विनातिकिट प्रवास

Submitted by मंजूडी on 14 February, 2008 - 07:19

श्री टिळक यांचं ललित, बिन भांडवली धंदा वाचलं आणि असे अनेक बिन भांडवली किंवा अल्प भांडवली आणि अवैध धंदे आठवू लागले. त्यातलाच एक धंदा म्हणजे लोकलमधून 'विनातिकिट प्रवास'.

'विनातिकिट प्रवास' म्हणजे मुंबईच्या लोकलमधून, तिकिट न काढता अगदी प्रथम वर्गाच्या डब्यातून प्रवास करा आणि समजा तिकिट तपासनीसाने पकडलंच तर दंड भरा आणि दंड भरल्याची पावती दाखवून आमच्याकडून दंडाचे पैसे घेऊन जा ह्या स्वरूपाचा हा अगदी अल्प भांडवली धंदा. प्रथम वर्गाने मासिक प्रवास करणार्‍यांचा ह्यात भरपूर फायदा होतो.

तर, 'विनातिकिट प्रवास' करायचा असेल तर या संघटनेच्या सदस्यांना गाठायचं. तुम्ही कुठून कुठे प्रवास करणार ह्यावर तुमचे मासिक शुल्क आधारलेले असते. एक फोटो देऊन ओळखपत्र आणि सदस्यत्वाची पावती घ्यायची आणि बिनधास्त प्रथम वर्गाने महिनाभर प्रवास करायचा. मासिक शुल्क भरून दर महिन्याला हा असा अल्प दरात प्रथम वर्गाचा प्रवास म्हणजे मुंबईकरांसाठी चैनच होते. समजा कुठल्या स्टेशनवर तपासनिसाने पकडलं तर रीतसर दंड भरून पावती घ्यायची आणि मग ह्या संघटनेच्या सदस्याला गाठून पावती दाखवून आपले दंडाचे पैसे वसूल करायचे.

उदरनिर्वाहासाठी मुंबई आलेल्यांपैकी कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून निघालेली ही कल्पना यशस्वी झाली आहे. अतिशय खाजगी रीतीने चालणारा हा धंदा विमा तत्वावर आधारीत आहे. म्हणजे समजा १० लोक रेल्वेतून फुकट प्रवास करत असतील तर तिकिट तपासनीस फार तर ४ जणांना पकडेल. बाकीचे ६ लोक विनासायास आपल्या कार्यस्थळी पोचतील.

बर्‍याच दिवसांपुवी वर्तमानपत्रात ह्याबद्दल बातमी वाचली होती. पण त्यावर विश्वास बसला नव्हता. परंतू जेव्हा खुद्द मला ह्याचा अनुभव आला तेव्हा ह्या धंद्याने पसरलेले हात पाय बघून मी सर्दच झाले.

त्या दिवशी नेहमीप्रमाणे पास काढण्यासाठी भरपूर मोठी रांग होती त्यामूळे पास मिळेपर्यंत चांगलाच उशीर झाला आणि माझी नेहमीची गाडी चुकली. पुढच्या गाडीत मैत्रीण भेटली, तिला मी हे सर्व सांगत असताना बाजूची मुलगी अगदी लक्षपूर्वक ऐकत होती. कुर्ल्याला जरा गर्दी ओसरल्यावर तिने मला गाठलं आणि कानात कुजबुजत ह्या संघटनेबद्दल माहिती दिली. माहिती इंटरेस्टिंग वाटली म्हणून मी जरा जास्त खोलात जाऊन चौकशी केली तेव्हा मला त्यांची वर दिलेली कार्यपद्धती समजली. मी ठाणे - भायखळा - रे रोड या टू वे रूटसाठी ५३५ रुपये भरते प्रथम वर्गाचा पास घेण्यासाठी. समजा मी या संघटनेची सदस्य झाले तर मला याच टू वे रूटसाठी फक्त १२५ रुपये भरावे लागतील. आणि प्रथम वर्गाचा दंड भरण्यासाठी आवश्यक असलेले पैसे नेहमीच पर्समध्ये बाळगावे लागतील. म्हणजे दर महिन्याला ५३५ रुपये मोजण्याऐवजी १२५ रुपयात काम भागेल. बघा, काय करू? तुमचा सल्ला विचारतेय. घेऊ का सदस्यत्व ह्या संघटनेचं? :))

गुलमोहर: 

मलाही अशा संटनेबद्दल कळले होते. खोलवर चौकशी तर अशा संघटना आहेत असे कळले. पण मनाला पटले नाही. कालातंराने रेल्वे प्रवास करावा लागला नाही. परंतु बरेच जण आहेत कि जे मासिक पास काढण्यापेक्षा असा दंड भरण्यात धन्यता मानतात. कदाचित ते या संघटनेचे सभासद असावेत.

मला वाटते हा उद्योग बराच रिकामा वेळ असलेले प्रवासी करतात. समजा तुम्ही पकडला गेलात तर तुम्हाला तुमचे महत्वाचे काम सोडून, कामावर रजा टाकुन तुमचे पैसे आणण्यासाठी जावे लागणार. म्हणजे तुमचे थोडेफार नुकसान होणारच. किती हे तुमच्या प्रामाणिकपणावर अवलंबून. शिवाय तुम्हाला दंडाचे पैसे सतत जवळ बाळगावे लागणार. बहुदा क्रेडिट कार्ड येथे चालत नसावे. शेवटी मनस्ताप, अपराधी पणाची भावना. चारलोकांसमोर आपला पंचनामा. सतत मनात धाकधुक. कठोर, दणकट मनाचे प्रवासीच या संघटनेचे सभासद होऊ शकतात. हो एक आहे वर्षाला तुमची रु. ४,९२० एवढी चांगली बचत होईल. माझं मत हो. निर्णय तुमचा.

लेख चांगला आहे. धन्यवाद.

मंजू काय अफलातून डोकी चालतात न या माणसांची? हीच जर योग्य मार्गाने चालली तर भारत ५ वर्षातंच महासत्ता होईल...

मंजू, ऐकले होते, पण खरेच असेल असे वाटले नव्हते.
नो क्लेम बोनस पण असतो का ? आणि बेडरपणाचे काय ट्रेनिंग वगैरे देतात का ?

दिनेशदा, खरंच, त्या मुलीला नो क्लेम बोनसबद्दल विचारायचं राहिलं.

आणि सदस्यत्व घेतल्यावर बेडरपणा आपोआपच येत असावा आपल्यात. :))

खरच अश्या समांतर संस्था (?) जर सत्कारणी लागल्या तर काय ना!
डोकं सुन्न झालं हे वाचून ,..:(

खरच असे होत मंजु, इतकी पद्धतशीर साखळी असते कामाची? असेल नक्की असेल पण ते वाचुन खुप अस्वस्थ वाटले की अश्या संस्था आहेत त्या ह्या पेक्षा जास्त वाईट वाटले असे लोक आहेत ज्यांना त्या लोकांकडुन पास घ्यावासा वाटतो.

तुमचा सल्ला विचारतेय. घेऊ का सदस्यत्व ह्या संघटनेचं? - नाही.

मंजु गं, मन सुन्न झाअलं वाचुन. प्रथम गरजेतुन आणि मग सरावानं हे उद्योग चालतात. मुंबईचं शांघाइ कसं होणार गं?

छे, हे इतक्यात संपणार थोडेच. आता धंदाच करायचा ठरवल्यावर, खर्चात बचत करणे आलेच. म्हणजे त्या लाईनावर असणार्‍या टिसी लोकांशी संपर्क साधणे आले. हि आमची मेंबरं आहेत, याना त्रास द्यायचा नाही, असे समाजवणे आले. त्या बद्ल्यात तुमची काळजी घेऊ, असे सांगंणे आले. मग बेकायदा मालाची वाहतुक करणे आहे. त्यासाठी गाड्या , हो रेल्वे गाड्या, काहि खास ठिकाणी खास वेळेला उभ्या करणे आले. मग आपल्या माणसाना रेल्वेत चिकटवणे आले, मग रेल्वेतील मालाची चोरी करणे आले. ( हो, रेल्वेच्या अख्ख्या वॅगन्स चोरीला जातात ) .

हे असे धंदे वाढिस लागण्याचं मुख्य कारण म्हणजे सत्तेवर असलेल्या नेत्यांची उदासीनता. आपले हफ्ते वेळेवर मिळताहेत ना, मग लोकांना काय करायचे असेल ते करू दे, ही मनोवृती. पैसे वाचवण्याचे मार्ग कोणी सुचवले आणि अवैध असले तरी त्याचा फायदा घेणारे आपल्या समाजात आहेत.

रुनी : मला पद्धतशीरपणाबद्दलच शंका होती. पण ती शंका आता १%सुद्धा राहिली नाही.

श्यामली : समांतर धंदे, वर दिनेशदांनी दिलेत बघ. ही फक्त चूणूक आहे. 'विनातिकिट प्रवास' तर अश्या संघटनेची मदत न घेताही करणारे कित्येक लोक आहेत. टीसीने पकडण्याची प्रोबॅबिलिटी हाच मुख्य घटक असतो या मनोभावनेचा.
रेल्वेमध्ये काम करणार्‍या लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना फुकट प्रवासाची मुभा असते. कधीकाळी टीसी रेल्वेत चढलाच तर त्याला मख्खपणे 'स्टाफ' असं सांगणार्‍या महिला बघितलेल्या आहेत. प्रत्यक्षात त्या असतात म्युनिसिपालटी किंवा बँकेत काम करणार्‍या.

केदार : don't worry मी असं विचारलं तरी असा प्रवास कधीच करू शकणार नाही. पास संपायच्या दोन दिवस आधीच माझा पुढच्या महिन्याचा पास तयार असतो.

ह्म्म.. बिन भांडवली धंद्याचा बीबी वाचलेला पण तुझा अनुभव वाचला नव्हता.

मुमंबईत आता मेट्रो सुरू झालीय. तिथे प्लॅटफॉर्मवर जायचे असेल तर आपल्याकडच्या तिकिटाने गेट उघडल्याशिवाय जाता येत नाही. अशी सिस्टिम रेल्वेवरही सुरू झाल्यावर असे प्रकार कमी होतील. ही सिस्टिम कधी आणि कशी सुरू होईल हा वेगळा विषय आहे. Happy

आणि असे प्रकार कमी होतील असा आशावाद व्यक्त करायलाही तसेच कारण आहे. मी आजवर फक्त दोनदाच मेट्रोने प्रवास केला. दुस-या वेळेस मुलगी सोबत होती आणि तिला मेट्रो व्यवस्थित पाहायची होती. म्हणुन आम्ही जरा रेंगाळत रेंगाळत चाललेलो. आमच्या समोरच एक सुखवस्तु दिसणारे कुटूंब तिथे आले. आई, बाप, आजी आणि सोबत एक ६-७ वर्षांची मुलगी. आईने आपल्या तिकिटाने गेट उघडले आणि त्या उघड्या गेटमधुन मुलीसकट ती माऊली आत आली. तिथे उभ्या असलेल्या गार्डाने जोरात ओरडुन मुलीचे तिकिट हवे, तिला असे आत आणु नका म्हणुन सांगितले. पण त्याच्याकडे नुसते कटाक्ष टाकुन ते कुटूंब सरळ प्लॅटफॉर्मवर निघुन गेले. मेट्रोलाही लोकांची ब-यापैकी गर्दी असते. तिथल्या गार्डांना कोण भाव देतेय.

सही आहे. मला नव्हते हे माहीत. अजून आहे का ही संस्था. मला सदस्य व्हायला आवडेल.
तसेच मेट्रो दरवाढीच्या नावावर आता रिलायन्सवाले लुटणारच आहेत सामान्य जनतेला. तिथेही काही पळवाट निघाली तर बरे होईल.

मला स्वतालाही बरेचदा असे वाटते की वर्षभरात ४ वेळाही कोणी पकडत नाही तर का उगाचच्या उगाच पासवर पैसे खर्चा करा. तसेच स्टेशनवर पकडले तर फर्स्टक्लास की सेकंडक्लास हे देखील समजत नाही. म्हणजे दंडही कमीच असावा. तसेच त्याऊपरही पकडलेच तर दंड भरणे गरजेचे नाही, तर चिरीमिरी देऊन सुटता येते. थोडक्यात पास काढने म्हणजे पैश्यांचा निव्वळ आणि निव्वळ अपव्ययच आहे.

उद्या पुन्हा सरकार तिकीटभाडे अचानक एका फटक्यात डबल करून टाकेन, हजार रुपयांचा पास दोन हजार होईल आणि महिन्याचा खर्चाचा सारा अंदाज बिघडेल. तेव्हा रडत बसण्यापेक्षा आतापासूनच अश्या स्कीममध्ये पैसे गुंतवून वाचवून ठेवलेले बरे Happy

बापरे, हे माहित न्हवतं. विम्याचं इथे केलेलं एप्लिकेशन आवडलं. अर्थात वाट्याला जाणार नाही हे आलंच.
ह्या अश्या माणसांमुळे आता सिस्टीम नवे अडथळे तयार करेल आणि मग ते पार करण्यासाठी लोकं आणखी डोकं लावतील. अशा नवीन नवीन गोष्टींसाठी हार्डवेअर, सोफ्टवेअर, ग्लिचेस गुड. आमचा जॉब टिकून राहील. Happy

अरे बापरे! आज वाचते मी हा धागा.सुपीक डोक्यांची खरोखर कमाल आहे.आजकाल प्रथम वर्गाचा पास काढणे मूर्खपणाच वाटतोय.आम्ही चढण्याआधी दुसर्‍या वर्गाचे प्रवासी हजर असतात.तेही ८-१० अशा संखेने.
माझ्या आईची सहकारी जास्त भन्नाट वाटते. त्यावेळी ती बोरिवलीवरून येताना कायम प्रथम वर्गाने यायची.टी.सीने पकडले तर १०० रुपये तयार ठेवायची.(त्याकाळी तेवढे पुरत असावेत.) काही नाही म्हणे कधीतरी टी.सी. पकडणार,तेव्हा द्यायचे.

शाळेच्या मुलांना फर्स्टक्लास चालते. मी डिप्लोमाला असताना फर्स्टक्लासनेच जायचो, कोणी अडवले तर सरळ नववीत किंवा दहावीत आहे आणि क्लासला चाललोय असे ठोकून द्यायचो. अर्थात ३-४ वेळाच अडवलो गेलो आहे आणि २-३ वेळा सोडून देण्यात आले आहे. पण एकदा मात्र एकाने घेतला बरोबर. मी शाळेत असलो तरी क्लासला जाताना नाही चालणार म्हणाला. मी माझे सर्वच मित्र असे जातात वगैरे आणि आणखी बरेच काही बोलीबच्चन द्यायला लागलो. तर तो, ज्यादा स्मार्ट बनता है छोकरा असे आजूबाजुच्या प्रवाशांना सुनावत मला त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला.

मधल्या काळात माझ्या पाकिटात असलेले ४००-५०० रुपये मी मोठ्या शिताफीने लपवले. त्यामुळे त्यांना २०-४० रुपयेच सापडले. ते त्यांनी न घेता माझा पास जप्त केला आणि दंडाची रक्कम आणून घेऊन जा म्हणाले. पास ४-५ दिवसांनीच संपणार होता हे त्या महाभागांच्या लक्षात आले नाही. आणि मी देखील त्या ४-५ दिवसांचा पास फुकट गेला याचेही वाईट वाटू नये म्हणून लगेच नवा पास न काढता ४-५ दिवस मुद्दाम विदाऊट तिकीट प्रवास केला.

देवकी, अहो खरेच चालते. आमच्यावेळीही चालायचे आणि आजही चालते. मी कधी हाल्फडे ने ऑफिसला जातो तर शाळेचा ग्रूप भरतो डब्यात. आणि हो, शाळेचे मुलगे सुद्धा लेडीज फर्स्टक्लास मध्ये चढतात.
तुम्ही खरेच असे बघितले नाहीये का?