दखनी चित्रपटांचे वर्गीकरण

Submitted by रघू आचार्य on 1 December, 2023 - 23:54

माफ करा. नमनाला मूठभर तेल न घालता थेट विषयावर येत आहे.

दक्षिणेचे सिनेमे बघताना दोन दशकाच्या आधी लक्षात आलेली गोष्ट म्हणजे त्यांचे साचे आहेत. त्याच साच्यात नायक बदलून गोष्ट सांगतात. पण साचा बदलत नाहीत. यातल्या काही साच्यांबद्दल अजिबात आक्षेप नाही. साच्यातला असूनही काही काही चित्रपट ठसठशीत बनतात. दक्षिणेच्या प्रेक्षकाला साचेबद्ध चित्रपट अंगवळणी पडलेले असतात, त्यामुळं त्याला त्यात वावगं वाटत नाही. तरीही वेगळ्या वाटेवरचे सिनेमे सुद्धा बनतात. त्यातले काही यशस्वीही होतात पण ते आपल्या पर्यंत पोहोचतातच असे नाही.

दोन दशकात दक्षिणेकडच्या चित्रपटातले थुलथुलीत नायक हा प्रकार नव्या पिढीत गायब झाला. थुलथुल्यांचे सिनेमे आजही येतातच. आता तर आपणही सरावलो आहोत.उदा मोहनलाल हा पूर्वीपासून कुठल्याच अँगलने सडपातळ नायक नाही. विजयकांत , चिरंजीवी हे सुटलेले नसले तरी किमान रजनीकांत, नागार्जुन प्रमाणे सडपातळ नाहीत. रजनीकांत ७२ वर्षांचा आणि नागार्जुन ६२ वर्षांचा. एखादे वर्ष वाढले असेल. नवे आलेले सुद्धा आता चाळीशीच्या पुढेच आहेत. पण या पिढीतले नायक फिटनेस बद्दल सजग आहेत , तसे ते वैविध्याबद्दल आग्रही नाहीत. साच्यांचा मोह त्यांना सुद्धा सुटत नाही.

विविध प्रकारचे दक्षिणपंथी साचे

१. भ्रष्टाचार मिटवण्यासाठी हिंसा - हा प्रकार आपण पहिल्यांदा हिंदुस्तानी ( इंडीयन) या कमल हसनच्या चित्रपटात पाहिला. पण त्या आधीपासून हा साचा तिकडे आहेच. अपरिचित नावाचा चित्रपट यातला त्यातला त्यात वेगळा म्हणता येईल. यात नायक जी काही हिंसा करतो ती पाहून भ्रष्टाचार्‍यांची दया येऊ लागते. भीक नको पण कुत्रं आवर या न्यायाने भ्रष्टाचारापासून मुक्ती नको पण तुझा हिंसाचार आवर ही भावना तीव्र होऊ लागते. यातल्या नायकांना एखादी जुनी मार्शल आर्टची विद्या अवगत असते. तसेच ते नेहमीच्या रूपात ओळखू येत नाहीत. कोण हिंसा करतंय हे कळत नाही. पण देशभरात हा जो कुणी अज्ञात व्यक्ती आहे त्याच्याबद्दल क्रेझ निर्माण होते. टीव्ही डिबेट मधे नागरीक एंकरला गप्प करतात. मंत्र्याच्या मागे पब्लीक लागते असे दृश्य दिसते. काही काही चित्रपटात या अज्ञात नायकाचे नाव घेऊन काही स्थानिक तरूण आपापल्या परीने भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा करताना पकडले जातात त्यामुळे पोलीस कन्फ्युज होतात असे वेगळेपण दाखवले जाते. अशा वेळी नायक गर्दीत उभा राहून हसत निघून जातो. अशा थीमवर हिंदीत सुद्धा काही सिनेमे आले होते. एका मधे चार तरूण एका गॅरेज मधे त्यांचं भ्रष्टाचार विरोधी कार्यालय थाटतात आणि तिथून हॅकींग वगैरे सगळं ऑपरेट करून गुन्हे करतात.

२. सायबर क्राईम - हे चित्रपट ज्याला संगणक, इंटरनेटचं काहीच ज्ञान नाही त्याच्यासाठी धक्क्यावर धक्के देणारे असतात. आफ्रिकेतल्या जंगलात राहणार्‍या माणसाला इस्त्रोच्या मोहीमा जशा अचंबित करून टाकणार्‍या वाटतात तसे हे सिनेमे सायबर अडाण्यांसाठी चंबूवासे ( तोंडाचा आ वासणे) ठरतात.

उदाहरण म्हणून किडम नावाचा चित्रपट आहे. नावावरून हा बालचित्रपट वाटला. पण ते इंग्रजीतलं किड नसून कीडा या शब्दाचं दक्षिणीरूप आहे.
यातली नायिका ही बसल्या जागेवरून गुन्हेगारांचे फोन हॅक करून ते काय गुन्हा करणार आहेत हे पोलिसांना सांगत असते. तिने त्यांचे इअरफोन्स सुद्धा हॅक केलेले असतात. फोनचे कॅमेरे हॅक करून ती नियमित स्क्रीनशॉट्स पोलिसांना पाठवत असते.
सिड द हॅकर , मायावन (मायावी), प्रिन्स, की असे काही नमुने आहेत. हिंदीतला मिकी व्हायरस हा याच साच्यातला आहे.

याच प्रकारात वेगळेपण म्हणजे सायबर एक्सपर्ट व्हिलन असणे. यातला व्हिलन हा एकट्या महिलांचे व्हिडीओज हॅक करून मिळवत असतो. त्यांचे सीक्रेट्स जाणून घेऊन त्यांना ब्लॅकमेल करत असतो. त्याला ट्रेस करणार्‍या पोलीस अधिकार्‍याच्या बायकोलाही तो ब्लॅक मेल करतो. हा चित्रपट वेगळा ठरण्याचे कारण म्हणजे सायबर साच्यासोबत यात आणखी एक साचा वापरला आहे. त्याबद्दल पुढच्या पॅरात बोलू.
डिजिटल थिफ https://www.youtube.com/watch?v=L-w06wCBOEc&t=653s

३. अब्बास मस्तान ठिक्कर साचा - धक्क्यावर धक्के देणे ही अब्बास मस्तान यांची शैली आहे. पण अब्बास मस्तान सुद्धा शरमेने काळे ठिक्कर पडतील असा धक्क्यांचा साचा दक्षिणेत आहे. यात इंटर्व्हलपर्यंत चित्रपट एका लयीत घडत राहतो. त्यात नायक नायिकेला पटवण्याचे चॅलेंज वगैरे देतो. तीन तासात तू पटशील असा मनोवैज्ञानिक दबाव आणतो. जसे विंबल्डन मधे जॉन मॅकेन्रो हा समोरच्याला तू हरणार आहेस असे डोळ्यात डोळे घालून सांगायचा त्यामुळे कच्चा मानसिक पाया असलेला खेळाडू त्याच्या या दबावाला बळी पडून पराभूत मानसिकतेचा शिकार होई. अगदी तशाच पद्धतीने नायिकेला आता तीन तासानंतर आपलं काही खरं नाही. आपण पटणारच आहोत तर जास्त विरोधात का जा म्हणून चंबळेच्या डाकूंप्रमाणे आत्मसमर्पण करते.

इतक्यात संकटांची मालिका सुरू होते आणि तिला नायकाचे अमानवी स्वरूप दिसून येते. यात कधी कधी नायिका, नायकाचे वडील, भाऊ, आई ( ज्या कॅरेक्टरला चित्रपटात जास्त महत्व असेल ते) किंवा नायकाचा परममित्र हे आगीच्या खाईत सापडतात आणि ते मेले म्हणून जाहीर होते. पण शेवटी धक्के उलगडत जाताना मध्यांतराच्या आधी जी कार खाईत पडली तिच्यातून संबंधिताला एक तर नायकाने आधीच ओढून काढलेले असते किंवा त्या व्यक्तीने उडी मारलेली असते. ही खेळी नायकाने खलनायकापासून त्या व्यक्तीला सेफ ठेवून हिंसाचार करण्यासाठी केलेली असते. वरच्या पॅरामधला सिनेमा हा असाच आहे. त्यातला पोलीस अधिकारी हा सायबर क्रिमिनलला गंडवण्यासाठी बायको (गफ्रे) ला नाटक करायला सांगतो आणि तो सापळ्यात अडकतो.

हे धक्के अनेक प्रकारचे असतात ज्याचा उलगडण्याचा साचा ठरलेला असतो. मध्यांतराच्या आसपास कलाटणी मिळते तेव्हां अनेक गोष्टी प्रेक्षकांपासून दडवून ठेवल्या जातात आणि शेवटी "कस्सं फसवलं, अश्शं नव्हतंच मुळ्ळी, ए ए फसला " छापाचा रहस्यभेद असतो. त्यासाठी फ्लॅशबॅक तंत्राचा अजीर्ण होईल असा वापर केला जातो. इतका कि आपल्या कानात मागे उभा फ्लॅशबॅक, पुढे उभा फ्लॅशबॅक हे गाणे वाजू लागते.

कहानी हा हिंदी सिनेमा अशाच कलाटण्यांमुळे गाजला पण त्यातलं रहस्यभेदन उच्च कोटीचं होतं ज्याच्या जवळपास सुद्धा हे दक्षिणी सिनेमे जाऊ शकत नाहीत.

४. लार्जर दॅन लाईफ नायक - मुख्यत्वे रजनीकांतचे सिनेमे या प्रकारचे असतात. अशा सिनेम्यांची कथा कशीही कुठूनही कुठेही जाते. तिचा उद्देश एकच नायक हा साक्षात देवाचा अवतार असून कधी कधी देव सुद्धा रजनीदर्शनाला येत असावेत अशी शंका निर्माण करणे.

उदा लिंगा या चित्रपटात रजनी चोर असतो. पण एका गावात राजवाड्यात चोरी करायला आल्यावर त्याला सुपरनॅचरल पावर मुळे त्या राजवाड्याशी कनेक्शन असल्याचे जाणवते. हा सुद्धा दक्षिणेचा टच. मग त्याला लिंगा या राजाबद्द्ल समजते. लिंगा हा राजा असून याला लोकांच्या कल्याणाची कळकळ असते. त्यांच्या शेतीला पाणी मिळावे म्हणून तो धरण बांधतो. शाहू महाराजांपासून प्रेरणा घेतलेला एव्हढाच भाग आहे. पण नंतर दरबारातले अस्तनीतले निखारे,फसवून घेतलेल्या सह्या आणि ब्रिटीशांचे कटकारस्थान यामुळे तो कफल्लक होतो. पण त्याची कसलीच तक्रार नसते. तो हसत हसत दुसरीकडे निघून जातो. दारीद्र्यात जगू लागतो. त्याची बायको खानावळ किंवा तत्सम उद्योग करते. त्यातून तो पुन्हा वैभव प्राप्त करतो. तो गरीब झाल्यावर जे जिणे जगतो ते महा मेलोड्रामा सदरात मोडते. एव्हढी संकटे येत असताना नायकाने शांतपणे हसणे हा रजनीचा युएसपी. अशा सीन्सला तमिळ प्रेक्षक कसा ढसाढसा रडतो हे प्रत्यक्ष पाहिलेले आहे.

बाबा या चित्रपटात भावाला वाचवण्यासाठी रजनी गुंडांचा मार खातो. गुंड त्याला सळई, मोठा बांबू, मोठा रॉड अशा अनुक्रमे जास्त हाडेमोड करणार्‍या आयुधांचा वापर करून टोले देत असतात. त्या प्रत्येक फटक्याला रजनी हसत असतो. जेव्हढा ताकदीने फटका तेव्हढाच रजनी हसत असतो. इथे नायकाचे महानत्व ठसवले जाते. तो लार्जर दॅन लाईफ आहे हे पटते. मनात आणले तर या गुंडांची चटणी झाली असती पण आपला नायक केवळ भावासाठी मार खातोय म्हणून प्रेक्षक रडू लागतात. बरं नायक पण साक्षात रजनी ! त्याला दुखापत होणे हा तमिळ अस्मितेला हात घालण्याइतकाच ज्वलंत प्रकार ! कधी कधी भीती वाटते कि प्रेक्षक भावनातिरेकाने थेटर तर जाळणार नाहीत ना ?
पण चित्रपटगृह हे दक्षिणेच्या प्रेक्ष्कांना मंदीराप्रमाणे पवित्र असल्याने असे प्रसंग ओढवत नाहीत. तसेच नायक हा दैवतच असल्याने त्याचे ५९०, ६०, १०० फूट होर्डिंग लावणे, त्याला हार घालणे हे प्रकार एमजीआर, एनटीआरच्या काळापासून चालत आलेले आहेत. ते आजही चालूच आहेत.

५. सिस्टीम सुधारणारे नायक / नायिका - यातले नायक किंवा नायिका हे आर एस एस च्या तालमीत वाढल्याप्रमाणे सातत्याने समान नागरीक कायदा, भय भूक भ्रष्टाचार, सिस्टीम याबद्दल बोलत असतात आणि सिस्टीम सुधारण्यासाठी संघर्ष करतात. यात सुद्धा धक्के दिलेले असतात.
एका सरकारी शाळेत एक शिक्षिका येते आणि शाळा सुधारण्यासाठी मेहनत घेते. आजूबाजूच्या वस्त्यात जाऊन मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांवर दबाव आणते. प्रसंगी त्या पालकांचे गुन्हे उघड करते. शाळा चांगली बहरू लागल्यावर शहरात ज्याचे खासगी शाळा कॉलेजेस आहेत असा लोकप्रतिनिधी तिला दम देतो. ती बधत नाही. मग तिच्यावर हल्ले सुरू होतात. मुलांच्या जाती शोधून मुलांची स्क्रिप्टेड भांडणे तिच्यावर जळणारे शिक्षक घडवून आणतात. ती मधे पडताच प्लाननुसार दुसर्‍या जातीचे लोक मोर्चे आणतात. कलेक्टरला दखल घ्यावी लागते. पण मिटींगमधे काय होते हे दडवले जाते. कलेक्टर अचानक निघून जातो.

शेवटी कळते कि नायिका आर्मी मधे आहे हे कलेक्टरला तिने त्या मिटींग मधे सांगितलेले असते. कलेक्टर पण प्रवाहाप्रमाणे वाहणारा असला तरी त्याला कदर असते. शेवटी नायिका हाणामार्‍या सुद्धा करते. आर्मीचा अधिकारी अशा प्रकारे मिशन मोड मधे शाळा सुधारवण्यासाठी पाठवला जाऊ शकतो असा संदेश आपल्याला यातून मिळतो

६. भय पट - दक्षिणेचे भयपट हे आपल्या समजुतीपेक्षा खूप वेगळे असतात. यात मोठाले वाडे, राजवाडे असतात. त्यात बहुधा एखादे रहस्य असते. एखादा दुष्ट आत्मा एखाद्या पेटीत बांधून ठेवलेला असतो. पण त्या आत्म्याच्या शापाने राजकन्या सुद्धा शापात बद्ध असते. काही वर्षांनी तिसर्‍या चौथ्या पिढीत या आत्यांचे अस्तित्व, गूढ मृत्यू हा भयाचा भाग असतो. मग गावाची सुटका करायला नायक / नायिका एखादा मणी, हाडुक, त्रिशूळ आणायला जंगलात जातो, दिव्य करतो आणि शेवटच्या रीळात दुष्ट शक्ती मुक्त झाल्याने हाहाकार उडतो. नायक / नायिका वेळेत पोहोचून तिचा नायनाट करतो. पण चित्रपट संपल्यावर दुष्ट शक्तीचा केस, एखादे हाडुक पडलेले दिसते. मग पुढचा भाग.

यात वेगळेपणा आणण्यासाठी शापित चित्र, घरावर फिरणारा अ‍ॅणाकोण्डा, किन्नरचे भूत असे प्रकार येतात.

७. पावर फुल एन आर आय व्हिलन - महेशबाबू, अल्लु अर्जुन, रवी तेजा यांच्या चित्रपटात असा व्हिलन असतो जो पूर्वाधात अनेक function at() { [native code] }याचार करतो. बदला घ्यायची वेळ येते तेव्हां तो हाँगकाँग, थायलंड, सिंगापूरला निघून जातो. मग नायक त्या देशात जाऊन बदला घेतो. या चित्रपटात एकमेकांना अड्ड्यात जाऊन दम देणे, शब्दबंबाळ सीन्स यांची भरमार असते. तसेच दोनशे गुंडांची धुलाई असते. एखाद्या बीफच्या फॅक्टरीत चॉपरमशीन ज्या वेगाने मांसाचे तुकडे करते त्याच वेगाने नायक दोनशे जणांना ठोसे मारतो. प्रेक्षकांच्या मानवी मर्यादांचा विचार करून ते क्रमाने दाखवले जातात अन्यथा एकाच वेळी ते ठोसे लगावले आहेत असा त्याचा अर्थ होय. मग फ्रेम पॉज होते आणि पुढच्याच क्षणी एकाच वेळी गुंड हवेत उडतात आणि नायक जर लुंगीत असेल तर लुंगी अर्धी बांधत पुढे निघतो. उपरणे असेल तर खांद्यावर उपरणे टाकतो त्याचा चप्प चप्प चप्प असा आवाज पंचक्रोशीत घुमतो. बहुधा हे उपरणे पंचधातूचे असावे त्यामुळे नायकाच्या पोलादी शरीरावर आदळताच आवाज होतो. रजनी असेल तर गॉगल फिरवून डोळ्यावर बसवणे, हवेत सिगरेट फेकून पिस्तुलाने पेटवणे असे जादूचे प्रकार दिसतात.
अन्य नायक असेल तर बूटातला पाय फिरवून वादळ निर्माण केले जाते. एव्हढा पराक्रम करूनही " ह्या ! त्यात काय ? गुटखा खाऊन पिंक मारण्याइतकी किरकोळ गोष्ट आहे" असे बेदरकार भाव नायकाच्या चेहर्‍यावर असतात. रवी तेजा असेल तर चेहर्‍यावर भाव नसणे हीच बेफिकीरी समजावी. तो तिकडचा सलमान खान आहे.

८. फॅमिलीमॅन नायक - याचाही जनक कमल हसन असावा असे वाटले होते. पण हा साचाही प्राचीन आहे. थेवरमगनम हा कमलचा सुपरहीट सिनेमा त्यानेच लिहीलेला होता. त्याच्यावर हिंदी सिनेमा बनवताना त्यानेच स्क्रीप्ट लिहीली. त्यासाठी तो स्वतः दिलीपकुमारच्या घरी गेला होता. दिलीपकुमारने तेव्हां फायनल निवृत्ती घेतली होती त्यामुळे ते नकारावर ठाम राहिले. तो रोल अमरीश पुरीने केला आणि विरासत प्रचंड हिट झाला.
या प्रकारच्या सिनेमात नायक हा सर्वशक्तिशाली असतो पण त्याच्यासाठी फॅमिली सर्वोच्च असते. फॅमिली व्हॅल्यूज ( हे काय ते गुलदस्त्यातच राहते) तो जिवाची बाजी लावतो. फॅमिलीला नायक साधा भोळाच वाटतो. पण नायक फॅमिलीसाठी नायिकेलाही सोडतो. दोन कुटुंबातले वैर मिटवण्यासाठी फॅमिलीतल्या कर्त्यावरचा वार अंगावर घेतो आणि मग मरतो किंवा जगतो.

यातली फॅमिली ही नेहमी हुकूमशहाच असते पण त्या फॅमिलीला गावाबद्दल तळमळ असते. कर्ता पुरूष हा मुगले आजम मधल्याअकबराप्रमाणे करारी आणि हृदयात दहशत निर्माण करणारा पण फणस असतो. या गावात पोलीस, न्यायालये मासे मारत असतात. याच कर्त्या पुरूषाचा हुकूम चालत असतो. सरंजामी व्यवस्था कशी चांगली असते हे पटत राहते. पण खलनायक कारस्थानाने कुटुंबाचं सर्व हडप करतो. कधी कधी कर्त्याची हत्या होते. कुटुंब देशोधडीला लागते. नायक शहरातून शिकून येतो आणि सगळे ठीक करतो. नंतर त्याचे रूपांतर सुद्धा हाणामारीतज्ञ अण्णा हजारेंमधे होते (अण्णांचा हुकूम गावात चालायचा).

साचा तोच ठेवून थोडे वेगळेपण सेन्सॉर बोर्ड चालवून घेते. एकदमच साचा मोडला तर बहुतेक सेन्सॉर मधे अडकत असावा.
ताक . कमल हसनला नकार दिल्यावर दिलीपकुमारने किला नावाच्या चित्रपटात काम केले होते.

सुरूवातीलाच उल्लेख केलेले काही गोड साचे म्हणजे कलेला वाहिलेले सिनेमे.

यात शंकराभरणम, सागर संगमम सारखे सिनेमे येतात. या साच्यातले बहुतेक के विश्वनाथ दिग्दर्शित चित्रपटातला नायक कलेसाठी आणि तत्वांसाठी जगतो. हे चित्रपट पाहताना कंटाळा येत नाही.

राजामौली मुळे भव्यपटांचा एक साचा अलिकडे जन्माला आला आहे. तो घट्ट झाला कि त्याचाही आदरसत्कार करूयात.

याशिवायही आणखी काही साचे असतील तर माहिती द्यावी ही विनंती.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे झकासै हे !

रवी तेजा तिकडचा सलमान खान आहे Lol

सही पकडे है Lol
करेक्ट निरिक्षणे आणि मस्त लेख!

जबरदस्त Lol
तो शाळा सुधारणा करणाऱ्या नायिकेचा pictur मी पाहिला आहे Proud
ती एका छोट्या मुलाचा crush असते त्यात, तो भाग छान हाताळला आहे.
अध्यात्मिक सिनेमे राहिले, तेही छान असतात त्यांचे भव्य दिव्य

जबरी लिहिले आहे Biggrin

कधी कधी देव सुद्धा रजनीदर्शनाला येत असावेत

lol

वाह वाह.काय व्यासंग.यात 'गोरी, पंजाबी फीचर्स वाली,उत्तरेकडची उर्मट श्रीमंत नायिका आणि तिला हॅरेस करून,तिच्याशी दमदाटी करून तिला सुतासारखं सरळ करून प्रेमात पाडणारा बऱ्यापैकी साऊथ फीचर्स चा गरीब *गॅरेज मेकॅनिक असल्यास उत्तम) नायक' हाही साचा ऍड करा.

एक नंबर आहे धागा.
असा व्यासंग करण्याची इच्छा आहे >> +१. फारच वैविध्यपूर्ण आणि नेमकी निरीक्षणं आहेत.

आधी शीर्षक वाचून माझा गैस झाला. मला वाटलं दखनी भाषेतले (ज्याला आपण हैदराबादी हिंदी म्हणून ओळखतो, ती दखनी नावाची एक लेजिट भाषा आहे. बहुधा हिंदिपेक्षा किंवा तितकीच जुनी) चित्रपट - म्हणजे द अंग्रेझ, हैदराबादी नवाब वगैरे. ह्यातले मला "वगैरे" काहीच माहीत नाहीत, हे दोनच माहिती आहेत. पण धागा वाचल्यावर लक्षात आलं की ही मेन कॅटेगरी राहून गेली आहे.

असो. तेलगू चित्रपटात नायक नायिकेला काहीतरी टिपिकल सामाजिक कार्य करताना बघतो, उदा. अंध व्यक्तीला रस्ता क्रॉस करून देणे, अनाथ मुलांना शिकवणे आणि त्यावरून तो इंप्रेस होतो. खरं म्हणजे तो आधी तिच्या बेंबीला पाहून इंप्रेस झालेला असतो (हे एक काय obsession आहे कळत नाही), पण ती मनाने चांगली असल्याचा पुरावा त्याला समाजकार्य पाहून मिळतो. पुढे चित्रपटात ती सहसा ते कार्य चालू ठेवताना दिसत नाही. त्या एका सीनपायी नायक गंडतो.

अशा चित्रपटांत सर्व गरीब लोक मनाने चांगलेच असतात. साधी भोळी गरिबी आणि चॅप्टर डांबिस श्रीमंती हा इथला नियम आहे. नायिका गरीब असेल तर ती मनाने श्रीमंत असते. पण नायक गरीब असेल तर तो गुन्हेगार असला तरी गरिबीपुढे ते काहीच नाही म्हणून सगळं माफ असतं. नायिकेचा काका मामा वगैरे कुणीतरी कॉमेडियन असतो.

हपा, गझिनी बद्दल बोलताय की काय? यात नायिकेने बेंबी अंधरस्ताक्रॉसीकरणप्रक्रियेदरम्यान न दाखवता स्वप्न गाण्यात दाखवली आहे.

अनु, बेंबीशिवाय तेलगू पिकचरला परवानगी मिळत नाही. तब्बूने कुठलं तरी संस्कृत गाणं केलं होतं तेलगू चित्रपटात, पण त्यातही बेंबी दाखवावी लागली. गझनी तो सिर्फ झांकी है, अभी बहुत कूछ देखना बाकी है.
पण हो, तुमचा मुद्दा बरोबर आहे. ती प्रक्रियेनंतर आली आहे त्यात, सो माझा फाऊल झाला.

धमाल लिहिले आहे. Lol Lol काही काही पंचेस तर भन्नाटच. पंचधातूला फार हसले.

हर्पा, मस्त पोस्ट. Lol

१. हिरो गावातील प्रतिष्ठित कुटुंबातील असतो व त्यांच्यावर जळणारं एक कुटुंब/भावकी त्यांच्यावर लक्ष ठेवून असतं. त्याकरिता ते गावातल्या धरणावर धोंडा घालून -भगदाड पाडून पूर आणतात किंवा आग लावतात. मग हिरो कृष्णासारखा गाव-गोवर्धन उचलून घेतो. गावातील सगळ्या मुली भाळलेल्या असतात पण हा मात्र एकीशीच 'स्टॉक -निष्ठ' असतो. फक्त तिलाच कुठंकुठं चिमटे काढत असतो, बाकी सगळ्या मात्र मातेसमान असतात. हे पूर आल्यानंतर तिला कळतं. मग दोघं सर्वांची सेवाशुश्रुषा करतात. जेवायला काही उरलं नाही तरी चुलीपाशी एक गाजर वाटून खातात व एकमेकांकडे बघून नारदमुनीसारखं हसतात.

२. परदेशी गेला तर तिथेही सगळ्या पोरी याच्याच मागे असतात, त्याचं प्रवचन ऐकण्यासाठी लोकच काय तर पायलटही स्वतःची फ्लाईट चुकवतो. पण याला मनोजकुमार सारखे झटके येतात आणि तो परत येऊन भात-शेती करतो. ट्रेंचकोट जरी घालत असला तरी लुंगीचं महत्त्व अधोरेखित करायचं विसरत नाही. बेवॉचची टीम लाल बेदिंग सूट एकवेळ विसरेल पण हे लुंगी आणि पंचा ... शांतम पापम!

३. हिरो एका वेळी वीस जणांना प्रत्येकी पाचपाच लिटर रक्त देऊ शकतो आणि रक्तदानानंतर पार्लेजी सुद्धा न खाता रस्त्याच्या मधोमध खूर्चीवर बसून व्हिलनगॅन्गला हवेत उडवू शकतो.

धमाल आहात सगळे Happy
अजून एक:
नायक आपल्याबद्दल इतका खात्रीत असतो की नायिका प्रेमाला हो म्हणण्या पूर्वी, पटण्यापूर्वी तो तिच्यासाठी कपाट, त्यात साड्या, त्यात प्रेग्नन्सी चे कपडे, बेबी फूड चे डबे, प्रेग्नन्सीमध्ये खाण्याच्या अन्नाचे डबे तयार ठेवतो(यात नायिका पटायला होणार संभाव्य उशीर, प्रोटीन व्हिटामिन एक्सपायरी होणे वगैरे वगैरे काही संबंधच नाही.)
नायिकेच्या घरचे 'बदक पॅटिस','कासव कटलेट' असे पदार्थ खाऊ घातले की लगेच कन्यादान करायला तयार होतात.

धमाल लिहिलंय. आवडलं. फोटो पण चपखल_/\_

शेवटच्या रीळात दुष्ट शक्ती मुक्त झाल्याने हाहाकार उडतो. >>
Lol

पुढच्याच क्षणी एकाच वेळी गुंड हवेत उडतात आणि नायक जर लुंगीत असेल तर लुंगी अर्धी बांधत पुढे निघतो. >>
Lol

हाणामारीतज्ञ अण्णा हजारे>> Lol

किती हा अभ्यास. आचार्यजी आपल्या गुरुकुलाचा पत्ता द्यावा. प्रवेश घ्यावा म्हणतोय.

Lol

असा व्यासंग करण्याची इच्छा आहे >> +१ टोटली.

धमाल निरीक्षणे आहेत. पंचधातूचे उपरणे याला टोटल फुटलो. मी हे सगळे रिलेट होण्याइतके दाक्षिणात्य पिक्चर्स पाहिलेले नाहीत पण जितके पाहिलेत त्यातील उदाहरणे आठवली Happy पुन्हा वाचून आठवेल तसे लिहीतो. मी_अनु, अस्मिता व हपा च्या पोस्ट्सही भारी Happy

मस्त लिहिलं आहे! पण मी साऊथचे असे कुठलेच सिनेमे फारसे बघितलेले नाहीत. टीव्हीवर लागले असले तरी बघत नाही. कंटाळा येतो.

“ खरं म्हणजे तो आधी तिच्या बेंबीला पाहून इंप्रेस झालेला असतो” - Lol ‘बेंबीज डे आऊट’ हे सा.ई. मूव्हीज चं खास ऑब्सेशन आहे.

फेफ Lol

आता पुन्हा वाचले Happy धमाल आहे.

अनाथाश्रमाआधी बेंबीने इम्प्रेस होणे हे महान आहे Lol

बेंबीज डे आउट >>> Lol

या गावात पोलीस, न्यायालये मासे मारत असतात. याच कर्त्या पुरूषाचा हुकूम चालत असतो. सरंजामी व्यवस्था कशी चांगली असते हे पटत राहते >>> लोकांना केलेला "सरंजामी नमस्कार/अभिवादन" हा एक आचरट प्रकार रूढ झाला आहे. इलेक्ट्रिक इंजिनांचे पेंटोग्राफ असतात तसे चौकट आकारात हात उंचावून हवेली च्या बाल्कनीमधून, सज्जातून लोकांना नमस्कार करणे. दुसरे म्हणजे यातील बाप माणूस जो असतो तो पिक्चर मधे एकदातरी नाट्यमय सीन मधे स्क्रीनभर पंजा दिसेल असा उंचावून सर्व उपस्थितांना गप्प करतोच.

अनेक पिक्चर्स मधे साउथच्या हीरोसमोर दोन हिरॉइन्स असतात. बहुतांश दोन्ही नॉर्थ इंडियन्स. दोघी त्याच्या मागे असतात. बाकी हिरॉइन्सला हॅरॅस करणे आणि ते कौतुकाने दाखवणे हे कॉमन आहे. हिंदीत हे ७०ज मधे होते. साउथ मधे अजूनही दिसते.

रोमँटिक पिक्चर्स मधे हीरो हा त्याचे वय व एकूण कर्तृत्व याच्याशी विपरित प्रमाणात लाइफमधे काहीतरी काहीतरी भारी करत असतो. म्हणजे २०-२२ वर्षांचा तरूण आख्खे अनाथालय चालवतो, किंवा तो मोठमोठ्या कंपन्या अ‍ॅक्वायर करण्यात माहीर असतो वगैरे. ते कार्य मोक्याच्या वेळेस उघड होउन हिरॉइनला व आपल्याला कळते. असे हीरो परदेशांत असतात तेव्हा त्यांच्याभोवती गोर्‍या मुळींचा घोळका असतो. त्यात अजून इक्वल ऑपॉर्च्युनिटी यायची आहे.

तेलुगूचा प्रभाव मराठीतही खूप येऊ लागलाय. एका पिक्चर मधे स्वप्नील जोशीही अनाथालयाला फंडिंग करत होता.

बाकी मोटरसायकल वरचा हीरो एक सर्क्युलर धूळ न उडवता नॉर्मल पद्धतीने कधीच न निघणे, साध्या फाइटचे १:४० हे गुणोत्तर वगैरे सर्वांना माहीत आहेच.

जबरी लिहिलंय! लेख आणि प्रतिसाद दोन्ही भारी!
दाक्षिणात्य चित्रपटांचा निस्सीम चाहता असल्याने लेखातल्या सर्वच निरीक्षणांशी मस्त रिलेट होता आले.
नायक अनाथ असणे हा पण एक प्रचलित साचा. घाऊक प्रमाणात अनौरस अपत्ये जन्माला घालणे हे दक्षिणेत पुरुषांचे आद्यकर्तव्य मानले जात असावे कि काय अशी शंका यावी इतक्या चित्रपटात हा साचा आत्तापर्यंत पाहिला आहे. मग मदर टेरेसाचा भलामोठा फोटो भिंतीवर टांगलेला एखाद्या चर्चचा अनाथाश्रम दाखवणे ओघाने येतेच. तुम्ही खुशाल अनौरस अपत्ये जन्माला घाला, त्यांचा सांभाळ करायला चर्चचे अनाथाश्रम सक्षम आहेत असाच जणू संदेश त्यातून द्यायचा असावा Happy

पण बाकी काही असो, साचेबद्ध असले तरी प्रत्येक चित्रपटात काही ना काहीतरी नवीन बघायला मिळत असल्याने मला त्यांचे (हिंदी डब्ड) मसाला चित्रपट आवडतात, त्यात पहिली पसंती तेलगू आणि दुसरी पसंती तामिळ सिनेमांना. काही अपवाद वगळता बरचसे मल्याळम चित्रपट संथ असल्याने आणि त्यातले थुलथुलीत नायक आणि कळकट्ट नायिकांमुळे विशेष आवडत नाहीत तर कन्नड सिनेमे लो बजेट असल्याने ते बघायला तेवढी मजा येत नाही.
लेखातला कमल हसन आणि दिलीप कुमार, अमरीश पुरिंचा किस्सा आवडला.

>>>"मुख्यत्वे रजनीकांतचे सिनेमे या प्रकारचे असतात. अशा सिनेम्यांची कथा कशीही कुठूनही कुठेही जाते. तिचा उद्देश एकच नायक हा साक्षात देवाचा अवतार असून कधी कधी देव सुद्धा रजनीदर्शनाला येत असावेत अशी शंका निर्माण करणे">>>
हे भारीच!
रजनी अण्णा आणि त्यांच्या अफाट लोकप्रियते विषयी काय बोलायचं? बस नाम ही काफी है!
ह्या निमित्ताने एका तामिळ मित्राकडून ऐकलेला त्यांचा चेन्नईतला एक किस्सा सांगायचा मोह आवरत नाहीये...
व्हीआयपी संस्कृतीचा अतिरेक आपण दाक्षिणात्य चित्रपटांतून पाहतोच पण प्रत्यक्षातही तिथे त्याचे दर्शन घडत असते. जयललिता मुख्यमंत्री असताना त्या मंत्रालयात जायला निघाल्या कि त्यांच्या निवासस्थानापासून ते मंत्रालयापर्यंतची सर्व रस्ते वाहतुक सुमारे तासभर आधीपासून अडवून ठेवली जायची. ह्या प्रकारामुळे दोन-तीन वेळा त्या रस्त्यावरून जाणाऱ्या रजनीकांत ह्यांना चित्रीकरणस्थळी पोचण्यास विलंब झाल्याने ते आधीच वैतागले होते. पुन्हा जेव्हा त्यांना आणि सकाळी कामावर जायाला निघालेल्या अन्य चेन्नईवासींना ह्या कारणास्तव वाहतूक खोळंब्यात अडकावे लागले तेव्हा त्यांनी ह्या व्हीआयपी संस्कृतीचा निषेध करण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली होती.

आपल्या गाडीतून उतरून 'थलैवांनी' सरळ रस्त्याच्या कडेला असलेली पानटपरी गाठली आणि तिथे विडी शिलगावून तिचे झुरके मारत उभे राहिले. साक्षात 'रजनी देव' रस्त्यावर विडी ओढत उभा असून चाहत्यांना स्वाक्षऱ्या देत त्यांच्यासोबत सेल्फी काढू देत असल्याची बातमी सोशलमिडीयावरून वणव्यासारखी शहरात पसरली आणि अक्षरशः काही हजार लोकांचा जमाव अल्पावधीत तिथे 'रजनीदर्शनाला' गोळा झाला. सतत वाढत चाललेल्या 'भाविकांच्या' गर्दीने तो रस्ताच नाही तर आजूबाजूचे रस्तेही भरून गेले आणि त्या गर्दीत जयललितांवरच काही तास अडकून पडण्याची पाळी आली Happy
झाल्या प्रकारातून योग्य बोध घेऊन मुख्यमंत्री आणि प्रशासनाने तासभर नागरिकांना वेठीस धरण्याचा हा अघोरी प्रकार बंद करून तो वेळ पाच-दहा मिनिटांवर आणल्याने एकप्रकारे हा 'रजनीदेव' चेन्नईवासीयांना पावला होता म्हणायचा Happy

बेश्ट आहे हे...

बहुतांश तेलगु सिनेमातला लव्ह अँगल हा I Love You, so you must love me असा असतो...

सर्वांचे मनापासून आभार.

धागा वर काढण्यासाठी नाही तर खरंच कृतज्ञ असल्याने आभार मानावेत असं ठरवलं पण थोडा बिझी होऊन राहून गेले. सर्वांचे प्रतिसाद आवडले.
धमाल आहेत प्रतिसाद पण. आवडलेल्या प्रतिसादांना उत्तर देतो.

@किल्ली - लहान असताना अध्यात्मिक / पौराणिक सिनेमे पाहिलेले आहेत. अलिकडे आठवत नाहीत. पण बघण्यात आले कि अ‍ॅड करीन.सूचनेबद्दल आभार.

गोरी, पंजाबी फीचर्स वाली,उत्तरेकडची उर्मट श्रीमंत नायिका आणि तिला हॅरेस करून,तिच्याशी दमदाटी करून तिला सुतासारखं सरळ करून प्रेमात पाडणारा बऱ्यापैकी साऊथ फीचर्स चा गरीब *गॅरेज मेकॅनिक असल्यास उत्तम) नायक' हाही साचा ऍड करा. >>> पर्फेक्ट निरीक्षण आहे.

साऊथच्या हिरोंना पंजाबी हिरॉईन पटते हे बघून तिकडचं पब्लीक "लंडनची सूनबाई" किंवा "फॉरिनची पाटलीण" बघताना किंवा हिंदी पिक्चरचा हिरो फॉरेनात गात असताना त्याच्या पाठीमागे अल्पवस्तांकिता गोर्‍या मडमा " अय्यय हुकू हुकू, अय्यय्य सुकू सुकू" म्हणत नाचत असतात तेव्हां भारतीय प्रेक्षकाला जे ब्रिटीशांच्या राज्याचा सूड घेतल्याचे समाधान मिळते तसे काही तरी होत असावे.

वीरू आणि आशुचँप >>पुणेरी कौतुक वाचून कोपरात आवंढा आला. Lol

येतो पुन्हा. कही मत जाईयेगा.

Pages