गटबाजी

Submitted by aaftaab on 14 July, 2008 - 07:31

गटबाजी
===========
सूचना - यातल्या पात्रांचा कुठल्याही व्यक्तीशी संबंध नाही.. सगळं काल्पनिक आहे. पण यातल्या घटनांचा सद्य परिस्थितीशी अगदी जवळचा संबन्ध आहे. यातल्या जाती, पंथ, धर्म, प्रांतवाचक उल्लेखांनी कुणाच्या भावनांना दुखवण्याचा हेतू नाहीये. कृपया हलकेच घ्यावे..
===========

संवाद १ :

स्थळ - सौमित्र सोसायटी, पुणे.

जोशीकाकू - काय कुलकर्णीकाकू ? ठरलं का लग्न सुमीचं?
कुलकर्णीकाकू - आता तुमच्याशी काय खोटं बोलायचं हो, तिनंच एक मुलगा आणला होता दाखवायला, तिचा जवळचा मित्र आहे म्हणत होती...
जोकाकू - आजकाल चालायचंच हो असं सगळं,
कुकाकू - कुणी पाठक म्हणून आहे,
जोकाकू - देशस्थ ऋग्वेदी आहेत ना, मग झालं !
जोकाकू - नाही ना, यजुर्वेदी आहेत, आमच्या अख्ख्या घराण्यात कुणी जातीबाहेर म्हणून लग्न केलं नाही, पण पोरगी पापात घालणार असंच दिसतय...

=================================
संवाद २ :

स्थळ - अष्टविनायक इंपोर्ट एक्स्पोर्ट कंपनी, जेवणाची सुट्टी

जोशी - जेवण छान झालय हं पाठक्या ! असाच वहिनीच्या हातचा डबा घेऊन येत जा..
पाठक - अरे तुझा पण डबा मस्त आहे, उसळ अशी झणझणीत आहे, मजा आ गया..
जोशी - ए आपट्या, तुझ्या डब्यात आज काय आहे रे?
आपटे - अरे माझ्या डब्यात अगदी मला पुरेल इतकंच जेवण आहे रे, मी तुमच्याशी कुठुन शेयर करू?
पाठक - हो रे आपट्या, तुझी ही रोजचीच रड आहे, साला कंजूस कोब्रा कुठला..
जोशी - हा हा हा...
==================================
संवाद ३ :

स्थळ - मधुबन सोसायटी, मुम्बई

आपटेआजोबा - नवीन शेजारी काय म्हणतायत जोशीबुवा?
जोशीआजोबा - मागच्या जन्मीचं काहीतरी असणार, त्याशिवाय का रोज अभक्ष्यभक्षणाचा वास सहन करावा लागतोय..
आपटे - का बरं? आपल्यातलेच आहेत ना?
जोशी - कुणी मराठ्याचे पवार की काय, ते आहेत, काय ती भाषा, काय ते अघळपघळ वागणं, आणि मांसाहार.. शिव शिव शिव...
===================================
संवाद ४ -

स्थळ - चंदुमल टपारिया माध्यमिक प्रशाला, शिक्षक कक्ष

पवार सर - शेवटी प्रवेश मिळाला एकदाचा माझ्या मुलाला..
काळे सर - कुठली शाखा? कुठे मिळाला प्रवेश?
पवार सर - तुळजापूरच्या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये मिळालाय, खूप प्रयत्न केला पण शेवटी सिव्हिलवर समाधान मानावं लागलं.. तरी बरं ग्रूपला ९२ टक्के होते..
काळे सर - हं ... आपण ओपन लोक म्हणजे हे रडगाणे आलेच.. कांबळेच्या मुलीला ग्रूपला ८२ टक्केच होते, तिला सीओईपी मध्ये कंम्प्यूटर मिळालं म्हणे.. आता पुढच्या वर्षी माझ्या मुलाचं काय होणार कोण जाणे!?
====================================

संवाद ५ -

स्थळ - शिवाजी मैदान

नेहमीचेच यशस्वी -
या लोकांना हजला जाण्यासाठी विशेष सवलती मिळतात, मायनॉरिटी म्हणून तुष्टीकरणाचे अनेक उपाय केले जातात, पण आज आपल्या देशात गुन्हेगारीचे प्रमाण पाहिले तर तुम्हाला कळेल की जास्तीत जास्त गुन्हेगार हे मुस्लीमच आहेत.. त्यात पुन्हा या देशद्रोही अतिरेकी कारवाया, यांना परत पाकिस्तानात पाठवलं तरच आपला देश सुरक्षीत होईल यात मला तरी काहीच शंका वाटत नाही, जय महाराष्ट्र !
=====================================

संवाद ६ -

स्थळ - नवीन मल्टीप्लेक्सचे बांधकाम चालू असलेली जागा.. पुणे

एका नवीन पक्षाचा कार्यकर्ता - ए, तुझं नाव काय रे?
कामगार१ - सर, मराठी नही आता..
कामगार२ - त्याचं नाव शर्मा हाय सर.. बिहारचा हाय त्यो..
ए न प का - चला रे, या साल्याला द्या दोनचार ठेऊन आणि द्या पाठवून त्याच्या घरी ... ए, तुझं नाव काय रे?
कामगार३ - सर, माझं नाव अब्दुल आहे, मी इथलाच हडपसरचा आहे सर..
ए न प का - ठीक आहे, तु मराठी बोलतोस ना, मग घाबरायचं नाही, आपण है ना... !
======================================

संवाद ७ -

स्थळ - ओमाहा, अमेरिका, कोहीनूर इंडियन स्टोअर..

खरेदी करणारा भारतीय - सो व्हेअर आर यु फ्राम?
दुकानदार - आयाम फ्राम पंजाब..
ख क भा - बहोत अच्छे .. हिंदी तो आतीही होगी आपको..
दु - हां, आती है.. पर थोडी उर्दु मिक्स हो जाती है.. लाहौरसे है ना हम..
ख क भा - अच्छा, पाकिस्तानसे है ...... खैर, आपने स्टोअर तो अच्छा बनाया हुआ है.. अगर आपका स्टोअर नही होता तो पता नही हमारा क्या होता. अपने साऊथ एशियन मसाले और खाने की बात इन अमरीकी लोगोंके खाने मे कहां..
दु - ये बात तो बिल्कुल दुरुस्त है.. वैसे अगर आप जैसे इतने सारे हिन्दुस्थानी यहां नही होते, तो पता नही हमारे स्टोअरमे खरीदने के वास्ते कौन तशरीफ लाता? इन्शाल्लाह, आप है इसलिये हम है !!
ख क भा - हा हा हा, ये भी सही है..

============================

तात्पर्य - लोक वेगवेगळ्या ठिकाणी परिस्थितीनुसार वेगवेगळी गटबाजी करतात.. पृथ्वीवर जर एकी साधायची असेल तर कुणीतरी परग्रहावरूनच आलं पाहिजे !

=== समाप्त ===

गुलमोहर: 

हम्म्....छान लिहिलयस.. मला वाटल आता स्वर्गापर्यंत पोहोचोवतोस की काय देवांची गटबाजी ऐकवायला Happy

व्वा ! छान. जागोजागी असले प्रकार बघायला मिळतात. परग्रहावरून आलेली व्यक्ती पृथ्वीवर एकी साधू शकेल असे वाटत नाही.

>>पृथ्वीवर जर एकी साधायची असेल तर कुणीतरी परग्रहावरूनच आलं पाहिजे !
अगदि अगदि.... आज मी अमेरिकेत आहे तर मला फक्त भारतीयच नाही तर कुठलाही एशियन सुद्धा आपला वाट्तो... मी आपणहुन जाउन त्याच्याशी बोलतो.... भारतात असतो तर मी असा वागलो असतो?

कन्सेप्ट छान आहे... जात आणि धर्म यावर आधारीत गटबाजी ही कोणत्या ना कोणत्या फायद्याच्या उद्देशाने झालेली असते. त्यातील उद्देश निखळ पारदर्शक नसतात. .... .... उद्देश निखळ असते तर जात, धर्म यान्ची बन्धने येण्याचे कारणच नसते.....

आफताब, एक जिवंत विषय (ज्वलंत नाही म्हणत... म्हणून म्हणून विझलाय तो शब्द).

मस्तच लिहिलय.

तात्पर्य अगदी पटलं!! कुणीही हे मुद्दाम करत नाही. ते अंगवळणी पडून गेलंय!
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

छानच लिहीलयं. आवडलं.

विषय खूप छान आहे. कधी कधी मलाही प्रश्न पडतो... आपण माणसे बर्याच वेळेला किती कॉन्ट्रावर्सी ठेऊन वागत असतो.... जगातले यच्चयावत धर्म षडरिपुना दूर ठेवायला सान्गतात... किम्बहुना तसे करण्याचे प्रयत्न यातूनच धर्म निर्माण झाले... मार्ग वेगळे... उद्देश एकच...

माझा प्रश्न याच्यापुढे आहे.... ८४ लक्ष योनींमधये मनुष्य योनी श्रेश्ठ मानली आहे... अर्थात हे देखील माणसानीच लिहिलेले मत आहे... उर्वरीत ( ८४ लक्ष -१) योनीनी अशा कोणत्या मताला लेखी दुजोरा दिलेला नाही... निर्माण करण्यार्यानेही गुणवत्ता यादी कुठे लावलेली नाही...... माणुस वगळता इतर प्राणी हे षड्रिपू पासून मुळातच मुक्त असतात.... गरजेनुसार काही वेळेला ते यान्चा वापर करत असतीलही... पण त्यान्च्यासाठी लिखीत धर्म नाही.... म्हणजे पाच पन्नास धर्म्ग्रन्थ वाचून जे माणसाला उमगते ( प्रत्यक्ष आचरण हा वेगळाच मुद्दा...) ते उर्वरीत ( ८४ लक्ष -१) योनीकडून आजन्म आमरण आचरले जातच असते... मग असे असेल तर माणूस देवाना जास्ती जवळचा आणि उर्वरीत ( ८४ लक्ष -१) मात्र 'खालच्या ' जातीचे हा सूर का आळवला जातो??? बहुतेक सर्वच धर्म असे मत मांडतात...

( ८४ लक्ष -१) हा एक गट आणि ( हिन्दु, मुस्लीम, ख्रिश्चन ..... आणि सर्व) हा एक गट.... मला हा माणसाने निर्माण केलेला दुटप्पीपणा वाटतो...

आफ्ताब यांचा लेख bised आहे.यात आम्ही मुल्ला-मौलवींचे संवाद अथवा मुस्लिम स्त्रीयांचे संवाद ऍड करावेत का???

आफताब,
एकदम पटलं. परिस्थिती नुसार गटबाजी होत राहते.

>>>>>> यात आम्ही मुल्ला-मौलवींचे संवाद अथवा मुस्लिम स्त्रीयांचे संवाद ऍड करावेत का??? Lol Lol Lol
LOL अरे तस म्हणल तर यात यस्जीरोडवरचे "सन्वाद" देखिल ऍड करावे लागतील, Proud अन मग तर हे मारुतीच शेपुट कुठच सम्पणार नाही DDD
...;
आपला, लिम्बुटिम्बु

छान

आफताब भाई, एकदम सही.

हे असे का आहे हा खरोखरच मानसशास्त्रज्ञांच्या संशोधनाचा विषय आहे. Uhoh Uhoh
(कोणाला अधिक माहिती असल्यास अवश्य सांगा)

मला वाटते माणसात नैसर्गिकरीत्याच आपल्यासारखे स्वभावधर्म असणारी दुसरी माणसे शोधण्याची ओढ असते. आता 'आपल्यासारखे' ची व्याख्या स्थळ, काल यानुसार बदलत असते.

आपण आजू-बाजूच्या लोकांपासून रंगाने, धर्माने, वंशाने, मूळ स्थानाने, जातीने इ. घटकांनी वेगळे आहोत याची जाणीव झाली (किंवा कोणी ती मुद्दामहून करून दिली) की एक प्रकारची असुरक्षिततेची भावना वाढीस लागते आणि मग 'आपल्यासारखे' लोक शोधण्यातून सुरु होते 'गटबाजी'.

तांत्रिक प्रगतीमुळे जग जवळ येवून जुने सगळे भेद विसरून 'विश्वची माझे घर' होईल असे काही वर्षापूर्वीपर्यंत वाटत होते, पण प्रत्यक्षात परिस्थिती उलटी झाली आहे.