''चला चला, लवकर आटपा बरं जेवणं.... आज श्रुतिका आहे नं?'' आजीने वेगळी आठवण करून दिली नाही तरी दर मंगळवार आणि शुक्रवार म्हणजे रेडियोवरच्या श्रुतिकेचे वार हे समीकरण कितीतरी वर्षे माझ्या मनात पक्के घर करून होते.
ही गोष्ट आहे साधारण १९८२ ते १९९० च्या काळातील. कदाचित त्याही अगोदर पासून नभोवाणीवर श्रुतिका अस्तित्वात असाव्यात. परंतु १९८२ मध्ये आमचा जुना, खटारा, धूळ खात पडलेला व फेंदर्या मिशांच्या झुरळांचे वसाहतस्थान बनलेल्या लाकडी अंगकाठीचा रेडियो एकदाचा निकालात निघाला व त्याजागी जुना ट्रान्झिस्टर आला. या नव्या काळ्या चौकोनी डब्यातून कर्कश खरखरीऐवजी सुमधुर आवाजातील गाणी आम्हाला पहिल्यांदाच ऐकू येऊ लागली. सकाळी उठल्यावर चिंतन मालिका आणि अभंगवाणी ऐकायची जशी सवय झाली तशीच मंगळवार व शुक्रवारच्या श्रुतिकेचीही चटक आपोआप लागली.
आजीला ही श्रुतिका स्वरूपातील मराठी नभोनाट्ये विशेष आवडायची. श्रुतिका ऐकायची म्हणून सायंकाळचे बाकीचे सारे कार्यक्रम ती लवकर उरकून घ्यायची. सायंकाळचा बाहेरचा फेरफटका, स्तोत्रवाचन, देवाला उदबत्ती - निरांजन आणि जेवण हे त्या दिवशी लवकर होईल या बेताने तिचे काम चालू असायचे. जेवणे झाली की थोड्या शतपावल्या घालायच्या आणि मग रेडियोवर आकाशवाणी केंद्राचे प्रक्षेपण लावून ठेवायचे. त्याच दरम्यान घाईघाईने अंथरुणेही घातली जायची. गाद्यांवर घातलेल्या चादरींना जराही सुरकुती पडली की इतर वेळेला आजीच्या कपाळालाही चुण्या पडायच्या. चादरीला चारही टोकांनी ओढून ठीकठाक खोचल्याशिवाय गादी प्रकरणातून आमची सुटका नसे. परंतु मंगळवार, शुक्रवारच्या मुहूर्ताला त्या काटेकोरपणातून आम्हाला सवलत मिळत असे. मग सुर्रकन चादरी घातल्या जात, त्यांवर दणादण उशा आदळत, पांघरुणांची घडी विस्कटण्याची पर्वा न करता ती नेम धरून गादीच्या पायथ्याच्या दिशेने हवेत उड्डाण करत. आमचे माकडचाळे आजी त्या दिवशी शांतपणे सहन करत असे. श्रुतिका सुरू झाल्यावर कोणी मधूनच उठवायला नको यासाठी आमची सारी धडपड असे. मोठी माणसेही त्यात सामील असत. आयत्या वेळी रेडियो स्टेशनचे प्रक्षेपण नीट ऐकू येण्यात काही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून श्रुतिकेअगोदरच दहा-पंधरा मिनिटे त्याला सुस्थानी प्रस्थापित करून श्रुतिकेअगोदर लागणार्या जाहिराती, बातम्या इत्यादींना भक्तिभावाने ऐकले जाई. आणि एरवी त्याच कार्यक्रमांचा त्रास होणारी आजी तेव्हा श्रुतिकेच्या प्रतीक्षेत ते सारे 'व्यत्यय' निमूट सहन करायची.
एकदा श्रुतिका सुरू झाली की रेडियोचा आवाज मोठा व्हायचा. त्या नाट्यातील शब्द अन् शब्द कळावा यासाठी कानांत अगदी प्राण आणून कथानक ऐकले जायचे. आजीच्या पुढ्यात कोणतीतरी भाजी निवडायला असायची किंवा तिने शनिवारी करायच्या बिरड्या सोलायला घेतलेल्या असायच्या. हातातून सटकणार्या व खोलीत चहूदिशांना उड्डाण करणार्या बुळबुळीत सालीच्या बिरड्यांनाही ती त्यावेळी गोळा करायला जायची नाही. एकीकडे हात झपाझप चालू तर दुसरीकडे सारे लक्ष त्या श्रुतिकेतून उलगडणार्या नाट्याकडे! एखादा अवघड, दु:खी किंवा नाट्यमय प्रसंग असला की आजीच्या सोबत आमचेही श्वास रोखले जात. एखादा गूढ, रहस्यमय प्रसंग असेल तर आमच्या हृदयाचे ठोकेही वाढलेले असत.
तो काळ कृष्णधवल दूरदर्शनचा होता. आमच्याकडे नुकताच टी. व्ही. संच खरेदी झाला असला तरी रेडियोची सर तेव्हाच्या टी.व्ही. ला येणे शक्यच नव्हते! रोज पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत साथसोबत करणारा रेडियो कोठे आणि सकाळ- संध्याकाळी मर्यादित प्रक्षेपण असणारा टी.व्ही. कोठे! विविधभारतीवरील 'बेला के फूल', 'छायागीत', 'आप की फर्माइश' कार्यक्रम जितके जिव्हाळ्याने ऐकले जायचे तितका स्नेह, जिव्हाळा टी.व्ही. बद्दल उत्पन्न होणे अजून बाकी होते. बाहेर नाट्यगृहांत जाऊन तिकिटाचे पैसे भरून नाटके पाहावीत असे वातावरण घरी नव्हते. शाळेला सुट्टी लागली की मगच आमचे पालक आम्हाला सिनेमा, सर्कस आणि बालनाट्य दाखवत असत. त्यामुळे नभोनाट्य किंवा श्रुतिका हा रेडियोवर आठवड्यातून दोनदा सादर केला जाणारा कार्यक्रम आमच्यासाठी मनोरंजनाची पर्वणी असे.
किती तरी सुंदर सुंदर श्रुतिका या काळात आम्ही अगदी तन्मयतेने ऐकल्या. एकच कलाकार तरुण, मध्यमवयीन व म्हातार्या व्यक्तीचे आयुष्याच्या विविध टप्प्यांमधील संवाद म्हणतो हे तेव्हा आम्हाला कोणी सांगितले असते तरी ते आमच्या मनांना पटले नसते. श्रुतिका ऐकताना आम्ही कथानकात रंगून तर जातच असू. पण मग त्याच वेळी बरेच प्रश्नही पडायचे. एका वेळी रेकॉर्डिंग स्टुडियोत एवढे सगळे लोक कसे काय मावत असतील? ते पार्श्वसंगीत वाजवणारे कलाकार पण त्यांच्या शेजारीच बसले असतील का? या लोकांना कार्यक्रम करून घरी जायला कित्ती उशीर होत असेल, नाही का? वगैरे वगैरे. कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण अगोदर केलेले असू शकते यासारख्या गोष्टी तेव्हा आमच्या ध्यानी-मनीही नसत. हो, आणि त्याच बरोबर बालसुलभ शंकाही असायच्या जोडीला. 'त्यांना मध्येच शिंक आली किंवा ढेकर आली तर ते काय बरं करत असतील?', 'मध्येच वीज गेली तर मग त्यांचा कार्यक्रम बंद पडेल का?' अशा शंकांनी मने आशंकित झाली तरी श्रुतिकेत व्यत्यय येऊ नये म्हणून गप्प बसत असू. कलाकारांची नावे श्रुतिकेत सर्वात शेवटी सांगत असत. ती नावे जाहीर झाली की, ''हां, मला वाटलंच होतं हं, अमक्यातमक्याची भूमिका तेच करत असणार म्हणून! काय सुरेख म्हणतात ना ते संवाद!'' वगैरे डायलॉग्जही चालायचे.
माझ्या आजोबांना खरे तर श्रुतिका ऐकायला आवडत असावे. परंतु वरकरणी मात्र ते तसे दाखवत नसत. जणू काही आपला त्या श्रुतिकेशी संबंधच नाही अशा थाटात त्यांच्या आवडत्या खुर्चीत ते नजरेसमोर वर्तमान-पत्र धरून बसलेले असत. पण रेडियोच्या आवाजाची पातळी जरा कमी झाली की त्यांची, 'जरा आवाज वाढव गं!' ची सूचना आजी गालातल्या गालात हसत अमलात आणत असे. त्या काळात चुकून त्यावेळी जर कोणी पाहुणे घरी आले तर स्वाभाविकपणे आम्ही रेडियोचा आवाज कमी किंवा बंद करत असू. पण मग रात्रभर आणि दुसर्याही दिवशी श्रुतिकेतील नाट्यात नंतर काय घडले असेल याची चुटपूट लागून राहायची. अनेकदा त्या नाट्यांचे विषय प्रौढांसाठीचे, धीरगंभीर असत. आम्हाला बालवयाच्या श्रोत्यांना ते झेपत नसत. मग श्रुतिका संपली रे संपली की आमची आजीच्या डोक्याशी भुणभूण सुरू होई.... ''आजी, अमक्या शब्दाचा अर्थ काय गं?'' ''आजी, तो बुवा असं का म्हणत होता गं?'' ''ए आजी, ती बाई अशी विचित्र का रडत होती गं?'' एक ना दोन.
आजी आपली कशीबशी आमच्या प्रश्नांना तिला जमेल तशी उत्तरे द्यायची, आणि फारच निरुत्तर झाली की, ''चला, झोपा आता! फार प्रश्न विचारत बसता!'' म्हणून रागावायची. कधी तिने तिच्या आवाक्यातील उत्तर दिले तरी आमच्या मनाचे समाधान व्हायचे नाही. मग झोपाळलेल्या डोळ्यांनी अंथरुणावर पडल्या पडल्या त्याबद्दल विचार करताना कधी तरी झोप लागायची.
एखाद्या रात्री श्रुतिकेचा विषय गूढ, रहस्यमय, भय उत्पन्न करणारा असेल तर मग त्या रात्री मला अंधाराचीही भीती वाटायची. ''ए आजी, आज छोटा दिवा तसाच राहू देत ना!'' म्हणून तिला गळ घालण्यापासून ते रात्रीतून बाथरुमला जायचे झाल्यास तिला बिचारीला झोपेतून जागे करून बाथरुमच्या दारापर्यंत सोबत करायला सांगण्यापर्यंत सर्व प्रकार चालायचे. पण दुसर्या दिवशी आजीने इतरांसमोर हसत हसत त्याविषयीचा उच्चार केला की नाकाच्या शेंड्यावर भला थोरला राग मात्र यायचा!
आजी-आजोबा वर्षातून दोन-तीनदा आमच्या गावी राहायला जायचे. एकदा तिथे गेले की साधारण महिनाभर मुक्काम असायचा त्यांचा तिथे. जाताना ते सामानात घरातील तो एकुलता एक ट्रान्झिस्टर सोबतीला घालून न्यायचे. ते दोघे घरी नसले की आम्हा लहान मंडळींना मनसोक्त दंगा करता यायचा. पण मग दर मंगळवारी व शुक्रवारी आजीची, रेडियोची व श्रुतिकेची खूप खूप आठवण यायची. आजोबांच्या देहान्तानंतर आजी एकटीच गावी जाऊ लागली. तेव्हाही तिच्या सोबतीला रेडियो असायचा. गावच्या शेणाने सारवलेल्या कौलारू घरात दिवेलागणीनंतर निजेस्तोवर कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात त्याची मंद सुरातील साथ तिला निश्चितच आश्वस्त करत असणार!
पुढे पुढे दूरदर्शनचे प्रस्थ जसजसे वाढले तसतसा माझा श्रुतिका ऐकण्यातील उत्साह कमी होऊ लागला. दूरदर्शनवरील वेगवेगळ्या विषयांवरील मालिका, मनोरंजनपर कार्यक्रमांचे आकर्षण वाढू लागले. घरात टी.व्ही.चा आवाज वाढला आणि त्यापुढे रेडियोचा आवाज क्षीण झाला. पण आजीने शेवटपर्यंत रेडियोची साथ सोडली नाही. टी.व्ही.चा आवाज तिला नकोसा झाला की ती रेडियो अगदी कानाशी धरून श्रुतिका ऐकायची. तिला त्रास होत असला तरी ती आम्हाला त्याबद्दल काही बोलायची नाही. पण चपापून मग आम्हीच टी.व्ही.चा आवाज कमी करायचो. कधी तरी ती आदल्या दिवशीची श्रुतिका किती छान होती ते रंगून सांगायची. त्या वेळी आपण तिची श्रुतिका ऐकण्यात साथ-सोबत केली नाही म्हणून उगाचच मनात अपराधी वाटायचे.
आजीनंतर श्रुतिका ऐकणेही इतिहासजमा झाले. परंतु त्या काळात श्रुतिकेच्या रूपाने आम्हाला जे काही मिळाले त्याचे मूल्य अनमोल आहे.
श्रुतिका ऐकता यावी म्हणून एकत्र येऊन चटचट उरकलेली कामे, 'आज काय ऐकायला मिळणार' याविषयी उत्कंठा, एकही शब्द चुकू नये म्हणून कानांत प्राण आणून केलेले श्रवण, श्रुतिकेतील पात्रांच्या संवादांशी एकरूप होणे, सादरकर्त्यांच्या आवाजांवरून त्यांच्या वया-रूपाविषयी मनात बांधलेले अंदाज, समृद्ध कथांना त्या थोडक्या वेळात ताकदीने सादर करण्याचे कलावंतांचे कसब, काही गंभीर कथानकांना ऐकून मनात निर्माण झालेले द्वंद्व, अस्वस्थता, विचारचक्र.... या सर्वाची तुलना आता रिमोटवरच्या बटणासरशी शेकडो चॅनल बदलण्याची सुविधा असलेल्या अद्ययावत टी.व्ही.शी चुकूनही करवत नाही. शिवाय श्रुतिकेशी आमच्या नकळत आमचे बाल्य जोडले गेले. विविध भावबंध जुळले गेले. आता फक्त त्यांच्या रम्य आठवणी मागे उरल्या.
-- अरुंधती
--------------------------------------------------------------
हाच लेख आपल्याला येथे वाचता येईल : माझा ब्लॉग
दीपज्योती दिवाळी अंक २०११
मस्त च. हा काळ मी आजिबात
मस्त च.

हा काळ मी आजिबात अनुभवला नाहिये.. पण सगलं चित्र डोळ्या समोर ऊभं राहिलं..
अकु, माझे लहानपण याच
अकु, माझे लहानपण याच काळातले.
खरेच नूसत्या श्रवणाने उच्चकोटीचा नाट्यानुभव देणारे कलाकार आणि लेखक होते त्या काळात .
(आकाशवाणीकडे जनरेटर होता त्यामूळे वीज गेली तरी त्यांच्या कार्यक्रमात खंड पडायचा नाही.)
सही! एकदम जुन्या आठवणी.
सही! एकदम जुन्या आठवणी. आम्हीही टीव्ही येइपर्यंत ती श्रुतिका/नाटिका ऐकायचो. पुण्यात बहुधा सोमवारी, गुरूवारी रात्री साडेनऊला असायच्या. मग टीव्ही आला आणि ९ की ९:१० ला छायागीत असायचे त्यावेळेस दोन्ही मधे कॉन्फ्लिक्ट आला. आजोबा जाम चिडायचे - त्यांना "ती तुमची हिन्दी गाणी" अजिबात आवडायची नाहीत (विशेषत: "हम तुमसे जुदा हो के मर जायेंगे रो रोके" छाप गाण्यांवर तर भयंकर राग त्यांचा
) आणि नाटिका ऐकायची असायची.
मस्त!
मस्त!
अकु, अगदी ओघवतं
अकु, अगदी ओघवतं लिहिलंयस.
तुमच्यासोबत मीसुद्धा श्रुतिका ऐकायला बसले आहे असं वाटत होतं.
'त्यांना मध्येच शिंक आली किंवा ढेकर आली तर ते काय बरं करत असतील?' >>
खूपच सुंदर वर्णन... जुन्या
खूपच सुंदर वर्णन... जुन्या आठवणी आल्या फार...
सकाळी शाळेत जाताना रेडिओ चालू असायचा. सकाळी ६.३० वाजता बहुतेक चिंतनच लागायचे, नक्की आठवत नाही. ते लागले की आई उठवायचीच. मग घरातून निघताना 'इय प्रवाचकः बलदेवानंद सागरः' हे एकले की मस्त मस्त वाटायचे.
दुपारी आल्यावरही रेडिओची साथ असायचीच. वनिता नाहीतर तत्सम महिलांचा काहीतरी कार्यक्रम चालू असायचा. जेवताना अगदी ताटाशेजारी रेडिओ हवाच.
गेले ते दिवस खरंच...
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद!
छान आठवण आहे
छान आठवण आहे
अरुंधती...फारच सुंदर आठवणी
अरुंधती...फारच सुंदर आठवणी आहेत...त्या वाचून मीही माझ्या बालपणात गेलो....मुंबई ब केंद्रावर नीलम प्रभूंनी एकटीने सादर केलेली ’आम्ही तिघी’ ही श्रुतिका म्हणजे कमालच होती...आजी,आई आणि मुलगी अशा तीन पिढ्यांना नीलमताईंनी एकटीने आवाज दिला होता.
बाळ कुडतरकर,नीलम प्रभू आणि प्रभाकर जोशींच्या आवाजातील..’प्रपंच’ आणि त्यानंतर”पुन्हा प्रपंच’ ह्या मालिकाही तुफान गाजल्या...सगळे सिद्धहस्त...आपलं सिद्धकंठ कलाकार होते.
पुणे केंद्रावरही पुरुषोत्तम जोशी,ज्योत्स्ना देवधर वगैरे ताकदीचे कलावंत होते...आकाशवाणीचा खरंच एक जमाना होता..माझंही बालपण समृद्ध करण्यात आकाशवाणीचा खूप मोलाचा वाटा आहे....
लिहावं तेवढं थोडं आहे...इथेच थांबतो..नाहीतर प्रतिसाद म्हणून लेखच व्हायचा.
मस्त लिहिलंय नववीत की दहावीत
मस्त लिहिलंय

नववीत की दहावीत आम्हाला दि.बा. मोकाशी ह्यांची 'रेडियोची गोष्ट' ही कथा होती ती अचानक आठवली आज. श्रूतिकेशी तसा काही संबंध नव्हता त्याचा पण त्यातल्या नायिकेला ज्युतिका रे ची रेकॉर्ड ऐकायची असते ती ज्युतिका आणि श्रुतिका हे शब्द आणि रेडियोच्या साक्षीने घडलेलं नाट्य हे कुठेतरी जोडलं गेलं असावं मनात
खूप छान लिहिलंय अकु - मला
खूप छान लिहिलंय अकु - मला माझे बालपण समोर दिसू लागले - आमच्या घरीही तू वर्णन केलेला सर्व सीन असे - देवकाका म्हणतात तसे खूप ताकदीचे कलावंत होते हे - माझ्या आईच्या नात्यातील एक मावशी (आम्ही हरिणीमावशी म्हणायचो तिला....आता पटकन तिचे खरे नावही आठवत नाही) बरेचदा त्या श्रुतिकांमधे असायची - त्यामुळे शेवटी नावे ऐकताना तिचे नाव कधी येते याची अगदी उत्सुकतेने वाट पहायचो - या लेखामुळे अगदी नॉस्टालजिक झालो - आईला नक्की सांगेन या लेखाबद्दल..
आमच्या सोसायटीतील श्री. कुलकर्णी हे देखील काही श्रुतिकांचे लेखक - "पैल तो गे काऊ कोकताहे" ही त्यांची श्रुतिका अजून आठवतीये मला....
शशांक, ओह्ह माय गॉड! ती
शशांक, ओह्ह माय गॉड! ती श्रुतिका ऐकली होती मी...आजही आठवतेय मला ती.... किमान, त्यावेळी ऐकताना जे काही वाटलं ते.... खरं सांगते, त्यात ऐकलेलं पैल तो गे त्यानंतर कितीतरी दिवस मला चक्क हाँट करत होतं. तेव्हा त्या श्रुतिका नाट्याचा अर्थही नीट कळला नव्हता. कालांतराने उमजत गेला. त्या कुलकर्णी काकांना जरूर कळवा, खूप परिणामकारक, पकड घेणारं लेखन आणि तितक्याच ताकदीचं सादरीकरण होतं ते!
जाई, देवकाका, अगो... धन्यवाद!
जाई, देवकाका, अगो... धन्यवाद!
अगो, मला दिबांचा तो धडा होता का, आठवतेय, पण बहुतेक नसावा किंवा असलाच तर ऑप्शनला टाकला असावा!
अकु, माझी नववी आणि दहावी
अकु, माझी नववी आणि दहावी म्हणजे पोर्शन बदललेली पहिली बॅच होती त्यामुळे तुला तो धडा नसावा
अगदी माझ्या मनातलंच सांगतियेस
अगदी माझ्या मनातलंच सांगतियेस असं वाटलं.
माझी आजी त्या श्रुतिकेतल्या कथेनुसार चेहेर्यावरचे हावभाव बदलत असे.
काही चांगला प्रसंग आला की तिला हसू यायचं, आनंद व्हायचा.
काही दु:खी प्रसंग आला तर "कसं बाई व्हायचं हिचं?"
"बाईच्या जातीनं हे करायला कशाला जावं म्हणते मी!" असं हळूहळू म्हणायची.
आम्ही मोठ्यांदा बोललो तर "ऐका गं!" म्हणून गप्प करायची.
तिला तेवढाच विरंगुळा होता.
कृष्णधवल दूरदर्शन संच आल्यावर फक्त किर्तन असलं तर बघायची.
एकदा चुकून छायागीत पाहिलं गेलं तर चिडली.
"काय मेले एकमेकांना निर्लज्जासारखे चिकटतात! मी नाही असलं काही पहायची!" असं म्हटल्यावर आम्ही फिदीफिदी हसलो होतो.
छान लिहिलंय. 70s मध्येही
छान लिहिलंय.
कोणाला ही पूर्ण गोष्ट आठवते का?
70s मध्येही असणार. आम्ही सांगली केन्द्रावरच्या ऐकायचो. श्रुतिकांची नावं, कथानकं आता एवढी आठवत नाहीत. एक 'वाटसरु' म्हणून होती, काहीशी रहस्यमय, त्यातलं '..हे नवलच आहे!' तेवढं आठवतंय.
व्यंकटेश माडगुळकरांची वाटसरू
व्यंकटेश माडगुळकरांची वाटसरू ही कथा माहित आहे.
वाटसरु - चांगलीच आठवतीये -
वाटसरु - चांगलीच आठवतीये - दूर रानात एका झोपडीत घडलेली कथा - मध्यरात्रीची वेळ, धुवाँधार पाऊस, वीजा, वगैरे आलेच सर्व - एक वाटसरु - रस्ता चुकलेला - दार वाजवतोय - झोपडीतील बाई त्याला आत घेते - आत कंदिलाच्या अंधुक प्रकाशात एक व्यक्ती झोपलेली - वाटसरु विचारतो - कोण हे - उत्तर - माझा नवरा मरुन पडलाय - वाटसरुची चांगलीच तंतरते - ती बाई थोडी कोपर्यात गेल्यावर ते प्रेत उठते - वाटसरुची बोबडी वळलेली - एवढ्यात त्याच्या कानावर "एका" कुविख्यात दरोडेखोराचे शब्द येतात - म्हणजे प्रेताकडून - "जवळचे सगळे पैसे काढ - नाहीतर...." .. कुर्हाडीचे पाते चमकते त्याच्या हातातले -

आता एकदम टर्निंग पॉईंट.... वाटसरु आपले रुप उघड करतो -डेअरिंगबाज इन्स्पेक्टर अंगावरचे कांबळे फेकून - कमरेचे पिस्तुल काढून दटावतो - बाहेर सर्व पोलिस आहेत - पळायचा प्रयत्न करु नको, वगैरे - दरोडेखोर शेवटचा प्रयत्न करणार तोच पिस्तुलाची गोळी वर्मी लागते - त्या बाईचे वाक्य -"चांगला डाव साधलास रे वाटसरा....."
एकदम खतरनाक वगैरे वाटलेली इस्टोरी - कलावंत आठवत नाहीत पण डायलॉग्ज, रात्रीचा, पावसाचा, वीजा (मेघ गडगडल्याचा) आवाज वगैरे सर्व आठवते आहे - त्याकाळाच्या मानाने "जबरीच" एकदम.....
आ हा हा कसली मज्जा असायची -अंथरुणात बसून - कधी पडून - कधी अंगावरचे शहारे अनुभवत ऐकलेल्या या श्रुतिका...कानात प्राण आणून ऐकल्यात सार्या - फक्त संवादफेक व वातावरणाला साजेसे संगीत यातून वेगवेगळे अनुभव देणारे नाट्य उभे करणे हे किती कष्टाचे असेल हे आता जाणवते - या टुकार - भिक्कार मालिका अन रिआलिटी शोज बघताना... कालाय तस्मै नमः....... अगदी म्हातारबाबाचे डायलॉग्ज बोललो काय - त्यावेळची मंडळी सांगू शकतील - आजकाल मुले दहावी -बारावीला गेली की आई-बाबा अगदी पुराने खयालात के लगते है...
जाऊ दे फारच लिहितोय मी नाही का...
मस्त. एकही श्रुतिका आता आठवत
मस्त.

एकही श्रुतिका आता आठवत नाहीये पण वातावरण आठवतेय. रात्री जेवणाच्या वेळेला किंवा जेवण झाल्या झाल्या असायच्या साधारण या श्रुतिका. आमच्याकडे तेव्हा बुशचा टू(की थ्री?) इन वन नुकताच घेतला होता आणि त्यात रेडियोवरचे कार्यक्रम कॅसेटवर टेप करता यायचे. नंतर टिव्ही घेतल्यावर टिव्हीचे कार्यक्रम पण टेप केले (केवळ ऑडियो). त्यामुळे तेव्हाच्या असंख्य कार्यक्रमांच्या टेप्स घरी पडलेल्या आहेत अजूनही. बघायला हवं एकदा. आई कॉलेजमधे असताना बालोद्यानला असायची आणि नंतरही गृहिणी, स्त्री सखी अश्या दुपारच्या स्लॉटस्मधे तिचे कार्यक्रम व्हायचे कधी कधी.
सगळ्यामुळे एकुणात रेडियोचा बराच पगडा होता लहानपणी. मात्र आमच्या घरी विविध भारती क्वचित लागायचं. ते मावशीच्या घरी गेल्यावर पोट भरून ऐकायचे मी.
अरू, तुझ्या बॅचच्या लोकांची पुस्तकं नोटस आमच्या बॅचने वापरली आणि रद्दीत दिली. आमच्यानंतर लगेच दरवर्षी अभ्यासक्रम बदलत होता.
देवकाका - बहुतेक "पुन्हा
देवकाका - बहुतेक "पुन्हा प्रपंच" चा शेवट ते कुटुंब बदली होऊन दुसर्या गावी जाणार असं काही होतं का - पुसटसं आठवतंय - ती शेवटी "बाबुल मोरा..." ही भैरवीतली ठुमरीही..पेटीवर म्हणतात ते..... त्यावयात राग दारी फार कळत नव्हती (आताही कळत नाहीचये) - पण अशा प्रसंगातूनच भैरवीची ओळख होत गेली.... आता हळुहळू भैरवीची अथांगता, त्यातील गहिरेपणा, आर्तता.. जाणवते आहे...... अजूनच काळजाचा ठाव घेत आहे.......स्स...
जुन्या आठवणी जाग्या झाल्या!
जुन्या आठवणी जाग्या झाल्या! `वाटसरु' आठवते अजुनही.
बालोद्यान, वनिता मंडळ, बेला के फूल हे घरात नियमित ऐकलं जायचं.
टुकार - भिक्कार मालिका अन रिआलिटी शोज >> अगदी ! माध्यमांच अवमुल्यन झाल्यासरख वाटत.
अरुंधती, किती ओघवतं आणि छान
अरुंधती, किती ओघवतं आणि छान लिहिलं आहेस, मला श्रुतिका माहिती नाहीत, पण तुझ्या लिखाणामुळे त्या काळात जाऊन आले.
पांघरुणांची घडी विस्कटण्याची पर्वा न करता ती नेम धरून गादीच्या पायथ्याच्या दिशेने हवेत उड्डाण करत. >> असे बरेच बारकावे, मस्त टिपलेस...
अभिनंदन!
शशांक... अगदी अगदी. अंथरुणावर
शशांक... अगदी अगदी. अंथरुणावर पडल्या पडल्या श्रुतिका ऐकताना रहस्यमय किंवा भीतीदायक प्रसंग असेल तर पांघरुणात मारलेली दडी चांगलीच आठवते. आणि तरी पुढे काय होते आहे हे ऐकण्याची उत्सुकता!
वाटसरुचे कथानक जबरी आहे... ऐकायला खरेच मजा आली असणार!
अन्कॅनी, हो, आकाशवाणीवर श्रुतिका तेव्हाही असाव्यात, फक्त आमच्या जुन्या डबड्या रेडियोतून तेव्हा केवळ खरखर किंवा कोणत्यातरी वेगळ्या फ्रिक्वेन्सीवरच्या बीबीसी न्यूज वगैरे ऐकू यायच्या. आणि त्या जुन्या रेडियोला डायलसारखे एक फिरवायचे/ पिळायचे बटण होते. त्यानुसार स्टेशने बदलता यायची. पण आमच्या रेडियोच्या काचेच्या आत दोन-तीन झुरळोबा घुसले होते. ते व्यत्यय आणायचे!!
नी, आमच्याकडे दुपारी असायचा रेडियो चालू.... आजी ते गृहिणी, सखी इ. कार्यक्रम ऐकायची. मी घरी असायचे तेव्हा तिच्याबरोबर माझेही श्रवण व्हायचे. कदाचित मी ऐकलेही असतील तुझ्या आईचे कार्यक्रम. आणि जर ती बालोद्यानला असेल तर ऐकलेच ऐकले असतील!! काही वर्षांपूर्वी माझी आकाशवाणीतील एका निवेदिकेशी ओळख व मैत्री झाली. (तेव्हा माहित नव्हते की ती आकाशवाणीत असते.) जेव्हा तिचा आवाज माईकवर ऐकला तेव्हा जाणवले की हा आवाज आपण ह्याअगोदर कोठेतरी ऐकलाय. मग तिने सांगितले की ती गेली अनेक वर्षे सकाळच्या चिंतन कार्यक्रमाच्या अगोदरचे निवेदन (हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे. सकाळचे अमुक वाजून अमुक मिनिटे झाली आहेत....) करत आहे!! तेव्हा माझी ट्यूब पेटली. आणि इतकी वर्षे ज्या आवाजाच्या साथीने सकाळी जाग यायची त्या आवाजाच्या मालकिणीला भेटल्याचा आनंदही झाला!
मस्त लिहिलंय. काही
मस्त लिहिलंय. काही महिन्यांपूर्वी एफएमच्या कुठल्याश्या चॅनेलवर (बहुतेक रेनबो) 'लाईफ गुलमोहर स्टाईल' म्हणून श्रुतिका लागायची. मला ती ऐकायचं व्यसन लागलं होतं. मग काही दिवस ऐकायला जमलं नाही. आणि परत एकदा ट्यून इन केलं तेव्हा नेमका लास्ट एपिसोड होता. भारी वाईट वाटलं होतं ते संपलं तेव्हा. एफएम चॅनेल फीव्हरवर 'रामायण' ही चालू होतं बरेच दिवस. नंतर कुठल्याही चॅनेलवर असं काही केल्याचं ऐकिवात नाही. नुस्ती आरजेंची निरर्थक बडबड (काही अपवाद सोडल्यास)
अकु, तुझ्या लेखामुळे जुन्या
अकु, तुझ्या लेखामुळे जुन्या आठवणी उजळल्या. धन्स!
मस्त लेख व आठवणींचे प्रतिसाद.
मस्त लेख व आठवणींचे प्रतिसाद. मी त्या काळात जिवंत होते पण कधी ऐकल्या नाहीत. पण कल्पना येतेय की किती मस्त वाटत असेल ते ऐकताना. ह्याचे रेकॉर्डिंग वगैरे उपलब्ध असेल का गं कुठे? ऐकायला हवं हल्ली ते ऐकताना कसे वाटेल. (आवडेल असेच वाटतए).
कदाचित मी ऐकलेही असतील तुझ्या
कदाचित मी ऐकलेही असतील तुझ्या आईचे कार्यक्रम. आणि जर ती बालोद्यानला असेल तर ऐकलेच ऐकले असतील!!<<<
बालोद्यान आई कॉलेजमधे असताना करायची. तू कसे ऐकशील तेव्हा. तेव्हा तू जन्मली सुद्धा नसशील (हे मला नक्की माहितीये)
मग नै ऐकले!!! शाळेत असताना
शाळेत असताना माझ्या काही मैत्रिणी असायच्या बालोद्यानला... काय भारी वाटायचं तेव्हा! विविधभारती आमच्याकडे लावलं तरी अगदी हळू आवाजात लावायला लागायचं.... त्या गाण्यांसोबत आपण गाणं गुणगुणणं वगैरेचा तर सवालच नव्हता! पण रात्री उशीरापर्यंत अभ्यास करताना किंवा एलिमेंटरी / इंटरमिजेट ची चित्रं पूर्ण करताना घरातले बाकीचे लोक झोपले तरी त्या रेडियोची साथसोबत आश्वासक वाटायची फार!
धन्स स्वप्ना, स्वाती, सुनिधी!
धन्स स्वप्ना, स्वाती, सुनिधी!
अकु - ती "एलिमेंटरी /
अकु - ती "एलिमेंटरी / इंटरमिजेट ची चित्रं" किंवा अगदी सध्या काढलेली चित्रे केव्हा पहायला मिळणार ?
Pages