तुझ्याशिवाय......!!!

Submitted by Kiran.. on 30 August, 2010 - 12:37

सहस्त्रभुजा फैलावून मी
गगनभेदी गर्जना केली
आणि आभाळ उचलून घेत
सूर्याला टाळी दिली..
काहीच अशक्य नव्हतं मला
लक्षावधी अश्वांचा रथ
वायूगतीने सोडायचो आणि
आकाश, पाताळ, धरणीला
बेभान वेसण घालायचो..
माझ्या त्या सुसाट, बेफाट, अफाट रूपाकडं
कण आणि कण थबकून पाहायचा
डोळ्यांत भरून घ्यायचा..

वारा माझा गुलाम होता
ठोकरीत पाणी होतं
आणि तेज......हं
ते तर मीच होतो..!

पण दमलो भागलो ना
कि
तुझ्या कडं यायचो
मिठीत विसावायचो..
माझं सारं अवसान शैशव होऊन जायचं
न मागता तुलाच , सारं सारं समजायचं

अमर्याद शक्तीचा स्वामी
नाही फक्त तुझा..तुझाच मी
हीच तर माझी खरी ओळख होती
आधाराची मलाही थोडी गरज होती
शक्तीहीन अवस्थेत जेव्हां
तुझ्या ओंजळीत चेहरा लपवायचो
तेव्हां कुठूनतरी अक्षय उर्जेचे सोनेरी कण चमकून जायचे
आणि माझे बाहू पुन्हा फुरफुरू लागायचे...

आणि एक दिवस..

आठवतंय मला
तुझा चेहरा माझ्या ओंजळीत होता
अर्धोन्मिलीत नेत्र...लाडीक खळी
आव्ळलेल्या मुठीतली चाफ्याची कळी
मी थोपवू पाहीलं तेव्हां
निळाईच्या त्या जादूगाराला
रोखून पाहीलं त्याच्या
लाचार पावलांना...
पण
पण
माझा शक्तीपात झाला
प्रचंड शक्तीपात..
उंच कड्यावरून मी कोसळत असतांना
माझी अक्षय उर्जेची कुपी निसटून गेली..

तुझ्याशिवाय.....

आता दोन पावलंही टाकवत नाहीत
कातरवेळेची उन्हही झेपत नाहीत
वारा मला हासत असतो
आकाश वेडंवाकडं होत होत
वाकुल्या दाखवत असतं
सूर्य चक्क भाजून काढतो
आणि पाण्याविना कासाविस होतो..

माझी ही दशा
कण आणि कण थबकून पाहतो..
कारूण्यानं..कणवेन

तुझ्याशिवाय मी काही नाही
हे आता कळून चुकतं..
पण श्वास मोजत राहण्याखेरीज
आता हाती काही नसतं..

तुझ्याशिवाय......!!!

Kiran™

गुलमोहर: 

तुझ्याशिवाय मी काहीच नाही
हे आता कळून चुकतं..
पण श्वास मोजण्याखेरीज
हाती आत काहीच नसतं.

फारच सुंदर भाऊ. अप्रतिम आशय. Happy

गंगाधर मुटे™

आशय फार फार आवडला. कविता लांबली असे वाटले.

परावलंबीत्वाची एक परिसीमा आली या कवितेत! 'ती' ऐवजी ईश्वर गृहीत धरले तर मस्तच!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बेफिकीर..
कुणीतरी विचारलं होतं..
उतारवयात जोडीदार साथ सोडून गेला तर काय होईल...त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून ही कविता आहे.
तुमची कल्पना सुरेखच

गंगाधरजी...खूप दिवसांनी भेटलो...धन्यवाद

वा किरण...... शेवटचं '' तुझ्याशिवाय'' हा शब्द चटका लावून जातो...

तुझ्याशिवाय.....

आता दोन पावलंही टाकवत नाहीत
कातरवेळेची उन्हही झेपत नाहीत
वारा मला हासत असतो
आकाश वेडंवाकडं होत होत
वाकुल्या दाखवत असतं
सूर्य चक्क भाजून काढतो
आणि पाण्याविना कासाविस होतो..

आयुष्यात पठारावस्था येतेच्....जिथे अप असते ना डाउन्.......फक्त अस्तो संथ श्वास्.....आणि तिथेच उमगते आपल्या माणसाचि ओळख.....या भावनेचे हे जणु सचित्र वर्णन आहे........अतिउत्तम्.....खूप खूप आवडली.......:)

"तुझ्याशिवाय मी काही नाही
हे आता कळून चुकतं..
पण श्वास मोजत राहण्याखेरीज
आता हाती काही नसतं.."

..... हे अधिक आवडलं
प्रभावी आशय.