इ.स. १०००० - भाग ७

Submitted by बेफ़िकीर on 29 March, 2011 - 03:21

दहा लाख!

तसे पाहिले तर ही संख्या खूपच! दहा लाख मानव म्हणजे काय झालं!

पण हे दहा लाख मानव पृथ्वीवर विखुरले गेलेले होते. ज्याला आपण हिंद मानतो तेथे असतील पन्नास, साठ हजार! इकडे काही, तिकडे काही, अशा पद्धतीने मानव विखुरलेल्या अवस्थेत होते.

पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे मानव उत्क्रान्तीच्या प्रवासातील खूपच पुढारलेले मानव होते. ते संख्येने कमी असतील, एकेकटेही असतील, नुकत्याच झालेल्या भीषण युद्धात कसेतरी वाचलेलेही असतील! पण तरीही त्यांचे ज्ञान खूपच होते. म्हणजे अश्मयुगाच्या आणि सुरुवातीच्या टप्यांच्या तुलनेत खूप होते. आजच्या मानवाच्या तुलनेत ते काहीच नव्हते. पण त्यावेळेसच्या समाजाचे त्यांना पूर्ण ज्ञान होते.

मात्र ते असहाय्य होते. कमकुवत होते. रोगी होते. नुकत्याच झालेल्या युद्धातील अपरिमित हानीमध्ये त्यांच्याही शरीराची, संपत्तीची खूप हानी झालेली होती. त्यांचे ज्ञान वापरून त्यांना पुन्हा आधीसारखे विश्व उभे करणे अशक्य होते. जिकडे पहावे तिकडे मृत मानवांची शरीरे, धूळ, धूर, केमिकल्सचे गंध, भयानक उष्णता, खूप लांबवर झालेल्या अणुस्फोटाच्या रेडिएशनमुळे होणारा त्रास! हे सर्व घटक त्या दहा लाख मानवांचे साथीदार होते.

प्रेते जाळणे शक्य नव्हते. इतक्या प्रचंड संख्येने असलेली प्रेते जाळणार कशी? त्यांची विल्हेवाट कशी लावणार? कित्येक ठिकाणी पडलेली घरे, त्यातील मौल्यवान वस्तू हे सगळे सहजपणे दिसत होते. पण ते लुटून त्याचे करणार काय? ते साठवणार किती? पावलापावलाला अश्या वस्तू दिसत होत्या ज्या एरवी रस्त्यावर पडलेल्या दिसत्या तर मानवाने सहज उचलून स्वतःजवळ ठेवल्याही असत्या. तो त्या वस्तू घेऊन श्रीमंत झाला असता. पण या क्षणी त्या वस्तूंचे मोल शुन्य होते. सोन्याची चीप मिळाली तरी ती ठेवणार कुठे? ठेवून करणार काय? दोन वेळचे अन्न मिळायची मारामार! सोने जपून काय करणार? कुणाला विकणार? विकले तरी त्याचे पैसे करून काय करणार?

त्या दहाच्या दहा लाख मानवांच्या मनात एक अवर्णनीय रितेपण आलेले होते. ज्या बाबींवर आजवर जीव लावलेला होता, त्या इतस्ततः विखुरलेल्या अवस्थेत आणि मालक नसलेल्या अवस्थेत पडलेल्या असूनही त्यांचा मोहही होत नव्हता.

शोध एकाच गोष्टीचा चाललेला होता. ते म्हणजे जिवंतपणाचे एखादे लक्षण आहे का हे बघणे!

मात्र जिवंतपणाचे काहीही लक्षण नव्हते. एखादा माणूस जिवंत दिसलाच तर तो केवळ काही क्षणांसाठी जिवंत असणार हे लक्षात येत होते.

आपले कुटुंब, रक्ताचे नातेवाईक, आपली संपत्ती, आपले घर, आपला प्रांत, भाषा, जात, धर्म यापैकी कोणत्याच संकल्पनेला आता काहीच नेमका अर्थ नव्हता. नेमका म्हणण्याचे कारण इतकेच की त्यांना असलेला नेमका अर्थ त्या मानवांच्या मनात रुजलेला असला तरीही सध्याच्या परिस्थितीत त्या संकल्पना अस्तित्वातच राहिलेल्या नाहीत हे सहज समजत होते त्यांना!

एक धडधाकट जिवंत माणूस दिसावा इतकीच किमान अपेक्षा होती. जमीनीवर अस्ताव्यस्त पडलेली प्रेते पाहून त्यांच्यावर झेपावायला आकाशात गिधाडे नव्हती. मिळेल त्या 'विषाने माखलेल्या मांसाचा' लचका तोडायला गावठी कुत्री नव्हती. झाडांची पाने केव्हाच गळलेली होती. जी झाडे स्फोटापासून काहीशी जवळ होती ती तर भुगा होऊन जमीनीवर ढिगार्‍यांच्या स्वरुपात पडलेली होती. तीच अवस्था माणसांची आणि घरांचीही!

खरे तर त्या काळातील विशेष पुरावे उपलब्ध नाहीत. तरी अंदाज आणि जी काय महिती उपलब्ध आहे त्यावरून असे जाणवते की त्या परिस्थितीत मानवाने विषारी मांस व चुकून माकून एखाद्या झाडावर पाला उरला असलाच तर तो खाल्ला असावा.

ध्येयहीन अवस्था होती ती! ईश्वर या संकल्पनेलाच तडा गेलेला होता. जात, धर्म या कल्पना निरर्थक वाटू लागल्या होत्या. अस्तित्वात आहोत म्हणून जगण्याचे कर्तव्य पार पाडायला हवे असे वाटत होते.

ही वादळानंतरची शांतता होती. या शांततेत काहीही नव्हते. कोणत्याही शुभ दिवसाची, शुभ क्षणाची प्रतीक्षा नव्हती. काही हवेसेही नव्हते आणि काही नकोसेही! वातावरणातील विषारी दर्प आणि हवा शोषून मानव अधिकाधिक क्षीण होऊ लागलेला होता.

काय झाले आहे याचे संपूर्ण ज्ञान त्याला होते. मानवानेच स्वतःच्या खुळचट संकल्पनांना देवत्व प्रदान करून इतर मानवांना नष्ट करण्याचा ध्यास घेतलेला होता. निसर्ग कायम समतोलच राखतो हे तत्व विसरले होते लिबर्टी प्रांतातील मानव! हिंदमध्ये कितीही लोकसंख्या निर्माण झाली तरी पृथ्वीला झेपेले इतपतच ती निर्माण होणार हे तत्वच विसरण्यात आले होते. या अफाट लोकसंख्येमुळे पृथ्वीवरील इतर मानवांना पुरेशी सुबत्ता मिळत नाही असे समजण्यात आले होते. त्यातच धर्म, वंश, पंथ व देव या संकल्पनांचे पगडे होते ते निराळेच!

या सर्वाचा भीषण परिणाम नेमका कसा असेल हे बघायला मात्र अख्या ग्रहावर फक्त दहा लाख माणसे उरलेली होती आणि त्यांच्यातील एकालाही हे माहीत नव्हते की इतरत्र कुणी मानव अस्तित्वात राहिला आहे की आपण एकटेच आहोत!

केवळ तीन आठवड्यात मानव सृष्टी जवळपास लयाला पोचलेली होती. निसर्गाने मानवाला दिलेली बुद्धी मानवाने निसर्गचक्र थांबवण्यासाठी वापरलेली होती. आता स्त्री पुरुष एकमेकांना भेटणे आणि त्यांच्या संयोगातून नवीन मानव निर्माण होणे ही शक्यता फारच कमी होती. निर्माण करायचा म्हंटला तरीही युद्धामुळे निर्माण झालेल्या रोगट आणि विषारी वातावरणामुळे स्त्रीची गर्भधारणेची शारिरीक क्षमता अत्यल्प असणार होती. अगदी मानव निर्माण झालाच तरीही तोही आणि त्याच्या पुढच्या कित्येक पिढ्याही रोगट आणि अल्पायुषीच असणार होत्या. हे सर्व मानवाच्याच अतिरेकी कृत्यांमुळे झालेले होते. मानवानेच निसर्गचक्र थांबेल असे भयानक कृत्य केलेले होते.

पृथ्वीवरील बहुतांशी पशू पक्षी या युद्धात खर्ची पडले होते. समुद्रांच्या पाण्याचा रंग बदलला होता. समुद्रातील सजीव जग मरून काठावर येऊन पडत होते. त्यात लहानश्या माशांपासून ते महाकाय मगरी, मासे आणि इतर जलचरही होते. त्यांचा काहीही दोष नसताना ते मेलेले होते. समुद्रात लाखो स्फोटके पडलेली होती. संपूर्ण पृथ्वीवर त्या तीन आठवड्यात जलप्रवास करणारी लहानमोठी अशी एकुण जवळपास पाच हजार जहाजे, गलबते जलसमाधी घेऊन सागरतळाशी पोचलेली होती. आकाशात जिकडे पाहावे तिकडे धुळ आणि धूर इतकेच दिसत होते. सुर्योदयातील पावित्र्य सपलेले होते. तिन्हीसांजा झाल्यानंतर मानव विषण्ण अवस्थेत सुरक्षित ठिकाण शोधून नुसता बसून राहात होता.

सर्व अणुसत्ता एकमेकांच्या प्रलयंकारी सामर्थ्याला वचकून असल्यामुळे तिसरे महायुद्ध होणारच नाही ही कल्पना निखालस खोटी ठरलेली होती.

मात्र!

या सर्व विदारक परिस्थितीतही... हिंदमधील १२ नावाच्या एका मानवाला २४ नावाचे एक अर्भक जिवंत असलेले दिसले. १२ने २४ ला जवळ घेऊन निसर्गाची ती अनोखी किमया जणू पहिल्यांदाच पाहिल्याप्रमाणे प्रेमाचा वर्षाव केला २४ वर!

१२ आणि २४ आता एकत्र राहू लागले. हे क्रमांक आम्ही काल्पनिकरीत्या दिलेले आहेत. हाती आलेल्या पुराव्यांनुसार तेव्हा मानवाला क्रमांक नसायचेच. त्यांना अक्षरांची विविध कॉम्बिनेशन्स असलेल्या शब्दांची नावे असायची म्हणे!

तर १२ आता २४ ला आपल्या कडेवर घेऊन फिरू लागला. २४ ला निदान पाणी तरी पाजता यावे म्हणून स्वतः उपाशी आणि तहानलेला असतानाही जमेल तितका प्रवास पायीच करून तो फिरू लागला. २४ एवढ्या धुमश्चक्रीत कसा काय वाचला हे काही समजत नाही. तो इतका लहान होता की चार दिवस उपाशी राहिला असता तर तसाच मरून गेला असता. याचाच अर्थ त्याला जन्म देणारे आई वडील नुकतेच मेले असावेत. पण त्या ढिगात त्याचे आई वडील कोण हे १२ ला समजणे अशक्यच होते.

ही कथा काल्पनिक आहे हे पुन्हा नमूद करावे लागत आहे कारण कथा स्वरुपात सांगितल्याशिवाय आजच्या, म्हणजे इसवीसन १०००० च्या मानवाला ते रम्य वाटणार नाही. खरे तर वस्तुस्थिती काय होती हे समजण्याइतके पुरावेच हाती लागू शकले नाहीत.

तर १२ ला एक वाहन मिळाले. १२ ने ते वाहन सुस्थितीत आहे हे पाहून ते चालू केले. १२ ला ते वाहन चालवता येत होते. मग १२ ने २४ ला त्या वाहनात स्वतःच्या शेजारी नीट ठेवले आणि आता तो ते वाहन घेऊन फिरू लागला. फायदा खूप होऊ लागला. अनेक भाग, जेथे तो चालत कधीतरीच पोचला असता, ते आता सहज कव्हर करता येऊ लागले. महत्वाचा फायदा म्हणजे बहुधा एक रेस्टॉरंट नावाचा प्रकार होता तो मिळाला. पुर्वी मानव आपल्या घरी अन्नप्राशन करण्याबरोबरच बाहेर जाऊनही अन्नप्राशन करत असावा. त्या बदल्यात ते काही कागदांचे विशिष्ट आकाराचे तुकडे द्यायचे. हे तुकडे ज्याच्याकडे जास्त तो बलवान ठरायचा. तर ते रेस्टॉरंट मिळाल्यावर १२ ने खूप शोध घेतला. बहुतेक गोष्टी जळून खाक तरी झाल्या होत्या किंवा विषाने बाधित तरी!

पण चक्क एका बाटलीत पाणी मिळाले. १२ ने ते चाखून पाहिले व उरलेले पाणी २४ ला पाजले. बहुधा २४ ते पाणी पिऊन टुकूटुकू बघू लागला असावा. कारण १२ ला आनंद झाला २४ ला पाणी पाजून!

मानवता पृथ्वीवर पुन्हा अवतरत होती. नुकतेच मानवाने केलेले भीषण युद्धाचे कृत्य पाहून दिलखुलासपणे हासून आणि न रागावता निसर्गाने पुन्हा एकदा मानवतेला जन्म दिला होता. एकाने दुसर्‍याचे पालन करायचे व त्या बदल्यात त्या दुसर्‍याने मोठे झाल्यावर पहिल्याचे! ही संकल्पना १२ व २४ मुळे प्रत्यक्षात आली.

त्यातच ३६ नावाची एक स्त्री तिथे फिरताना दिसली. तिला १२ आणि २४ भेटल्याचा खूप आनंद झाला. तिने २४ ला सांभाळायची आणि १२ बरोबर अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधार्थ फिरण्याची तयारी दाखवली. मग दोघांनी मिळून काही इतर वाहने या मूळ वाहनाच्या मागे बांधली. या मूळ वाहनातील इंधन संपल्यावर ते त्या इतर बांधलेल्या वाहनांचा उपयोग करून फिरणार होते.

निसर्ग प्रत्येक गोष्टीत बॅलन्स ठेवतो. इतके प्रादुर्भाव झालेले वातावरण हळूहळू शुद्ध होऊ लागले. परिणामतः काही वस्तू पुन्हा खाणेबल झाल्या. त्यातच १२ आणि ३६ हे जाळ करून काही खाद्य भाजून खाऊ लागले. २४ आता त्या दोघांमध्ये स्थिरावलेला होता.

हा प्रवास पृथ्वीवरील सर्वच दहा लाख मानव करत होते. दळणवळणाची आणि संवादाची सर्व साधने बंद पडलेली होती. पण नियमीत प्रवास करत असल्यामुळे मानव भेटू लागले. १२ आणि ३६ यांना आता ४० भेटली. ४० अन्नाच्याच शोधार्थ फिरत होती. एक लहानसे बाळ व एक आपल्याप्रमाणेच स्त्री पाहून तिला आनंद झाला. ती आता त्या वाहनात बसून फिरू लागली. बळ वाढले तसे अधिकाधिक चांगले राहणीमान मिळू लागले. अधिकाधिक मानवही भेटू लागले.

हळूहळू एक गट तयार झाला. मात्र आता इंधन संपले. त्यामुळेच अन्नाबरोबरच वाहनांचाही शोध सुरू झाला. १२ आणि ३६ हे या गटाचे प्रमुख मानले गेले. कारण ते सर्वांना आपल्याबरोबर नेत होते. समाविष्ट करून घेत होते.

ही होती २०७५ च्या अमानवी अतीभयंकर महायुद्धानंतरची पहिली पिढी!

२०९० पर्यंत या पिढीला एक भक्कम स्वरूप प्राप्त झाले. त्यांनी स्वतःसाठी एक जागा स्वच्छ करून तेथे वास्तव्य सुरू केलेले होते. आता तेथे काही आणखीन लहान बाळे आली. छोटासा २४ आता १५ वर्षांचा झालेला होता. तो समुद्रातील काही वाचलेल्या सजीवांपैकी काही छोटे सजीव पकडू लागला होता. ते बहुधा मासेच असावेत. हा २४ आता त्या गटाचा सर्वाधिक आवडता मुलगा बनला. कारण तो विक्रमी सामुद्री सजीव पकडायचा. त्याच्यामुळे जवळपास दोनशे लोकांची भूक भागायची. २४ ची साथ द्यायला आता एक गट तयार झालेला होता. याच पंधरा वर्षात निसर्गाची दुसरी किमया म्हणजे शेतीही निर्माण झालेली होती. या समाजात कुणी मानसशास्त्रज्ञ होता तर कुणी इलेक्ट्रिशियन! कुणी भाजीवाला होता तर कुणी उद्योगपती!

मात्र या सर्वांमध्ये खूप प्रेम होते. १२ आणि ३६ हे त्यांचे अजूनही प्रमुखच होते. ते दोघे खूप मित्रत्वाच्या नात्याने सर्वांना वागवत होते. सर्व शेती उत्पादनाचे व पकडलेल्या खाद्य सजीवांचे वाटप न्याय्य पद्धतीनेच होत होते. वयाने मोठे मानव लहान मानवांना ज्ञान देत होते. शाळा नसल्यामुळे ते ज्ञान तसेच दिले जात होते.

हा समाज आधीच्या समाजापेक्षा खूप चांगला समाज होता. त्यांना देव नव्हता. त्यांच्यात कुणी श्रेष्ठ वा कनिष्ठ नव्हते. हे सर्वजण शांतताप्रिय होते कारण अशांततेचे भीषण स्वरूप त्यांनी अनुभवलेले होते. या लोकांना अजूनही फोन, दळणवळण या यंत्रणा सुरू करता येत नव्हत्या. मात्र एके दिवशी एक प्रचंड मोठा शोध लागला.

संपूर्ण पृथ्वी वाय-फाय असल्यामुळे व ती यंत्रणा कक्षेबाहेरील उपग्रहाकडून कार्यान्वित असल्यामुळे एका न मोडलेल्या संगणकावर काही विचित्र संदेश आलेले दिसले. उघड होते की गूगल, याहू, रेडिफ या यंत्रणा केव्हाच नष्ट झालेल्या होत्या. ते संदेश डिकोड करणारा एकही माणूस या समाजात नसला तरी एक गोष्ट करत येत होती ती म्हणजे त्या संदेशांना प्रतिसाद देणे!

एका माणसाने इंग्लीशमध्ये पाठवलेल्या संदेशाला एक सेकंदही झाला नसेल तोच......

...... अफाट वेगाने तेथे पोत्याने संदेश येऊन पडायला लागले. मुख्य म्हणजे ते संदेश इंग्लीशमध्येच होते.

आणि त्यातूनच हा शोध लागला. उपग्रहावरील अजूनही कार्यान्वित असलेल्या यंत्रणेमुळे हे समजले की एकंदर पृथ्वीवर अजून लाखो लोक जिवंत आहेत.

या लोकांचे एकमेकांशी संदेशवहन आता संगणकावरच होऊ लागले. पंधरा वर्षांपुर्वी झालेल्या भीषण युद्धाच्या आठवणी काढून लोक दु:ख व्यक्त करू लागले तर कुणीतरी भेटले याचा आनंदही व्यक्त करू लागले.

हे संदेशवहन हा या मानवसमुहासाठी सर्वात मनोरंजक प्रकार ठरला. काही शाब्दिक नावे असलेले व पृथ्वीवर इतरत्र जिवंत असलेले मानव आता या समुहाचे ओळखीचेही झाले आणि मित्रही!

माणसातील जात, धर्म, प्रांत, भाषा, वंश या सर्व भिंती गळून पडल्या होत्या. धरित्री पुन्हा फुलू लागली होती. ऋतू नियमीत झालेले होते. शेती पिकत होती. फळे फुले येत होती. मानसमुह आनंदीत होत होता.

याचा परिणाम असा झाला की त्या पिढ्यांमध्ये युद्धाचे विषारी परिणाम असूनही तो समुह उत्फुल्ल होता. त्यांच्यातील लोक अर्धवट वयातच मरत होते. पण मरताना आनंदी होते. कारण त्यांना मरताना तरी मानवतेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार पाहायला मिळाला होता. एवढ्या प्रचंड ग्रहावर आपल्यासारखे अगदी कमी लोक आहेत आणि त्यांच्यात कोणतेही भांडण उरलेले नाही हा तो आविष्कार!

या मानवसमुहाच्या शेकडो पिढ्या निर्माण होत गेल्या. इसविसन २०९० ते इसविसन ३९९९ या कालावधीत या पिढ्यांनी तांत्रिक प्रगती खूप केली.

मात्र आंतरजालीय सेवा त्यांना कधीच निर्मिता आल्या नाहीत. मोबाईल फोनच काय पण साधे फोनही निर्माण करू शकले नाहीत. इतकेच काय तर ते दगडाच्या तुकड्याने रेघोट्या आखूनच साहित्य निर्माण करत होते. कारण बॉल पेन शोधणारा जॉन बिरो पुन्हा जन्माला आल्याशिवाय बॉल पेन कसे मिळणार? अनेक वाहनांचे जुनाट भग्नावशेष समोर असूनही नेमके पोलादाचे चाक कसे करता येईल हे कोण शोधून काढणार?

त्यामुळेच, २०७५ मधील युद्धानंतर पृथ्वीवर जी काही तांत्रिक प्रगतीची लक्षणे होती, जसे चालू असलेली वाहने वगैरे, ती चालू स्थितीत असेपर्यंतच त्या प्रगतीचा लाभ मानवाला घेता आला. नंतर काहीच करता येईना! त्याचमुळे दुर्दैवाने हा मानव अप्रगत राहिला. डोळ्यासमोर प्रगत संस्कृतीचे अवशेष दिसत असूनही अप्रगतच राहिला. त्यामुळे पुर्वीच्या प्रगतीच्या कथा या आता दंतकथा होऊ लागल्या.

मात्र असे असूनही हा कोणत्याही कालावधीतील मानवापेक्षा अधिक चांगल्या स्वभावाचा मानव होता. कारण कमी संख्या असल्यामुळे सर्व सुबत्ता पुरी पडत होती. कुणीही केवढेही झोपडे बांधू शकत होते. कुणी त्या गोष्टीला विरोधही करत नव्हते.

मात्र समुद्रातील सजीव सोडून इतर कोणताही सजीव दिसत नव्हता. आणि त्या दिवशी गंमत झाली.

अचानक वस्तीपासून काही अंतरावर एक विचित्र सजीव दिसल्यामुळे लहान मानव घाबरून धावत वस्तीत आले. त्यांना जे म्हणायचे होते ते म्हणताही येत नव्हते कारण 'काय पाहिले हेच त्यांना सांगता येत नव्हते'!

मात्र काही जुन्या जाणत्यांनी सांगितले की ही म्हैस आहे.

म्हैस जगली कशी हे कोडेच उलगडेना! ती खूप लांबून आलेली असावी. मात्र चांगली म्हैस होती. ती काही घाबरत नव्हती मानवांना! याचाच अर्थ तिने इतरत्र कुठेतरी नियमीतपणे मानव पाहिलेले असावेत.

म्हशीचे दूध पितात हे लहान मानवांना ऐकून माहीत होते. पण या म्हशीला दूध नसावे. ही आली कुठून याचा मगोवा घेण्यासाठी काही जुने जाणते मानव निघाले. आणि जवळपास दोन महिन्यांनी ते नाचत आणि उड्या मारतच परतले. त्यांना खूप लांबवर एक वस्ती मिळाली होती जिच्यात दुभदुभते भरपूर होते. अन्न आणि पाणीही चिक्कार होते. कशाची कमतरताच नव्हती. तेथील मानवांना आपल्या समुहातील मानवांबाबत सांगितल्यावर तेथील मानव 'मग आणा की त्यांना इथे' म्हणाले! हे ऐकून सगळे आनंदाने वस्तीत परतले होते.

आता एक मोठे स्थलांतर चालू झाले. ती म्हैस काहींनी बरोबर घेतली. तिला त्यात काही प्रॉब्लेम नव्हता. एक मोठा मानवसमुह हिंद प्रांताच्या पृथ्वीवरील पश्चिम दिशेपासून पृथ्वीवरील उत्तर दिशेकडे जायला निघाला. तेथे पाच नद्यांचा संगम होत होता. हवा अतिशय सुरेख होती. शेते डोलत होती. गहू भरपूर पिकायचा.

तेथे या समुहाचे जोरदार स्वागत झाले.

भरपूर अन्नवाटप झाले. कोंबडी नावाचा एक प्रकार या नवीन आलेल्या समुहातील काही लहान मानवांनी पहिल्यांदाच खाल्ला तर जुन्या जाणत्या मानवांनी कित्येक वर्षांनी अनुभवला.

आनंदाला उधाण आलेले होते. स्थलांतरीत समुहातील काही स्त्रिया नवीन समुहातील स्त्रियांना आपल्या झोपडीत आणून त्यांचे स्वागत करू लागल्या. नवीन समुहातील लहान मानव स्थलांतरीत समुहातील लहान मानवांना बरोबर घेऊन खेळू लागले.

आहारात जबरदस्त सकारात्मक फरक पडल्याने व वातावरण काळानुसार अधिकाधिक शुद्ध होत राहिल्याने या स्थलांतरित समुहाची साधारण पाचवी पिढी अत्यंत सशक्त व मूळ समुहासारखीच निपजली.

आता सगळे एकाच धरतीमातेचे सुपुत्र होते.

त्यातच आजवरचा आश्चर्याचा सर्वात मोठा धक्का म्हणजे या पाच नद्यांचा संगम होणार्‍या प्रांताच्या वरच्या बाजूने अश्वावर आरुढ होऊन काही मानव आले. ते तर फारच वेगळेच होते. अतिशय देखणे होते. त्यांचे अश्वही अतिशय रुबाबदार होते. त्या मानवांनाही येथे येऊन नवीन मानव दिसल्यामुळे खूप आनंद झालेला होता. ते मानव कलाप्रांतात पुढारलेले होते. त्यांच्याकडे अनेक कौशल्ये होती. कुणीही बघतच राहावे अशी ती जनरेशन होती.

आता त्यांच्यातील काही मानव येथेच स्थिरावले, काही परत गेले तर काही येण्याजाण्यात काही वस्तूंच्या व्यापारात गुंतले. एकंदर, जेथे पुर्वी खजुर आणि आलूबुखार या फळांचे विक्रमी उत्पादन व्हायचे तेथील मानव पाच नद्यांच्या संगमावर राहणार्‍या मानवामध्ये मिसळला....

.... कलह! या आनंदाच्या पिढ्यानपिढे चाललेल्या सोहळ्यात मानवाच्या 'श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या' नैसर्गीक प्रवृत्तीमुळे शेवटी कलह निर्माण झाले. काही ना काही कारणावरून धुसफुस चालू झाली. मारामार्‍याही होऊ लागल्या. गट पडू लागले. त्यातच आधीच्या स्थलांतरीत समुहाविरुद्ध मूळ समूह उभा ठाकला व म्हणू लागला की आमच्या येथील नैसर्गीक सुबत्ता तुम्हा स्थलांतारितांमुळे अपुरी पडत आहे व तुम्ही चालते व्हा. हे करण्यासाठी त्यांनी आलूबुखार प्रांतातील मानवाची मदत घेतली. त्यातच पृथ्वीवरील पश्चिम दिशेच्या किनार्‍यावर काही होड्या येऊन ठेपल्या. त्यातून अत्यंत गोरी त्वचा असलेले काही मानव उतरले व ते भर वेगात सर्वत्र संचारही करू लागले. ते काही ना काही कारणाने प्रगत असावेत. त्यांचे ते प्रगत राहणीमान या समुहांना जाणवले तसे आलूबुखार प्रांतातील मानवही बिथरले.

शेवटी परिस्थिती अशी आली हिंसा दररोजचीच होऊ लागली. मानव मरू लागले, मारू लागले.

हेच होत असताना २०७५ मध्ये झालेल्या भीषण महायुद्धाचा एक अत्यंत विलंबाने होणारा परिणाम होऊ लागला होता.

त्या युद्धात कित्येक अब्ज मानव मेले होते. कोणताही मानव मरताना त्याच्या शरीरातील अ‍ॅलॉटेड चैतन्य मुक्त होते. ते वायूस्वरुपात वातावरणात मिसळून अत्यल्प वजनामुळे अवकाशाकडे झेपावत राहते. हे पुढे अवकाश भेदून नेमके कुठे जाते हे अजूनही समजलेले नाही. मात्र ते संथपणे अवकाश भेदून कोणत्यातरी दिशेला निघून जाते. पुढे ते वेगळ्या स्वरुपात येथेच येते की तिथेच थांबते की इतरत्र कुठे जाते ते माहीत नाही. मात्र लॉ ऑफ कन्झर्व्हेशन ऑफ मास च्या नियमानुसार ते नष्ट होत नाही.

मात्र हे सगळे नैसर्गीक मृत्यूच्याबाबतच होऊ शकते. अनैसर्गीक मृत्यू, ज्याला त्या काळात खून, हत्या व वध अशी तीन शाब्दिक नावे होती, त्या प्रकारांमध्ये असे होत नाही. याचे कारण त्या चैतन्यावर मानवी शरीरातील विचारप्रक्रियांचा प्रचंड परिणाम होत असतो. नैसर्गीक मरण आले तरी तो असतोच,पण प्रमाणे खूप कमी असते. अनैसर्गीक मरणात ते अतिशय प्रचंड असते. उदाहरणार्थ एखाद्या मानवाला आज काही कारणामुळे एकदम दोन हजार पॉईंट्स मिळणार असतील व अचानक त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या मनातील तो विचार अर्धवट राहतो व त्याचा परिणाम अ‍ॅलॉटेड चैतन्यावर होतो. यामुळे ते चैतन्य जेव्हा मुक्त होते तेव्हा ते अवकाशाच्या दिशेने न जाता धरतीवरच आपटते. कारण त्याचे वजन वाढल्यामुळे त्याच्यावर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव इतर हवेपेक्षा अधिक पडतो. अशी अनेक माणसे मेल्यास हे मुक्त न झालेले चैतन्य धरतीवर साठू लागते व त्याचा दबाव धरतीवर पडतो. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया ही असतेच, त्यामुळे धरती हे चैतन्य अवकाशाच्या दिशेने रेटू लागते.

मात्र हे झाले किरकोळ हजार बाराशे मानव मेले तर! २०७५ च्या युद्धात अब्जावधीमानव एकदम मेले. त्यांच्या मुक्त न झालेल्या चैतन्यशक्ती धरतीवर अभुतपुर्व दबाव पाडू लागल्या. परिणामतः धरतीचाही प्रतिक्षिप्त दबाव त्यांना रेटू लागला. मात्र पुन्हा वातावरणाच्या दाबाने या अमुक्त चैतन्यशक्ती धरतीकडेच वळू लागल्या. या आंदोलनांमुळे धरतीचे थर इतके अस्थिर झाले की त्यांच्यातील एकमेकांना चिकटून राहण्याची प्रवृत्ती नष्ट होऊ लागली.

याचाच परिणाम होता इसवीसन ४००० मधील महाप्रकोपी भुकंप!

हा भुकंप इतक्या विलंबाने होण्याचे कारण हे होते की अश्या अमुक्त चैतन्यशक्तींनी निर्माण होणार्‍या आंदोलनांमुळे धरतीचे थर अस्थिर होणे ही घटना जवळपास काही शतकांनीच होऊ शकते.

या भूकंपाचा तत्कालीन मानसमुहांच्या वागण्याशी काही एक संबंध नव्हता. मात्र ते त्यात बळी पडले. जवळपास संपूर्ण मानवजात नष्ट झालेली असावी. पृथ्वीचा दिवस २४ तासांवरून तेवीस तास सेहेचाळीस मिनिटे इतका कमी झाला. याचे कारण तिची रोटेशनची गती वाढली. या वाढीव रॅडियल मोमेन्टमचा परिणाम अर्थातच तिच्या वरकरणी किंवा तौलनिकपणे लिनियर वाटणार्‍या पण मुळातच रॅडियलच असणार्‍या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेवरही पडला आणि त्या काळी ३६५ दिवसात सूर्याभोवती एकदा फिरणारी पृथ्वी आता केवळ ३४० दिवसातच फिरू लागली. त्यामुळे साधारण सोळा वर्षांनी एखादा माणूस जरी म्हणाला की त्याचे वय सोळा वर्षांनी वाढलेले आहे तरी पुर्विच्या तुलनेत ते केवळ पंधराच वर्षांनी वाढलेले असायचे. अर्थातच या गोष्टीचा परिणाम ऋतूंवरही झालाच! आणखीन एक परिणाम असा झाला की वाढीव गतीमुळे सूर्याभोवती असलेल्या पृथ्वीच्या प्रदक्षिणेचे वर्तुळ वाढले. त्याचा परीघ वाढला. त्यामुळे एखाद्या माणसाचे वय सोळा वर्षांनी सोळा वर्षे वाढण्याऐवजी प्रत्यक्षात ते सतरा वर्षांनी वाढू लागले. कारण पृथ्वीचे एक वर्ष पूर्ण होण्याआधीच तो माणूस ज्या काळातील होता त्या काळातील त्याचे वय एक वर्षाने वाढलेले असायचे. शेवटी पृथ्वीची गती वाढणे व सूर्यप्रदक्षिणेच्या वर्तुळाचा परीघही वाढणे या परस्पर विरोधी क्रियांमुळे पृथ्वी पुन्हा पुर्वीच्याच परिघात व पुर्वीच्याच गतीने फिरू लागली. मात्र तसे व्हायला इसविसन ६०१२ हे साल उजाडलेले होते.

इसविसन ४००० ते इसविसन ६०१२ या कालावधीत काय झाले ते आपण एका ब्रेकनंतर समजून घेऊ!

=====================================

१६९९ च्या खांद्यावरची चीप बंद पडली तसा गोप भानावर आला.

१६९९ - कशी वाटली गोष्ट??

गोप - मजेशीर आहे खरी... पण...

१६९९ - ...... काय??

गोप - भुकंपानंतर त्या अमुक्त चैतन्यशक्तींचे काय झाले??

१६९९ - अर्थातच... त्या शक्ती भुकंपाच्या जबरदस्त धक्यामुळे अवकाशात गेल्या...

गोप - आणि त्याच पद्धतीने....

१६९९ - ?????????

गोप - प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून त्या काही शतकांनी पुन्हा पृथ्वीवर धडकतील नाही????

हादरलेली १६९९ थिजलेल्या नजरेने ४६३४४ कडे पाहात होती...

गुलमोहर: 

खुप छान
बेफिकीरजी खरंच कांदबरीचे प्रत्येक भाग हे विविध विषय व विचारांशी निगडीत आहेत . त्यामुळे वाचताना खुप मज्जा येते . तसेच आज ज्या सुखसोयी आपण उपभोगत आहोत त्यासाठी पुवीँच्या मानवाला ही अशाप्रकारेच परिस्थितीशी झटावे लागले असेल याचे जाणीव आंम्हाला तुम्ही या भागातून करून दिली त्याबद्दल आभारी आहे . पुढील भागाची वाट पाहते . पु .भा . शुभेच्छा .

छान झाला हा ही भाग... मस्तच... कारणमीमांसा अतिशय उत्तम आहे प्रत्येक घटनेची.. खुपच छान.... पु.ले.शु.

संपूर्ण पृथ्वी वाय-फाय असल्यामुळे व ती यंत्रणा कक्षेबाहेरील उपग्रहाकडून कार्यान्वित असल्यामुळे एका न मोडलेल्या संगणकावर काही विचित्र संदेश आलेले दिसले. उघड होते की गूगल, याहू, रेडिफ या यंत्रणा केव्हाच नष्ट झालेल्या होत्या. ते संदेश डिकोड करणारा एकही माणूस या समाजात नसला तरी एक गोष्ट करत येत होती ती म्हणजे त्या संदेशांना प्रतिसाद देणे!

एका माणसाने इंग्लीशमध्ये पाठवलेल्या संदेशाला एक सेकंदही झाला नसेल तोच......

...... अफाट वेगाने तेथे पोत्याने संदेश येऊन पडायला लागले. मुख्य म्हणजे ते संदेश इंग्लीशमध्येच होते.

आणि त्यातूनच हा शोध लागला. उपग्रहावरील अजूनही कार्यान्वित असलेल्या यंत्रणेमुळे हे समजले की एकंदर पृथ्वीवर अजून लाखो लोक जिवंत आहेत.

या लोकांचे एकमेकांशी संदेशवहन आता संगणकावरच होऊ लागले. पंधरा वर्षांपुर्वी झालेल्या भीषण युद्धाच्या आठवणी काढून लोक दु:ख व्यक्त करू लागले तर कुणीतरी भेटले याचा आनंदही व्यक्त करू लागले.

पण या १५ वर्षात "वीज" कोण पुरवत होत ?

MSEB का? हि हि हि हि

नाही संगणक चालत होते म्हणून विचारलं

बेफिकीर,
एकदम भारी........

--------------

पण या १५ वर्षात "वीज" कोण पुरवत होत ?>> सौर उर्जा................

अरे खरच की, वीज पुरवावी लागेल हे लक्षात नाही राहिले. आता थातुर मातुर दुरुस्ती करणे योग्य नाही. चूक तशीच कंटिन्यू करतो, कृपया वाचकांनी / प्रतिसादकांनी एवढे मोठ्या मनाने स्वीकारावे.

सर्वांचा मनापासून आभारी आहे.

चांगभलं व बकासूर, आपल्या दोघांचा विशेष आभारी आहे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

भुषणराव,
खुप वाईट वाटल, मानवाने मानवाचि केलेलि हानि, आणि परत एकदा चागले जिवन जगल्यावर देखिल परत कलह, भाडण आणि सर्व काहि.
माणव कधिच सुधरणार नाहि का??????

विज कशि मिळालि हा प्रश्न मनात आलाच होता.

अप्रतिम.. भन्नाट कल्पनाविस्तार केला आहेत.. आणि तो प्रचंड वास्तवदर्शी आहे.

आजपर्यंत तुम्ही केलेल्यातले सर्वात छान लिखाण..

पु. ले. शु.

अफाट कल्पनाशक्ती !! मस्तच जमला हा भाग. हे खरेच फार दुर नाही सद्य परिस्थिती पहाता. वाचायला छान वाट्ते पण खरच असे झाले तर ?

मस्तच.. खास करून 'आत्मा' ही संकल्पना लॉ ऑफ कन्झर्वेशन मधे बसवलेली जास्त आवडली आणि पट्ली..

बेफिकीरजी,
तुमच्या सर्व कादमबरी वाचल्या. प्रतिसाद द्यावाच लागत आहे.
कृपया कला आणि बनाही लवकर पूर्ण करा ना...

कामाच्या व्यापामुळे हा भाग आज वाचता आला. बेफिकीरजी अभिनंदन भाग खूपच जमला आहे. प्रतिक्रीया मधील चांगभल चांगभल यांची शंका वाचून खूपदा ओठ खाली वर केले . त्यांची शंका तशी मस्तच होती. असो .
पुढील भागासाठी शुभेच्छा !

मस्तच Happy

खरंच... अफाट कल्पनाशक्तीचा पुरेपूर वापर करुन मनोरंजक आणि त्याचवेळी विचाराला चालना तसेच वेगळी दिशा देणारी कादंबरी...

तीन भाग एकत्र वाचण्याची मजा काही वेगळीच...

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत... Happy

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...............
बेफिकीरजी लवकर येऊ देत ना ...

Pages