हिंदीकरण झालेले शब्द व रचना

Submitted by मिरिंडा on 5 March, 2024 - 21:33

गेल्या बऱ्याच दिवसांपासून वृत्तपत्र वाचताना एक गोष्ट लक्षात आली.. काही किंवा जे लक्षात आले ते मराठी शब्द व रचनांचा हिंदी पद्धतीने रुप पालटून वापरात आणण्याचं वृत्तपत्रासारखं माध्यम प्रयत्न करीत आहे. याचं आश्चर्य वाटतं.. उदाहरणादाखल काही शब्द खाली देत आहे :-
योग्य मराठी शब्द। हिंदी करण झालेला मराठी शब्द
-------------------- --------------------------------------
१)सुरक्षितता सुरक्षिता
2)पारदर्शकता पारदर्शिता
3)शहाणपणा शहाणवी (हा शब्द मी तरी
कोणत्याही मराठी साहित्यात
वापरलेला पाहिला नाही.,कोणी
पाहिला असल्यास अवश्य
संदर्भासहीत सांगावे.)

जसजसे आणखी शब्द सापडतील तसतसे या यादीत समाविष्ट करीन.आपणासही असे शब्द सापडल्यास ही यादी वाढवण्यास मदत करावी ही विनंती. मला वाटतं योग्य मराठीचा वापर हाच यावरील उपाय असावा. सर्व मराठी शब्द वापरात आणावेत नाहीतर मराठीचं रुपडं एवढं बदलेलं की ती ओळखणं कठीण जाऊ शकेल.
या लेखात हिंदी भाषेबद्दल कोणताही आकस नसून आपली भाषा योग्य रितीनै वापरात यावी,एवढीच अपेक्षा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

** शहाणवी (हा शब्द मी तरी कोणत्याही मराठी साहित्यात वापरलेला पाहिला नाही) >>> +१
पण हे पर्याय आहेत :
शहाणीव, शाहणीव
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%...

४. क्रौर्य - क्रूरता
५. औदार्य - उदारता
६. वैविध्य - विविधता (आपल्या मराठी प्रतिज्ञेत - समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या - असे शब्द आहेत. तिथे वैविध्य वापरायला हवा होता का?)

ह.पा. - ४,५,६ मध्ये काय वावगे आहे? त्व, ता हे दोन्ही प्रत्यय मराठीत चालतात.
हल्ली वैविध्यता असा डबल इंजिनवाला शब्द दिसला आहे.

पारदर्शिता पाहिला आहे. सुरक्षिता अजून तरी नाही.

प्रेक्षकांसाठी दर्शक, गणवेषासाठी वर्दी, ‘दगा’ऐवजी ‘धोका’ देणे.
‘खूप जास्त’ (‘बहुत ज्यादा’), “ही आपली परंपरा ‘राहिली आहे’” (रही है) यांसारखे शब्दप्रयोग.
फारएन्डाचा आवडता ‘माझी (मला) मदत करा’.

’मी तुमच्या ईमेलमघून जात आहे’ (I am going through your email) असं वाक्य मी इतक्यातच या कानांनी ऐकलं! हे हिंदीकडून आलेलं नाही, पण नोंदवल्याशिवाय राहवलं नाही.

>>> 'जसं की' मधली की
हो हो, आणि ‘कसं आहे ना,’ (वो क्या है ना) अशी वाक्याची सुरुवात.

वो क्या है ना >> असं कुणी म्हटलं तर मला 'शकु को कुछ देर अकेला छोडना था ना' हेच आठवतं.

>>> 'शकु को कुछ देर अकेला छोडना था ना'
lol हे कशात आहे?

मला त्या ‘कसं आहे ना’ने सुरू होणाऱ्या वाक्यांची फार धास्ती वाटते, कारण त्यापुढे हमखास काहीतरी पिळू तत्त्वज्ञान येतं! Proud

मला एक पडलेला मोठा प्रश्न आहे तो कोणितरी सोडवून द्या प्लिज Proud

जेव्हा आपण बोलताना असं कुठे असतं का? या अर्थाने "असं थोड्च असतं? किंवा असं थोडच आहे?" असं म्हणतो, बरोबर ना?

मग हिंदीत बोलताना ऐसे थोडी ना होता है? असं का म्हणतात? त्यात हे ना म्हणजे नकारार्थी आहे की आपण ए ऐक ना मध्ये जो ना वापरतो तो आहे?

तसं आयडियली हिंदित बोलताना सुद्धा "ऐसे थोडे ही होता है? असंच म्हणायला हवं ना?

हे सगळ लिहायचं कारण म्हणजे मराठीत सुद्धा लोक आता "असं थोडी ना असतं"? असं म्हणायला लागलेत.

शकु को कुछ देर अकेला छोडना था >> फिल्लमबाजी.

बरं आपण भाषिक सरमिसळ न होण्याचा आग्रह धरणं कितपत रास्त आहे? आपण बोलतो ती भाषा ही प्राकृत महाराष्ट्री, संस्कृत, कन्नडा, फारसी, अरबी, पोर्तुगीझ, इंग्रजी अश्या कित्येक भाषांची सरमिसळ होऊनच तयार झाली आहे ना?

मला त्या ‘कसं आहे ना’ने सुरू होणाऱ्या वाक्यांची फार धास्ती वाटते, कारण त्यापुढे हमखास काहीतरी पिळू तत्त्वज्ञान येतं! Proud >> Lol

"बाबारे, दुनिया काय आहे हे तू पहिचानलं नाहीस" ई (पुलं)

सगळ्या क्रियांना बनवणे क्रियापद लावणे.
जेवण बनवले.
भाजी बनवली,अनारसे बनवले.
.
अजून एक, केस केले. I mean, what???

मला त्या ‘कसं आहे ना’ने सुरू होणाऱ्या वाक्यांची फार धास्ती वाटते, कारण त्यापुढे हमखास काहीतरी पिळू तत्त्वज्ञान येतं! Proud >> Lol

"बाबारे, दुनिया काय आहे हे तू पहिचानलं नाहीस" ई (पुलं)>>>
या दोन्हीला +१. मलापण ते "कसं आहे ना" ऐकलं की धडधडतं आणि बाईंनी हे लिहिलेलं मी वाचताना मला पुलंचं "बाबारे.."च आठवलं! "प्राण्या, रामकथारस पी!" Lol

सूड म्हणून महाराष्ट्राचे दोन उपोषणपटू हिंदीचे मराठीकरण करत आहेत.

जिन झाडों को लोगा फत्तर मारते उसीकोच फळफळावळ आते.

प्रयत्नांवर "पाणी फेरले " (आपण विरजण घातले म्हणतो ना?)

पालकांसोबत बटाटा "चांगला जाईल " (पालककें साथ आलू अच्छा जायेगा ) असे सध्या बऱ्याच पाककृती व्हिडीओ मध्ये ऐकू येते

'तुझ्यावर' हा रंग छान दिसतो(तुम पे ये रंग..)
'तुला' हा रंग छान दिसतो- असं हवं.

'माझ्यावर' हसता- 'मला' हसता.

>>बरं आपण भाषिक सरमिसळ न होण्याचा आग्रह धरणं कितपत रास्त आहे? >> सरमिसळ झाली तर ठीकच. पण मराठीत प्रचलित शब्द/ वाक्यरचना/ क्रियापदं/ शब्द क्रम सध्या अस्तित्वात असताना मुद्दाम तो न वापरता इतर उचलणे करू नये. त्याने उगाच सपाटीकरण होईल, आणि भाषेचे सौंदर्य कमी होत जाईल.
बाकी सरमिसळ होतच रहाणार. वाहत्या प्रवाहाला बांध घालणारे आपण कोण! प्रवाहपतित होणे सगळ्यात उत्तम.

आता हैराण होणे, जोरदार टाळ्या होणे हे रुळलेले शब्द म्हणून टाकू नी काय!

साडी परिधान करा असा शब्द वाचनात आला हल्ली एक दोन दा ते साडी पेहेनना वरून आलाय का काय अस वाटलं. साडी नेसतात, ड्रेस घालतात हे माहित होत. मग कोणी कोणी साडी घालायला लागले ते ही माहित होत. आता हे नवीन आहे साडी परिधान करण.

सर्वांचे प्रतिसाद वाचले. साधारणपणे असंच दिसलं की मराठीत शब्द असताना,दुसरे शब्द उधार घेण्याची गरज नाही. "ऐसा थोडी ना होता है. हिंदी करणं झालेली मराठी रचना " असं थोडी असतं ?ऐवजी असं कुठे असतं का ? किंवा असं नसतंच मुळी" व "तुम वहां जाओगे नही" चे हिंदीकरण झालेली मराठी रचना, "तू तिथे ते जाणार नाहीस ऐवजी " तू तिथे जाऊ नकोस" अशी थेट आज्ञा देणारी रचना वापरीत नाहीत. यावर मायबोलीवर एक मोठा सविस्तर लेख लिहिला आहे. या सगळ्या हिंदी मिश्रित मराठी रचना जर वेळीच हेतुपुरस्सर थांबवल्या नाहीत,तर आपल्या भाषेचं सौंदर्यही संपेल आणि नवीन शिकणारा चुकीचं मराठी शिकेल ते वेगळंच आणि आपल्यासारख्याला हेच मराठी बरोबर असंही सांगेल. ही वेळ दूर नाही. मराठी बोली भाषेतले शब्द संवादात आले तरी हरकत नाही. पण उगाचच उसने शब्द यायला नकोत,असं मनापासून वाटतं.कदाचित काही लोकांना हा प्रपंच चुकीचा वाटेलही व असे लोक असंही म्हणतील "अशा हिंदी मिश्रित शब्दप्रयोग आपली भाषा वाढते" हे म्हणणे चूक आहे. भाषा मूळ रुपापासून दूर मात्र जाते.इतक्या तळमळीने लिहिण्याचे हेच कारण आहे. कोणाला उगाचच चिकित्सा चालली आहे असंही वाटू शकतं. त्यांच्यासाठी माझ्याजवळ काहीही स्पष्टीकरण नाही.

भाषा मूळ रुपापासून दूर मात्र जाते >> त्याला काय करणार? मूळ रूपातील मराठी कशी होती हे आजही कुणी नीट सांगू शकेल असं वाटत नाही.
"मी दरवाज्यातून पसार झालो" या वाक्यात दरवाजा आणि पसार हे परभाषिक शब्द आहेत. ते आल्याने आपल्या कानाला काही खटकलं का? किंवा त्याने आपण सौंदर्य नष्ट झालेली भाषा बोलतो आहोत असं वाटलं का?

मुळात द्वार किंवा दार हे शब्द असताना आपण दरवाजा घेतलाच ना? तिथे "मी डोअरमधून पसार झालो" असं म्हटलं तर काय प्रॉब्लेम आहे? दरवाजा चालतो तर डोअर का नाही?

सॉरी,इथे माझं उदाहरण चुकलं. विषय हिंदीचा आहे आणि मी इंग्रजी घुसवलं. जरा विचार करून दुसरं उदाहरण देतो.

भाषेचे सौंदर्य हा ओव्हररेटेड प्रकार आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. मराठीत हिंदी शब्द घुसले की ते कानाला खटकते, हे मान्य आहे. पण मग खुद्द मराठी तरी अगदी शुद्ध लिहिली आणि बोलली जाते का? माझ्या मते भाषेचे मूळ उद्दिष्ट म्हणजे एकमेकांशी संवाद साधणे. याचा अर्थ एकच तो म्हणजे भाषा साधी-सरळ-सोपी असली पाहिजे.

हे थोडंसं पुलंच्या 'रावसाहेब'मधल्या ' गाण्याची चाल बदलणे' सारखं आहे असं वाटतं मला.
विचारपूर्वक एखादा शब्द किंवा शब्दप्रयोग मराठीत आणणे आणि केवळ आळशीपणाने किंवा मुळातच तेवढी गुणवत्ता/वाचन/अभ्यास नसल्यामुळे वापरणे यात फरक आहे.
हा एलिटिसिझम होतोय कदाचित माझा.
पण 'अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज' आणि तत्सम शब्दप्रयोग ही सरळसरळ भ्रष्ट नक्कल आहे.

Pages