सुखी कोण?

Submitted by sneha1 on 11 October, 2009 - 00:48

चार वर्षांपूर्वी सकाळ मधे छापून आलेली माझी छोटीशी कथा मायबोलीवर टाकते आहे.इथला हा पहिलाच प्रयत्न आहे......

भाजी आणायला मंडईत गेले होते.मला मंडईत जायला नेहमीच आवडते.ताजी ताजी, हिरवीगार भाजी पाहिली की मनाला कसा गारवा मिळतो.वांगे घेत असताना समोर पाहिले, तर सीमा दिसली.थोडा खिन्नच दिसला तिचा चेहरा.मी जाऊन बोलायला सुरुवात केली,पण नेहमी आनंदात राहणारी सीमा गप्पच वाटली. न राहवून मी कारण विचारल्यावर ती म्हणाली,''अगं, काय सांगू?ह्यांना प्रमोशन मिळाले आहे, पण परगावी पोस्टिंग असल्यामुळे नाही म्हणतात्.आता तूच सांग्,महागाई किती वाढली आहे.रोजचा खर्च , शिवाय मुलांचे शिकवण्या, शाळा, किती वाढते खर्च आहेत्?शिवाय पिंकी पण लग्नाची होईलच की आता.मला काय करावे, काही कळत नाही.अजून स्वतःचे घर झाले नाही आमचे, आणि ह्यांचा एकच नाद, मी घराला, ह्या शहराला सोडून जाणार नाही.आता तूच सांग, मी काय करू ते.''

मी उमेशला, सीमाच्या नवर्‍र्याला ओळखते.फारशा महत्वाकांक्षा नसलेला,सरळसाधा माणूस आहे तो.सीमाशी जुजबी बोलून मी तिचा निरोप घेतला, आणि घराकडे निघाले.
थोडे पुढे गेल्यावर घराच्या वाटेवर मला नीता भेटली.तिचे घर माझ्या घराजवळच आहे.ती आग्रह करून घरी घेऊन गेली.खूप दिवसात तिच्या आणि माझ्या गप्पा झाल्या नव्हत्याच.मी पण तिच्याबरोबर तिच्या घरी निघाले.आम्ही पोचलो आणि ती मला समोरच्या खोलीत बसवून चहा आणायला गेली.मी बसल्याबसल्या इकडेतिकडे बघायला सुरूवात केली.उंची पडदे,मखमली गालीचे,नवाकोरा मोठा टीव्ही ,अद्ययावत म्यूझिक सिस्टिम हे सगळे नीताच्या आर्थिक सुबत्तेची साक्ष देत होते.तेव्हढयात नीता बोन चायनाच्या सुबक कपबशांमधून चहा घेऊन आली.बोलता बोलता मी महेशची, तिच्या नव-याची चौकशी केली.तिने सांगितले की तो चार महिन्यांसाठी अमेरिकेला गेला आहे, कंपनीच्या कामासाठी.त्याचे असे दौरे नेहमीच चालू असतात्.ती म्हणाली,"महेश सतत कामात बिझी असतो.कधी मुलांची परीक्षा,त्यांचे आजारपण्,कधी बक्षिस समारंभ..त्याची पण घर सोडून जायची इच्छा नसते कित्येकदा,पण काय करणार्?नोकरीच तशी आहे.''तिच्या बोलण्यात खिन्नपणा जाणवलाच, नाही म्हट्ले तरी.थोड्या गप्पा मारून मी घरी यायला निघाले.
घरी येताना रस्ताभर माझ्या मनात विचारचक्र चालू होते.खरंच कोण सुखी? सीमा की नीता?सीमाला प्रत्येक क्षणी नव-याचा सहवास मिळतो,घरातील सुख्-दु:खात त्याचा प्रत्यक्षपणे सहभाग असतो, त्याचा आधार असतोच तिला.तरी आर्थिक अडचणींचा त्रास होतो, हेही तेव्हढेच खरे आहे.आणि दुसरीकडे नीता.तिला आर्थिक अडचणी कसल्याही नाहीत. वरवर तिला सगळे मिळाले आहे असे वाटते खरे,पण तिलादेखील समाधान नाहीच्.सगळे आहे, पण नव-याचा सहवास नाही.एकट्याने सगळया कौटुंबिक अडचणींना तोंड देताना नव-याची उणीव जाणवतेच.शिवाय हे सगळे टाळायला महेशने इथल्या इथेच कमी पगाराची नोकरी घेतली, तरी पैशाचा,मुलांच्या भविष्याचा विचार आहेच की.कोण सुखी आहे?आणि कोणाचे बरोबर आहे,महेशचे की उमेशचे?
रात्री जेवताना मी हा विषय अवीजवळ, माझ्या नव-याजवळ काढला.त्याने नेहमीच्या शांतपणे मला उत्तर दिले,''हे बघ, आयुष्यात संपूर्णपणे सुखी किंवा दु:खी असे कोणी नसतेच. कोणत्याही परिस्थितीत अडचणी टाळता येत नाहीत़॑. आपल्याला फक्त निवड करायची असते,आपल्याला कोणत्या अडचणी हव्या आहेत त्याची.उमेशचे म्हणशील, तर त्याने आर्थिक अडचणी सहन करून घरच्यांचा सहवास, त्याचे मानसिक समाधान आणि शांत जीवन निवडले.महेशने कामाला, पैशाला जास्त प्राधान्य दिले आणि घरापासून दूर राहणे निवडले. हे करताना तोदेखील आनंदाच्या छोटया छोट्या क्षणांना मुकला.एकापरीने हे त्याने त्याच्या घरच्यांचा सुखासाठीच निवडले.आणि अर्थात त्याच्या करियर साठी.शेवटी महत्वाचे हेच आहे की आपल्याला आयुष्यात काय हवे आहे ते आपणच ठरवायचे.प्रत्येकवेळी ते मिळेलच ह्याची खात्री नसतेच म्हणा तशी.पण ,एकदा निर्णय घेतला की तो आनंदातच पाळायचा.मग त्याच्याबद्द्ल कुरकुर करण्यात काही अर्थ नाही.''त्याचे उत्तर पटून मी पण प्रश्न सुटल्याचा नि:श्वास सोडला.

गुलमोहर: 

आपल्याला फक्त निवड करायची असते,आपल्याला कोणत्या अडचणी हव्या आहेत त्याची. >>>
धन्यवाद! तुम्हाला आणि अविलाही... किती चुटकीसरशी सोडवला माझा प्रॉब्लेम... Happy

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

छान आहे कथा! सुखी कशात राहायचे हा खरंच मोठा प्रश्न आहे.. नेहेमीच पडतो.
आत्ता जी स्थिती आहे त्यात आनंद मानला की झाला तो माणूस सुखी! Happy

भाग्यश्री