एक संध्याकाळ

Submitted by मुरारी on 18 March, 2011 - 00:57

४ वाजतात. मी पीसी बंद करून उठतो, ऑफिस मधल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. अरे हा आज इतक्या लवकर कलटी? मी त्या नजर जाणीवपूर्वक टाळतो.आज मनस्थितीच विचित्र असते, त्यात अजून बसून काम करणं मला तरी निदान शक्य नव्हतं. कामाचं टेन्शन झेपत नाहीये कि बाकीच्या टेन्शन मुळे काम झेपत नाहीये , काहीच कळत नाहीये. खाली येतो आणि बाहेर चालू लागतो, बाहेर भन्नाट हवा सुटलेली असते, पण सगळे उष्ण वारे , हम्म उन्हाळा सुरु झाला तर मी स्वतःशीच पुटपुटतो. आज चालत जाऊया नाहीतरी लवकर निघालो आहे. उन्हाची तीव्रता आता बरीच कमी झालेली असते, पण सुर्यनारायण मात्र अस्ताला जाण्याआधी मस्त त्याची चित्रकलेची हौस पुरवून घेत असावा, आकाशात केशरी,निळसर, अश्या अनेक रंगांची जणू रंगपंचमी सुरु होती, अहाहा काय निसर्गाचा चमत्कार आहे !!! पण साला मनात कसलं मळभ साठलंय देव जाणे, चालता चालता, विचारांचे घोडे चौखूर उधळलेले असतात.
कधी कधी एखाद्या सकाळी प्रचंड ढग आकाशात गोळा होतात, सोसाट्याचा वारा सुटतो, गडगडत, विजा चमकतात पण अख्खा दिवस पाऊस काही पडत नाही,जीवाची काहिली मात्र होत राहते , तसच काहीस झालंय. भरपूर रडावस वाटतय, पण छ्या, मी आणि रडू ? मनातला पुरुषी बाणा जागा होतो. का रडू नये? पुरुषाला भावना नसतात ? त्या काय फक्त दारू पोटात गेल्यावर बाहेर काढायच्या असं थोडी आहे? अनेक म्याचो म्यान बार मध्ये पोरींच्या वरताण रडताना पाहिलेले आहेत मी. मनात द्वंद सुरूच असत. गाडीच्या आवाजाने मी दचकतो, विचारांच्या तंद्रीत न बघतच रस्ता क्रोस करत होतो. वा काय गाडी आहे, जवळ जवळ ४०-५० लाखांची सहज असेल, काय आरामदायक आयुष्य आहे यार, गाडी निघून गेल्यावर मी नजरेआड होईपर्यंत बघत बसतो , नक्की कोणीतरी श्रीमंत बापाचा पोरगा असणार , नुसता पैसा! सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत पैसा कसा खर्च करावा याचाच विचार करत असतील साले. टिपिकल मध्यमवर्गीय विचार सुरु होतात. नाहीतरी साले आपण रोज सकाळी उठलं कि ७.२८ ची लोकल पकडायची जीवघेणी शर्यत, किडा मुंगी सारख स्वतःलाच चिरडून घ्यायचं, भयानक स्पर्धेत स्वतःला लोटून द्यायचं, दिवसभर गुरासारख राबायचं आणि रात्री कधीतरी दमून असंच चिरून चिरडून घरी यायचं . घरचे बिचारे तोपर्यंत झोपलेले असतात, कोणाशी संवाद नाही , थट्टा मस्करी नाही, काहीच नाही, सगळे मिळून पत्ते खेळून सुद्धा २ ३ वर्ष सहज झाली असतील, हल्ली ऑनलाईन गळाभेटी होतातच, एकमेकांना "लाईक" केलं कि विषय संपला. सालं आरामात जाऊन झोपायला तर अजून हक्काचं घर सुद्धा नाहीये. राहतं घर खाली कराव लागेल कि काय अशी परिस्थिती. आजूबाजूचे गगनचुंबी इमले बघत उगाचच त्यात राहणार्यांचा हेवा वाटतो. मनातला कडवट पण वाढतच असतो, स्टेशन येत तसं गजबजाटाने भानावर येतो. मुकाट खाली मान घालून ट्रेन ची वाट बघत बसतो.
एका कोपऱ्यात एक भिकारी बाई बसलेली असते साधारण तिशीची, बाजूला एक छोटंसं नंगु पोर, आणि छातीची कवटाळलेलं एक तान्हुल, तिच्या चेहऱ्याची गालफड बसलेली, शरीर फाटके कपडे आहेत , म्हणून दिसतंय एवढी परिस्थिती, केसांचा अवतार, डोळ्यात कसल्याच भावना नाहीत, भिकार्यांच्या डोळ्यात निदान लोचट , पैसे मिळतील अश्या भावना मी बघितलेल्या आहेत, पण अशी स्वप्न शून्य नजर.. बापरे अंगावर शहारा येतो. ते तान्हुलं तिला लुचायचा प्रयत्न करत असतं, आणि माउली तशीच बसून, त्याची भूक कशी भागेल? मी पटकन रिक्षाचे वाचवलेले पैसे त्या नंगु पोराच्या हातात टेकवतो, ते उद्या मारत परत तिच्याकडे जात, पण तिच्या चेहर्यावरची रेषही हलत नाही , मला तो प्रकार असह्य होतो, ट्रेन येतंच असते, मी पटकन आत शिरतो, लवकर निघाल्याने ट्रेन बरीचसी रिकामीच असते , मस्त विंडो सीट मिळते.
लोकल सुसाट सुटते , खिडकीतून वर आल्यावर जरा बरं वाटत. समोर कॉलेजचा कंपू बसलेला असतो, नुसता दंगा माजवलेला असतो त्यांनी, एकमेकांची खेचत, थट्टा मस्करी करत , अख्या डब्याच लक्ष वेधून घेतलेलं असत, मधेच एक दोघे जण माझ्याकडे बघत असतात, मीच त्यांच्यासमोर एवढं खत्रूड आणि निर्विकार थोबाड घेऊन बसलो असेन म्हणून असेल कदाचित
परत पावसाची आठवण येते, त्यांचा आनंद जल्लोष पाहून , बाहेर मुसळधार पाऊस बरसतोय, आणि मी कोरडा राहून खिडकीतून बघतोय , तशीच माझी अवस्था असते . बाजूला लक्ष जात, एक प्रेमी युगुल त्याच्याच विश्वात गुरफटलेलं असत, तो तिला सारख चिडवत असतो, ती मधेच चिडायची, मधेच हसायची, मधेच तोंड फिरवून खिडकी बाहेर बघायची, पण तिचा त्याच्या हातातला हात मात्र तसाच, जणू जन्मोजन्मीची साथ देण्यासाठीच गुंफलेला. तीच लक्ष
माझ्याकडे जात, मी गोंधळून चटकन नजर फिरवतो.
गाडीने ठाणे सोडलेले असते, समोरचा कंपू पण उतरून गेलेला असतो, एखादा कुशल शिंपी ज्याप्रमाणे समोरचं कापड कुशलतेने सरसर कापत जातो, तसाच निसर्गाचा विशाल पट्टा कापत ट्रेन भरधाव निघालेली असते, चला आता २० मिनिटात डोंबिवली! बाहेर खाडी दिसत असते , आणि परत सूर्यनारायणाच दर्शन होत , त्याचा केशरी रंग इतका लोभस दिसत असतो कि बस , खाडीच पाणी सुद्धा केशरी रंगात नटलेल असत, मी पटकन दोन तीन फोटो काढतो मोबाईलवर , पण नीट येत नाहीत , असो शक्य तेवढ्या कटू आठवणी दूर करण्याचा प्रयत्न सुरु असतो. बोगद्यातून गाडी बाहेर येते आणि मुंब्रा देवीचा डोंगर दिसू लागतो . नकळत हात जोडले जातात, "सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके ........ "
हे त्रम्बिके, नारायणी सर्वांचं मंगल कर. "जो जे वांछील तो ते लाहो" खरं आहे, सर्वांना सर्व काही मिळो, सर्व स्वप्न पूर्ण कर, त्या समोरच्या जोडप्याला कधीही वेगळं करू नकोस, विचार उलट सुलट कोणाबद्दलही येत असतात .
ठाकुर्ली येत मी उतरतो . घरी पोहोचल्यावर आई दरवाजा उघडते , " अरे मन्या तू? इतक्या लवकर ? तब्येत बरी आहे ना? थांब पाणी आणते, बाबा सुद्धा आलेले असतात, ते सुद्धा विचारतात का रे असा दिस्तोयेस , बॉस ने झापला कि काय? मी हसतो. आई बाहेर येत म्हणते , अहो आता तो आलाय ना लवकर बरंय ना, रोज ११ वाजतात बिचाऱ्याला, मन्या तुला मस्त चहा टाकते हे पण घेतील अर्धा कप ! पोहे करू का पटकन ? बाबा पटकन पोहे आणा ना जरा खालून ,संपलेत आणि मला कॉफी ची दोन पाकीट पण आणा, आईची धावपळ बघतच बसतो, बाबा कधीच खाली सटकलेले असतात, मी हातपाय धुवून ग्यालरीत उभा राहतो, समोरची झाड केशरी उन्हात रंगलेली असतात, एका फांदीवर घरट्यात चिमणा चिमणी आणि त्यांचं पिल्लू चिवचिवाट करत असतात,
.
.
.
.
.
.

आणि आत, मनात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असते

गुलमोहर: 

सुंदर रे प्रसन्न... छान लिहीलं आहेस....
ते तान्हुलं तिला लुचायचा प्रयत्न करत असतं, आणि माउली तशीच बसून, त्याची भूक कशी भागेल?>>>>> ही माण्सं आजकाल भाड्यावर पोरं घेतात आणि मग हिंडतात. अते उलट यांच्याकडे बक्कळ पैसा असतो. अंधेरीत लोखंडवाल्यात घरं असतात ती भाड्याने देऊन त्यावर उदर्निर्वाह चालतो वर भिकही? आहेच... जे पोरगं जास्त काटकुळं असेल त्याचं भाडं जास्त कारण भिकही जास्त देतात ना लोक किव करून...

अॅबस्ट्रक्ट लिखाणाचा एक सुंदर प्रयत्न रे...
तुझी शैली खूप छान आहे...
आणि तुझी संध्याकाळ तर अगदी भावली..असं वाटलं की त्या दिवशी मी तुझ्याच बरोबर होतो..तुझ्या वाक्यावाक्यांतून तुझे चित्र डोकावतेय...
असाच लिहीता हो...मनापासून शुभेच्छा