"या माझ्या बिछान्यावरील उशीला सुतळ्या बांधून व तीत नारळाच्या करवंट्या कोंबून एका मदनिकेचा आकार देण्यात तुम्हा तिघा सहाध्यायींचा जो माझी नीती भ्रष्ट करण्याचा कुटिल हेतू आहे तो मी साध्य होऊ देणार नाही"
फुल्ल चढलेल्या अवस्थेतही आत्म्याने ते वाक्य टाकले आणि दिल्याला समजले.
आत्मानंद ठोंबरे आता दिड क्वार्टर 'न चढण्याच्या' पातळीला पोचलेले आहेत.
तिसर्या वर्षाची फायनल एक्झॅम तोंडावर असतानाही आत्मा निवांत पीत होता. अख्खं कॉलेज अभ्यासाच्या वातावरणात गुंगलेलं होतं!
त्या दिवसानंतर एक दिवस शेखरने दिल्याचा भर आंगनमध्ये मार खाल्ला आणि वनदास व दीपा बोरगे यांचे प्रेम 'व्हीलनलेस' या पातळीला पोचले.
ही परिक्षा झाल्यानंतर आणखीन एक ट्रेक काढायचा ठरत होते व त्यात अलका देव 'यांना' आणण्याची जबाबदारी दिलीप, अशोक व वनदास या तिघांसकटच सुरेखा, रशिदा व दीपा 'यांनी'ही शिरावर घेतलेली होती.
धनराज गुणे आता कॉलेजला येत असला तरी दिल्याच्या गॅन्गपैकी कुणालाही पाहताच मारक्या म्हशीसारखा चेहरा करत होता. मात्र परिक्षा जवळ आलेली असल्याने त्याचेही प्राधान्य अभ्यासालाच होते. मात्र साजिद शेख आता त्याच्याशी एक शब्द बोलत नव्हता व एकेकटाच वावरत होता.
वनदासच्या घरी आता त्याच्या आईला अत्यंत सन्मानपुर्वक वागवले जात होते. याचे श्रेय मुक्तकंठाने आत्म्याला देऊन वनदास आत्म्याशी कधीही मैत्री तोडायची नाही या टप्यावर आलेला होता.
आत्मा अजूनही कधीकधी आईच्या आठवणीने व्याकुळ व्हायचा पण जाड चष्म्याआड अश्रू लपवायचा!
अशोक आणि रशिदा आता बिनदिक्कत सारसबागेबाहेरच्या आनंद भेळवाल्याकडे आठवड्यातून किमान तीन वेळा भेटायचे. रशिदा आयुष्यात आल्यापासून अशोकने जाणीवपुर्वक प्रयत्न करून भरपूर व्यायाम करून वजन बरेच घटवले होते. पहिल्या वर्षीचा अशोक आणि आत्ताचा अशोक यात खूपच फरक होता.
भर उन्हाळ्याचे दिवस असल्याने आत्मा हल्ली व्होडकाच पसंत करायचा. आंगनला जायला त्याला आता परवानगी होती. सगळ्यांच्या मनी ऑर्डर्स व्यवस्थित येत होत्या. सुरेखा अधून मधून कॉलेजला येऊन दिल्याला भेटून जायची. दीपा बोरगे आणि वन्या तर दिवसभर एकमेकांच्या समोर असायचेच. त्यात पुन्हा कॅन्टीनला चहा प्यायला बसायचे अन त्यात तास घालवायचे. संपूर्ण कॉलेजमध्ये आता 'या दोघांचे जुळलेले आहे' हे मान्य झालेले होते.
अलका देव जरी अजूनही आत्म्याकडे पाह्न फक्त हसतच असली तरी वन्याच्या आणि सुरेखाच्या सांगण्यावरून दीपा आता अलकाशी खूपच जवळीक करायला लागली होती. त्यातील हेतू म्हणजे आत्म्याबद्दल तिचे मन वळवणे व आत्म्याला मैत्रीण मिळवून देणे!
त्यात सहाय्य व्हावे म्हणून अशोक बळजबरीने आत्म्याला स्वतःबरोबर व्यायाम करायला लावायचा.
तीन महिन्यातच आत्म्यामध्ये काही सुखद फरक दिसू लागले होते. पडलेले खांदे जरा वर उचलले गेले होते. चालण्याची लकब बदलली होती. मान ताठ राहात होती. हळूहळू दंडांच्या मसल्सचे गोळे त्याला स्वतःलाच जाणवायला लागले होते. व्यायामाच्या पहिल्या दिवशी त्याने खरे तर जालीम नकार दिला होता. पण दिल्याच्या भीतीने त्याने काही अचाट विनोदी हालचाली करत व्यायाम सुरू केला. पहिले सहा, सात दिवस जाम अंग दुखत होते, दम लागत होता. पण नंतर जाणवायला लागले. हे असे केले की दिवसभर उत्साह राहतोय अंगात! भूक चांगली लागतीय! मग किंचित गंभीरपणे व्यायाम सुरू झाला. आणि महिन्याभरातच आत्म्याला फरक जाणवला. आपल्या अंगात आता खूपच उत्साह असतो, आपण ताठ चालत आहोत वगैरे वगैरे! मात्र त्याला उगीचच वाटायचे की आपण आता एखाद्या बॉडी बिल्डरसारखे दिसत असू! त्यामुळे तो मुद्दाम जरा छाती पुढे काढून, मान वर करून वगैरे चालू लागला होता.
त्यामुळे जरा विनोदीच दिसत असला तरीही शरीरात एक पुरुषी लकब मात्र येऊ लागली होती. आणि व्यायामाचा परिणाम म्हणून दारू अधिक घ्यायला लागला होता तो! कारण हॅन्ग ओव्हरचा परिणाम व्यायाम वगैरे केल्यावर जरा कमी वाटू लागायचा.
आणि आता रूम नंबर २१४ गेले तीन महिने अगदी पहिल्या वर्षासारखीच रसरशीत झालेली होती.
आजही आत्मा एकटाच आंगनला जाऊन परत यायच्या आधी अश्क्या आणि वन्याने त्याच्या उशीला एका स्त्री सारखा आकार देऊन ठेवलेला होता. पण आत्म्याचे ते वाक्य ऐकून मात्र त्यांचाच पोपट झाला कारण त्यांना वाटले आत्मा त्या उशीकडे निदान दोन, तीन सेकंद तरी आकर्षणाने बघेल आणि प्रकार लक्षात आला की काही न बोलता उशी फेकून देऊन झोपून जाईल.
अशोक - तुम्हाला आता अशा प्रकारचे आकार बिछान्यात असण्याची सवय करायला हवी...
आत्मा - का??
अशोक - कारण अभियांत्रिकीतून उत्तीर्ण झाल्यावर विवाह बंधनात अडकायचे असते..
आत्मा - ते तर तुम्हालाही अडकायचंय, मग तुम्ही असे आकार का ठेवत नाही स्वतःजवळ?
अशोक - आम्ही तशा आकारांना प्रत्यक्ष स्वरुपात मधूनमधून भेटतो म्हणून..
आत्मा - तरीच....
अशोक - .. काय तरीच???
आत्मा - हल्ली सुवर्णा मॅडम सही करायला वाकल्या तरी तुम्ही सभ्यपणे इतरत्र पाहता..
अशोक - तुम्ही कुठे पाहता मग??
आत्मा - हे सर्व विश्व त्या नियंत्याने बनवलेले आहे. तो जे दाखवेल ते बघायचे...
अशोक - आज काय प्राशन केलंत??
आत्मा - व्होडका नावाचं एक रंगहीन द्रव्य...
अशोक - किती प्रमाणात??
आत्मा - प्रमाण आपण मोजू नये... आंगनवाला स्वतःच मोजतो...
अशोक - आणि धुम्रकांड्या किती ओढल्यात?
आत्मा - जेवढ्या गार वार्यात पेटू शकल्या तेवढ्या..
अशोक - तुम्ही विवाहानंतरही असेच बोलाल बहुधा...
आत्मा - कसे??
अशोक - प्रियेने जेवढी वस्त्रे दूर करू दिली तेवढी मी होऊ दिली.. तिने जितके जवळ येऊ दिले तितका मी जवळ गेलो.. आणि मी किती चुंबने घेतली हे तिनेच मोजले.. आपण कशाला मोजायचे??
आत्मा - बरोबर बोलता आहात..
अशोक - अशाने कसे व्हायचे??
आत्मा - काय कसे व्हायचे?
अशोक - वहिनींचे?
आत्मा - का?
अशोक - स्त्रीला कसं फुलवत फुलवत सर्वोच्च सुखाच्या बिंदूला न्यायला लागतं...
आत्मा - नेऊ जमेल तसं... आपण निद्रिस्त व्हा.. सर्वच काळज्या आपण वाहणे योग्य नाही...
अशोक - एक सहाध्यायी म्हणून ती चिंता माझ्या मनाला व्यापते..
आत्मा - माझा विवाह होईल तेव्हा आपल्या दोघांचे सहाध्यायी हे नाते उरलेले नसेल..
अशोक - मग कसले नाते असेल??
आत्मा - एक जुना मित्र...
अशोक - माझ्यामते अशा वेळेस वहिनींना मन मोकळे करावेसे वाटेल..
आत्मा - करतील त्या.. आपण भविष्यातील चिंता व्यर्थ वाहू नयेत..
अशोक - त्यावेळेस तुमचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणून मी एक चांगला सल्लागार ठरू शकेन..
आत्मा - सल्लागार? गरम विषयात गार सल्ले कुणाला हवेत??
अशोक - पण गरम विषय तुमच्यामुळे गार झाला तर?
आत्मा - गार होणार नाही... मी कामशास्त्रातील यच्चयावत ज्ञान मिळवलेलं आहे...
अशोक - कुठून??
आत्मा - निसर्गाकडून..
अशोक - असं?? मग सांगा बरं?? प्रेयसी समोर उभी असताना काय करावे??
आत्मा - आपण कुठे असणे अभिप्रेत आहे??
अशोक - आपण पलंगावर बसलो आहोत, ती लाल साडी नेसून समोर आली आहे, तिच्या हातात केशर घातलेल्या गरम दुधाचा ग्लास आहे आणि ती सलज्ज नजरेने जमीनीकडे बघत आहे..
आत्मा - अंतर किती आहे दोघांमधील??
अशोक - साधारण दोन फूट...
आत्मा - कंबरेला विळखा घालावा...
अशोक - कुणी??
आत्म - आपण..
अशोक - दूध सांडले तर??
आत्मा - व्हिस्की प्यायलेली असताना दूध कुणाला हवंय??
अशोक - व्हिस्की? आपण अशा मधूर क्षणी मद्यप्राशन करून तिला सामोरे जाणार?
आत्मा - माणसाला जगायला चारच गोष्टी लागतात, हवा, पाणी, मद्य व धुम्रकांडी!
अशोक - आणि तिने विळखा घालूच दिला नाही तर??
आत्मा - विळखा घालू न देण्याचे काही तर्कशास्त्रीयदृष्ट्या योग्य असे कारण आहे काय?
अशोक - अनेक आहेत...
आत्मा - विशद करावीत..
अशोक - त्यांच्या नाजूक घ्राणेंद्रियांना आपल्या मद्योपासनेची तिरस्करणीय जाणीव होऊन त्यांनी दूर जाणे, आपल्या वासनेने बरबटलेल्या हातांची त्यांना किळस येणे, अचानक शिंक येणे, त्यांची कंबर एका सर्वसाधारण चणीच्या पुरुषाच्या दोन हातात मावण्यासारखी नसणे, मधल्या कोणत्याही स्टेप्स न घेता पतीराज थेट कंबरेवर धडकले आहेत हे पाहून त्यांना सांस्कृतिक धक्का बसणे, आपल्या जाड चष्म्यातून दिसणारे आपले बटबटीत डोळे पाहून त्यांना तो मधूचंद्र न वाटता जबरी संभोगाचा प्रकार वाटणे वगैरे!
आत्मा - तसे झाल्यास मी त्यांना कक्षातून तडीपार करेन
अशोक - आणि???
आत्मा - आणि इतर काही पर्याय उपलब्ध आहेत का यावर विचार करेन..
अशोक - जसे?
आत्मा - जसे.. बहीण, मैत्रीण..
अशोक - आपण अत्यंत भ्रष्ट मनाचे युवक आहात...
आत्मा - मग आपल्याला काय वाटले?? त्यावेळेस मी आपल्याला बोलवेन?? उशीला आकार द्यायला??
वन्या फस्सकन हसल्यामुळे हा संवाद थांबला. बायको रागावून 'कक्षातून' बाहेर गेल्यानंतर उशीत करवंट्या कोंबायला अशोकला बोलावणे हा प्रसंग त्याने व्हिज्युअलाईज केला होता.
एकंदर दिवस मजेत चालले होते.
तिसर्या वर्षाची परिक्षा संपवून सगळे निघाले तसे यावेळेस मात्र सगळ्यांना पहिल्या वर्षीसारखेच दु:ख झाले. त्यात पुन्हा अशोक आणि वन्याला वेगळे दु:खही होतेच. रशिदा आणि दीपाला सारखे सारखे भेटता येणार नाही याचे! आत्म्यालाही मनातून वाटत होते, एकदा शेवटच्या दिवशी अलकाला विचारावे, अक्षयला येतेस का! आणि त्याने खरच विचारलेही!
मुंग्यांनी मेरूपर्वत गिळला तर नाही? सूर्य पश्चिमेला वगैरे तर उगवला नाही??
अलका देव 'हो' म्हणाली 'हो'!
अक्षय हॉटेलच्या फॅमिलीमध्ये याहून अधिक विनोदी प्रेमी युगुल यापुर्वी आले नाही असे यच्चयावत वेटर्सनी मालकाला सांगीतले असणार! अलकाने यापुर्वीही अनेकदा आत्म्याचे बोलणे ऐकले होते. पण तेव्हा तिचे वडीलच आजारी असल्यामुळे तिचे त्याकडे फार लक्ष गेलेले नव्हते. त्यानंतर मात्र बोलण्याची फारशी वेळच आली नव्हती. कधी कॉलेजमध्ये समोर आला तर आत्मा नुसतेच 'नमस्कार' असे म्हणायचा.
आत्मा - आपण... कॉफी घेणार का??
अलका - ..... हं (ऐकू येईल न येईल इतक्या शालीन स्वरात)
आत्मा - अहो... दोन कॉफी द्या... आणि पैसे मी देणार आहे...
अलका - ......
आत्मा - आपल्याला ... क्रोध नाही ना आला?? मी निमंत्रण देण्याचा...
अलका - ... काय?? .. छे छे... क्रोध कसला...
आत्मा - नाही... एका.. तरुण मुलीला असे बोलावणे म्हणजे...
अलका उगाचच लाजली. आत्म्याच्या तुपट भाषेमुळे का होईना, तो आपल्यासमोर वरमतो आहे इतके तरी तिला समजले.
आत्मा - मला... आता जावे लागेल जालन्याला..
अलका - हं.. कधी येणार??
आत्मा - पुढील शैक्षणिक वर्ष सुरू झाल्या झाल्या...किंवा आधीच थोडा...
अलका - तू असा का बोलतोस??
आत्मा - असा म्हणजे??
अलका - शैक्षणिक वर्ष, निमंत्रण, क्रोध वगैरे??
आत्मा - तसे संस्कार आहेत..
अलका - तू मला 'तू'च म्हण..
आत्मा - छे छे... तुम्हाला 'तू' म्हणायला जिव्हा रेटेल तरी का?
अलका - ... काय?????
आत्मा - नाही म्हणता येणार... विवाहानंतर पाहू...
अणुबॉम्बच फुटला अक्षयमध्ये!
दोन फुटांवर हे येडं बसलेलं असल्यामुळे धड अलकाला लाजता येईना, धड त्या वाक्याकडे दुर्लक्ष केलंय असं दाखवता येईना की धड त्यावर काही बोलता येईना! ती फ्रीझ होऊन टेबलकडे बघत बसली.
अनेक क्षण काहीच न बोलण्यात गेले तेव्हा कुठे घनचक्करला समजलं की आपण नाही ते बोलून गेलो. ही आपल्याशी विवाह करेल असे आपण समजणे चुकीचे आहे हे त्याला आता कळले. आता सावरून कसे घ्यायचे?? वेटरने वाचवले.
आत्मा - ... कॉफी... आली...
अलकाने निमूटपणे एक कप हातात घेतला. अजूनही त्या मगाचच्या वाक्याचे विचित्र सावट होते त्या भेटीवर!
आत्म्याला मात्र सावरून घ्यावेच लागणार होते.
आत्मा - म्हणजे... तुमच्या विवाहानंतर पाहू...
अलका - ... म्हणजे??
आत्मा - .. तुमचा विवाह वगैरे एकदा पार पडला की... मग बघता येईल.. काय हाक मारायची ते...
अलकाला घोळ लक्षात आला होता की आत्म्या सावरून घ्यायचा प्रयत्न करत आहे.
आता ती जराशी थट्टेखोर मूडमध्ये आली.
अलका - माझ्या लग्नानंतर तुझा प्रश्न कुठे येतो मला हाक मारण्याचा??
आत्मा - तेही आहेच...
अलका - की तुझ्या लग्नाबाबत म्हणालास???
आत्मा - छे छे.. माझा कसला विवाह??
अलका - अय्या लग्न नाही करणार??
आत्मा - लग्न करण्यासाठी दोन व्यक्ती लागतात... पती व पत्नी..
फस्सकन हसू आले होते खरे तर अलकाला! पण मुलींना हसू गालात दाबण्याचे कौशल्य उपजतच असते.
अलका - मग??
आत्मा - समजा मी पती झालो...
आता मात्र अलका खरच हासली. इतक्या कमी अंतरावर असं चांदणं विखुरलेलं पाहून आत्मा जरा भारावलाच!
आत्मा - ... तर... एक पत्नी नको का??
अलका - ... खरंय...
आत्मा - ... तुम्ही हासलात की छान दिसता...
आत्मा सुटलाच होता.
मिश्कीलपणे आत्म्याकडे पाहात अलकाने विचारले..
अलका - म्हणजे एरवी नाही दिसत??
आत्मा - ... नाही नाही.. तसे नाही... अधिक खुलता असे म्हणायचे होते...
अलका - तुला... कुणी मुलगी नाही आवडत??
आत्मा - सगळ्याच आवडतात..
अलका - काय?????
आत्मा - म्हणजे... आपण कशा अर्थाने म्हणताय??
अलका - तशा...
आत्मा - तशा अर्थाने आवडते एक.. अशा अर्थाने सगळ्याच आवडतात...
अलका - अशा म्हणजे??
आत्मा - म्हणजे... एक सहाध्यायी... विद्यार्थीनी.. भगिनीस्वरुपी...
अलका - चच.. तसं विचारतीय का मी??
आत्मा - तेच म्हंटलं.. असं कसं विचारलंत...
अलका - .....कोण आवडते??
आयुष्यात कधीही धाडस न केलेल्या आत्म्याने सर्व पितरांची, बुवांची आणि स्वतःतील एका शुद्ध आत्म्याची त्रिवार माफीमागून ते धाडस केले...
आत्मा - ... तुम्ही...
खटकन मान फिरवली अलकाने लाजून! आता ती लाजतीय म्हणजे तिला हा प्रस्ताव मान्य आहे की आपल्याला हासतीय हेच आत्म्याला समजेना! आता बौद्धिक घ्यायची वेळ निर्माण झालेली आहे इतकेच त्याला जाणवले.
त्याच्या शरीरातील सर्व रक्त डोळ्यात आणि तोंडात गोळा झालं होतं! अंग बधीर पडाव तसं तिच्याकडे पाहात म्हणाला..
आत्मा - खरे तर... खरे तर तुम्हाला अनेक गोष्टी सांगायच्या आहेत...
अलकाने मान कॉफीच्या कपाकडे लावली. आता ती फक्त लक्षपुर्वक ऐकणार होती. तिला कायम असाच मनाने चांगला व साधा मुलगा साथीदार म्हणून हवा होता. व्यक्तीमत्वाच्या बाबतीत तिच्या काहीच अटी नव्हत्या. तिला हेही माहीत होतं की ती स्वतः सामान्य दिसते. पण, आत्मा अगदीच बुळचट बोलायचा. त्यामुळे तिला एकाचवेळेस हसूही येत होतं आणि ऐकायचंही होतं की तो म्हणतो काय??
"एका अत्यंत सोवळ्याच्या घरात माझा जन्म झाला. अत्यंत कडक सोवळे! आजी आजोबा तर भयंकरच कडक! आता माझी आई नाही आहे हे तुम्हाला माहीतच आहे, पण आईसुद्धा कडकच होती. माझे बाबा महाराष्ट्रातील गाजलेले कीर्तनकार! बुवा ठोंबरे! माझी भाषा अशी होण्याचे कारण हेच! की बाबांनी लहानपणापासून मला आणि माझ्या लहान बहिणीला हेच सांगीतले की आपली भाषा नेहमी निर्मळ व पुस्तकी स्वरुपाची असावी. त्याचे कारण असे की बोली भाषेच्या पातळीला आपण पोचलो की हळूहळू ती भाषा शिवराळही व्हायला लागते.
आजवर मी माझ्या आयुष्यात एकाही व्यक्तीला, तिच्या अपरोक्षही शिवी दिलेली नाही.
असल्या संस्कारांमध्ये वाढलेला मी! कायम शाळेत इतरांच्या थट्टेचा विषय व्हायचो. कारण माझी भाषा आणि दुसरे कारण म्हणजे स्वतःच्या व्यक्तीमत्वाकडे कधीही जाणिवपुर्वक न बघणे! कित्येक वर्षे तर मला कपड्यांच्या रंगाबाबत व शैलीबाबतही काहीही मत नव्हते. इकडे महाविद्यालयात आल्यावर लामखडे आणि पवारांमुळे मला समजले की आता आपण अशा अशा प्रकारचे कपडे शिवायला हवेत.
याही तिघांनी माझी मनसोक्त थट्टा केली. अत्यंत धार्मिक विचार, ईशभक्ती आणि कर्तव्यपालन, म्हणजे विद्यार्थीदशेत असताना भरपूर अभ्यास व साधना इतकेच मला जमू शकायचे.
अलका, इथे आल्यानंतर माझ्या विचारांच्या विश्वावर घणाघाती आघात झाले. यात दोष कुणाचाच नाही. माझाही, माझ्यावर झालेल्या संस्कारांचाही, संस्कार करणार्यांचाही किंवा ज्या लोकांनी माझ्या विचार-विश्वावर आघात केले त्यांचाही!
जो तो आपापल्या विचारांप्रमाणे वागू शकत होता व ते स्वातंत्र्य दिले होते वसतीगृहाच्या संस्कृतीने! याच टप्यावर अनेकांमध्ये महत्वाचे बदल होतात तसे माझ्यातही झाले. मुख्य म्हणजे स्त्रीबाबतची माझी भूमिकाच बदलली. वर्गातील किंवा महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थिनी ही आपली भगिनी आहे या माझ्यावरील संस्कारांना तडा गेला. येथे तर मुलगी हा विषय सर्वात अधिक मनोरंजनाचा होता व सर्व दिवसाला व्यापून उरलेला होता. माझ्या नजरेतही बदल घडले. यातही कुणाचाच दोष नाही. हे होतेच, व व्हायचेही होतेच! झाले!
मात्र! या सर्व कालावधीत माझ्यात पडलेला एक अत्यंत महत्वाचा व हीन दर्जाचा फरक म्हणजे मी इतका वाहवत गेलो मी मला मद्यप्राशनाची भयंकर सवय लागली. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, की मी रोज पितो. रोज! अक्षरशः रोज! ही सवय ज्यांच्यामुळे लागली ते आता कित्येक दिवसांत पीतही नाहीत. पण मी? मी संध्याकाळ झाली की प्यायला जातो.
अलका, ही बाब खरे तर अशी आहे की एखाद्या मुलाचे सर्व सामाजिक आयुष्यच त्यामुळे नष्ट व्हावे. पण.. त्याचवेळेस मी अत्यंत चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होत होतो, क्रमांक मिळवत आहे हे तर आपणही जाणताच! त्यामुळे माझे पिणे ही बाब एक चमत्कार ठरू लागली. इतके मद्य प्राशन करणारा मुलगा वर्गात सहावा येतोच कसा! आणि इतक्या चांगल्या घरातील मुलगा वयाच्या फक्त विसाव्या वर्षी इतके मद्य पितो?? सर्वांसाठी मी चमत्कार बनलेलो असतानाच.. माझ्या विचारांवर आणि मनावर मात्र फक्त एकाच गोष्टीची छाया होती.. मद्य... मद्य... आणि मद्य!
अलका.. पिण्याची कारणे शोधायला लागलो मी.. आपल्याला माझा अत्यंत तिरस्कार वाटेल.. पण हे मी खरे सांगतो आहे इतके तरी श्रेय मला द्या व या गोष्टी मी नंतर कधीच केल्या नाहीत व करणारही नाही यावर विश्वासही ठेवा की... मी.. मी चक्क दोन वेळा चोरी केली... मद्यासाठी... सातशे सातशे रुपयांची उधारीसुद्धा केली... बाबांनी पैसेच देण्याचे बंद केले होते...
माझ्या कक्षातील सर्वांनी आजवर दोन तीनदा विविध कारणास्तव माझ्याशी मैत्री तोडली... पण... ते प्रेम असे असते अलका... की.. ती मैत्री अशी ठरवून तुटू शकत नाही... काही काही प्रसंग असे घडले... की मैत्री तुटू शकतच नाही हे चौघांनाही समजले आणि तेव्हापासून आमची चौघांचीही मैत्री आता अतुट झालेली आहे... राजमाचीला गिर्यारोहणाला जाण्याचा प्रस्ताव जेव्हा मी आपल्यासमोर मांडला तेव्हा आपण माझ्या ज्या सहाध्यायींना विचारात घेऊन न येण्याचे ठरवलेत व ज्यांश्याशी काहीही झाले तरी मी मैत्री तोडणार नाही असे मी आपल्याला भर रस्त्यात ऐकवले ते माझे सहाध्ययी... दिलीप, अशोक आणि वनदास.. तिघेही आज सुधारले आहेत आणि... आत्मानंद ठोंबरे... आता फक्त मद्यपी झालेला आहे... तो महाविद्यालयात आहे ते दोनच कारणांसाठी... येथे स्वातंत्र्य आहे व येथे चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालो नाहीत तर वडील जालन्याला परत गेहून जातील... म्हणून...
मी चोरी केलेली आपण पाहिलीत व ते वनदास यांना सांगीतलेत हे मला माहीत आहे अलका.. त्याचप्रमाणे हेही माहीत आहे की आपण वनदास यांना हेही सांगीतलेत की आधी आपल्याला त्या तिघांबद्दल व त्यांच्या व्यसनाधीनतेबद्दल तिटकारा होता.. पण आता तो नसून... तोच तिटकारा आपल्याला माझ्याबद्दल आहे..
पण अलका... जशी आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट अगदी खरी सांगीतली तसे हेही सांगतो... की... येथील पहिल्या दिवसापासूनच माझ्या मनात तुम्ही भरलात... खूप वाटायचं.. तुमच्याशी बोलाव.. पण.. साहसच व्हायचं नाही... त्यानंतर तुमच्या तीर्थरुपांना त्रास झाला.. तेव्हा आपली मैत्री झाली... पण काही कारणाने.. आपण परत दुरावलात.. नंतर मी आपल्याला राजमाचीबद्दल विचारले... तेव्हा आपण नाही म्हणालात... पण.. ज्या दिवशी मला दिलीप, अशोक व वनदास यांनी चोरी केल्याबद्दल मारले ना.. तेव्हा.. तेव्हा मला समजले.. की... तुम्हालाही माझ्याशी मैत्री करायची आहे...
मगाशी मी तुमच्या किंवा माझ्या विवाहाबद्दल बोलत नव्हतो... मी आपल्या विवाहाबद्दल बोलत होतो... हा असा बारीक, कृश, सावळा, जाड चष्मा लावणारा, अभ्यासू, तुपट भाषा बोलणारा आणि ... अखंड मद्य प्राशन करणारा आत्मानंद बुवा ठोंबरे... आपण.. स्वीकाराल काय???"
पाच मिनिटे! पूर्ण पाच मिनिटे अलका रिकाम्या कपाकडे पाहात बसली होती. आत्माही डावीकडे मान फिरवून जमीनीकडे पाहात बसला होता.
ती शांतता असह्य होती. त्यात आत्म्याच्या भावविश्वाचा चुराडा करण्याचीही ताकद होती आणि त्याचा स्वर्ग करण्याचीही!
मात्र! अलका देव बोलतच नव्हती. शेवटी... जणू आत्ता नाही म्हणणे हे तिला प्रशस्त वाटत नाही आहे व त्याचे आपल्याला खूप वाईट वाटेल या माणूसकीमुळे ती आत्ता बोलत नाही आहे असा ग्रह करून आत्मा म्हणाला...
"अरे?? तीन वाजले?? चला... निघायला हवं... एक काम करा.. तुम्ही आधी जा.. मी एक दहा पंधरा मिनिटांनी बाहेर पडेन..."
काहीही न बोलता अलका उठली. फॅमिली रूमचे दार भिंतीत अर्धे दार असते तसे होते. त्या दारात गेली आणि वळून म्हणाली...
"दोन अटींवर स्वीकारेन आत्मानंद... एक म्हणजे.. तू दारू सोडणे.... आणि दुसरे म्हणजे... मला...
... मला अहो जाहो न करणे..."
मूळतः सावळे असलेले गाल गुलाबी गुलाबी करून झटक्यात निघून गेलेल्या अलकाने काय वाक्य टाकले ते समजायलाच आत्म्यला वेळ लागला.
आणि त्यानंतर रूमवर झालेल्या पार्टीत नुसता धुमाकुळ झाला.
===========================================
यावेळेस दिल्यासुद्धा बसने गेला कोल्हापूरला! वनाच्याकडे तर आनंदोत्सवच साजरा झाला. त्यांच्या वाडीत वन्याचा आणि त्याच्या वडिलांचा सत्कार करण्यात आला. आईने गेले कित्येक महिने एक थप्पडही खाल्लेली नव्हती वडिलांची!
अशोकची वहिनी आता मागचे सगळे विसरून 'काय? सारखे सारखे भेटू नका हां पुण्यात जाऊबाईंना' असे म्हणून अशोकची थट्टा करत होती. आणि रशिदा चक्क एकदा सासरी जाऊनही आली होती. गंमत अशी होती की अशोकच्या वहिनीपेक्षाही तिची लहान जाऊ वयाने मोठी होती.
मात्र, त्या दिवशी रशिदाचे ते रूप व लाघवी वागणे पाहून व हिंदू शिष्टाचारांची असलेली माहिती पाहून सगळेच विरघळले. होता नव्हता तोही विरोध संपला.
आणि आत्मानंद??
आत्मानंद एका भयानक वळणावर पोचलेला होता.
अत्यंत भयानक!
बुवा ठोंबरे वीस दिवसांच्या दौर्यावर गेले होते. घरात फक्त आजी, आजोबा आणि त्रिवेणी! त्यातही आजी आणि आजोबा आता फारच वृद्ध झालेले होते. आईच्या फोटोकडे पाह्न आत्म्याला ढवळून येत होते.
मात्र! ठोंबर्यांच्या त्या शुद्ध घरात एक अशुभ प्रकार व्हायला आता काहीच बंधन राहिलेले नव्हते.
मद्य!
वडील घरात नसल्यामुळे व स्वतःला एक स्वतंत्र 'कक्ष' असल्याने....
.... आत्म्याने खूप खूप विचार करून एक खंबा आज विकत आणला होता व स्वतःच्या कपाटात दडवला होता. रात्रीची भोजने साडे आठला झाल्यानंतर एकदा स्वतःच्या कक्षात आल्यावर काही प्रश्नच नव्हता. रात्री कुणीच उठवायचे नाही कुणाला! मस्तपैकी आतल्या आत पीत बसायचे आणि भरपूर प्यायल्याने झोप आली की झोपून जायचे असा त्याचा प्लॅन होता.
आणि... ते चालूही झाले. ही योजना सहज कार्यान्वित होऊ शकली.
सलग चार दिवस आत्मा पीत होता. संपली की नवीन बाटली आणायची आणि जाताना जुनी फेकून द्यायची हे त्याने ठरवलेले होते. फक्त सिगारेट ओढता येणार नव्हती व ती सकाळी बाहेर जाऊनच ओढावी असे त्याने ठरवले होते.
आणि कालच रात्री साडे नऊ वाजता त्याला पुन्हा एकदा नाटेकर काकूंचे दर्शन झाले. त्यावेळेस त्याचे स्वतःचे तीन पेग संपलेलेही होते. भान हरपून आत्मा नाटेकर काकूंकडे पाहात होता. यावेळेस तयने 'आपण त्यांना दिसू नये' याची भरपूर काळजी घेतलेली होती. कालच त्रिवेणी म्हणाली होती की आता सुधाही मुंबईला होस्टेलवर राहते आणि काका काकुंची खूप भांडणे होतात कारण काका आता प्रमाणाबाहेर प्यायला लागले आहेत.
आत्म्याला ते ऐकून खरे तर वाईट वाटले होते पण दररोज रात्री तो त्या खिडकीत त्याच्या तपस्येला मात्र बसत होता. आणि कालच त्या तपस्येचे फळही मिळाले होते. अनेक महिन्यांनी इतक्या जवळून एका स्त्रीच दर्शन असे झाल्यामुळे आत्मा खिळून बसलेला होता. शेवटी साडे दहा वाजता काकूंच्या खोलीतील लाईट बंद होऊन झोपाझोप झाली तेव्हा कुठे तो पलंगावर आला आणि बराच वेळ पीत राहिला.
बर्याच वेळाने काका आले असावेत. कारण परत लाईट लागला. त्यांच्या घराला लॅच असल्यामुळे काका आत येऊ शकले होते. आत्मा परत खिडकीत बसून राहिला. त्याला स्पष्ट दिसत होते. काकू झोपलेल्या आहेत. काका झिंगत आहेत. काकांनी कसेबसे चेंज केले आणि दिवा बंद करून तेही कसेबसे पलंगावर आडवे झाले. अर्थात, ते आडवे झाल्याचे आत्म्याला दिसले नाही.
आणि मग आत्म्याला पुन्हा या गोष्टीची ओढ लागली.
त्याने याबाबत स्वतःचे एक स्पष्टीकरणही तयार करून ठेवलेले होते.
ज्या कृतीचा दुसर्याला काहीही त्रास न होता आपल्याला आनंद मिळतो ती कृती करायला हरकत काय?
वर पुन्हा नाटेकर काकूंना चॉईस होताच की? स्वतःची खिडकी बंद करून घ्यायचा!
कालच्या अनुभवामुळे आजही आत्मा खिडकीला चिकटून बसला होता. नाटेकर काकू घरात इकडून तिकडे करताना दिसत होत्या. त्यांच्या अंगावर अजूनही संध्याकाळी बाहेर जाताना नेसलेलीच साडी होती हे आत्म्याला समजत होते. याचाच अर्थ आजही नयनसुख मिळण्याची शक्यता आहे हे त्याला माहीत होते. देवाची प्रार्थना करत होता की काकूंना खिडकी बंद करायची दुर्बुद्धी करू नकोस! काका आजही दिसत नव्हते.
आजही काकूंनी साडे नऊच्या सुमारास चेंज केले आणि आत्म्याचा आत्मा तोष पावला.
बर्यापैकी बेढब असल्या तरी काकू त्या अवस्थेत आत्म्याच्या वयाच्या मुलाला निश्चीतच आकर्षक वाटणार हे खरे होते. आता आत्मा पलंगावर बसून 'आपल्याला काय काय पाहायला मिळाले' याची स्वतःशीच उजळणी करत होता.
दुसर्या आणि तिसर्या दिवशी मात्र खिडकी बंद होती. आणि आज चवथ्या दिवशी??
आज काकूंना त्याने पुन्हा पाहिले. पण काका आज दहा वाजताच आले. पुन्हा दिवा लागलेला पाहून आत्मा हळूच स्वतःच्या खिडकीत आला.
काका झिंगत होते. पाठ करून झोपलेल्या काकूंना हलवून हलवून उठवत होते. काकू त्यांचा हात झटकून पुन्हा झोपायचा प्रयत्न करत होत्या. साधारण पंचवीस एक फुटांचे अंतर असल्यामुले आत्म्याला 'ते दोघे एकमेकांशी काही बोल असावेत का' याचा काहीच अंदाज येत नव्हता. पण बहुधा बोलत असावेत.
पण हा अंदाज मांडण्याची गरजच उरली नाही. अचानक आवाज वाढले. काकू उठून बसल्या आणि काकांशी तावातावाने भांडू लागल्या.
'रोज पितोस.. घराची काळजी नाही.. बटीक आहे का मी?? .. का ठेवलेली बाई आहे?? तू येशील तेव्हा तुला जेवायला वाढायला... जा.. त्या गुत्यात काही खायला मिळते का बघ..."
नाटेकर काकूंसारख्या बाईंची भाषा अशी कशी हा प्रश्न आत्म्याला पडेपर्यंतच काकांनी खाडकन काकूंच्या तोंडात मारलेली त्याने पाहिली.
भलताच प्रकार! आपण काय बघायला थांबलो आणि काय बघायला मिळतंय!
जवळपास एक तास वादावादी चाललेली होती. त्यात काकूंनी अनेकदा थप्पडा खाल्या तर काकांवरही त्यांनी एकदा हात उगारला पण तो काकांनी दाबून खाली ओढला. काकू ओक्साबोक्शी रडत होत्या. काका नशेमुळे झोपले तरी काकू बराच वेळ एका खुर्चीवर उदासवाण्या बसून बघत बसल्या होत्या.
हा प्रकार चक्क दुसर्या आणि चवथ्या दिवशी पुन्हा घडला. मात्र पाचव्या दिवशी सकाळी आत्म्याला तिसरेच दृष्य दिसले. आणि तेही सकाळीच!
आंघोळीच्या तयारीने आपले कपडे हातात घेऊन बेडरूममधून बाथरूममध्ये चाललेल्या नाटेकर काकू अचानक कपडे पलंगावर टाकून बाहेरच्या खोलीत आल्या आणि पर्स घेऊन आणि किल्ली हातात घेऊन दार उघडून बाहेर पडल्या. आत्मा दचकलाच!
कारण नाटेकर काकूंच्या चालण्याची दिशा होती आत्म्याचे घर!
हादरलेला आत्मा हातात वर्तमानपत्र धरल्याचा अभिनय करत बाहेरच्या खोलीत येऊन बसला. त्याला वाटले बहुधा काकूंनी पाहिले आणि आता आजिला सांगून आपली खरडपट्टी काढणार!
त्या आल्या आणि आजीला म्हणाल्या 'भाजी घेऊन येते.. लॅच लावलंय.. चावी इथे ठेवते...'
आजी काही विचारायच्या आत त्या गेल्याही! आत्म्याकडे त्यांचे लक्षही नव्हते.
घरातल्याच साडीवर ही बाई कुठे गेली असावी ते आत्म्याला समजेना! पण त्याही सेकंदात त्याला तीव्रपणे जाणवलेली एकच गोष्ट होती. नाटेकरकाकूंचा चेहरा अत्यंत भकास व कसलातरी निर्धार केल्यासारखा दिसत होता.
आणि आत्म्याच्या मनात नेमका नको तो विचार प्रकटला.
जवळून! अगदी जवळून या बाईला पाहता येईल! तिच्या नकळत!
भारल्यासारखी पावले वळली आत्म्याची!
पटकन ती किल्ली घेऊन त्याने नाटेकर काकूंच्या घराजवळ जाऊन इकडे तिकडे पाहिले. लांबवर कुठेतरी नाटेकर काकू वेगात चालत जाताना दिसत होत्या. कुणाचे लक्ष नाही पाहून आत्म्याने पटकन दार उघडले अन उघडेच ठेवून पुन्हा स्वतःच्या घरात होती तिथे किल्ली ठेवली आणि...
... मांजराच्या चालीन त्यांच्या घरात आत गेला आणि आतून दार लावले.
मात्र! त्या क्षणी तो स्वतःच गर्भगळीत झाला. आपण हे काय करतो आहोत असा विचार त्याच्या मनात आला. क्षणभर वाटलेही, की हे फार होते आहे. आपण इतक्या साध्या मोहासाठी इतकी रिस्क नको घ्यायला! मनाचा कौल घेतला असता तर??
नाहीच घेतला. घरात कुणीच नाही हे माहीत असल्यामुळे बिनदिक्कत चालत बेडरूममध्ये आला. तिथून स्वतःच्याच खिडकीकडे पाहिले. आत्ता त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. आपली खिडकी बरीचशी अंधारात असल्यामुळे व तिला खूपच जाड काच व दोन पदरी पडदे असल्यामुळे आपण कुणाला दिसूच शकत नाही. खूप बरे वाटले त्याला त्याही वेळेस!
आणि मग तो हळूच बेडरूममधल्या पलंगाखाली जाऊन बसला. एक ट्रंक होती तिच्या मागे!
आत्मानंद ठोंबरे यांच्या या कृतीचे मात्र कोणतेही पटण्यासारखे स्पष्टीकरण असू शकत नव्हते. धिस वॉज टू मच! फक्त मोह व तो मोह पूर्ण करण्याची घाणेरडी लालसा! नाही अलका आठवली, नाही स्वतःची मेलेली आई, नाही त्रिवेणी आणि नाही बुवा ठोंबरे!
दहा मिनिटे अवघडून बसलेल्या आत्म्याला घाम फुटला तो त्या क्षणी.. जेव्हा बाहेरचे दार वाजले, उघडले, बंद झाले आणि नाटेकरकाकू चालत असताना त्यांच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज आला.
काकू एकदम बेडरूममध्ये आल्या!
आत्मा डोळे फाडून बघत होता. कोणत्याही क्षणी साडी आणि पेटिकोट गळून पडणार होते. पण... कितीतरी वेळ नाटेकर काकू उभ्याच होत्या. जवळपास चार, पाच मिनिटे असतील!
नंतर त्या परत किचनमध्ये गेल्या. पुन्हा आल्या. खुर्चीवर बसल्या. आता पलंगाखालून आत्म्याला त्यांचा कंबरेपर्यंतचा भाग दिसत होता कारण त्या खुर्चीवर बसलेल्या होत्या.
काहीही हालचाल न करता ही बाई नुसती अशी का बसली असावी समजेना! टी.व्ही. लावलेला नाही, हातात पुस्तक नाही, काहीही नाही!
बराच वेळ आत्मा तसाच बसून राहिला. काय चालले आहे तेच त्याला समजेना! आपण असल्याचा संशय तर नाही ना आला?
आणखीनच अंग आकसून घेतले त्याने!
तेवढ्यात हालचाल झाली. अस्पष्ट अशी!
नाटेकर काकू अचानक उभ्या राहिल्या. त्यांचा डावा पाय का कुणास ठाऊक किंचित लटपटल्यासारखा वाटला आत्म्याला!
तेवढ्यात त्यांच्या खुर्चीवरून एक फोटो पडला. आत्म्याने पाहिले. त्यांच्या मुलीचा, सुधाचा फोटो होता तो!
नाटेकर काकू अचानक पलंगावर येऊन बसल्या. जणू शाळेच्या सहलीहून आलेले व प्रचंड दमलेले मूल 'कधी एकदा पलंगावर आडवे होतोय' या विचाराने पलंगाकडे धावते तसे!
नखशिखांत हादरला होता आत्मानंद!
आपण ज्या पलंगाखाली लपलो आहोत त्याच पलंगावर ही बाई बसली आहे. बाप रे!
मग काहीशी हालचाल झाली आणि बहुधा त्या झोपल्या असाव्यात!
घामाने पूर्ण भिजलेले अंग आत्म्याने कसेबसे आक्रसून घेतले होते. श्वासांचा आवाज येऊ नये इतकीच तो प्रार्थना करत होता.
किती वेळ झाला कुणास ठाऊक! खूप खूप प्रयत्नांनंतर आत्म्याने आपले दोन्ही पाय पूर्ण सरळ करण्यात यश मिळवले. अक्षरशः मुंग्या आल्या होत्या पायांना!
अजून काही वेळ गेला. आता मात्र आत्म्याला निश्चीतच समजले. नाटेकर काकू झोपलेल्या असणार!
पण! सावध! सावध राहण्यातच शहाणपण होते. आपल्याला जर त्यांनी पाहिले तर त्या इतक्या जोरात किंचाळतील आणि इतके मोठे प्रकरण होईल की ते आपल्या बाबांनाही झेपणार नाही हे त्याला माहीत होते.
नशिबालाच दोष देत होता तो! पदरात तर काहीच पडले नव्हते. उलट ही बाई चांगली आंघोळीला चाललेली पलंगावरच पडून राहिली होती.
मात्र आता उठायलाच हवे होते. हळूच का होईना बघायला हवेच होते!
जमीनीवर जणू एखादे पीस फिरवावे तशा अलगद हालचाली करत पलंगाबाहेर डोके काढायला आत्म्याला तब्बल पाच मिनिटे लागली.
आणि डोके काढून दिसले तर काय??
नाटेकरकाकुंची वेणी.. जी पलंगावरून खाली लोंबत होती. कसलाही आवाज न करता आत्म्याने डोके वर वर नेले! आणि पलंगाच्या बॉर्डरवर जेव्हा त्याची नजर पोचली...
.... ठोंबर्यांच्या घरातील गेल्या हजार पिढ्यांमध्ये कुणी इतके घाबरलेले नसेल...
नाटेकर काकू... डोळे सताड उघडे ठेवून... आत्म्याकडेच बघत होत्या...
मेंदूतून निघालेली भीती पाठीच्या कण्यातून कंबरेखाली पोचली आत्म्याच्या... त्याची नजरच खिळली त्या डोळ्यांवर... आणि मग.. खूप खूप हळू.. फारच हळू... त्या विचाराने आत्म्याच्या मेंदूत प्रवेश मिळवला...
काकू.. आपल्याला पाहून काहीच म्हणाल्या नाहीत... किंचाळल्या नाहीत... आणि.. हालल्याही नाहीत.. इतकेच काय.. डोळेही हालले नाहीत... पापण्याही लवल्या नाहीत... गॉन... नाटेकर काकू... गेलेल्या आहेत... मेलेल्या आहेत त्या...
एखादे प्रेत उठून बसावे तसा हादरलेला आत्मा पलंगाखालून बाहेर येऊन त्या डोळ्यांकडेच खिळल्यासारखा बघत उभा राहिला... अक्षरशः दोन नंबरला लागायची वेळ आली होती त्याची...
आणि तेवढ्यात त्याला ते दिसले... कसलीतरी कीटकनाशकाची बाटली पडली होती त्यांच्या उजव्या खांद्यापाशी!
खिळे ठोकून पाय जमीनीत फिक्स करावेत तसा आत्मा त्या प्रेताच्या डोक्यापाशी उभा होता.
... घामाने निथळत होता.. येथून आपण या क्षणी धावायला हवे हे समजत असूनही नाटेकर काकूंच्या मृत नजरेत मिसळलेली नजर काढताच येत नव्हती...
... आणि...
.... जे व्हायला नको होते.... ते... झाले..
... बेल वाजली...
आपण कुठे आहोत, का आहोत, काय करतो आहोत, आपण आत्ता काय पाहिले आहे... कसलाही विचार न करू शकणार्या आत्म्याला नाटेकरांच्या घरातले ते जिवंतपणाचे एकमेव लक्षण जाणवले अन आधार मिळाल्यासारखे वाटले... दाराची बेल.. !!!!
अक्षरशः ढुंगणाला पाय लावत धावत जाऊन त्याने दार उघडले..
... नाटेकर काकांकडे आज नेमकी लॅचची किल्ली नसावी... ते हबकून आत्म्याकडे पाहात होते...
बरोब्बर दोन दिवसांनी... आपापल्या गावाहून.. दिल्या, अशोक आणि वनदास... जालन्याला निघालेले होते...
.. कारण दिल्या आणि अशोकला वन्याचा फोन आला होता...
"आत्म्याला अॅरेस्ट झालीय... सुइसाईड केसमध्ये... कदाचित.. मर्डर केसही असेल..."
अरे आता काय लिहिणार आहात
अरे आता काय लिहिणार आहात राव.
लवकर सवय झाली आहे आता तुमची.......................
पु.ले.शु.
अरे काय चाललय,
अरे काय चाललय, व्यक्तीस्वातंत्र्य नावाची गोष्ट आहे की नाही.... उगाच कहितरी आपल.....
ह्यांना ब्लु फिल्म पाहिलेल्या चालतील (म्हणजे गुपचुप सगळ) पण असे विषय जे खर बाहेर घडतय ते बोलायच ही नाही. पण यांनी 'पेज ३' नक्कि बघितला असेल कि तेव्हा पण लेखकाला आक्षेपार्ह मेल केला....
काय एकेक माणस पण......<<<<<<श्वे अनुमोदन.
धन्स योगिता जी.....
धन्स योगिता जी.....
सानी.... सगळ मनातल
सानी....
सगळ मनातल टाईपलस....
पण तिथल्य्या लोकाना स्प्ष्टीकरण देण्याची मलाही गरज वाटत नाही.......
ज्याना स्वतःची ओळख(दर्जा)अजुन कळलेला नाही/पटलेली नाही......ते काय दुसर्यान्चा दर्जा ठरवणार....अशा लोकान्ची विचारसरणी ही खुपच तोकडी आहे अस मला वाटतय...
सावरी
मिही तेच म्हणणार होते. अत्यंत
मिही तेच म्हणणार होते. अत्यंत बेक्कार नि बकवास काद.बरी लिहिली आहे. हे लेखन आवडणारे लोक दर्जाहीन वाचक आहेत नक्किच कारण केराच्या टोपलीपेक्शा अधिक मुल्य याला नाही. उबग व चीड आणणारे भडक वप्रसंग घालून वर म्हटले तसे एकता कपूरसारखे दळण दळत आहे हा माणुस असे माझे मत. <<<<<<<<<<<<<<< वाचक कसे आहेत किंवा त्यांचा दर्जा कोणता आहे हे केराच्या टोपलीपेक्षा अधिक मुल्य नसलेल्या माणसांनी सांगु नये. आणि प्रथम कादंबरी हा शब्द लिहायला शिकावा. ती बेक्कार आहे कि बकवास तो नंतरचा प्रश्न आहे. कारण वाचलेलं कळलं की नाही यावर ते अवलंबुन असतं.
आणि एक कोणाबद्द्लही तुमचं असलं बेक्कार नि बकवास मतप्रदर्शन करु नका. कारण असं मतप्रदर्शन करणार्या बाबत मग उबग व चीड येते.
योगिताताईशी सहमत बेफिकिरजी,
योगिताताईशी सहमत
बेफिकिरजी, पु. ले. शु.
धन्स rrs जी..
धन्स rrs जी..
योगिता.... प्रचन्ड
योगिता....
प्रचन्ड अनुमोदन.....
सावरी
हे Candy, Deliya etc etc सटर
हे Candy, Deliya etc etc सटर फटर लोक आहेत ना, यान्चा एक लोचा असतो..याना स्वताहुन कही लिहिता येत नसत, आणि personal life मधल Frustration हे अस कहितरी फालतु प्रतिक्रिया लिहुन काढतात. हे असले लोक घरी लपुन Porn films चविने बघतात आणि बाहेर मात्र सज्जनपनाचा आव आणतात. बेफिकिरजी Just Ignore these Bloody Hypocrites!! क्रुपया लिहा...वाट पाहतोय!! आणि Candy, Deliya etc कोठेतरी जाऊन Candy चोकत बसा. तुमच्या बाष्कळ प्रतिक्रियेची इथे गरज नाही.
saamana दिल जिय लिया यार
saamana दिल जिय लिया यार तुने(ह घे)
खुप मोठा मोदक.
भुंगा, तुम्हांला माझी
भुंगा, तुम्हांला माझी प्रतिक्रिया कळलीच नाही. वाटल्यास पुन्हा एकदा वाचा नी मग वरचं पोस्ट एडिट करा. नाहीतर जाऊ द्या, समजावयची इच्छा माझी नाही.
>>तुमची कादंबरी मी वाचत नाहीये फक्त प्रतिक्रिया तेवढ्या वाचते जमतील तशा.................वर आशुचँपची प्रतिक्रिया वाचून हा भाग वाचला.
बोंबला! सगळा उजेडच आहे
हे म्हणजे सिनेमा बघत नाही पण त्यातल्या जाहीराती बघून सिनेमा बघायचे ठरवले असे झाले.>>>>>
जोशी, अहो जाहिराती नी सिनेमाचा काहीएक संबंध नसतो. तुम्हांला प्रोमो म्हणायचं होतं का? तसं असेल तर खरंच आहे. प्रोमो बघूनच ह्या सिनेमाचा एक भाग वाचायचं ठरवलं. काय चूक आहे त्यात?
बाकी, तुमच चालू द्या
सावरी...... धन्यवाद!!
सावरी......
धन्यवाद!!
Pages