??

विनित - हो पण मग.. मग्..करायचं काय??

दोन प्रेमी जीवांच्या संभाषणात आता कुणीही पडत नव्हतं! आता बाकीचे सगळे परके झालेले होते. बोलत होते फक्त विनित आणि वर्षा!

वर्षा - करायचं काय करायचं काय म्हणजे काय?? तू आता नोकरीला तिकडे जाणार.. मग काही इतक्यात येणार नाहीस.. पत्र पाठवू शकायचा नाहीस.. फार तर अक्कांना पत्र पाठवलंस तर माझी चौकशी करशील इतर सगळ्यांप्रमाणेच इतकंच... मीही तुला पत्र पाठवू शकणार नाही... कारण ती तुझी नोकरीची जागा...

विनित - क्षमाकडून पाठवू शकशील की पत्रं??

वर्षा - काहीही काय्?? काकाकाकूंना समजलं की संपलंच सगळं!

विनित - मी.. म्हणजे आपण एकमेकांना पत्र नक्कीच पाठवू शकू वर्षा.. रोज एक पत्र लिहीत जाऊ..

वर्षा - आणि काय?? एक दिवस मला मुलगा बघायला येईल.. मग मीच तो नाकारेन.. आधीच मी रुपाने सामान्यच.. त्यामुळे मी नाकारले गेले तर उत्तमच.. होकार आला तर मी नाकारणार... असं किती वेळा?? एक दिवस तुझ्याहीपेक्षा जास्त पगार असलेला.. एकुलता एक.. पुण्यातच असलेला असा मुलगा येईल.. मग माझ्याकडे कोणतेही कारण उरलेले नसेल नकार द्यायला... मग आत्तापर्यंत होत होती ती भांडणं प्रचंड वाढतील.. आईला वाड्यातून टोमणे मिळतीलच... मोठी हेमामालिनी आलीय यांची मुलगी सगळ्यांना नकार द्यायला.. मग भांडणं.... मारामार्‍या... शेवटी एकदाचा ... होकार द्यावा लागेल... सगळ्याचं कारण काय?? तर केवळ तू बोललाच नाहीस म्हणून.... आणि आत्ताच बोललास... तर आणखीनच मोठी भांडणं..

विनित - मग.. मग काय करू असं म्हणणं आहे तुझं??

वर्षा - याला काही नाहीच आहे बघ अप्पा...

अप्पा - असं कसं म्हणतेस?? आत्ता तुझा विषय काढून रडत होता तो प्यासामध्ये..

वर्षा पुन्हा रडू लागली...

सगळेच दु:खी झाले होते. हळवे झाले होते. पण वर्षा आणि विनितचे दु:ख सगाळ्यात मोठे होते...

क्षमा - रडू नकोस.. नको रडूस वर्षा... काही होणार नाही प्रॉब्लेम..

अचानक उसळून वर्षा म्हणाली...

वर्षा - काही कसं होणार नाही??? हा एकदा मुंबईला गेल्यावर ... इथे काय वाट्टेल ते होऊ शकेल..

अजून अनोळखीच असलेल्या ग्रूपमध्ये... आत्तापर्यंत काहीच न बोललेली निवेदिता... एकच वाक्य बोलली.. पण.. सगळ्यांचेच चेहरे अवाक होऊन तिच्याकडे पाहात होते..

निवेदिता - मुंबईला जायचंच नाही... त्यात काय इतकं?? पैसा कमवायला आयुष्य पडलंय.. वर्षाला मात्र हातची घालवून बसशील..

पाच मिनिट! स्तब्ध शांतता! आणि शेवटी.... घोगर्‍या झालेल्या आवाजात विनितचे वर्षाकडे बघत बोललेले ते वाक्य...

"मुंबई कॅन्सल... मी वाड्यातच राहणार... तुझ्याशिवाय नाही जगू शकत वर्षा.. "

उजळ गालांवर सरी ओघळलेल्या.. नाक लालेलाल झालेले... डोळ्यात दु:खांच्या अविरत लाटा... शनिपारापासची ती अकरा वाजताची शांत गंभीर वेळ... आणि... ओठांवर हळूहळू फुलू लागलेलं लाजरं हसू... वर्षा भुमकर... तिच्या आयुष्यातील आजवरचा हा सर्वात मोठा विजय होता... स्वतःच्या आईलाही सोडून जाण्यास केवळ मिळणार्‍या संधीमुळे तयार झालेला विनित गुजर.... आता तिच्यासाठी... फक्त फक्त तिच्यासाठी.. त्या संधीवर लाथ मारून.. पुण्यातच राहणार होता..

'तुझ्याशिवाय नाही जगू शकत वर्षा' हे वाक्य ऐकून निवेदिता आणि क्षमाने पटकन लाजून एकमेकींकडे पाहिले होते.. आणि त्या मंद हासल्या होत्या.. मात्र विन्याचे ते वाक्य अप्पा, राहुल्या आणि उम्याला अजूनही नीटसे समजलेच नव्हते...

राहुल - म्हणजे... तू.. तो जॉब घेणारच नाहीस??

पुन्हा एकदा निवेदिताने अत्यंत महत्वाचे वाक्य टाकले..

निवेदिता - प्रेम आणि पैसा... यातील पैसा नसला तरी लोक जगतात असं वाचलंय मी.. पण.. प्रेमाशिवाय जगू शकत नाहीत.. असंही वाचलंय...

यातील 'असंही वाचलंय' हे शेवटचे दोन शब्द उच्चारताना हळूच तिची नजर उमेशकडे गेली होती... तो बावळटासारखा निवेदिताच्या धाडसी स्वभावाकडे पाहात बसलेला होता..

राहुल - .. अप्पा... अरे बघितलंस का हा काय बोलतोय???

अप्पा - च्यायला दिडशेचं कंट्रिब्युशन होतं माझं... फुकट गेलं...

विनीत - कसलं कंट्रिब्युशन??

अप्पा - तुला घड्याळ दिलं ते??

गर खुदा मुझसे कहे कुछ मांगले बंदे मेरे
मै ये मांगू मैफिलोंके दौर यूं चलते रहे
हमपे आलो, हम निभालो, हमसफर, हमराझ हो
ता कयामत जो चरागोंकी तरह जलते रहे

यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी..

मिठ्या!

अप्पा, राहुल, विनीत आणि उम्या! एकाच मिठीत! आणि वर्षा क्षमाच्या! निवेदिता एकटीच! खळखळून हासत.. हळूच सगळ्यांबरोबरच उमेशकडेही.. पण किंचितशीच अधिक क्षण बघतीय... आणि शनीपाराचा शनी... आपली प्लॅन केलेली साडेसाती रद्द करून उद्याचा सूर्य कधी उगवतो याची वाट पाहतोय..

प्यासाच्या वेटर्सनी साफ करून ठेवलेल्या टेबलवर परत तोच ग्रूप येईल असे त्यांना अजिबात वाटलेले नव्हते.. अप्पा पोरींना घरी सोडून तातडीने प्यासाला परत आला होता.. आणि त्याने पोरींना झापलेलेही होते.. पुन्हा असे वाट्टेल तेव्हा बाहेर पडायचे नाही...

खुसखुसत सगळ्या आपल्या घरी निघून गेल्या.. अप्पाला त्यांच्याबरोबर पाहिलेले असल्याने वाड्यातील कुणीच त्यांना काहीच बोलले नाही... अप्पाने पटकन सगळ्यांची अंथरुणं बाहेरच घातली..

आणि प्यासामध्ये आता झालेले चीअर्स मात्र... खण्ण खण्ण खण्ण खण्ण...

अप्पा - दे ते घड्याळ भडव्या..

राहुल - हे घड्याळ आता दहा दहा दिवस आपण तिघांनी आलटून पालटून वापरायचे..

विनित - का?? मी का नाही??

राहुल - कारण हे घड्याळ घालण्याच्या लायकीचा तू नाहीस... तुला साधी तीन हजारांची मुंबईतील नोकरीसुद्धा मिळू शकत नाही...

विनित - ओ... एक नाईन्टी द्या..

उमेश - पण एक बरं झालं...

अप्पा - काय??

उमेश - आता... माझ्या प्रकरणात कुठलाच अडथळा उरलेला नाही..

खदाखदा हासत राहुल आणि अप्पाने उम्याला टाळ्या दिल्या तेव्हा विन्या म्हणाला..

"मी नव्हतोच कधी त्यात... तुझी खेचत होतो साल्या.. वर्षाला मी सोडेन होय कधी??"

आणि रात्री दिड वाजता सगळे वाड्याच्या चौकातच आडवे झाल्यानंतर... काही क्षण उम्या जागाच होता... 'त्या' खिडकीकडे बघत... आणि.. भास झाला का काय च्यायला???

चक्क दिवा लागला??? आणि विझला??? तीन वेळा मोजून??

बर्‍यापैकी चढलेल्या उम्याने मग शिट्टीवरच गाणं वाजवलं..

'नींद न मुझको आये... दिल मेरा तडपाये... चुपके चुपके... कोई आके.. सोया प्यार जगाये.. ओहोहोहो'

अप्पाने त्याच्या तोंडावर हात दाबला त्यानंतर मिनिटातच सगळे घोरायला लागले.. मात्र.. 'त्या' खिडकीत अजूनही कुणीतरी जागंच होतं...

=============================================

'राहण्या खाण्यातच अठराशे जाणार आहेत म्हंटल्यावर बाराशेसाठी मुंबईला जाण्यापेक्षा आठशेवर पुण्यात राहिलेले काय वाईट' हे असत्य कारण विन्याने स्वतःच्या आईसकट अख्या वाड्याला पटवून दिल्यानंतर भुमकर काकूंनी काय वाक्य टाकावे??

कुणीही हीच अपेक्षा केली असती की त्या म्हणाल्या असत्या 'सुख सोसायचीही ताकद असावी लागते'. आणि मग भोचक हसून आत निघून गेल्या असत्या.

नाही.

त्यांनी काय वाक्य टाकावे?? तर म्हणे..

"काही असलं तरी तुम्ही चौघे एकमेकांपासून वेगळे झालेले नसतं बाई पाहवलं माझ्याच्यानी'

रास्ते वाड्याच्या इतिहासात त्यांनी उच्चारलेले हे एकमेव प्रेमळ विधान होते. यावर एकमत झाल्यामुळे सगळेच अवाक झालेले होते.

आणि सकाळपासून दर्शनच नाही निवेदिताचं! वेडापिसा झालेला उमेश स्वतःच्याच घरात येरझारा घालत होता.

आई - काय रे?? नुसता काय फिरतोयस??

उमेश - मग काय करू??

आई - जाहिराती आल्यात त्या वाच की?? कितीतरी शाळांमध्ये शिक्षक हवे आहेत..

उमेश - मी शिक्षक बिक्षक होणार नाही.. आधीच सांगतोय..

आई - मग काय होणार आहेस? एम ए तरी कर?

उमेश - एम ए बिम ए नाही झेपणार मला आता..

आई - का?

आईच्या या 'का' चे उत्तर चहा पीत बसलेल्या आजोबांनी परस्पर दिले.

आजोबा - आता वय नाही त्याचं एमेबिमे करण्याचं..

आजोबांपुढे आई काय बोलणार? आजोबांपुढे उमेशचे बाबाही बोलत नव्हते.

तरी आईने विषय रेटलाच.

आई - मग कसलं वय आहे???

आजोबा - आता प्रेम करण्याचं वय आहे त्याचं..

आजोबा म्हणजे एक भयानकच प्रकार होता. आई वैतागली आणि उमेश हादरला.

आई - प्रेमंबिमं इतक्यात करायची नाहीत.. आयुष्य पडलंय प्रेमं करायला.. आधी शिका भरपूर.. नोकरी मिळवा.. त्या विनीतला बघ कशी नोकरी मिळालीवती..

उमेश - तो बी कॉम आहे.

आई - मग??

उमेश - आर्ट्सला काय डिमांड आहे का??

आई - हा विचार बारावीत पंचावन्न टक्के मिळवताना सुचला नाही वाटतं??

उमेश - क्षमा कुठे गेलीय?? त्या समोरच्या मुलीबरोबर वगैरे गेलीय का??

आई - अभ्यासाला गेलीय मैत्रिणीकडे..

आजोबा - समोरची मुलगी समोरची मुलगी काय म्हणतोस?? नांव नाहीये का तिला??

उमेश - काहीतरी निवेदिता का काहीतरी आहे म्हणे..

आजोबा - ओळख झाली नाही वाटतं अजून??

आई - दादा तुम्ही त्याला काहीतरी सांगू नका.. तो आधीच रिकामटेकडा फिरतोय..

आजोबा - नाही.. कोकणस्थच आहेत... म्हणून म्हंटलं आपलं... मला काय म्हातार्‍याला??

उमेश - आपटे म्हणजे कोकणस्थ का??

आजोबा - हो... आपटे, जोगळेकर, राईलकर, गोखले, हे सगळे कोकणस्थ.. कुलकर्णी देशस्थ..

आई - चोवीस वर्षं झाली लग्नाला आमच्या... तरी हा विषय आहेच..

खदखदत आजोबा हासले. आईच्या चेहर्‍यावर कुलकर्णी असल्याचा अभिमान आणि देशस्थ म्हंटल्या गेल्याचा राग होता.

आई - तरी आमच्याइतकी स्वच्छता नव्हतीच मी आले तेव्हा...

आजोबा - त्याचं कारण आहे.. तुझा नवरा तुझ्या मुलापेक्षा पसारा जास्त करायचा..

आई - काही नाही.. आई तरी काय ठेवायच्या घर??

आजोबा - आता माझ्यासारख्याबरोबर आयुष्य काढायचंच तिला इतकं टेन्शन..की घर काय आवरणार बिचारी!

उमेश - आजोबा तुमचं लग्न कितव्या वर्षी झालं हो??

आजोबा - आहे आहे.. तुझं लग्नाचंच वय आहे बरं? माझंही विसाव्या वर्षीच झालं होतं...

आई - लग्न बिग्न हजार करता येतील.. आधी नोकरी मिळाली पाहिजे..

आजोबा - मुलगी बघून ठेवायला हरकत नाही पण तशी...

आई - माझी हरकत आहे..

आजोबा उमेशकडे पाहून डोळा मारून हासले. उमेशलाही 'कसंसं' हसावंच लागलं!

"आई.. खीर केलीवती... 'क्षमा'साठी आणलीय"

मुलायम मुलायम गुलाबी तनू गंधुनी देत आहे सलामी तुला.. !!!

आत्ता चालू असलेल्या संवादात ही रेशमी मोहक झुळझुळ कशी काय झाली अचानक?? अशा विचारात उम्या आतल्या खोलीतून पुन्हा स्वयंपाकघरात येत होता तेव्हा 'क्षमा'साठी या शब्दातील 'क्षमा' ही अक्षरे निवेदिताने उम्याकडे बघून हासत उच्चारली होती.

आणि अख्या वाड्यातील पस्तीशीपुढच्या प्रत्येक स्त्रीला काकू किंवा मावशी म्हणून हाक मारणार्‍या निवेदिताने आपल्या आईला "आई" अशी हाक मारली????

आली काय अन गेली काय!

खोलीत नुसताच एक सुगंध भरून राहिला होता. "अगं अगं.. एवढे शंकरपाळे तरी खाऊन जा" म्हणून तिच्या मागोमाग दारापर्यंत गेलेल्या आईला "आई" ही हाक बहुधा जाणवलीच नव्हती.

आणि भक्क पोकळी निर्माण झालेल्या त्या खोलीत उम्या एकदा आईकडे, एकदा आजोबांकडे आणि एकदा दाराकडे बघत होता..

बोंबला! ही घरातच तर होती की? मग अगदी न दिसायचा विडा उचललावता वाटतं? आपण स्वयंपाकघरातच असतो तर जरा अधिक तरी बघता आलं असतं तिच्याकडे!

"अहो आई... ती खीर थोडी आम्हालाही द्या बर का?? नाहीतर एकटी 'क्षमा'च खायची सगळी"

आजोबांनीही 'क्षमा' याह अक्षरांवर बरोब्बर जोर देत पुन्हा एकदा उम्याचा सातारा केला. आई मात्र तिच्याच नादात होती. मधेच मागे वळून आजोबांकडे पाहात म्हणाली..

"हो ना?? आई काय म्हणाली ती मला??"

"सगळ्यांनाच म्हणते.. "

उमेशने स्फोटक परिस्थिती लांबवण्यासाठी घाईघाईने प्रयत्न केले. ते पाहून आजोबा म्हणाले...

"आहे वाटतं तुझी ओळख?? नाही... मगाशी नाही म्हणालास म्हणून म्हंटलं.. मला काय म्हातार्‍याला"

"उमेश.. ही घे थोडी खीर... दादा.. ही घ्या तुम्ही.. "

"मला नको.. मला नाही खीरबीर आवडत.. "

उम्याने साळसूदपणाचा कहर केला. तरी आईने पुन्हा आग्रह केल्यावर दोन चमचे खीर चाखून पाहिली आणि मग वाटीतील सगळीच संपवली.

आजोबांनी त्यांची खीर संपवली अन म्हणाले..

"आत्ता तर चहा घेतला मी... सगळी चहाची चवच गेली.. जमलीच नाहीये नाही?? खीर??"

आता उम्यालाही होकारार्थी मान हालवावीच लागली.

"का? चांगली केलीय की?? आता हे पातेले परत देऊ तेव्हा त्यात काहीतरी दिले पाहिजे.. "

"गुलाबजाम आणू का चितळ्यांचे??"

उमेशने विचारले.

"आत्ता लगेच द्यायला हवंय असं काही नाही... नंतर देऊ काही केलं की.. "

आणि थोड्या वेळाने निवेदिता बाहेर जाताना दिसली उमेशला! सायकलवरून!

काहीतरी कारण काढून तोही ताबडतोब बाहेर निघाला सायकल घेऊन! तिला माहीतच नव्हते तो मागून येतोय!

आणि लाल महालापाशी त्याने तिला गाठले. एकदम शेजारी त्याला सायकलवर बघून ती दचकली आणि थांबली..

तोही थांबला..

"काय???"

निवेदिताने आश्चर्याने विचारले..

"खीर... खूप आवडली खीर.. "

"हे.. हे सांगायला इथे??? लाल महालापाशी??"

उमेशने इकडे तिकडे पाहिले. त्याला स्वतःचा वेडेपणा जाणवला. खीर आवडली हे ऐतिहासिक स्टेटमेन्ट नव्हते शाहिस्तेखानाची बोटे छाटल्याप्रमाणे!

"नाही नाही... चाललोवतो जरा.. "

"कुठे??"

"मित्रा... कडे"

"हंहं.. "

"तू??? तू कुठे चाललीयस??"

"केसरी ऑफीसपाशी आत्या राहते... तिला खीर द्यायला.."

"अरे?? .. तिकडेच राहतो माझा मित्र... चल जाऊयात दोघेही..."

चेहर्‍यावर मिश्कील भाव ठेवून निवेदिता म्हणाली...

"नको... काहीतरीच वाटायचे लोकांना.. "

उम्यालाही जरा लाजच वाटली.. तो जमानाच तसा होता.. मुलेही लाजायची त्या जमान्यात..

"ठीक आहे.. मग तू जा पुढे.. "

मान वेळावत हासत निवेदिता सायकलवर बसली... एक पाय टेकवत उम्याकडे पाहात म्हणाली..

"निघते.. "

"आता.. कधी येणार??"

जशी काही ट्रान्स्फर होऊन गावालाच चालली होती.

"आज नाही येणार.. आत्याकडेच राहणार आहे.."

उमेश काहीसा दु:खी झाला..

"का?? .. तिकडेच का??"

"सारसबागेत जाणारेत सगळे.. आत्तेभावाचा मुलगा लहान आहे ना... त्याच्यासाठी.. "

"कधी?? संध्याकाळी??"

"हं... "

"ठीक आहे... मग आता... उद्याच... "

गोड होड हासून निवेदिता निघाली तेव्हा... उमेश खुळ्यासारखा बघत होता कितीतरी वेळ...

पण खुळा नव्हता तो... कारण... खुळा असता तर...

लांबून का होईना.. पण..

संध्याकाळी सहा वाजता त्याची आणि निवेदिताची सारसबागेत नजरानजर कशी झाली असती???

गुलमोहर: 

मस्तच झाला भाग, विनीतच्या मुंबईला जायच्या प्यासातल्या प्रसंगाने तर पाणी आणलं डोळ्यात, बेफिकिर टच...:) Happy

जबरी..........
पुन्हा वेड लागणार वाचनाचे,,,,,,,,,,,,,,,,,,,,,.
सही झाला हा भाग.
पु.ले.शु.....

HAAA BHAAG......Manaachya khaas aathavani chyaa kappyat thevanya saarakha aahe.....

लवकर टाकला......
छान.....
लगेच वाचते....

व्वा ! बेफिकिर जी! व्वा
प्यासातल्या प्रसंगाने डोळ्यात पाणी आले.
तुमच्या कथा , कादंबरया वाचुन मी तुमचा फॅन झालोय.
मी आत्ताच माझे प्रोफाइल तयार केलं ते तुम्हाला प्रतिसाद देन्या साठीच.

एक वाचक.

नका हो प्रोफाईल बिफाईल तयार करू! ही कादंबरी संपवून मी आपला निघालोय !

सर्वांचा आभारी आहे.

-'बेफिकीर'!

(ही कादंबरी जरा लांबण्याची शक्यता आज वाटली मला, ते वेगळे, पण...)

नका हो प्रोफाईल बिफाईल तयार करू! ही कादंबरी संपवून मी आपला निघालोय !>>>>>>>>>>>>>

कुठे निघालात हो.

मायबोली वरुन निघुन कुठे जाणार.

मायबोली वरुन निघुन कुठे जाणार.>>> मायबोली वरुन निघुन कुठे जाणार म्हणजे काय? मायबोली हे काय सर्वस्व आहे का काय?????

आज्जोब्बा एकदम जबरदस्त, भुषणराव > Rofl
'लवली' कादंबरी Happy

प्रतिसाद अपुर्ण आहे....खुपच बिझलोय.

पुढील लिखणासाठी शुभेच्छा.
[कादाचीत पुढाचा भागही आला आहे]
धन्यवाद!*

BEFIKEERजी, मायबोली, वरुन जाण्याचा विचार करु नका. कारण मा.बो. च्या असंख्य वाचकांसाठी.
आपल्याला अर्थातच भरपुर commitments असतिलच. पण आपले रसिकांशी हे नाते जोडले आहे, ते इतक्या सहज तुटणार नाही. आयुष्यभराचे नाते आहे हे. तर हिच विनंती, कि आपल्या कथांची इतकि सवय झालि आहे, कि त्या शिवाय दिवस पुण्र झाला असे वाटत नाही. आपण असेच लिहित रहा आणी मा.बो. वरुन जायचा विचार देखिल मनात आणु नका.

BEFEE........हे काय......प्यासा च्या meeting च्या आधीच जायचे बोलणे????
नाही चालणार्......नो परवानगी..... :)......असेच उदन्ड लीहीत रहा.....पुलेशु....