मराठी भाषाभिमान्यांसाठी मार्गदर्शक ग्रंथ : भाषाशुद्धीचे व्रत !

Submitted by शिवराज on 7 April, 2010 - 14:33

कोणताही समाज हा राष्ट्राभिमानी होण्यासाठी तो प्रथम स्वभाषाभिमानी असावा लागतो. स्वभाषाभिमानाविषयी महाराष्ट्राची, तसेच राजभाषा मराठीची स्थिती काय आहे, हे सर्व जण जाणतात. बहुतांश मराठी जनांकडून दहा
शब्दांच्या एका वाक्यात इंग्रजी, अरबी, फारसी आदी परकीय भाषांतील एक-दोन शब्द सहजपणे वापरले जातात. अन्य भाषेतील शब्दांची सरमिसळ करून मराठीत बोलणार्‍या किंवा ते बोलणे ऐकणार्‍या मराठी माणसाला त्याची खंतही वाटत नाही. राजकीय लाभासाठी मराठीची ढाल पुढे करणारे पुष्कळ आहेत, मराठीसाठी वर्षातून एकदा होणार्‍या साहित्य संमेलनात गळा काढणारेही उदंड आहेत; पण खरोखर मराठी जिवंत ठेवण्यासाठी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा स्तर (दर्जा) देण्यासाठी झटणारे मराठीप्रेमी अल्प आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत आठवले हे या अल्प मराठीप्रेमींपैकीच एक आहेत. प.पू. डॉ. आठवले यांनी मराठी भाषेच्या रक्षणासाठी `भाषाशुद्धीचे व्रत' या एका मार्गदर्शक ग्रंथाची निर्मिती करून मराठी भाषेच्या रक्षणाची चळवळ
अत्युच्च वैचारिक स्तरावर पोहोचवली आहे. प.पू. डॉ. आठवले हे अध्यात्मक्षेत्रातील सर्वश्रुत नाव. अध्यात्माशी निगडित १६० हून अधिक ग्रंथांचे लिखाण त्यांनी केले आहे. थोर विभूतींनी निर्मिलेले वाङ््मय सर्वच
दृष्टीकोनांतून मौलिक असते. म्हणूनच डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या `भाषाशुद्धीचे व्रत' या ग्रंथाच्या माध्यमातून `मराठी भाषाशुद्धीच्या चळवळीला अध्यात्माचा स्पर्श झाला', असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मराठीत परभाषिक शब्दांचा धुमाकूळ !
भाषाशुद्धीचे आद्य प्रवर्तक आहेत छत्रपती शिवाजी महाराज ! त्यानंतर ही ध्वजा समर्थपणे पेलली ती स्वा. सावरकरांनी !! या दोघांच्याही चरणी ग्रंथारंभी प्रार्थना करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणातच अनेक मराठी जनांच्या तोंडी रुळलेल्या परकीय शब्दांची काही उदाहरणे देण्यात आली आहेत. मराठी भाषिक प्रांतातील घर, कार्यालय, न्यायालय, राजमार्गातील विविध आस्थापनांच्या पाट्या आदी सर्व ठिकाणी परभाषेतील शब्दांच्या सुळसुळाटाचे या प्रकरणात वर्णन करण्यात आले आहे. स्वभाषेत शब्द उपलब्ध असतांना तो न योजता परभाषेतील शब्द आपण निर्धास्तपणे वापरतो, हे पाहून आपलीच आपल्याला लाज वाटेल. आजतागायत, तयार, शाहीर, मुलुख, शिवाय, कायदा, शहीद आदी शब्दांनी मराठीत नुसता धुमाकूळच घातलेला नाही, तर त्यांनी त्या
अर्थाचे मराठीतील शब्दच आपल्याला विसरायला लावले आहेत !

विरोधकांच्या आक्षेपांना उत्तरे
भाषाशुद्धीसाठी प्रयत्‍न करणार्‍यांना सर्वांत प्रथम स्वपक्षातील विरोधकांच्याच आक्षेपांना उत्तरे द्यावी लागतात. विरोधकांचे हे आक्षेप काही वेगळे असतात असे नव्हे, तर ते स्वा. सावरकरांच्या वेळचेच असतात, उदा.
परभाषिक शब्द न वापरणे हा त्या परभाषेचा द्वेष आहे, परभाषेतील शब्द वापरल्यामुळे मराठीची शब्दसंपत्ती वाढते, नवीन स्वदेशी शब्द रूढ होणे कठीण आहे इत्यादी. या आणि अशा सर्वच आक्षेपांवर स्वा. सावरकरांनी त्या
वेळी दिलेली उत्तरे या ग्रंथात नमूद करण्यात आली आहेत. ही उत्तरे आजही तेवढीच समर्पक वाटतात.
या ग्रंथात स्वा. सावरकर आणि भाषाशुद्धीचे कट्टर पुरस्कर्ते माधवराव पटवर्धन यांच्या जीवनातील भाषाशुद्धीसंबंधीचे काही प्रसंग सांगितले आहेत. हे प्रसंग वाचून भाषाशुद्धीच्या कार्यावरील निष्ठा किती अविचल हवी, हे लक्षात येते. वाचकांना हे पाच-सहा प्रसंग अंतर्मुख तर करतीलच, तसेच त्यांचा स्वभाषाभिमानाचा पीळही बळकट करतील.

स्वकीय शब्दांच्या रक्षणार्थ उपाय
भाषाशुद्धीचे काम अवघड वाटले तरी ते एक आवश्यक असे कर्तव्य समजून केले, तर तसे कठीण नाही. परकीय शब्द टाळतांना जिभेला थोडा त्रास होईल, तरी `कात' म्हणून ते स्वीकारल्यास एक-दोन वर्षांतच भाषाशुद्धी होऊन जाईल मराठी बोलतांना आणि लिहितांना इंग्रजी किंवा अन्य परकीय शब्द
वापरण्याची सवय निंद्य आहे, हे समजून या सवयीचा दास झालेल्या प्रत्येकाने मनापासून प्रयत्‍न करायला हवेत. मराठीत संभाषण करतांना इंग्रजी किंवा अन्य परकीय शब्द वापरणार्‍याने त्यावर प्रायश्चित्तही घ्यायला हवे. ही प्रायश्चित्ते कशी असावीत, हे ग्रंथात उल्लेखिलेल्या स्वा. सावरकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या संबंधात घेतलेल्या प्रायश्चित्तांवरून वाचकांच्या लक्षात येईल.

साहित्यिकांनी आवर्जून गौरवावा, असा ग्रंथ !
मराठी साहित्य संमेलनांचे कर्मकांड आपल्याकडे प्रतिवर्षी यथासांग पार पडते. संमेलनाच्या व्यासपीठावरून मराठीला इंग्रजीच्या जोखडातून सोडवण्याची अन् मराठी साहित्य उच्च स्तरावर नेण्याची भाषणे अनेक साहित्यिक राज्यकर्त्यांच्या साक्षीने झोडतात; पण दैनंदिन जीवन `मराठीमय'
कसे करावे, याचे मार्गदर्शन हे साहित्यिक करत नाहीत. हे महत्कार्य या ग्रंथाने केले आहे. कोणत्याही वाङ््मयाची उपयुक्‍तता पडताळतांना ते वाङ््मय संस्कृतीचे जतन करण्यासाठी किती उपयुक्‍त ठरणार आहे, या कसोटीवर त्याची पडताळणी व्हायला हवी. या दृष्टीकोनातून पहायचे झाल्यास या ग्रंथातून प्रसारित होणारे मराठी भाषेच्या रक्षणाचे विचार मराठी संस्कृतीचेही जतन करण्यास मराठीजनांना प्रेरित करतील. याच कारणासाठी मराठी साहित्यिकांनी आवर्जून गौरवावा, असा हा ग्रंथ आहे !

भाषाशुद्धीची चळवळ पुढे नेणारा ग्रंथ !
संस्कृतनंतर सर्वांत सात्त्विक भाषा म्हणजे मराठी भाषा. अभारतीय भाषांच्या आक्रमणामुळे मराठी मरणपंथाला लागू नये, यासाठी या ग्रंथाचे वाचन प्रत्येक मराठी बांधवाकडून झाले पाहिजे. मराठीच्या भवितव्याविषयी गेली अनेक वर्षे चिंता व्यक्‍त केली जात आहे; मात्र कृतीच्या अंगाने दुसर्‍याकडून
अपेक्षा केली जाते. हा ग्रंथ वाचकाला कृतीसाठी उद्युक्‍त करील.
आज `मराठी'च्या सूत्रावरून (मुद्यावरून) देशभर बरेच रान उठले आहे. मराठीचा आग्रह धरणारे मराठीत संभाषण करतांना स्वत:च्या तोंडून अमराठी शब्द उच्चारले जाऊ नयेत यासाठी किती आग्रही असतात, स्वत:ची मुले इंग्रजी माध्यमातून नव्हे, तर मराठी माध्यमातून शिकावीत, यासाठी किती दक्ष असतात, हे सर्वच मराठीजनांना ठाऊक आहे. या पार्श्‍वभूमीवर मराठी भाषेला शुद्ध बनवण्याचा आग्रह धरणारी ही ग्रंथनिर्मिती सर्वांनाच भावेल. छत्रपती शिवाजी महाराज अणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यानंतर मराठी भाषेच्या शुद्धीची चळवळ पुढे नेणारा हा ग्रंथ महाराष्ट्राला त्याची हरवलेली भाषिक अस्मिता निश्चितच परत मिळवून देईल !

ग्रंथाचे नाव : भाषाशुद्धीचे व्रत
संकलक : डॉ. जयंत बाळाजी आठवले व श्री. संजय दिगंबर मुळये
मूल्य : रु. ३५/-, पृष्ठसंख्या : ६०
ग्रंथ मिळण्यासाठी संपर्क क्र. : ९३२२३१५३१७
संगणकीय पत्ता (इ-मेल) : satvikgranth@gmail.com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users