पत्रिकेचं नक्की आयुष्यातलं स्थान काय आणि किती ?

Submitted by उडन खटोला on 17 October, 2014 - 16:19

ही गोष्ट आहे 1990 मधली. माझ्या ऑफिस मधल्या एका मैत्रिणीला एक स्थळ सांगून आलं होतं. अतिशय श्रीमंत. घरच्यांना एकदम पसंत. त्याला ती पसंत. पण तीला काही तो आवडला नव्हता. तिचा नकार घरच्यांच्या पचनी पडेना. त्यांनी एकांना पत्रिका दाखवली. त्यांनी रामबाण अस्त्र काढलं. त्यांनी सांगितलं की 'हा सुवर्णयोग जर चुकवला तर नंतर 10 वर्षं मुलीच्या कुंडलीत विवाहयोग नाही.' मैत्रिण हैराण.
मी तिला म्हटलं की, 'पत्रिकेवर विश्वास ठेवायचा तर नीटच ठेव. तुझ्या नशिबात हाच मुलगा लिहीला असेल तर जेव्हा केव्हा योग येईल तेव्हा हाच मुलगा नवरा मुलगा असेल.
योग एकतर आत्ता असेल किंवा दहा वर्षांनी ... त्यात जर-तर कसं काय ? पत्रिका म्हणजे अटळ योग. काळ्या दगडावरची रेघ.
नाही तर पत्रिकेवर विश्वास ठेवू नकोस. तुला पसंत नसलेल्या मुलाशी विवाह करू नकोस. स्वत:वर विश्वास ठेव आणि घे नशिबाची परिक्षा.'
सुदैवाने तिने हिंमतीने विरोध केला. लगेचच एका उत्तम मुलाशी दोघांच्याही पसंतीने विवाह झाला. आज ते सुखात लग्नाचा रौप्यमहोत्सव साजरा करतायत.
माझा एक मित्र एकीच्या प्रेमात पडला. त्याचा पत्रिकेवर खूप विश्वास. त्याने खटपटी लटपटी करून तिची पत्रिका मिळवली. दुर्दैवाने पत्रिका जुळेना. त्याने तिचा विचार मनातून काढून टाकला.
दोघांनी प्रेमविवाह ठरवला. आधी घरून विरोध. मग पत्रिका तरी बघू अशा तडजोडीपर्यंत गाडी आली, तर पत्रिका जुळेनात.
मग काहींनी सांगितलं, 'प्रेमविवाहात पत्रिका बघत नाहीत.'
कुणी म्हणे, 'मुलीला मंगळ आहे.'
कुणाचं म्हणणं, 'complementary गुण धरले तर पत्रिका जुळते.'
तर कुणी म्हणे, 'पत्रिका चांगल्या पायगुणाची आहे. लक्ष्मी येईल घरात.'
एकाने तर त्या मुलीला हात बघून भविष्य सांगितलं, 'हिचे एक लग्न ठरुन मोडेल.'
या सगळ्या गोंधळात त्यांनी परस्परांवर विश्वास ठेवून विवाहाचा निर्णय घेतला. दोघेही सुखरुप आहेत. संसारही सुखाचा आहे. आर्थिक परिस्थिती सर्वसाधारणच आहे, लक्ष्मीकृपा लांबच आहे.
याऊलट उत्तम गुण जुळलेल्या, नीट पाहून विवाह केलेल्या तीन जोडप्यांचे माझ्यासमोर घटस्फोट झालेले आहेत.
माझ्या कुंडलीत 'विवाहापासून सुख' हा योगच नसेल तर पत्रिका पाहून विवाह करण्यात काय हशील ? तरीही पत्रिकेला एवढं अवास्तव महत्त्व का ? पत्रिकेचं नक्की आयुष्यातलं स्थान काय आणि किती ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचे विचार खरच बरोबर आहेत ........ एकतर खूप कमी लोकाना खरच पत्रिका कळ्ते त्यामुळे समोरचा ज्योतिषी कितपत खर सान्गतोय देवजाणे ....समोरच्या ज्योतिषावर किती विश्वास ठेवायचा ते ज्याच त्याने ठरवावे........................ मी तर एक किस्सा एकला होता कि एका बाईने खोटच एका मुलाची आणि मुलीची पत्रिका जुळत असताना आणि ते दोघे एकमेकाना पसन्त असताना जुळ्त नाही म्ह्णून सान्गितली होत कारण तिला तिच्या ओळ्खीच्या मुलीच त्या मुलाशी लग्न लावायच होते ................सुदैवाने त्या मुलाच्या आइवडिलाना आणी त्याला स्वतः मुलगी आवड्ली असल्याने त्यानी दुसर्या अजून ज्योतिषीना पत्रिका दाखवली...........आता त्याच लग्न होउन त्याना मुले सुदधा आहेत...............त्यामुळे समोरचा ज्योतिषी नक्की खर सान्गतोय आणि आपण त्याच्या सान्ग्ण्यावरून कुणाशी लग्न करायचे हे आपल्या मनाविरूद्ध ठरवणे म्हण़जे फारच चुकीचे आहे

पत्रिका आणि लग्नसंबंध असा धाग्याचा विषय वाटतोय कारण इतर क्षेत्रातील उदा० अथवा घटना नाहीत.

वर एक प्रतिसादात फेबुवरून इकडे चिकटवले असे लिहिले आहे तर तसा संदर्भ द्याच.
फेबुवर जरी तुम्हीच लिहिले तरी काही तासांतच तुमचे नाव गायब होते अथवा हे दुसऱ्या कुणाचे ढापले आहे असा समज होतो.

उडन खटोला,

नका ना पाहु पत्रिका. कुणाच काही जाणार नाही. कशाला ज्योतिषप्रेमींच्या आणि अभ्यासुच्या ठिकाणी येऊन मुक्ताफळे ?

पत्रिकेचं नक्की आयुष्यातलं स्थान काय आणि किती ?>>>>शुन्य.

जगात चारशेच्या वर देश आहेत त्यातले ३९५ देशातील नागरिक पत्रिका पाहत नसावेत तरी त्याचं काहीही बिघडलेलं नाहीये

माझ्या ग'फ्रेंडला कडक मंगळ आहे Sad
आमचे काय कसे होणार आहे देव जाणे .. पण यावर काहीतरी लिहिण्याची खुमखुमी येते बरेचदा .. पण पुन्हा कधीतरी.. एखाद्या प्रतिसादात मांडण्यासारखे नाहीये एकंदरीत प्रकरण !

पत्रिकेचं नक्की आयुष्यातलं स्थान काय आणि किती ?>>>>शुन्य.

जगात चारशेच्या वर देश आहेत त्यातले ३९५ देशातील नागरिक पत्रिका पाहत नसावेत तरी त्याचं काहीही बिघडलेलं नाहीये

हे लिहल नसत तरी काही बिघडल नसत.

माझ्या ग'फ्रेंडला कडक मंगळ आहे अरेरे
आमचे काय कसे होणार आहे देव जाणे >>>>>>>.अरे घाबरू नका हो मंगळी मन्ड्ळी बिनधास्त असतात एकदम....... कधी ड्गमगत नाहीत....फायटिग स्पिरीट खूप असत

माझ्या ग'फ्रेंडला कडक मंगळ आहे अरेरेआमचे काय कसे होणार आहे देव जाणे >>>>>
ऋन्मेष, काही हॊत नाही. बिनधास्त लग्न करा

सुम, अतरंगी,
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद
मी स्वता देखील याच मताचा आहे की पत्रिका वगैरे काही होत नाही, बिनधास्त करा लग्न Happy

पण ती माझे डोके खूप खाते, या कारणासाठी आमचे ब्रेकअप होऊ शकते Angry . . . . . . . . . . . . . . . . Proud

पण ती माझे डोके खूप खाते, या कारणासाठी आमचे ब्रेकअप होऊ शकते राग . >> जुना जलवा सिनेमा बघा. त्यात नसिरुद्दीन आईला म्हणतो " पापाने बेवकूफ तो नहीं बनाया पर शादी तो की! " सिनेमात अनेक बेहतरीन विनोद आहेत त्यापैकी हा एक आहे. एकदा लग्न केल्यावर तिला डोके खायचे लायसेन्स मिळेल. ऑन अ सिरीअस नोट तिला सांगा कितीतरी निरपराध लोक मरत असतात असे मंगळ आहे म्हणून कोणी मरत नाही. ब्रेकप झालाच तर त्याला इतरही कार्णे असून बिचा र्‍या मंगळाचे नुसते नाव घेतले जात आहे हे निस्चित समजा.

अमा,
माझ्या केसमध्ये, माझी इमेज चारचौघात अशी आहे, की मंगळ या कारणासाठी किंवा पत्रिकायोग बघत मी कोणत्या मुलीला नकार दिला तर माझ्या इज्जतचा पार कचरा होईल.
आजवर ज्या गोष्टींची मी टिंगल करत आलो त्यावरच विश्वास ठेऊन मी नकार दिला हे माझ्यासाठी आयुष्यभराचे चिडवणे होईल.

आणि हो, याच कारणासाठी मी तिच्याशी कुठल्याही कारणास्तव ब्रेकअप होऊ देणार नाही, नाहीतर तिच सर्वांना सांगत सुटेल की अरे या रिशीने मला मंगळ आहे म्हणून नाकारले Lol

@ ऋन्मेऽऽष

<< माझ्या ग'फ्रेंडला कडक मंगळ आहे अरेरे
आमचे काय कसे होणार आहे देव जाणे >>

मंगळ त्यांना आहे ना, मग तुम्ही कशाला काळजी करताय? त्यांना भोगावं लागणार आहे. त्या मंगळाचे फळ म्हणूनच त्यांना सईभक्त नवरा नशिबी येणार आहे.

UDAN KHATOLA,
THE POST POSTED BY YOU WAS READ ON 15 OCT 2014,IT IS BY SWATI JOSHI, WHEN YOU USE POST PUBLISHED BY OTHER PERSON AT OTHER SITE,YOU MAY STILL USE IT,BUT HAVE HEART OF OFFERING DUE REF.AS THEASE DAYS EVERY PERSON IS EVERY POINT,SO THEPT COULD NOT BE SECRET OR PROTECTED FOR LONG.
PL. CONFIRM YOUR STAND ON THIS COMMENT
AS WHEN WE WANT TO PROTECT MARATHI,WE CAN NOT PUBLISH OTHERS WORK AS OWN.

पण ती माझे डोके खूप खाते, या कारणासाठी आमचे ब्रेकअप होऊ शकते राग . . . . . . . . . . . . . . . . फिदीफिदी
------
पत्रिकेवर माझा पुर्ण अविश्वास आहे, निव्वळ थापा असतात...

असो, प्रेमात सर्व क्षम्य असते हे लक्षात घ्या आणि मॅचिन्ग पत्रिका तयार करा.

भारताच्या यानाचे मन्गळ कक्षेत यशस्वी आगमान झाले आहे त्यामुळे मन्गळाचे मास (mass) थोडे वाढले त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्यावर होणार आहे. शुभेच्छा.

त्या मंगळाचे फळ म्हणूनच त्यांना सईभक्त नवरा नशिबी येणार आहे. Lol

अवांतर - ग'फ्रेंडला मंगळ असल्याचा एक फायदा मात्र समजला, तिच्या घरी कल्पना नसेल आणि तिचे घरचे लग्नासाठी स्थळे शोधत असतील तरी आपल्याला फारसे टेंशन घ्यायची गरज नसते. आपल्या हातात चिक्कार वेळ असतो कारण पत्रिकेवरच तिचे स्थळ नाकारले जाते.

वेळीच गर्लफ्रेंडचे ऐश्वर्या राय प्रमाणे झाडाशी लग्न लावून दे रे बाबा, नाहीतर तुझ्या नावात जस तिच्यामुळे SS आल तस अजून कै. वगैरे पण यायचं. भलत्या विषयात थट्टा नको, पैसे गेले तरी चालतील पण एका मनीप्लांटशी तिचे लग्न वेळीच लावून दे. साधे घरच्या घरी वैदिक पद्धती किंवा आर्य समाजी पद्धतीने पण चालेल. अशा लग्नाच रिसेप्शन नाही देत कुणी पण चार मित्र-मैत्रिणी बोलावून जरूर पाणीपुरी खा. तिचा मंगळदोष जाणे हे किती आनंदाचे. झाड मरेपर्यंत लग्न करू नका. कदाचित ह्याला अंधश्रद्धा म्हणून किंवा तू आवडत नाही म्हणून तिचे आई-बाबा झाडाला पाणी घालण्याचा प्रयत्न करतील तर झाड स्वतःच्या घरी घेवून ये.

मी ज्योतिषी नाही त्यामुळे सल्ला फक्त ऐश्वर्याच्या लग्नावरून दिलेला आहे. चांगल्या ज्योतिषाने जे काही सांगितल - झाडाऐवजी वेलीशी लग्न इ. - तर ते करा.

मंगळ या कारणासाठी किंवा पत्रिकायोग बघत मी कोणत्या मुलीला नकार दिला तर माझ्या इज्जतचा पार कचरा होईल.>>>>> केवळ मंगळ आहे म्हणू नका. तो कुठल्या घरात असणे यावर तसेच तुमच्या पत्रिकेत शनी असणे वगैरेमुळे , मंगळ दोष निर्बल होतो.यावर जाणकार जास्त माहिती देतीलच.

आपण पोहोचलोत एकविसाव्या शतकात पण आपली लग्न जमवण्याची पद्धत मात्र अजुनही अठराव्या शतकातलीच आहे. एक लहान फरक पडलाय, मुलीची पसंतीही विचारात घेतली जाते, मुलगा मुलीशी एकट्याने थोडे बोलु शकतो आणि दोघे एका शहरात असतील तर एकमेकांना भेटु शकतात. आता यात गोम अशी की लग्नाआधी मुलगा मुलगी जरी एकांतात बोलले तरी बहुतांश केसेसमध्ये त्याला काही अर्थ नसतो. बहुतेक वेळा मुलगा तुला माझ्या आईबाबांना संभाळावे लागेल इ.इ. बोलतो ज्याला अर्थातच ती मुलगी लगेच हो म्हणुन मोकळीही होते. एकदा लग्न झाले की मग या वचनांचा विसर पडतो. (हे मी प्रत्यक्ष पाहिलेय घडताना Happy )

लग्न ठरवायच्या असल्या जुनाट पद्धतीमुळे लग्न ठरवताना शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवाराशी चर्चा करुन समोरच्या व्यक्तीशी आपले आयुष्यभर पटू शकेल का, ज्या गोष्टी आज पटत नाहीयेत त्या गोष्टी आपल्यासाठी किती महत्वाच्या आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन आपण या व्यक्तीबरोबर राहु काय इत्यादी विचार केला जात नाही. अशी कुठलीही पद्धत आपण विकसीत केली नाहीय.

पण तरीही आपल्या मुलामुलीचा संसार सुखात जावा अशी मात्र सगळ्या पालकांची इच्छा मात्र असते. सुखात जाण्यासाठी योग्य व्यक्ती मिळणे आवश्यक, पण ती व्यक्ती योग्य आहे की कसे हे जाणण्याची सोय काहीच नाही. मग काय करणार. मिळणारी सुन/जावई कशी आहे याचा पत्त्ता कसा लागणार? अशा वेळी पत्रिका पाहुन मुलामुलीचा स्वभाव जाणुन घ्यायचा प्रयत्न केला जातो. इथेही खुप गोंधळ आहे. लग्न पत्रिकेमुळॅ तुटतेय हे लक्षात आले की चक्क पत्रिका बदलाय्चेही प्रकार होतात. मुळात पत्रिका जुळवणे म्हणजे सगळ्या लोकांना २७ नक्षत्रात बसवुन त्यांची जोडी जमवली जाते जिथे कोणाची जोडी कोणाबरोबर तरी जुळणारच. हे गणीत आहे, पण म्हणुन त्या माणसांचे पटायला लागणार असे थोडेच आहे?

त्यामुळे आपण जर लग्न जुळवण्यासाठीच्या जुनाट पद्धतींचा त्याग करुन काळानुरूप वरवधुसंशोधनात बदल केला तर पत्रिकेचे आयुष्यातील महत्व शुन्य होऊन जाईल. जोवर असे करत नाही, तोवर पत्रिकेचे महत्व राहणार आणि त्याआडुन नको असलेल्या स्थळांना 'पत्रिका जुळत नाही' असे म्हणत नकारही मिळणार.

अर्थात वर लिहिल्याप्रमाणे जर कोणी फक्त गुणपत्रिका जुळवत असेल तर मग पुढे जाऊन विवाह यशस्वी अथवा अयशस्बी होणे हे पुर्णपणे त्या दोन व्यक्तींवर अवलंबुन राहणार. मग पत्रिका ३६ गुणांनी जुळूनही वर्षभरात घटस्फोट झाल्याची उदाहरणे मिळणार आणि न जुळताही सुखाने नांदणारी उदाहरणेही मिळणार.

रच्याकने, ऋन्मेष, तुमची गफ्रे तुमचे डोके इतके खात असेल की तुमच्या मनात क्षणैक ब्रेकपचा विचार येतो, तर तुम्ही दोघांनी मिळून एखाद्या कौन्सेलरला गाठलेले बरे. नाहीतर आज लोक काय म्हणतील या भितीने गप्प राहाल आणि लग्नानंतर असह्य झाल्यावर सगळॅ खापर मंगळावर फोडाल. बिचारा मंगळ.

वर डिस्क्लेमर लिहायचा राहुन गेला.

वर मी जे लिहिलेय ते ठरवुन, दाखवुन/पाहुन लग्न करणा-या लोकांसाठी आहे. बाहेरील समाजात बहुतांशाने हीच पद्धत आहे. माझ्या घरी आणि ओळखींमध्ये आजवर झालेल्या लग्नांमध्ये हीच पद्धत वापरली गेलीय.

मायबोलीवरचे लोक मात्र सारासार विचार करुन, चर्चा वगैरे करुन लग्न करतात. वधुवरसुचक मंडळात जाण्याचे प्रसंग त्यांच्यावर येत नाहीत याची मला जाणिव आहे. त्यामुळे त्यांनी उगीच वरचे वाचुन मला झोडपायला सुरवात करु नये.

सीमंतिनी Proud
पण जर मी चुकत नसेल तर ते झाडाशी लग्न वगैरे मृत्युयोग कि मृत्युशडाष्टक योग वगैरे प्रकरण असते ना.

अतरंगी एण्ड ऑल,
अहो मी मंगळाला घाबरत नाहीयेच, फक्त नमूद केले तो आहे म्हणून. आणि हे मी स्वता शोधायला गेलो नव्हतो तर ग'फ्रेंडनेच मला सांगितले, ते देखील रीतीरिवाजाप्रमाणे प्रपोज आणि गुलाबांच्या फुलांची देवाणघेवाण वगैरे झाल्यावर.. तेवढी हुशार आहे ती Wink

अवांतर - उलट मी खुश आहे, आता ती आयुष्यभर माझ्या उपकाराखाली राहील कि याने माझा मंगळ न बघता माझ्याशी लग्न केले, नाहीतर माझे काय झाले असते Proud

देवकी,
धन्यवाद,
पण खोलात शिरायचेच नाही तर तिचा मंगळ आणि माझा शनी कुठेही का असेना .. तुर्तास तिला कडक मंगळ आहे एवढीच माहीती आहे. (मंगळातही कडक आणि सॉफ्ट असतो हे ज्ञानही तिथूनच मिळाले)

साधना, डोके खाल्यामुळे ब्रेकअप हे गंमतीने म्हटले होते Happy

ऋन्मेऽऽष .......... मन्गळाचा अजुन एक फायदा ऐका.....मंगळ असलेली माणसे दिसायला भलतीच दे़खणी असतात.(उदा. ऐश्वर्या रॉय)..... अर्थात हे मी सान्गायची गरज नाही ...... तुम्ही रोज बघतच असाल म्ह्णा तुमच्या GF ला

आता ती आयुष्यभर माझ्या उपकाराखाली राहील कि याने माझा मंगळ न बघता माझ्याशी लग्न केले, नाहीतर माझे काय झाले असते >>>>>>> उच्च विचार!तुम्ही गंमतीने म्हटले आहे हे कळतंय. एक म्हण आहे, मंगळ त्याची चंगळ.

सुम, इश्श, आपल्यासाठी आपली जी कोण असते तीच ऐश्वर्या राय. (मला ऐश्वर्या राय आवडत नाही ती गोष्ट वेगळी ;))

देवकी, ते उच्च विचार गंमतीच्या टोनमध्ये लिहिले असले तरी ते फॅक्टही आहेच. (दुर्दैवाने म्हणा हवे तर). बाकी या गोष्टीचा अ‍ॅडवांटेज (गैरवापर नाही) उचलून संसार सुखाचा करण्यास हरकत नाही Happy

आणि ते सईभक्त नका बोलू रे, सईप्रेमी बोला हवे तर, आजकाल भक्त वगैरे ऐकले की राजकारणाचा धागा तर नाही ना उघडला असे वाटते Proud

ऋ, माझा भावाला मंगळ होता आणि लग्नानंतर तो खरच गेला Sad लग्नाच्या वेळी त्याला साडेसाती होती आणि त्याला मंगळ होता हे मला त्यावेळी माहिती नव्हते. मी तसा त्यावेळी विश्वासही नाही ठेवला. पण तो गेल्यानंतर मी त्याच्या ग्रहांचा थोडा अभ्यास केला. आणि, कळले की त्याला साडेसाती आणि मंगळ होता. त्यामुळे माझा विश्वास बळावला ह्या गोष्टीवर.

>>मी त्याच्या ग्रहांचा थोडा अभ्यास केला. आणि, कळले की त्याला साडेसाती आणि मंगळ होता<<
बी या दोन्ही गोष्टींचा फलज्योतिषीय दृष्ट्या त्याच्या जाण्याशी संबंध नाही. पत्रिकेत त्यासाठी अष्टम स्थान व अष्टमेश यांची स्थिती व संबंधीत ग्रहयोग पहातात. ज्योतिषी आपापल्या अनुभव व आकलनानुसार त्याचे इंटरप्रिटेशन करतात.

प्रकाशजी मला तुम्ही जे म्हणत आहात ते कळले नाही पण माझ्या ढोबळ ज्ञानानुसार साडेसाती असणे, मंगळ असणे आणि त्या व्यक्तीचे लग्न आणि ह्यातच ती व्यक्ति जाणे .. ह्यावरुन माझा साडेसाती आणि मंगळ असण्यावर विश्वास बसतो आहे. पुर्वी नव्हता हा विश्वास पण आता मात्र आहे.

ऋन्मेऽऽष ,
उच्च विचार!>>>हे मी उपरोधाने लिहिले होते.

मंगळ असणार्‍याने साडेसातीकाळात लग्न केल्यास जीवाला धोका संभवतो असे म्हणायचे आहे का?>>>>> असे अजिबात नाही.बींनी त्यांचा ठोकताळा लिहिला असून त्याला फलज्योतिषीय आधार नाही.घाटपांडे यांचा प्रतिसाद वाचा.तसेही जे नियतीच्या मनात असते त्याच्या पलिकडे तुम्ही नाही जाऊ शकत.

देवकी, हो ते आपण उपरोधाने लिहिले होते हे मला समजले होते, आणि त्यानुसारच माझी पुढचीही पोस्ट होती Happy
अवांतर - एकदा का मी मंगळावर (पत्रिकेतल्या) अविश्वास दाखवला की मी त्यावर ज्या टिप्पण्या करणार त्या गंमतीजंमतीतच आल्या.

तसेही जे नियतीच्या मनात असते त्याच्या पलिकडे तुम्ही नाही जाऊ शकत.>>> नियतीच्या मनात काही एक असते हे कश्याचा आधारावर आपण म्हणू शकतो ?

ऋ, माझा भावाला मंगळ होता आणि लग्नानंतर तो खरच गेला >>>>> बी आपली कोणतीही प्रिय व्यक्ती जाणे हा खरोखरच कुटुंबावर मोठा आघात असतो ...

मात्र माझ्या मते कुठलीही व्यक्ती जाणे ह्याच्याशी पत्रिकेचा काडीचाही संबंध नसतो. मानवाचे आयुष्यमान मर्यादित आहे कुणी एक दिवस जगतो तर कुणी शंभर वर्षे हि नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यात कुणाचाही हस्तक्षेप नसतो.
माझ्या एका मित्राचा पत्रिकेवर अत्यंत विश्वास त्याने मुली बघण्यात जवळपास पाच ते सहा वर्षे घालवली मुलींपेक्षा तो त्यांची पत्रिका काळजीपूर्वक बघत असे. शेवटी सर्व जुळून आले नि त्याचा विवाह झाला. पत्रिकेच्या बाबतीतही तो अत्यंत काटेकोर होता मात्र लग्नानंतर अवघ्या ३ महिन्यानंतर एका अपघातात त्या दाम्पत्याचा मृत्यू झाला.

लग्न करताना व टिकवताना पत्रिका, मंगळ ह्या भाकड गोष्टींपेक्षा मने जुळणे हे महत्वाचे असते.

सचिनजी,

आपल्या मित्राची पत्रिका जर अभ्यासाला मिळाली तर उपकृत होईन. केवळ जनमवेळ, जन्मतारीख आणि जन्मस्थळ पाठवा. सोबत त्यांच्या पत्नीचीही दिलीत तर आणखी बरे.