तुझ्यामुळे झालं हे सगळं, जर तू मला समजून घेतलं असतंस तर कदाचित असं झालं नसतं. पण आता मी तुझं का ऐकू? तेव्हा जेव्हा माझी वेळ होती तेव्हा तू कुठे होतास? अग पण...
आणि शांतीने फोन ठेवला. तेव्हापासून जी विचारांना सुरूवात झाली ती कधी संपलीच नाही. एकटीच विचार करत बसले होते, एकटक पाहत, कुठे पाहत होते ते मला हि ठावुक नव्हतं. शून्यातून जग पहावं तशीच शून्यात पहात होते. लोकांचे शब्द तर माझ्या कानावर पडत होते पण माझ्या डोक्यातले विचार लोकांपर्यंत पोहचत नव्हते. आणि कधी स्वत:त हरवले कळलंच नाही.
निशांत, बोलायला लागला तर मी विचारात पडायचे, याचं नाव निशांत कोणी ठेवलं? इतकं बोलायचा, इतकं बोलायचा, कळायचंच नाही इतकी energy कुठून आणायचा आणि विचारलं ना त्याला की तोंड नाही का दुखत तर म्हणायचा “You are my recharge battery” आणि मग मी हसायचे. आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा एकमेकांशी काहीच बोललो नाही, कारण तेव्हा आमची ओळख नव्हती. आम्ही आमच्या common friend च्या लग्नाला गेलो होतो. सरिता जामकर आता अश्विनी नारकर. त्यावेळेला निशांतला पाहिलं आणि वाटलं असे नावाप्रमाणे अगदी शांतच आहे. त्या पूर्ण दिवसांत तो फक्त माझ्याकडे पाहत होता. काहीच बोलला नाही पण निघता निघता माझा फोन नंबर घेतला आणि मी सुद्धा वेडयासारखा दिला. पण त्यानंतर दोन दिवसांनी त्याचा फोन आला. मी आधी ओळखलंच नाही, कोण निशांत मग थोडया वेळाने लक्षात आलं, अरे हा तर तोच शांत नावाप्रमाणे.
कदाचित हि फोनवरची ओळख आमची पहिली ओळख होती. त्यानंतर मी निशांत बरोबर बोलण्यात इतकी गुंतले की माझं नाव शांती आहे हे सुद्धा विसरले. रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ, अरे रात्र राहिलीच, अगदी रात्री झोपेपर्यंत फोन, एस.एम.एस. बस इतकंच. सकाळपासून रात्रीपर्यंत काय केलं सगळा रिपोर्ट असायचा एकमेकांचा. मी पूर्वी माझ्या मैत्रिणींना म्हणायचे, “काय बोलता गं इतका वेळ फोन वर”? पण स्वत:ला हे उत्तर मिळाल्यावर गप्प झाले. म्हणतात ना सवय आणि गरज यामध्ये काही तरी अंतर आहे पण हि सवय नकळत गरज कधी झाली समजलंच नाही. दिवस, रात्र, महिने गेले. भांडायचो, रुसायचो, रागवायचो पण बोलायचो. मध्येच एक दिवस असा आला ज्या दिवशी निशांतचा फोनच नाही आला. मी त्याला फोन करायचा प्रयत्न केला पण तो फोन उचलतच नव्हता. मला वाटलं कामात असेल, असा वाट पाहता पाहता आठवडा गेला, महिना गेला अचानक फोन वाजला. मी फोन उचलला आणि तोंडातून इतके वाईट शब्द आले की मी स्वत:ला आवरूच नाही शकले आणि नकळत डोळ्यातून पाणी इतक्या जोरात यायला लागलं, असं वाटलं की अश्रूंचा बांध सुटला. मन शांत झालं अगदी शांत. या क्षणी मला आणखी काहीच नको होतं. फक्त ते शब्द, तो आवाज बस.
पण आता हे असंच चालू झालं. अगदी एक – एक महिना मी निशांतच्या फोनसाठी थांबून रहायची, वाट पहायची, अगदी चातकासारखी की आज फोन येईल आणि मी आता त्याचा आवाज ऐकेन. एक महिना वाट पाहिल्यानंतर जेव्हा तो अर्धा तास बोलायचा तो असा मनात भरून ठेवायचे खोलवर की येणारा पुढचा महिना मी त्यावर काढेन.
त्यादिवशी माझं लक्ष फोनवरच होतं, कधी वाजणार? पण फोन काही आला नाही. तीन महिने गेले, चार गेले, पाच गेले. मी त्याला भेटण्याचा प्रयत्न केला, पण तो कुठेतरी निघून गेला होता. तो आठ महिन्यापूर्वीच कुठे तरी गेला होता. मी त्याच्या नातेवाईकांना विचारलं, पण कुणाला काहीच माहित नव्हतं. काही दिवस उलटले. मी अशीच बाजारात जात होते, तिथे मला निशांतच्या बाजूला रहायला एक आत्या होत्या त्या भेटल्या, त्यांनी मला निशांतचा पत्ता दिला. मी लगेच एक मिनिट पण वाट न पाहता, घरी आले. आईला म्हणाले, मला मिरजला जायचं आहे. आई म्हणाली पण का? कशासाठी? पण मी तिला उत्तर नाही देऊ शकले आणि रात्रीच्या गाडीने मिरजला गेले. पत्ता शोधला आणि निशांतच दार ठोकलं. दार उघडताच पायाखालची जमीन हलल्यासारखी वाटली. माझा विश्वास बसत नव्हता. अरे हा निशांत आहे तोच ज्याला मी सरिताच्या लग्नात पाहिलं होतं. त्यानंतर मी त्याला आज तब्बल दहा महिन्यानंतर भेटत होते. तेव्हाचा निशांत उंच, गोरा, अंगाने तसा मजबूत डोळे, नाक अगदी सुंदर पण आताच्या निशांत मध्ये इतका फरक होता की मला त्याला ओळखायला वेळ लागावा आणि मी शांती निशांतला पाहत मागे सरकावे.
मग त्याच्या आईशी बोलले तेव्हा कळलं की त्याला कॅन्सर आहे आणि गेले सहा महिने ती लोक इथेच आहेत मिरजेत त्याच्या उपचारासाठी.
मी त्याच्या सोबत बोलायला गेले पण तो काहीच नाही बोलला. फक्त शांत होता अगदी पहिल्या भेटीसारखा, एकटक पाहत होता माझ्याकडे. मग मीच बोलले का आता गप्प का? तर मागून आईचा आवाज आला. नेहमी सकाळ, दुपार, संध्याकाळ तुझाच नंबर डायल करतो फक्त call चं बटन दाबत नाही. हे शब्द ऐकताच निशांतने एक हुंदका दिला आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रूंची धार लागली ती काही पुढचे दोन तीन तास थांबली नाही. आई म्हणाल्या, तो तुझ्याशी बोलायचा खूप प्रयत्न करायचा पण तो तुला त्याच्या आजाराबद्दल सांगायला घाबरत होता. मी तर त्याला खुप समजावलं पण ऐकलाच नाही, म्हणाला नाही सांगायचं तिला. बोलता बोलता रात्र झाली. मी माझ्या खोलीत गेले आणि स्वत:लाच म्हणाले, अरे मी तर विचार करते होते मुलं ही अशीच असतात. त्यांना वाटतं तेव्हा बोलतात आणि त्यांना वाटतं तेव्हा लांबही जातात. मुलीच्या मनाशी खेळतात. कधी मुलींचं मन समजुनच घेत नाही. पण मी निशांतच्या बाबतीत चुकीची होते, विचार करता करता झोपले.
सकाळी उठले पाहते तर निशांतचा चेहरा अगदी खुलला होता. एक वेगळंच तेज होतं त्याच्या चेहऱ्यावर. त्याच्याकडे पाहिलं आणि ठरवलं आता जोपर्यंत निशांतकडे वेळ आहे इथेच रहायचं, त्याच्यासोबत आणि त्याला सगळ्या गोष्टी द्यायच्या ज्या एका मित्राकडून अपेक्षित असतात.
दोन महिने झाले मला मिरजला येऊन. निशांतला बोलता सुद्धा येत नव्हतं. काहीच खायचा नाही, फक्त पाणी आणि सगळ्यांकडे पहायचा. संध्याकाळी दहा वाजले. निशांतला हॉस्पिटलमध्ये नेलं. तो अगदी नरम होता. काहीच बोलायच्या मनस्थितीत नव्हता. फक्त डोळे उघडे होते बस आणि काही नाही. मी रात्री बाराला घरी गेले, म्हणाले थोडा आराम करू पण झोप काही लागत नव्हती. मग अगदी कावरं बावरं होत होतं. उशी उलथा पालथ करून शेवटी साडे तीनला झोपले आणि पटकन फोन वाजला.
निशांत ...
सगळंच शांत झालं. अगदी सगळं. माझ्यासाठी माझी मैत्री, माझा सखा, सगळं संपलं. डोळ्यातून पाणी नाही आलं ते पण मनातच सुकलं कारण यानंतर मी वाट ही पाहणार नव्हते. मनात विचार चालू झाले... फक्त निशांत, निशांत आणि निशांत.
या गोष्टीला तीन वर्षे होवून गेली. पण या तीन वर्षात दिवस इतके बदलले की मी फक्त विचार करण्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नव्हते. असं वाटलं ते दिवस पुन्हा आले तर पण फक्त विचारच करू शकतो आपण. माझे निशांत बद्दलचे विचार कधीच थांबणार नाहीत पण त्याच्याबद्दल मी जो विचार केला होता तो मात्र मी बदलण्याचा प्रयत्न केला. मी आयुष्यात निशांत सारखा मित्र गमावला याचं दु:ख मी अनुभवते आहे आजतागत.
समाप्त.
- रुणाली शिरधनकर.
खुप मनापासुन लिहिलेलं...
खुप मनापासुन लिहिलेलं... डोळ्यात पाणी आणलंत..
खरंच काही माणसं आयुष्यात क्शण्भरसाठी येतात... निघुनही जातात..
मनाला मात्र चटका लावुन जातात..
माझ्याही आयुष्यात अशी काही माणसं आहेत(होती) जी माझ्या कायम लक्शात राहतील...
निशांत = निशेचा अंत =
निशांत = निशेचा अंत = रात्रीचा अंत = पहाट.
शांत शब्दाचा काही संबंध नाहीये.
बाकी नो कॉमेंटस.
मनापासून लिहिलयंत.....
मनापासून लिहिलयंत.....
छान लिहील आहे
छान लिहील आहे
धन्यवाद प्रतिसाद दिल्या बद्दल
धन्यवाद प्रतिसाद दिल्या बद्दल
छान लिहीलय
छान लिहीलय
फार सुन्दर लीहिल आहे ....
फार सुन्दर लीहिल आहे ....
छान लिहिलय..
छान लिहिलय..
नाही आवडली.
नाही आवडली.
माझ्या बर्याच अशा
माझ्या बर्याच अशा निसट्लेल्या मैत्रीच्या क्षणांची अन त्या मैत्रांची पण आठवण आली. अनेक अश्रु मी मनात दडवून ठेवलेत. त्या मैत्रांना मी आठवत असेन क?
आतवर जाउन भिडली....मस्त मस्त
आतवर जाउन भिडली....मस्त मस्त मस्त.....:)