माझी कविता-८: आपण यांना पहिलत कां ?

Submitted by डॉ अशोक on 27 April, 2011 - 07:39

आपण यांना पहिलत कां ?

त्या दिवशी कुरुक्षेत्रावर
अर्जूनाला गीता सांगून
अठरा दिवसांच युद्ध संपवून
हे गेले, ते अद्याप गायब आहेत!

नंतर पुष्कळा ना हे दिसले म्हणतात -
कुणाला इश्वर म्हणून
कुणाला प्रेषित म्हणून
कुणाला अवतार म्हणून
खरं खोटं कुणास ठावूक !

ह्याना ओळखण्याची खूण-
जाऊ द्या, सांगून काही उपयोग नाही
कारण, इथेच सगळी गोची आहे
अनेका ना अनेक रुपात दिसून सुद्धा
याना शोधनं आज सुद्धा चालूच आहे!

सापडून देणारास वा माहिती देणारास -
बक्षिस इनाम काहीच नाही
आधीच सांगतो, ऐकून नंतर घेणार नाही
सापडल्यास आमच्या कड़े आणू नका
म्हणूनच पत्ता आमचा दिला नाही !

एक मात्र करा प्लीज -
भेटलेच तुम्हाला तर म्हणावं
त्यांच्या शिवाय इथं तसं ठीक म्हणावं
फक्त ते अनेक रुपात दर्शन द्यायचा
बहुरूपी खेळ पूरे म्हणावं !

द्यायचच असेल दर्शन तर -
सर्वाना, सर्वकाळ, सर्व ठिकाणी
एकाच वेशात, एकाच अवतारात
मानवतेच्या गोजीरवाण्या रूपात
भेटा की म्हणावं !

नाही तर -
त्यांचेच भक्त, त्यांचेच नावे
त्यांचेच आसन बळ कावतील म्हणावं !

आणि शेवटी कुणी सांगाव -
मग ते "परित्राणाय साधुनाम"
ते "धर्म संस्थापनाय "
ते "संभवामी युगे युगे "
इत्यादि इत्यादि इत्यादि ऐकायला सुद्धा
कुणी उरणार नाही म्हणावं !
- अशोक

गुलमोहर: 

नंतर पुष्कळा ना हे दिसले म्हणतात -
कुणाला इश्वर म्हणून
कुणाला प्रेषित म्हणून
कुणाला अवतार म्हणून
खरं खोटं कुणास ठावूक !
छान .मस्त!!

खुप आवडली डॉक्टर !

खरं सांगू?
तो पक्का ओळखुन आहे..
आपला दांभिकपणा...
प्रत्येक गोष्ट त्याच्यावर ढकलून..
निश्चिंत होण्याचा आपला कातडीबचावुपणा..
म्हणूनच तो अदृष्य झालाय....
कारण त्याला पक्के माहीत आहे..
ज्यांना खरोखर त्याची आस आहे...
त्यांना कुठेही शोधायची गरज नाही,
तो तिथेच आहे...
त्यांच्यातच, त्यांच्या आतच..
फक्त मनापासुन..
एक साद घालायची आवश्यकता आहे !

विशाल...
सविस्तर अभिप्राया बद्दल आभार ..
हो, ते ही खरं आहे. तो (श्रीकृष्ण) जन्म घेत नाही कारण तो अर्जूनानं जन्म घेण्याची वाट पहातोय. तो (राम) जन्म घेत नाही, कार्रण तो लक्ष्मण आणि भरताची वाट पहातोय !
-अशोक