किती चाटणार भारतपुत्रा? : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 26 November, 2010 - 09:09

किती चाटणार भारतपुत्रा? : नागपुरी तडका

कृष्णावाणी राहुल आणि, म्हणे सोनिया भारतमाय
किती चाटणे आणखी रे, भारतपुत्रा असेच पाय? ...!!

जन्म गेला पूर्वजांचा, करता करता खुशामतगिरी
गुलाम तेही मिरवत होते, चप्पल घेऊन डोक्यावरी
दास्यत्वाची जनुकं अजुनी, काही केल्या मरत नाही
आनुवंशिकतेची देण अशी की, लाळघोटणे सरत नाही
चापलुशीम्होरं आता, कसले संस्कार, कसलं काय ...!!

राजेशाहीची भलावण, रक्तामासात भिनलेली
भाटगिरीच करता करता, बुद्धी सारी झिंगलेली
कणा आणि मणकाही, उत्क्रांतीमध्ये गळून गेला
स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला
लोकशाहीचे गुणधर्म रक्तात काही मिसळत नाय ...!!

शंभर कोटी जनतेमध्ये, राष्ट्रनायक दिसत नाही
’ते’ घराणे सोडून अन्य, कुणीच लायक भासत नाही
असेच आमचे गणराज्य, अशीच आमची लोकशाही
भगत-बापूंना माहीत नव्हते, अर्थ निघणार असाही
मुजोर सारे अभय झाले, खाण्याकरिता मलईसाय ...!!

गंगाधर मुटे
......*.......*......*......*......*......*.......*......*......*......
इसम = व्यक्ती

गुलमोहर: 

<<अमूक एक मुलगा हा अमूक याचा मुलगा आहे, म्हणून त्याला संधी नाकारणं... यात लोकशाहीचे धिम्डवडे निघतात.>>

प्रश्न संधी नाकरण्याचा नाहीये. यांची योग्यता, पात्रता, कर्तृत्व काय? असा प्रश्न आहे.
कर्तृत्व शून्य असूनही अमक्याच्या मुलगा आहे, ही काही योग्यता असू शकत नाही.

सोनियाजींना भारतमाता आणि राहुलना कृष्ण म्हणताना
असे म्हणणार्‍यांनी त्यांच्या मध्ये अशी कोणती सर्वोच्च योग्यता बघितली की तशी योग्यता या देशातल्या तमाम जनतेपैकी कोणामध्येच नाही आहे? Happy

तडका आवडला...

कर्तृत्व शून्य असूनही अमक्याच्या मुलगा आहे, ही काही योग्यता असू शकत नाही.
---- त्यांचे कर्तुत्व काहीही असेल (तुम्ही शुन्य समजा), पण जनतेला कुणाला तरी डोक्यावर घ्यायचेच असते... त्यात कर्तुत्वशुन्य असणार्‍यांचा काय दोष?

गांधी (किंवा पवार, ठाकरे, शिंदे, राणे, भुजबळ, चौटाला, रेड्डी, नाईक, चव्हाण.... अनेक नावे मिळतील) घराण्यात जन्म घेतला आहे हा त्यांचा दोष कसा असेल? लोकशाहीत सर्वांना समान संधी मिळायला नको कां?

मुटेजी, अगदी बरोबर आहे तुमच. वाजपेयी सरकार नंतर जेव्हा पहिल्यांदा कॉन्ग्रेस सरकार आले आणि सोनियाने पंतप्रधान पदाला नकार दिला तेव्हा सर्वांनी संसदेत मनधरणी करणारी जी भाषणे केली ती पाहून तर अगदी किव येत होती. नविन प्रमाणेच अगदी जुने जाणते लोक देखील यात मागे नव्हते. आपके नेतृत्व मे मातृत्व है, इ. Sad
त्यातला एकही जण असे नाही म्हणू शकला की ज्येष्ठतेनुसार व पात्रतेनुसार अमुक एका माणसाला आम्ही नेता म्हणुन पाठिंबा देत आहोत. हे असे घडले राजीव नंतरच्या निवडणुकीत नरसिंहरावांच्या बाबतीत.
बाकी इतर वेळी आनंदच आहे. आणि पुढे काय होणार आहे ते दिसतेच आहे.
मला आजवरच्या इतिहासात तिनच लोक घराणेशाहीला अपवाद असुनदेखील बराच काळ सत्तेवर राहिलेले दिसतात. शास्त्री, राव आणि वाजपेयी.

तशी घराणेशाही सर्वत्रच पसरते आहे
शेवटी नविन उमेदवार/नेता हा कुठल्याही घराण्यातला का असेना, इथं जनतेनं ठरवायचं आहे कि कुणाचं कर्तुत्व किती आहे,त्यांनी आता पर्यंत काय काम केल आहे ते?
पण शेवटी पैसा ओतुन अशा घराण्यांकडुन त्यांना हवं ते करु द्यायच कि नाही हे देखील जनतेवरच अवलंबुन आहे
तसा हा आता प्रश्न खुप गुंतागुंतीचा आणि अवघड वाटतोय मला ...

Pages