तिथे तटावर लाटा

Submitted by जया एम on 21 August, 2010 - 12:04

लाटा कुरळ्या बटांच्या पोरी अवखळ भारी
झिम्मा फुगड्यांचा दंगा रोज घुमे घरी दारी

असा धरुनिया फेर त्यांनी हादगा मांडला
जीव ऐलमा पैलमा, जीव पाण्यात सांडला

लाटा भरतीच्या सख्या, त्यांना ओहोटीचे काय
खेळ तळ्यात मळ्यात पोरी भिजविती पाय

समुद्राच्या तटावरी धुंद उसळती लाटा
शुभ्र अभ्रकी ओढीने जाती फेसाळत वाटा

त्यांची खळाळ भरारी खडकाला धडकली
तेव्हा त्याच्या कपारीत काही स्वप्ने अडकली

थेंबभर ओले सुख जन्म भरून वाहिले
शिंपल्याच्या मनी कोण मोती बनून राहिले

तिथे तटावर लाटा इथे जीव झाला पाणी
मनी वारा गात गेला काही मन्त्रमुग्ध गाणी

अशा सोज्वळ दुपारी सूर्य आर्द्र मऊ झाला
आणि दिवसाला कैवल्याचा स्पर्श होऊ आला

थोडी खुपणारी वाळू थोडे मखमली ऊन
माये आयुष्य उसळे आज लाटालाटातून

गुलमोहर: 

यमकांशी व व्याकरणाशी कुस्ती खेळून इथे पद्य लिहणार्‍यांनी त्या वाचून, त्यातून नक्कीच शिकावे.<<<

मला एक समजत नाही. जे आवडले ते आवडले असे म्हणून मोकळे होण्यात माशी कुठे शिंकते? एखादे काहीतरी आवडले की जे आवडत नाही त्याचा इतका कडवट उल्लेख करण्याचे कारण काय? मुळात वरील कवितेत व्यवस्थित व्याकरण (अष्टाक्षरी) पाळलेले आहे आणि व्यवस्थित यमके पाळलेली आहेत. मात्र या प्रतिसादातून असे दिसत आहे की व्याकरण आणि यमके न पाळणारी अशी ही कविता आहे की काय! 'आणि तरीही किती श्रेष्ठ आहे ते बघून उगाच व्याकरण आणि यमकांशी कुस्ती खेळणार्‍यांनी काहीतरी शिका' असा एक नादान, बिनबुडाचा आणि ल तो मो घा स्वरुपाचा सल्लाही आहे. (क्षमस्व)!

आणि त्याला पुन्हा करोडोंनी अनुमोदन देणारे तर त्याहून महान!

या सर्वामुळे चांगल्या कवितेखाली भांडणे ट्रिगर करणार्‍यांच्या प्रतिसादांची कीव येते. असो!

>> मला एक समजत नाही. जे आवडले ते आवडले असे म्हणून मोकळे होण्यात माशी कुठे शिंकते? एखादे काहीतरी आवडले की जे आवडत नाही त्याचा इतका कडवट उल्लेख करण्याचे कारण काय?

हे बाकी खरं.

मात्र या प्रतिसादातून असे दिसत आहे की व्याकरण आणि यमके न पाळणारी अशी ही कविता आहे की काय! >>>>> न पाळणारी नाही पण अगदी सहजतेने आणि खुप अर्थपुर्ण यमके जुळली आहेत. यमकं जुळवायला खुप आटापिटा, दूर दूरचे संबंध/अर्थ लावलेले आजिबात आढळत नाहीत असं म्हणतोय केदार.

मलाही अशा कविता फार आवडतात. कधी कधी खुप गहन असा विचार तर कधी कधी अगदी साधी कल्पना, शब्दांची नेमकी अचुक निवड जेणे करुन यमकं अशी जुळवलेली असतात की वाटतं ही कविता एकसंध असा विचार म्हणून ह्या व्यक्तीच्या डोक्यात उगवली असावी. हीच त्यांची कमाल किंवा आर्टिस्टिक अबिलिटी म्हणावी लागेल.
भारी आहेत कविता तुमच्या जया एम. Happy

अफलातून. यातल्या प्रतिमा सुस्पष्ट. एक संवाद चालू आहे तुमच्या कवितांचा वाचकाशी.... हा अनुभव महत्वाचा. हा प्रतिसाद केवळ उपचार म्हणून , वाचनाची पोच म्हणून. स्वतःसाठी आणि तुमच्यासाठी.

(तुमच्या कविता म्हणजे सूर्यासारख्या दिपवणा-या.. त्यासमोर एक लुकलुकता काजवा वाटावी अशा एका मा़झ्या कवितेची अनुभूती म्हणून आठवण झाली. तुमच्या काही कवितांमधून सुटलेल्या स्वप्नांचे संदर्भ खूप ओळखीचे वाटले, केवळ त्यासाठी हे धाडस ! http://www.maayboli.com/node/42393 )

खूप आवडली ही कविता.
विशेषतः, हें तर फारच भावलं [ कदाचित कोकणातला असल्याने मला ह्या प्रतिमा खोल कुठेंतरी स्पर्श करून जात असाव्यात !] -

<< त्यांची खळाळ भरारी खडकाला धडकली
तेव्हा त्याच्या कपारीत काही स्वप्ने अडकली

थेंबभर ओले सुख जन्म भरून वाहिले
शिंपल्याच्या मनी कोण मोती बनून राहिले

तिथे तटावर लाटा इथे जीव झाला पाणी
मनी वारा गात गेला काही मन्त्रमुग्ध गाणी >>

Pages