एक आदरांजली जनकवीस .... त्यांच्याच सुरेल गीतांमधून.

Submitted by किंकर on 22 December, 2011 - 19:35

.....आणि या नंतरच्या गीताचे शब्द आहेत श्री.निवृत्ती रावजी पाटील यांचे.असे म्हणून जर निवेदकांनी निवेदन थांबवले, तर काय होईल ?काही नाही जे काय असेल ते ऐकु.काय करणार असे मनात म्हणत तुम्ही गप्प बसाल.पण काही क्षणच कारण त्यानंतर तुम्हाला अशी सुरावट कानी पडेल कि बस्स फक्त ऐकतच राहावे.कारण तुमच्या कानावर पडत असेल हि सुरावट ....

गंगा जमुना डोळ्यात उभ्या का ? जा मुली जा,दिल्या घरी तू सुखी रहा …......
काय ओळखलेत ना ? श्री. निवृत्ती रावजी पाटील म्हणजेच आपले पी.सावळाराम.
हो !मी म्हणालो,कि आपले पी.सावळाराम.आणि का नाही म्हणायचे आपले म्हणून?कारण त्यांनी दिलेल्या रचना सर्वथा त्यांच्याच प्रतिभेचे देणे आहे,पण मन कोणाचे जाणलेय त्यांनी?या प्रश्नाचे उत्तर आहे,आपले अगदी आपल्या सर्वांचे.त्यात कोण नाही ?मुलगी,आई ,प्रेयसी, शेतकरी, कामकरी,भक्त, चित्रकार कोणतेही व्यक्तिमत्व घ्या मनोगतासाठी शब्द आहेत आपल्या लाडक्या शब्द प्रभूचे.तर हे पी. सावळाराम जे काही थोडेफार मला समजलेत ते मी आपणासमोर उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी माझ्या भावना ,त्यांच्या विषयीचा आदर याबद्दल बोलताना मनापासून लिहणार आहे, त्याच्या स्मृतीदिनी त्यांचा चाहता म्हणून त्यांना वाहिलेली हि एक आदरांजली आहे. जे सुचतेय ते लिहिणार आहे. पण त्यासाठी सर्वाधिक मदत घेणार आहे त्यांच्याच सुमधुर गीतांची. माझा हा प्रयत्न थोडा धाडसी मानून घेत त्यांच्या आजच्या सृम्तीदिनी मी त्यांना वंदन करून त्याचे आशीर्वादच मागत आहे.
मी पी. सावळाराम यांना शब्दप्रभू म्हटले आणि तेही कसे तर अगदी 'दिलसे' कारण मराठी आणि तिचा पुरेसा वापर याबाबत आपण नेहमीच 'दिलसे' आणि 'मनसे' जागरूक आहोत असे म्हणत असतो. आणि आपल्याच मातृ भाषेसाठी असा अभिमान बाळगणे हे सर्वार्थाने बरोबर देखील आहे. पण हि माझी भाषा मला किती आणि कशी समजते यासाठी भाषेचा वापर, त्यातील गद्य आणि पद्य, त्यातील सौंदर्य स्थळे यांचे आकलन होणे तितकेच जरुरीचे आहे. पी. सावळाराम यांना आपली भाषा आणि तिचे महत्व इतके पराकोटीचे समजले होते कि, त्यांनी भगवत गीतेचे निरुपण आणि सहज सुंदर शब्दात तिचे विवेचन करण्याचे जे कार्य संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी लिहून केले.त्या महत कार्याकडे बघताना एका वेगळ्याच दृष्टीकोनातून बघितले आहे.
ते स्वतः कवी मनाने, त्या ज्ञानेश्वरी निर्मितीच्या शुभारंभाचे क्षणा पाशी पोहचले आहेत आणि ज्ञानेश्वर जे बालकच आहेत,
या बालकाचे अंगी नव निर्मितीच्या सृजन क्षणी सृजनत्वाचे बळ यावे म्हणून मराठी भाषा हि स्वतःच परमेश्वरास विनवते आहे,हे भगवंत हि ज्ञानेश्वारीची निर्मिती हा बालक तुझ्यासाठीच करीत आहे. या बालकाचा हा जगावेगळा प्रयास मार्गी लावण्याचे बळ तूच दे.आता मला सांगा मुळात भगवत गीता किती अवघड, पण ती सोपी करून जन सामान्यांना ज्ञानेश्वरी रुपात देण्याचे काम,नुसत्या कल्पनेने थरकाप होतो मग ते निरुपण सुलभ आणि अचूक असावे असे कोणासही वाटेल.संत ज्ञानेश्वरांनी ते केले,नव्हे ते केले म्हणूनच ते संत झाले. पण हे भाषाविष्काराचे काम अतुलनीय म्हणूनच भाषाच परमेश्वराकडे धावली असे पी. सावळारामजींना कवी कल्पनेतून वाटले आणि अवतरले हे सुरेल काव्य

1.ज्ञानदेव बाळ माझा,सांगे गीता,भगवंता
लक्ष द्या हो विनविते,मराठी मी त्याची माता
पी.सावळाराम यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी या गावी झाला. गाव परिसर तसा अस्सल ग्रामीण.कदाचित त्यांच्या लहानपणी त्यांनी वर्णाश्रमाचा पगडा पहिला असेल.उच्च वर्गाचे चुकीचे वागणे अनुभवले पण असेल. त्यावर त्यांनी कोणतीही कडवट टीका केली नाही पण जाती भेद दूर करून जगायचे कसे याचा संदेश देताना ते म्हणतात ..

2. खरा ब्राह्मण नाथची झाला
जो महारा घरी जेवला ...

या गीतातील अखेरच्या कडव्यातील ओळी होत्या,
धूप घालता सुवास सुटला
मागे पुढती पाट मांडिला
नाथाने मुखी घास घातला
पुंडलिक वरदा हरी बोलला ....
म्हणजे ज्याक्षणी नाथांनी सम विषमतेच्या मर्यादा मोडून ,गरीबाघरी पहिला घास घेतला,तेंव्हा त्यांची ती कृती अशा उंचीची होती कि,त्यातून जातीभेद टाळून सर्व प्राणीमात्र एकच आहेत हि शिकवण त्यांनी कृतीतून दिली. आणि ह्या पद्धतीने जगू इच्छिणारा माणूस हाच खरा श्रेष्ठ माणूस आहे.देवाला देखील हे वागणे पूर्णतः ग्राह्य आहे आणि इतका मोठा आणि अचूक संदेश या कवींनी फक्त एका सांकेतिक कृतीच्या वर्णनातून दिला आहे आणि त्यासाठी ते म्हणतात - पुंडलिक वरदा हरी बोलला.
एकूणच काय तर पी. सावळाराम हे सश्रद्ध, डोळस भक्ती करणारे आणि परमेश्वरी ताकद मानणारे कवी होते. गुरुत्वाकर्षण, कृष्णविवर, आकाशगंगेतील आपले स्थान यावर सान थोरांपासून ते आगदी नासा पर्यंत कोणी काहीही म्हणो पण हा डोलारा शास्त्रीय मुलभूत तत्वांवर जसा उभा आहे तसा, या सर्वामागे एक ईश्वरी ताकद कार्यरत आहे आणि हे वास्तव गीतबद्ध करताना पी.सावळाराम,सांगतात कि परमेश्वर अद्भुत आहे. सर्व जग चालवण्याची माया ज्याचे अंगी आहे तो मातेच्या माया, ममतेसाठी अजाणत्या रुपात प्रकटतो.आणि हे त्रिकालाबाधीत जपलेले ईश्वराचे अधिष्ठान आपणासाठी सहज सोप्या रुपात गीतबद्ध करताना ते म्हणतात ..
3.सारी भगवंताची करणी
अधांतरी हे झुले नभांगण शेषफणावर धरणी
पी. सावळाराम हे जनकवी म्हणून ओळखले जातात पण मला मात्र ते सृजन कवी वाटतात.शहरी आणि अतर्क्य कविता मांडत पुढे न जाता, ज्यांनी आपली कविता शेतावरून गावात नेली. पण या कवीचे मन इतके संवेदनशील राहिले कि त्यांच्या हातून सर्वाधिक सुंदर रचना ह्या स्त्री मनाची आंदोलने टिपणाऱ्या झाल्या. प्रत्येक स्त्रीचे भाव विश्व विवाह बंधनाने आणि सासर माहेरच्या नात्याने इतके बदलते कि, त्यामुळे स्त्री अंतर्बाह्य बदलून जाते. त्यांनी प्रेम गीते लिहलीतच.पण त्याच बरोबर विवाह निश्चिती, विवाह सोहळा,पाठवणी, ते मधुचंद्राची रात्र यावर काव्य रचना केल्या आहेत. तसेच त्यांनी पुराणातील अमर प्रेम कथांवर देखील सुरेल रचना करताना शंकर पार्वती, राधा कृष्ण सीता राम यांचा नातेसंबंध सुरेख उलगडला आहे.
पण या स्त्री मनाचा पट उलगडताना,त्यांनी प्रेमालाच प्रश्न विचारणारी स्त्री उभी करून केलेली सुंदर रचना मला सर्वाधिक भावली आहे. कारण हा प्रश्न विचारताना ती प्रेमाला म्हणते, काय देवू मी तुला ? पण त्या प्रश्न मागे साशंकता नसून अर्पण भाव आहे.प्रेमातून मिळालेला सौख्याचा काळ तिला कृत कृत्य करीत आहे आणि त्यामुळे तिच्या ओठी शब्द येतात...

४.प्रेमा काय देवू तुला ?
भाग्य दिले तू मला...
पी.सावळाराम हे ठाणेकर म्हणूनच परिचित.पण बालपणी पश्चिम महाराष्ट्राशी असलेले ऋणानुबंध आणि कलाक्षेत्राशी असलेल्या संबंधातून जुळलेली ग्रामीण परिसराची नाळ,यामुळे शेती,शेतकरी म्हणजे काय ?याची त्यांना पूर्णता जाणीव होती. शेतकरी कामाच्या रगाड्यात जरी थकून जात असला,तरी त्याची काळ्या मातीची ओढ तिच्यावरील माया कधीच कमी होत नाही. त्यामुळे पीक दाणापाणी जेंव्हा पूर्ण तयार होते तेंव्हा प्राणी,पक्षी यांच्या तडाख्यातून ते वाचवण्याचे काम करताना सुद्धा शेतकरी ते ममत्वाने करतो. त्यातील काव्य काय किंवा निसर्गाने भरभरून दिल्यावर त्या शेतीच्या उत्पन्नाची तुलना थेट स्वर्गातील खजिन्याशी करण्याची कल्पना हा ग्रामीण कवीच करू शकतो. मग त्याला शेतच देवाचा अवतार वाटले,तर त्यात काय नवल आणि आपोआप ओठावर शब्द येतात ....

५.देवावाणी शेत माझ नवसाला पावलं
कुबेराच धन माझ्या शेतात घावल...
प्रेम, विरह, मानसिक आंदोलने हि जशी कवी मनाची हळवी ठिकाणे,त्याप्रमाणे कवीच्या मनास भावणारा विषय म्हणजे निसर्ग. कवी मनाने निसर्गाच्या विविध रुपांकडे नजर टाकली कि, मग उन हसरे होते,थंडी गुलाबी रंग घेते,वारा गाणे गाऊ
लागतो.याप्रमाणेच कवीस नेहमीच भावणारा निसर्गाचा चमत्कार म्हणजे पाऊस.त्याचे आणि पावसाचे नाते इतके घट्ट आहे कि, कवी मन आहे आणि पावसावर गाणे नाही हे घडणेच अशक्य. पी.सावळाराम देखील यास अपवाद नाहीत.पण त्याची पावसाकडे बघण्याची नजर म्हणजे प्रेम, चुटपूट, मनाची दोलायमान होणारी अवस्था, हळवे स्त्री मन या सगळ्याचा अनोखा संगम आहे. स्त्री मन, राधेचे अव्यक्त प्रेम, आणि पाऊस असा त्रिवेणी संगम ज्या पावसात घडून आला आहे त्या या पावसाच्या तरल गाण्याने आनंद तर होतोच पण पावसाची रिमझिम आपल्याला फक्त भिजवत नाही तर पुरती चिंब करते आणि राधेला कृष्ण भेटीने होणारा मिलनाचा आनंद आपल्याही मनात द्विगुणीत होतो. चला तर या गोकुळातील पावसात भिजायला...

६. रिमझिम पाऊस पडे सारखा
यमुनेलाही पूर चढे ...
कवी, त्याच्या रचना, त्यातून दिलेला संदेश यासारखा विषय जेंव्हा निखळ आनंद घेण्याकडून अभ्यासाकडे वळतो तेंव्हा समीक्षक टीकाकार कवीने काल्पनिक जगात न वावरता सामाजिक भान ठेवून काम केले पाहिजे, त्याचा कविता ह्या स्वप्नमय जगातून बाहेर येवून त्यात सामाजिक जाणिवेची स्पंदने असली पाहिजेत, असा सूर लावताना दिसतात. खरे तर कवी प्रथम माणूस असतो. तुमच्या आमच्या सारखं त्यालाही मन असते. फक्त एक व्यक्त होण्याची अव्यक्त नजर त्याच्या मनात दडलेली असते. त्यामुळे कवीची समाज त्यातील भोंदुगिरी, अन्याया विरुद्ध पेटून उठण्याची चीड हि तुम्हा आम्हा सामान्य माणसापेक्षा कितीतरीपटीने तीव्र असते. तेथे त्याची लेखणी तलवार बनते. श्वास- उच्छवास अंगार बनतात.
पण असा अन्याय अशी लढाई लढताना ती परमेश्वराचे नजरेतून लढणे,अन्यायाविरुध्द लढताना सुरवात घरापासून करणे याची जाणीव ठेवत केलीली रचना हे सामाजिक जाणिवेचे खरे खुरे प्रतिक आहे. आज आपण समाजात वावरताना परस्परांची गरज म्हणून, बदलते संदर्भ स्वीकारून जातीभेदापासून दूर जाण्यास सुरवात केली आहे. पण तीन चारशे वर्षापूर्वी त्याची तीव्रता इतकी प्रखर होती कि, स्वतंत्र पाणवठे, स्वतंत्र विहरी, देवळात प्रवेशास बंदी,असे हीन प्रकार चालत असत. त्याचे पडसाद संत कवींच्या रचनेत सुद्धा दिसून येतात. काळाच्या ओघात प्रथा बदलल्या, 'एक गाव एक पाणवठा' अशा घोषणा करीत पुढाऱ्याकडून या प्रथेस पायबंद घालण्याचे प्रयत्न झाले. तरीही अश्या गोष्टीचे उच्चाटन सार्वजनिक झाले तरी मनापासून होणे हि खरी गरज ठरते.
याच पार्श्वभूमीवर पंढरपुरात माजलेली बडवेगिरी व त्यातून पैसा खावून दर्शन देण्याची प्रथा, कागदोपत्री मंदिर प्रवेश सर्वांसाठी खुला झाल्यावर देखील मागील दाराने टिकून होती. याचा तिटकारा येवून पी. सावळाराम यांनी लिहिलेले काव्य इतके अप्रतिम आहे कि बस्स! रुखमाई स्वतःच जर देव दर्शन सर्वांना खुले नसेल तर येथे काय पावित्र्य राहिले ? असा प्रश्न करून विठ्ठलास म्हणते कि हे अमंगल ठिकाणच सोडून आपण दूर निघून जावू. आणि इतके म्हणून न थांबता,पुढे ती म्हणते कि आताच्या या परिस्थितीत अन्याय सहन करत इथेच राहणे हा आपल्या नावाला कलंक आहे म्हणून चला.आणि अश्या अन्याया विरुध्द लढण्याची तिची तळमळ दर्शवणारी मनस्थिती गीताचे अखेरच्या ओळीत इतकी सुंदर टिपली आहे कि ती तुम्ही जरूर अनुभवाच.

७. पंढरिनाथा झडकरी आता,
पंढरी सोडून चला विनवते रुखमाई विठ्ठला...
चित्रपट सृष्टी जिला मायानगरी म्हणून ओळखले जाते तिथे काम करताना,यश अपयश,लढा झगडा,सुख दुखः,या चढ उतारांवरून होणारा प्रवास कोणालाच चुकत नाही.त्यामुळे अन्य कोणत्याही क्षेत्रापेक्षा या क्षेत्रांतील कलाकारांची आत्मचरित्रे वास्तव दाहकतेने सजलेली दिसतात. काम करताना काही मने इतकी जुळतात कि त्यातून नंतर नंतर फक्त अप्रतिम तेच येत राहते. जसे मुकेश आणि राजकपूर, लता दीदी आणि मदन मोहन , गदिमा आणि सुधीर फडके,किती नावे घ्यायची. पी. सावळाराम हे देखील यास अपवाद नाहीत. गीतकार म्हणून त्यांची कारकीर्द कशी बहरली याचा पुरेशा तपशील जरी मला ठावूक नसला तरी वसंत प्रभू आणि पी सावळाराम यांनी आपणास नेहमीच निखळ आनंद दिला आहे.
त्यांच्या आजच्या दिनांक २२ डिसेंबर या त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना वंदन करून मी माझ्या या आपणासाठी केलेल्या कार्यक्रमाची पूर्तता करू इच्छितो.अखेरीस या कवीने इतके सर्व समाजाला देत, आगदी लोकाग्रहास्तव ठाण्याचे नगराध्यक्षपद पण भूषवले होते.तरीही या सर्व यशानंतर आपण ध्येय पुर्ती केली का ? असे मनास विचारात जनकवी पी.सावळाराम यांनी पुढील रचना लिहिली असावी असे मला वाटते.पहा बरे माझे म्हणणे तुम्हाला पटते का?

८. हरवले ते गवसले का ?
गवसले ते हरवले का ?

गुलमोहर: 

वा, छान परिचय करुन दिलात कविवर्य पी. सावळारामांच्या कवितेचा.
पी. सावळाराम व वसंत प्रभू हे मला अगदी आवडणारे काँबिनेशन आहे.
एक यादी मिळाली त्यांच्या सर्व गाणी / कवितांची तर किती बरं होईल असे वाटले.

किंकर, किती मस्त लिहिलाय हो लेख. खरच, आपल्याला अनेक गाणी आवडत असतात. पण त्या कवीबद्दल अशी काहीच माहीती नसते. तुम्ही खरच इतक सुंदर लिहिलय, गाणी आणि वर्णन दोन्ही अप्रतिम. धन्यवाद!
७. पंढरिनाथा झडकरी आता,
पंढरी सोडून चला विनवते रुखमाई विठ्ठला...>>>>>
ही ओळ ऐकताना, किंवा म्हणताना, खरच रखुमाई किती कंटाळलेय इथल्या प्रकाराला ते या शब्दातूनच प्रतित होतं. मला त्यांची सर्वच गाणी फ़ार आवडतात.
या भाषाप्रभूला माझीही आदरांजली.!

पुरंदरे शशांक - धन्यवाद . आपणास हवी असलेली पी. सावळाराम व वसंत प्रभू यांची गाणी , 'आठवणीतली गाणी' या संकेत स्थळावर एकत्रित मिळतील.
फारएण्ड- लेख आवडला धन्यवाद. बा. भा. बोरकर यांच्यावर काही लिहता आलेतर बरे होईल असे वाटते. पाहू केंव्हा जमतेय.
पद्मजा_ जो , मैत्रेयी भागवत - धन्यवाद.
शोभ१२३ - धन्यवाद. खरेतर मूळ ताकद गीत रचनेची असते, लिखाण चांगले होण्याचे श्रेय त्यात आहे.

स्वाती२- अभिप्रायासाठी मनपूर्वक धन्यवाद.
उदय - अभिप्रायासाठी धन्यवाद.
शैलजा - धन्यवाद.