न जाने क्यूं होता है यूं जिंदगी के साथ...

Submitted by अतुल ठाकुर on 2 January, 2020 - 06:12

9a0377719e6d86647d9e200d813c95ac.jpg

आपल्याकडे काही गाणी अगदी वैश्विक सत्य सांगणारी लिहिली गेलीत. एखादी व्यक्ती नेहेमी जवळपास असताना आपण त्या व्यक्तीला गृहीत धरतो. त्या व्यक्तीचे आपल्यावर असलेले प्रेम, ती व्यक्ती आपल्यासाठी करीत असलेली धडपड आपल्या लक्षातही येत नाही. किंवा लक्षात आल्यास आपल्याला तिचे फारसे कौतूक नसते. मात्र तिच व्यक्ती काही काळासाठी नजरेआड झाली की मात्र आपल्याला त्या व्यक्तीच्या बारीक सारीक गोष्टी पावलोपावली आठवू लागतात. आणि आपल्या आयुष्यात त्या माणसाच्या अभावाने पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटते. आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्यापैकी बहुतेकांना येणार्‍या या अनुभवाला चपखल शब्द दिलेत गीतकार योगेश यांनी. बासु चटर्जींचा १९७६ साली आलेला "छोटीसी बात" हा खरं तर एक हलकाफुलका चित्रपट. पण या कॉमेडीत अनेक जागा मला नेहेमी अशा वाटत आल्या आहेत की त्यातील विनोदाचा भाग सोडला तर या गोष्टी अगदी रोजच्या आयुष्याला लागु होणार्‍या आहेत.

विद्या सिन्हावर लपून छ्पून प्रेम करणारा अमोल पालेकर, त्याच्या प्रेमात "रास्ते का कांटा" असलेला असरानी आणि हा काटा काढण्यासाठी मदत करणारा अशोककुमार यांची ही कथा. मध्यमवर्गीय पापभीरु वातावरण. नायक आपल्यावर प्रेम करतो आहे हे नायिकेच्या लक्षात आलेले आहे. तो भिडस्त आहे हे ही तिला माहित आहे. ती त्याचा लाजरे बुजरेपणा, भिडस्तपणा एंजॉय करते आहे. पण तिच्या नकळत ती त्याच्यात गुंतत चालली आहे हे मात्र तिच्या लक्षात आलेले नाही. ते केव्हा लक्षात येते? तर आपल्यातला हा बुजरेपणा निघुण जावा, पराभूत मनोवृती नाहीशी व्हावी म्हणून अमोल पालेकर जेव्हा अशोककुमारकडे ट्रेनिंग घेण्यासाठी काही दिवसांकरता निघून जातो तेव्हा. तिच्या आयुष्यात एकदम पोकळीच निर्माण होते आणि सुरु होतं न जाने क्यूं...

सलील चौधरी हा वेगळ्या बाजाचे संगीत देणारा संगीतकार. या गाण्याची सुरुवात, त्यावेळी वाजवला गेलेला (बहुधा) सेक्सोफोन आणि त्यानंतरचा तो जीवघेणा कोरस. असं वाटतं आठवणींच्या पक्ष्यांचा थवाच्या थवा मनाच्या आकाशात उडू लागला आहे. अगदी असाच चमत्कार सलीलदांनी "आनंद"साठी "जिंगदी कैसी है पहेली हाये" मध्ये केला आहे. पण त्याबद्दल पुन्हा केव्हातरी. लताबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं कळतच नाही. नुसता दैवी आवाज असता तर एकवेळ समजलं असतं. पण प्रत्येक गाण्याचा बाज ओळखून त्यातील शब्दन शब्द त्या भावनेत ओतप्रोत भिजवून पेश करायचे. हे या जगातलं नाहीच. काहीतरी पलिकडचं आहे. या गाण्यात नायिका अल्लड नाही, प्रौढा आहे. शब्दही प्रौढ आहेत. नायिका मध्यमवर्गीय आहे. तिच्या भावना एकदम नायकाच्या गळ्यात पडणार्‍या नाहीत तर संयत आहेत. आणि नेमक्या त्याच भावना लताच्या आवाजाने पकडल्या आहेत.

बासुदांच्या या गाण्याच्या दिग्दर्शनाबद्दलही बोलावं लागेल. विरह आहे पण हलक्याफुलक्या चित्रपटातील आहे. विरह तर जाणवायला हवा पण प्रेक्षक दु:खी होता कामा नये म्हणून बहुधा काही हलके फुलके सीन्स गाण्यात घेतले आहेत. विद्या सिन्हाच्या बाजुला बसमध्ये बसायला जाताना अचानक दुसर्‍यानेच ती जागा पटकावल्यावर नायकाचा झालेला हिरमोड, तिच्या मागोमाग जाताना तिने अचानक वळून पाहिल्यावर त्याचे बावरणे या गोष्टी विरहातही वातावरण हलके ठेवायला मदत करतात. मुंबईतील शिवाजीपार्कच्या आसपासचे असल्यासारखे वातावरण. त्या छोट्या टुमदार इमारती, बाल्कनीज. आणि त्यात अंगभर साडी लपेटून घेतलेली आपली नायिका.

भारतीय साडीत कुठलीही स्त्री सुरेखच दिसते, आणि यात तर आहे विद्या सिन्हा. साध्या साड्या नेसून ही नायिका अगदी आपली वाटते. आपल्या शेजारी राहात असावी अशी. पण त्या साधेपणात एक ग्रेस आहे. माणुस आकर्षक वाटायला फार मेकप किंवा उत्तानतेची गरज नसते हे सांगणारा तो काळ. साधी विद्यासिन्हा साडीत फार सुरेख दिसली आहे. आणि तिला साथ देणारा अमोल पालेकरचा टिपिकल मध्यमवर्गीय नायक. तोही अगदी आपल्यातलाच. चेहर्‍यावरील भाव तर आहेतच पण हे मध्यमवर्गीय असणे अमोल पालेकरच्या नुसत्या चालण्यातूनही जाणवते. नायिकेचचा हरवलेपणा, उदासवाणेपण बासुदांनी छोट्या छोट्या गोष्टींमधून दाखवले आहे. यात एक दृश्य आहे. नायिका बसस्टॉपवर उभी असताना असरानी स्कूटर घेऊन येतो आणि बरोबर येते का तिला विचारतो. नायिका नकार देते. ती उदास आहे कारण "वोही है डगर वोही है सफर, है नही साथ मगर मेरे, अब मेरा हमसफर" या भावनेने तिचे मन भरून गेले आहे.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख ! मला या जोडीचा रजनीगंधा खूप आवडतो... नरेशन बाय हिरोईन (स्वगते ) खूप मस्त वाटतात.

all time favourite song
लिहिलय ही छान >>> + १

अगदी आवडतं गाणं. चित्रपटही खूप आवडतो.
तुम्ही गाण्यांबद्दल फार छान लिहीता. नंतर कितीतरी वेळ ते गाणं मनात रेंगाळत असतं.

सुंदर लिहिलं आहे.हा पिक्चर, याची गाणी खूप आवडतात.
हे थोडं उदासवाणं गाणं आणि नंतर नवा कॉन्फिडन्स वाला अमोल पालेकर आल्यावर उत्साही आणि आनंदी 'ये दिन क्या आये' गाणं.
या पिक्चर वर पण लिहा.

छान लिहीलं आहे...
त्या काळची सर्वच गाणी अशीच कर्णमधुर व अर्थपूर्ण पध्दतीने चित्रीत केलेली असत...
असच एक सदाबहार गाणे म्हणजे रिमझिम गिर सावन- लता व्हर्शन. त्यातली नायिके बरोबर पावसात भिजणारी मुंबई, व अनेक दृष्ये अक्षरशः आपल्याला थेट (जुन्या) मुंंबई च्या किनारी नेऊन सोडतात. अमिताभ व मौशमी बरोबर आपणही मुंबई मध्ये चिंब फिरून येतो.
'बातों बातों मे' चित्रपटातील सर्वच गाणी अशीच मुलायम व अर्थपूर्ण पध्दतीने चित्रीत केलेली आहेत... त्यातही 'सुनिये कहीये' हे अमोल पालेकर व टीना मुनिम यांच्यावरील चित्रीत गाणे व त्यातील लोकल ट्रेन मधिल दृष्ये आजही आपल्याला त्या दशकात घेऊन जातात. पुन्हा एकदा बासू दा च!

>>>>> 'बातों बातों मे' चित्रपटातील सर्वच गाणी अशीच मुलायम व अर्थपूर्ण पददीने चित्रीत केलेली आहेत... त्यातही 'सुनिये कहीये' हे अमोल पालेकर व टीना मुनिम यांच्यावरील चित्रीत गाणे व त्यातील लोकल ट्रेन मधिल दृष्ये आजही आपल्याला त्या दशकात घेऊन जातात. पुन्हा एकदा बासू दा च!>>> येस्स्स्स अतिशय गोड गाणे, सुरेख चित्रीकरण. गर्ल नेक्स्ट डोअर, कॉमन मॅन. आपण स्वतःला हिरो-हिरॉइनहिरॉइनच्याखुशाल, अगदी बिनदिक्कत कल्पू शकतो.

>>गर्ल नेक्स्ट डोअर
टिना मुनिम वॉज बिट मोअर दॅन गर्ल नेक्स्ट डोअर बर का.. ! Wink

हाहाहा सत्य आहे. Happy तिची स्टाइल काळाच्या पुढेच होती. किरिस्ताव मुली तशा आधुनिकच दाखवल्या जायच्या.

असच एक सदाबहार गाणे म्हणजे रिमझिम गिर सावन- लता व्हर्शन. त्यातली नायिके बरोबर पावसात भिजणारी मुंबई, व अनेक दृष्ये अक्षरशः आपल्याला थेट (जुन्या) मुंंबई च्या किनारी नेऊन सोडतात. अमिताभ व मौशमी बरोबर आपणही मुंबई मध्ये चिंब फिरून येतो.

<<

या गाण्यावर आधीच धागालेखकांनी सुंदर लेख लिहला आहे

https://www.maayboli.com/node/70252

छान

Pages