कोकण भटकंती बाईकवरून भाग-५

Submitted by आशुचँप on 26 December, 2010 - 10:48

http://www.maayboli.com/node/22012 भाग-४

दिवस पाचवा -
आज आमच्यापुढे गहन प्रश्न होता. रत्नागिरीला जावे अथवा नाही. आधीच्या प्लॅननुसार आम्ही रत्नागिरीजवळील रत्नदुर्ग आणि त्याच्या थोड्या पुढे असलेला देवगडपासून मोहिमेची सांगता करणार होतो. पण मध्ये माझ्या आजारपणामुळे निम्मा दिवस वाया गेलेला. त्यामुळे आता काय करावे हा विचार डोक्याला शिणवत होता.
रत्नागिरीला जायचे तर एवढ्या लांब जाऊन फक्त एकच किल्ला मिळणार होता आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे दुसरे दिवशी रत्नागिरी ते पुणे असा जवळपास साडेतीनशे किमी हून अधिक अंतर कापावे लागणार होते. आधीच आमचे सहाशे-सातशे किमी बाईकिंग झाले होते त्यावर अजून म्हणजे हालत होती.
एकच होते की रत्नागिरीला एकांच्या ओळखीने फुकट राहण्याची सोय होणार होती.
शेवटी काय ते हेदवीला जाऊन ठरवू असे म्हणत निघालो. कालचे ते हॉटेल मस्त होते त्यामुळे तिथेच जाऊन भरपेट नाष्टा केला आणि हेदवीच्या दिशेने सुटलो...
हेदवीची ब्राम्हणघळ खूप प्रसिद्ध आहे पण नेमके आम्ही चुकीच्या वेळी गेलो त्यामुळे जिथे भरतीच्या वेळी उभे राहणे पण मुश्किल होते तिथे आम्ही छानपैकी घळीत डोकावून पहात होतो.

हेदवीचा समुद्रकिनारा

थोडी निराशा झालीच पण तिथल्याच एका हॉटेलमध्ये असे कळले की जयगड फारसा लांब नाही आणि आत्ता निघून दुपारपर्यंत येणे शक्य आहे. अरे वा, मग बोंबलत रत्नागिरीला जाण्यापेक्षा परत गुहागरला मुक्काम करता येणे शक्य होते आणि दुसरे दिवशी गुहागर-पुणे हे अडीशेच किमी राहणार होते. हे एकदम बेस्ट झाले.
आज माझा टर्न होता गाडी चालविण्याचा. सुरुवातीला चांगला रस्ता लागला त्यामुळे खुश होतो पण नंतर त्या प्रचंड चढ उतारवाल्या रस्त्यांनी जो हिसका दाखवला तो म्हणजे हैराण करणारा होता.
प्रचंड वळणे आणि एकदा तीव्र उतार की थोड्या वेळाने एकदम तीव्र चढ असे करत तडफडत नरवणमार्गे कुडली गाव गाठले. गावातला उतार इतका तीव्र होता की दोन्ही ब्रेक दाबूनच गाडी चालावावी लागत होती. गावातल्या धक्क्यापाशी पोचलो आणि खऱ्या अर्थाने धक्का बसला तिथली होडी पाहून...आधीच तिथे सहा-सात बाईकवाले उभे होते आणि ती होडी म्हणण्यापेक्षा होडके या सगळ्यांना घेऊन जायला किती फेऱ्या मारणार या विचारात पडलो. त्याहून धक्का बसला म्हणजे त्या बोटवाल्या कोकण्याने सगळ्या गाड्या एकदम घेऊन जायचे जाहीर केले तेव्हा. आणि केले की त्याने. तो आणि मदतीला एक जण अशा दोघांनी दे दणादण सगळ्या बाईक्स भराभर त्या होडक्यात बसवल्या आणि वर प्रवासीपण घुसवले.

होडक्यात बाईक चढवताना अमेय आणि कोकणी बोटवाला...

ते होडके म्हणजे दुचाकी गाड्यांचे शोरूमच झाले होते. आमच्या युनिकॉर्नबरोबर, यामाहा, हिरो-होंडा, बजाज पल्सर अशा अनेकाविध गाड्या तिथे सुखाने बसल्या होत्या. माझी बाईक अगदीच कडेला उभी केल्याने मी आणि अमेयने सर्व ताकत लाऊन धरून ठेवली होती.
तो कोकणी म्हणजे एक अस्सल नमुना होता. एकतर अखंड त्याची टकळी सुरू होती आणि एकेकाची तो जे खेचत होता ते ऐकून सॉलीड धमाल येत होती.
पलिकडच्या काठावर उतरल्यानंतर तितक्याच वेगाने त्याने सगळ्या गाड्या अनलोड केल्या आणि पुढच्या फेरीसाठी रवाना झाला.
इथून पुढे जयगडपर्यंतचा प्रवास हा एक लक्षात ठेवण्यासारखा होता. मला अजूनही जसाच्या तसा तो भाग आठवतो, चित्रात जपून ठेवल्यासारखा...
बराच चढ चढून आल्यावर आम्ही डोंगरमाथ्यावर पोचलो आणि तिथून एक रस्ता सरळ रेषेत पार अगदी क्षितीजापर्यंत गेला होता. असा रस्ता कोकणात अगदीच दुर्मिळ...त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुकलेली झाडी होती आणि त्या पिवळसर पार्श्वभूमीवर दुपारच्या उन्हात तो वैराण रस्ता संपता संपत नव्हता. त्या भागातच कंटाळा इतका ठासून भरला होता की भरधाव गाडी चालवतानाही मला जांभया येत होत्या...असो.
जयगडला पोचलो तेव्हा उन्ह चांगलेच वर आले होते आणि घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या.
जयगडबद्दल मी फारश्या अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. पण किल्ल्यात बघण्यासारखे बरेच काही आहे. उन्हाने वैतागलो होतो त्यामुळे फारसा वेळ न घालवता पटापट फोटो मारून निघायचे असा बेत होता पण त्या किल्ल्यात एवढे गुंगलो की वेळ किती गेला ते कळलेच नाही.

किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार

खंदकाकडे जाणाऱ्य मार्गावरील द्वार

खंदक
From Konkan Trip

जयगडचा इतिहास फारसा नाही. पण शास्त्री नदीच्या मुखाशी वसलेला किल्ला आहे मात्र देखणा. हा किल्ला बांधताना बुरुज सारखे ढासळत होते त्यामुळे जयबा नावाच्या एका सैनिकाने आपणहून बांधकामाच्याखाली बलिदान दिले. त्यामुळे किल्ल्याचे नाव जयगड ठेवण्यात आले अशी वदंता आहे. किल्ल्यात त्या जयबाची घुमटीपण आहे.
कालांतराने या किल्ल्याचा शासकीय विश्रामगृह म्हणूनपण वापर झाला.

एका तीन मजली इमारतीचे अवशेष, मारूती मंदीर, लाईट हाऊस सारखी एक इमारत, भक्कम तटबंदी असे बरेच काही कॅमेराच्या डोळ्याखाली घालून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.

पुन्हा एकदा त्या कंटाळवाण्या मार्गाने खाडी गाठली. तो कोकणी होताच स्वागताला. पुन्हा एकदा त्या धोकादायक वाटणाऱ्या होडक्यातून आमची गाडी सुखरूप पैलतीरी नेली आणि हेदवी गाठले.
त्या हॉटेलच्या मालकांना आश्चर्य वाटले. कारण आम्ही जाताना अंदाज केला होता की तीनपर्यंत परत येता येईल म्हणून. आणि बरोबर तीनला एक मिनिट कमी असतान त्यांच्या हॉटेलपाशी जाऊन हॉर्न दिला.
मग त्यांच्याच बागेत जरा फोटोसेशन केले.

From Konkan Trip

या आख्ख्या कोकणप्रवासात किल्ले हेच उद्दीष्ट ठेवल्याने समुद्रकिनारी डुंबायला वेळच मिळाला नव्हता. त्यामुळे त्याची भरपाई करण्यासाठी गुहागर गाठले. भक्तनिवासाची खोली दुसरे दिवशीपर्यंत बुक करून फक्त कॅमरा आणि कपडे घेऊन गुहागरचा किनारा गाठला.
आणि गेल्या गेल्याच असल्या फ्रेम्स मिळायला लागल्या की बास.

शेवटी सूर्यास्त झाल्यावर आम्ही कॅमेरा बाजूला ठेवला आणि डोळे लाल होईपर्यंत मनसोक्त पाण्यात डुंबलो.
पाच दिवसाचा धावपळीचा, सततच्या बाईकिंगचा, वेळी-अवेळी खाण्याचा शीण भरून निघत होता. ते समुद्रस्नान इतके सुखद होते की भुकेची जाणीव झाली नसती तर तिथेच डुंबत राहीलो असतो रात्र होईपर्यंत.
आंघोळी उरकून पुन्हा एकदा काकांच्या हॉटेलवर धाड टाकली. आम्हाला बघताच त्यांनी लगबगीने आत जाऊन सुचना दिल्या बहुदा.
अरे ते कालचे बकासुर आलेत. या टेबलला दोघांची सर्वि्स लावा. Happy
आणि आम्ही त्यांची निराशा केली नाही. मनसोक्त समुद्रस्नानामुळे तर पोटात आगडोंब उसळला होता. त्यामुळे भरभक्कम बील होण्याइतके हादडलेच शिवाय जाताना तिथे विकायला ठेवलेले कोकम आगळ, कँडी, मँगो कँडी असा कोकणी मेवापण खरेदी केला.
आमच्यासारखे ग्राहक रोज यावेत असे काकांनी नक्कीच गाऱ्हाणे घातले असणार तिथल्या दैवताला.
घरी फोन करून उद्या येत असल्याची सुवार्ता कळवली आणि एका सुरेख ट्रेकची तितकीच सुरेख सांगता झाल्याच्या आनंदात अंग टाकले.

==================================================================
खांदेरी-उंदेरीला झालेली निराशा आणि माझे पोटाचे दुखणे या गोष्टी वगळता आमची कोकण मोहीम प्रमाणापलिकडे यशस्वी झाली. सगळ्यात आधी लिहील्याप्रमाणे माझ्या होंडा युनिकॉर्नचा त्यात मोलाचा वाटा होता. निर्जन ठिकाणी गाडीला काही झाले असते तर आमच्यासारखे हाल कोणाचे नसते. या प्रवासात अनेक माणसे स्वभावाची माणसे भेटली, निसर्गाचे घडीघडी बदलणारे रूप पाहिले, सूर्योदय-सूर्यास्ताचे मनोहारी रंग अनुभवले आणि समुद्र..तो तर आमचा सखा झालाय. त्या रत्नाकराने तर त्याची किती म्हणून रुपे दाखवायची. प्रत्येक ठिकाणचा समुद्र वेगळा...आणि प्रत्येक गोष्ट कॅमेरात टिपणे हे केवळ अशक्यप्राय होते पण मेंदूच्या हार्डडिस्क मध्ये सेव्ह झालेली आठवचित्रे अजूनही आमच्या सोबत आहेत आणि सोबत राहतील...

समाप्त.....

गुलमोहर: 

खूप महिन्यांनी हा धागा वर आला Happy

शाहिर -
ब्राह्मणघळीत भरतीच्या वेळी खूप उंच लाटा येतात. त्यावेळचे दृश्य बघण्यासारखे असते.

Pages