एकटेपणा.... !

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 9 January, 2011 - 06:25

माणसाला सगळ्यात जास्त भिती कशाची वाटत असेल …..मरणाची ?? अं हं……चुकलात…. !! अहो… एकटेपणाची. बाकी कुठल्याही संकटाला तो तोंड देऊ शकतो पण एकटं राहण्याची वेळ आली तर मात्र तो ढेपाळतो. किंबहुना ह्या गोष्टीचा तो विचार करणंही टाळतो.

कधी कधी गोंधळ, गर्दीचा इतका वैताग येतो की असं वाटतं दूर दूर पर्यंत कोणीच दिसायला नको, जवळ असायला नको. एकांत हवा. पण एकांत आणि एकटेपणा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एकांत सुद्धा काही वेळापुरताच हवासा वाटतो. नंतर त्या एकांताचं रुपांतर एकटेपणात होतं आणि मग तो नकोसा होतो. लहानपणी तर आपल्याला कायम कोणीतरी सोबत खेळायला हवं असतं शिवाय आई, बाबा सुद्धा हवे असतात. तरुणपणी आपला चॉईस बदलतो पण सोबत लागतेच. म्हातारपणी तर सोबत गरजच बनते. उतारवयातल्या एकटेपणाला घाबरुनच तर आपण तरुणपणात लग्न, संसार, मुलं, बाळं ह्यात स्वत:ला अडकवून घेतो. सोबत नेहमीच एक सुरक्षिततेची भावना देते…. मग ती कोणत्याही वयात असो.

कुठल्याही आनंदाच्या क्षणी किंवा कुठल्याही दु:खाच्या क्षणी आपण एकटं राहणं टाळतोच. आनंदाच्या परमशिखरावर असतांना सुद्धा तो आनंद उपभोगायला आपल्याला कोणीतरी सोबत हवं असतंच. एकटं आनंदी कसं राहू शकणार ? लॉटरीचं तिकीट लागलं….. खूप पैसे मिळाले…. पण पुढे काय ? त्या पैशाचं सुख कुणाच्या तरी सोबतीनंच लाभेल ना…!! मग ती सोबत कुणाचीही असो. कधी कधी सगे, सोयरे नसले तर माणसं चक्क कुत्री, मांजरी पाळतात. त्यांच्या सोबत आपला आनंद वाटतात. पण एकटेपण टाळतात.

दु:खातही रडायला कुणाचा तरी खांदा लागतोच. खचलेल्या मनाला उभारी द्यायला कुणीतरी लागतंच. आपल्यासाठी कुणीतरी रडणारं असावं असं प्रत्येकालाच वाटतं आणि तसं माणूस मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर झटतो. आपण एकटेच जन्माला येतो आणि एकटेच जातो हे जरी अंतिम सत्य असलं तरी जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आपण कायम सोबतीसाठी धडपड करतो. त्याच धडपडीत आयुष्य संपतं. संसार, संसार म्हणजे तरी काय असतं ? आपण आपल्या लोकांचं विश्व तयार करतो आणि त्यांना आनंद, समाधान देण्यासाठी कष्ट करतो. कुठलंही काम करतांना सुद्धा शेवटी काम झाल्यानंतर कुणीतरी ते बघून पसंतीची पावती देणं हे ही तितकंच आवश्यक असतं. त्यासाठी ही कुणीतरी लागतंच. शारिरीक भुकेसारखी मानसिक भूक पण असतेच आणि ती भूक भागवायला कोणीतरी सोबत लागतेच. एकटेपण खायला उठतं. त्या पायी वेड लागायची पाळी सुद्धा येते. आपण कितीतरी सेलीब्रेटीजची उदाहरणं बघतो. सेलीब्रेटीज कशाला सामान्य माणूसही माणसांचा भुकेला असतो. “माणसात असणं” हेच मुळी नॉर्मल माणसाचं लक्षण मानल्या जातं.

एकला चोलो रे……. हे म्हणायला ठीक आहे. पण आचरणात आणायला तितकंच कठीण आहे. एकटेपणावर उपाय शोधण्याचे आपले सतत प्रयत्न सुरु असतात. पण एका ठराविक वेळेनंतर त्यावर कुणाची तरी सोबत हा्च एकमेव उपाय असतो. एकटं असतांना आपण नेटवर जरी असलो तरी तिथेही आपण माणसंच शोधत असतो. माणूसपण शोधत असतो. माणूस म्हटलं की त्यात कळप आलाच. जनावरंच फक्त एकटी राहू शकतात. एकटेपण म्हणजे भयाण रात्र, एकटेपण म्हणजे रखरखीत वाळवंट ! असं एकटेपण जगात कुणाच्याही वाट्याला न येवो !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आवडल Happy

खरं आहे. एकटेपण हे खरंच भयावह.
लेख वाचता वाचता का कुणास ठाऊक, अश्वत्थाम्याची आठवण झाली.

खरंय गं, जयश्री!!!
एशियात कुटुंब प्रणाली जोपर्यन्त मजबूत आहे , एकटेपणाची भीतीच नको आपल्याला Happy
आजकाल जॉईंट न्युक्लिअर फॅमिली ची संकल्पनापण हळूहळू मूळ धरू लागलीये.. हवा/जरूर तेंव्हा एकांत ,हवा/जरूर तेंव्हा सोबत

जयुताई
लिखाण सुंदर आहे.आवडले.
गेल्या वर्षी या भयावह स्थितीतून मी सहा महिने काढले आहेत्.स्वतःचे घर वाकुल्या दाखवू लागते.
पण केंव्हा ना केव्हां हे भोगायची तयारी ठेवावी लागते.

छान लिहिलयं !
आपल्याला खुप काही फिरुन बघायचं असतं,काही राहुन गेलेलं असतं, तसं आपण नेहमी म्हणतो,की कुठे जायला वेळच मिळत नाही..
पण मला वाटतं आपण एकटे असलो कि फिरणं खुप टाळतो!

छानच लिहिलेय जयुताई. म्हणजे वर्णन छान केलेस एकटेपणाचे व त्या अवस्थेचे. पण अजून तळ गाठला असतास ना एकटेपणाच्या भावविश्वाचा तर अजून गहिरे वाटले असते.

छान लेख... लेख वाचुन बरेच प्रश्ण पडलेत! लहानपणापासुन एकटेपणाची सवय नसते म्हणुन आपण एकटेपणाला भितो का? कुटुंबव्यवस्था हा एकटेपणावर उपाय होतो का? एकटेपणाचा बाउ केला गेला आहे का? म्हणजे जसं 'पाणी नाही तर त्याची भिती माणसाला बुडवते' तसं थोड्या एकटेपणाचा लोकं बाउ करुन जास्तच दुखि: होतात का?
"एकला चोलो रे…" हे थोडफार.. expect for best, prepare for worst... सारखं आहे का?
>> जनावरंच फक्त एकटी राहू शकतात.
हे मात्र मान्य नाही. मला वाटतं प्रत्येक species प्रमाणे हे बदलणार. शेवटी माणुसही एक जनावरच आहे.

धन्यवाद लोक्स Happy

चिन्नु...... अगं एकदम मस्त आहे मी. कधीपासून या विषयावर लिहायचं होतं....त्याचा मुहूर्त लागला इतकंच Happy

उमेश..... हम्म.....!!

सॅम.... जनावरांबद्दलचं मत जरा चुकलंच.

जयश्री, छान लेख. थोडक्यात आणि अतिशय खरे लिहीले आहे.

अश्वत्थाम्याची आठवण झाली >>> उल्हास भिडे, अगदी स्वाभाविकच वाटले. (एकटेपणाची 'जखम' घेऊन जगणारी माणसे पाहिली की अश्वत्थाम्याची आठवण येते असेही म्हणावेसे वाटते)