आवाज कुणाचा

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

माणसाच्या आयुष्यात 'आवाजाच' अगदी म्हणजे अगदी महत्वाच स्थान आहे. माणूस जन्माला आल्यापासून जो ' आवाज' करायला सुरुवात करतो, तो जन्मभर आवाज करत किंवा ऐकत मार्गक्रमण करत असतो. अगदी आयुष्याच्या 'अथ' पासून 'इती' कान कसले कसले कष्ट सहन करत असतात बिचारे.

आता नेहेमीचच उदाहरण घ्या. तूम्ही कधी कधी (कधी कधी नव्हे नेहेमीच) लोकल गाडीची वाट बघत उभी असता. लोकांचा कलकलाट सूरु असतो. मध्येच ध्वनीक्षेपकावर कसली तरी 'खूडबूड' ऐकायला येते. " एक विशेष सूचना". तूम्ही पंचप्राण एकत्र करून 'ती' ऐकण्याचा प्रयत्न करता. " खर्र... खर्र... खूर्र... खूर्र... खड.. खड.. खडाक खूडूक गाडी खट खट उशीराने ........... विशेष सूचना सम्पली". तूम्हाला काही कळतच नाही 'खर्र खर्र खूर्र खूर्र' मध्ये 'विशेष' ते काय. बर ही सूचना 'तीन -तीन' भाषात देतात पण तूम्हाला एकही कळत नाही. जर 'विशेष सूचना' कोणाला चूकून कळली तर बहूदा निवेदीकेचा/निवेदीकाचा पगार कापत असावेत. इतक्यात गाडी येते. स्टेशनात गाडी शिरते तीच मूळात 'बोम्ब' मारत. लोक त्याहून वरताण बोम्ब मारून डब्यात शिरतात (लोकल डब्याला 'कूपी' म्हणत नाहीत ते बरय नाहीतर डब्यात शिरणार्‍याला 'कूप मंडूक' म्हणाव लागल असत काय? असो) तूम्हीही लोकांचे शिव्याशाप खात, नागमोडी वळण घेत डब्याच्या 'अंतःपूरात' प्रवेश करता. बसायला जागा नसतेच. कसे बसे स्वतःच्या दोन पायंवर 'उभे राहील्यासारखे' करता. कूणी दोघ जण ऑफीसच्या गमती जमती 'शेयर' करत असतात. तूम्हीही कधीतरी ते कान देऊन ऐकता. पहील्या सीटवर एक 'मारवाडी जाडा' धोतराच्या आत आणि सीटच्या वर बसलेला असतो. पोट मांडीवर ठेवलेल असत. ते पडू नये म्हणून वर त्याला दोन्ही हातांचा आधार दिलेला असतो. कराकरा मांडी खाजवत असतो. ढेकूण ढेकूण दूसर काय? मध्ये मध्ये गाल खरवडत असतो. डासांना उडवत असतो.

"बेगॉन स्प्रे मारा. बेगॉन स्प्रे मारा." कोणी एक गमत्या ओरडतो
"कूठे ?कूठे?" दोन तीन आगाऊ चौकशी करतात.
" त्या तीथे. धोतरात." गमत्या अंगूली निर्देश करून दाखवतो.

डबा हसतो. तूम्हीही हसता जोरात.

बाहेर कसला तरी गलका ऐकू येतो. कुण्या 'एकाचा' कुण्या 'एकाला' धक्का लागलेला असतो. 'राष्ट्रभाषेत' हमरा तूमरी सूरू असते. भांडणारे कोणतेही भाषीक असोत, पण भांडण्याची भाषा कायम ' राष्ट्रभाषा' च असावी लागते. शब्दाने शब्द वाढत जातो. बघे माना डोलवत असतात. मध्येच एक जरा 'जास्तच' पेटतो. घड्याळ काढून ठेवतो. (ही तर मोठ्याच लढाईची तयारी) शर्टाच्या बाह्या दूमडून घेतो. आता समोरच्यालाही काहीतरी 'ठोस' कृती करण भाग असत. तो आपला चष्मा काढून ठेवतो. शर्टाची वरची दोन बटण मोकळी करतो. बघेही आता मोठी धमाल पहायला मिळणार म्हणून सरकून त्या दोघांना जागा करून देतात. बर हे सर्व घडताना 'आवाज' चालूच असतो. दोन बैल आता रिंगणात येतात. एकमेकांकडे बघून फूरफूरतात. आता ते दोघ भिडणार तोच कोणी एक 'उपटसूंभ' मध्ये येतो आणि चष्मिष्ट ला समजावतो. आता समजावणीची भाषा ही ' राज्यभाषा' असते. चष्मिष्टला काहीतरी निमीत्त हवच असत. तो त्वेषान दोन पावल पूढे जाऊन त्यापेक्षा अधिक त्वेषाने चार पावल मागे येतो. 'उपटसूंभ' समजावतो. " तूमच्या सारख्या शिकल्या सवरलेल्या माणसाने अस वागून कस चालेल" वगैरे वगैरे. 'चष्मिष्ट' चा राग शमतो. तरी पण आजूबाजूच्या ३ लोकांना तो 'आपलीच बाजू बरोबर कशी' ते समजावून सांगत असतो. विरोधी पक्षही त्याच वेळेला ४ लोकांना आपली बाजू पटवून देत असतो. पण लोकांना आता शमलेल्या भांडण्यात रस नसतो. इतक्यात कूठल तरी स्टेशन येत आणि भांडणारे ते 'दोघ' आणि तो 'उपटसूंभ' गर्दीबरोबर स्टेशनावर वाहून जातात.

मध्येच एक सीट रिकामी होऊन तूम्हाला बसायला जागा मिळते. तूम्ही त्या जागेत घूसता. तूम्हाला छानशी डूलकी काढावीशी वाटते. तूमच्या शेजारचा गाडीच्या लहरींचा आस्वाद घेत असतो. ' होय होय होय होय' , 'नाय नाय नाय नाय' म्हणत 'नक्की नक्की' म्हणत तूमच्या खांद्यावर अगदी ' विश्वासाने' डोक/मान टेकतो. पण तूम्ही पक्का ' विश्वासघात' करून ते डोक/मान उडवून लावता. अस दोन-तीन दा झाल्यावर ते 'डोक' दूसर हक्काचा खांदा शोधत आणि तूम्ही सुटकेचा निश्वास सोडता .

पण तूमच्या नशीबातले 'आवाजा'चे भोग सम्पलेले नसतात. कोण्या एका स्टेशनात एक 'पेटीवाला भिकारी' आपली पेटी आणि गळा घेऊन शिरतो. पेटीवर ३-४ दा बोट फिरवून आणि भात्याची उघड झाप करून तो पूढल्या संकटाची कल्पना देतो. बोट पेटीवर सूर शोधत असतात आणि डोळे ' सावज' . 'सूर' आणि 'गाण' बहूदा 'पाठशिवणीचा' खेळ खेळत असतात. त्याला धमकावून वाठवत असावेत- 'जर का सूरात गायलास तर खबरदार गाठ आमचाशी (का हीमेश रेशमिया शी) आहे.' काही लोक कंटाळून, काही लोक पूण्य कमावावे म्हणून, तर काही इतरांवर छाप पाडण्यासाठी म्हणून पैसे देतात. तूम्हाला पैसे द्यायचे नसतात म्हणून तूम्ही झोपेच सोंग घेता. पण भिकारी कसला खट. अगदी तूमच्या समोर येऊन उभा रहातो. आणि भात्यातून कसले कसले बाण काढून तूमच्यावर सोडत असतो. गाणही अगदी चपखल निवडतो.

" ए दूर के मूसाफीर...." (आयला ह्याला कस कळल आम्ही वसईवरून आलो ते)
" ... हमको भी साथ लेले ...." (आता आला आहेस ना बाबा डब्यात पक्षी डोक्यात)
"... हम रहे गये अकेले ....." ( तो भाता आहे ना तूझ्याकडे. एकला कशापायी)

नाईलाजाने तूम्ही रूपया काढून त्याच्या हातावर टेकवता. तो भिकारी (का शिकारी) पूढच्या स्टेशनावर उतरून जातो. तूम्ही परत थोड्यावेळ ' डूलकी ' घ्यायचा प्रतत्न करता. तूमच स्टेशन येत. तूम्ही दोन्ही हात दूर करून जन्मो -जन्मीचा सोबती 'आळस' दूर घालवण्याचा प्रयत्न करता. आणि एक मोठ्ठी जाम्भई देता एक भलामोठा 'आवाज' करून.

***************************************************************समाप्त

विषय: 
प्रकार: 

छान लिहिले आहेस केदार. गाडीत चढण्यापासून उतरण्यापर्यंतच्या सर्व घटणा गमतीशीर मांडल्या आहेत.
सुरुवात 'आवाज' अशी करून पुढे सर्व रेल्वे संबधीत आवाज ह्यावरच लिहिले आहे त्यामुळे पहिला परिच्छेद आणि पुढील सर्व लिखाण ह्यामध्ये मेळ वाटत नाही. पहीला परिच्छेद दिशाभूल करतो अथवा कोणतीच दिशा दाखवत नाही.

धन्यवाद रे अपूर्व Happy

थोडीशी गफलत झालेली. दूरूस्त केलीये. Happy