नक्षत्रांची शांती २ - बैल गेला आणि झोपा केला

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 December, 2021 - 14:47

नक्षत्रांची शांती - भाग १ - https://www.maayboli.com/node/80761

........................................................

पहिल्या भागातील नागबली नारायणाची पारायणे करून झाली असतील तर आपण आता दुसर्‍या भागाकडे वळूया...
आशा करतो हा देखील तसाच ओघवान होईल Happy

तर, आता मी मोठा झालो होतो. खरे तर आपले मूल कुठल्या बाबतीत किती मोठे झालेय हे आईवडीलच ठरवत असतात. त्यांनी मला देवधर्म मानण्या न मानण्याबात व्यक्तीस्वातंत्र्य द्यावे ईतका मोठा मी त्यांच्यासाठी झालो होतो.

मी नवीन नवीनच नास्तिक झालो होतो. त्यामुळे आस्तिकांची टिंगल टवाळी उडवायचे कामही नित्यनेमाने करत होतो. घरी मात्र तो आगाऊपणा टाळायचो. कारण आईवडिलांनी दिलेल्या या व्यक्तीस्वातंत्र्यामुळे त्यांच्याबद्दल मनात एक आदर निर्माण झाला होता. जेव्हा ईतर भावंडांना त्यांचे आईवडील देवधर्माबाबत कसलीही तडजोड करू देत नव्हते तेव्हा माझे मंदिरात न येणे, गर्दी असेल वा रांग असेल तर सत्यनारायणाच्या पुजेचे दर्शन टाळणे, आवडीचा नसेल तर प्रसाद न खाता गपचूप आईच्या हातात सरकावणे, भूक लागली असेल तर देवाच्या आधी जेवणे, ईत्यादी प्रकार घरी चालवून घेतले जात होते. पाहुण्यांकडे जाताना मात्र अमुकतमुक वागू नकोस, बरे दिसत नाही अशी विनंती केली जात होती. तशी विनंती करण्यातही त्यांचाच मोठेपणा होतो हे उमजून मी ती मान्य करत होतो.

हळूहळू त्यांनी नातेवाईकांना आणि बाहेरच्यांनाही कल्पना द्यायला सुरुवात केली की आमचा मुलगा नास्तिक आहे, तर तो अमुकतमुक धागे दोरे हातात घालणार नाही. घरी पूजा असली तर गुरुजींना सांगायचे की त्याचा यावर फार विश्वास नाही तर त्याने ज्या विधी करायच्या आहेत त्या आम्हाला सांगा, आम्ही करतो. यावर गुरुजी म्हणायचे, आईने केले तरी ते पुण्य मुलाला लाभते. मग मला पुण्य मिळावे म्हणून मला रोज करायला सांगितलेले मंत्रजाप आई करायची. मला पाळायला सांगितलेले मंगळवार आई पाळू लागली. आधीचे तिचे सोमवार गुरुवार वगैरे होतेच, त्यात आणखी एका वाराची भर पडली.

त्याचवेळी एकेकाळी न चुकता दर मंगळवारी गणपतीच्या मंदिरात जाणारा मी मात्र अंगारकी संकष्टीलाही स्वहस्ते अंड्याचे ऑमलेट करून खाऊ लागलो. अभ्यासाला रात्रीचे डोंगरावर जायचो तेव्हा खाली गाड्यांवर मिळणार्‍या मांसाहारात बीफ असू शकते याची कल्पना असूनही त्यावर तुटून पडायचो. एखाद्या निर्जीव वस्तूलाही पाय लागला तर चटकन पाया पडायचे संस्कार शाबूत होते. भले मग ती वस्तू एखाद्याची चप्पलच का असेना. पण तेच रस्त्यात मंदीर दिसले तर सवयीनेच पाया पडणे आता नकळत बंद झाले होते. देवाधर्माच्या सार्‍या संकल्पना माझ्यासाठी शून्य झाल्या होत्या. एकेकाळी मी शिंकणे, मांजर आडवी जाणे, लिंबू-मिर्ची बांधणे वा नजर उतरवणे सारख्या अंधश्रद्धांवरही विश्वास ठेवत होतो याचे माझेच मला हसायला येत होते.

आणि अश्यातच एके रविवारी सकाळी कसल्याश्या गोंगाटानेच जाग आली.

खरे तर रविवारचा गोंगाट म्हणजे आम्हा पोरांची क्रिकेटची मॅच. पण हा गोंगाट त्याहून भारी होता. बाहेर येऊन पाहिले तर सर्व गॅलर्‍या फुल्ल होत्या. लहानथोर, बायकापुरुष सर्वांच्या नजरा खाली मैदानावर लागल्या होत्या. असे चित्र केवळ नवरात्री वा दहीहंडीलाच बघायला मिळायचे. आज काय स्पेशल आहे म्हणून त्या गर्दीत घुसून खाली डोकावलो तर एक बुवा आणि एक बैल होता. शेजारच्याला विचारले, काय रे, बैल पोळा आहे का आज? तर तो म्हणाला, छे रे. भविष्य सांगतोय तो माणूस..

झालं, मी डोक्याला हात लावला. रोज पेपरात वाचतो राशी भविष्य, हा काय वेगळे सांगणार आहे. तरी चला जवळून मजा घेऊया म्हणून खाली मैदानात गेलो. जेवढा तो बैल सजवला होता तेवढाच तो माणूसही स्वतः सजलेला होता. शेजारीच त्याचा एक मदतनीस बसला होता. तो मात्र साध्या पांढर्‍या कपड्यात होता. तोच एकेकाला प्रश्न विचारायला उकसवत होता. पण अजूनही संकोचाने म्हणा वा भितीने म्हणा कोणी विचारायला तयार होत नव्हते.

अखेर एक आगाऊ म्हणून ओळखली जाणारी मुलगी पुढे आली. मेरे बारे मे बताओ बाबा. आणि त्याने सांगायला सुरुवात केली. तिचा चंचल स्वभाव, तिची खर्चिक वृत्ती, तिचा चटकन चढणारा रागाचा पारा वगैरे. मी मनातल्या मनात म्हटलं हे तर जगातल्या ९० टक्के मुलींना लागू होईल. कुछ और बताओ बाबा. आणि मग त्याने एक बाँब टाकला. म्हणाला तू तुझ्या आईवडीलांची खरी मुलगी नाहीयेस. हे ऐकून मी उडालोच. ईतके वर्ष मी त्या मुलीला बघत होतो, आय मीन ओळखत होतो. पण ही खबर मलाही माहीत नव्हती. ती मुलगीही आता सिरीअस झाली. त्याने अजून तिच्याबद्दल दोनचार गोष्टी सांगितल्या. ज्या तंतोतंत जुळल्या. त्यापुढे तो म्हणाला की तुझे खरे बाबा आता या जगात नाहीत. पण आई अजून जिवंत आहे. आणि ती तुला भेटणार देखील आहे. हे ऐकून मात्र ती मुलगी रडायची शिल्लक होती.

मग त्याने लगेच दुसरा मुलगा पकडला. त्याच्या वडिलांच्या दोन बायका आहेत म्हणाला. हे तर आमच्याकडे सर्वांना माहीत होतेच. पण पुढे हे देखील म्हणाला की तुझीही दोन लग्ने होतील. हे ऐकून सारेच फुटले. मग त्याने अजून एकाला पकडले, मग अजून एकाला. कोणाचा व्यवसाय सांगितला तर कोणाचे शिक्षण, एखाद्याचा छंद सांगितला तर एखाद्याची आवड, कोणाची चिंता सांगितली तर कोणाचा आजार... तो भूत भविष्य वर्तमान तिन्ही सांगत होता. भूत आणि वर्तमान बरोबर येत होते तसे भविष्याबद्दल तो जे सांगतोय त्यावरही लोकांचा विश्वास बसू लागला होता. लोकांची उत्सुकता वाढू लागली होती. आणि एवढा वेळ जे फक्त लहान मुलेच त्याचा खेळ बघायला खाली जमली होती ते आता वरतून मोठ्यांनीही आवाज देऊन त्याला आमंत्रण धाडले होते.

त्याने बैल खालीच बांधला आणि आता तो एकेकाच्या घरात त्यांच्या विनंतीवरून फिरू लागला. आमच्याकडूनही त्याला बोलावणे आले होते. एकेकाचे उरकत आमचाही नंबर लागला. एव्हाना लोकांचा त्यावरचा विश्वास आणखी वाढला होता. त्यात एक आमचेही कुटुंब होते. आधीच तो भारदस्त माणूस, त्यात भरजरी पोशाख. गळ्यात माळा, हातात अंगठ्या, डोक्यावर पगडी. एकूणच व्यक्तीमत्व छाप टाकणारे. आता तो आमच्यासमोर आमच्या घराण्याचा ईतिहास सांगायला बसला. आजोबा पोस्टमास्टर होते हे त्याने सांगितले. वडिलांना पकडून आठ भावंडे हे सांगितले. प्रॉपर्टीवरून लफडे झालेत हे सांगितले. त्यात आमच्यावरच अन्याय झाला हे सांगणे आलेच. आणि मग ही साडेसाती अशीच कायम राहणार हे देखील सांगितले. कारण काय तर विधवा बाईची नजर लागली आहे.

बिल्डींगमधील एका विधवा बाईशी आमचे बिलकुल पटायचे नाही. तसे तर त्या बाईचे अर्ध्या बिल्डींगशी पटायचे नाही. पण आमची कयामत से कयामत तक सारखी एका पिढीपासूनची दुश्मनी होती. विधवा बाईची नजर म्हणताच तीच डोळ्यासमोर आली. तिच्या बाबतीत हे बिलकुल शक्य आहे म्हणत ते पटलेही. मग काय, अकलेचा भाग पळाला आणि लागला मासा गळाला!

आता समस्या आली तिथे उपाय आला. तो अर्थात तोच देणार होता. पण फुकटात तर कोणी काही देत नाही. भले मग तो कितीही थोर पुण्यात्मा का असेना. आकडा ऐकून आम्हालाच आकडा आला. तब्बल पंचवीस हजार. आमच्या सुदैवाने ईतके पैसे आमच्याजवळ नव्हते. आमची ती ऐपतही नव्हती. किस्सा फार जुना आहे लक्षात घ्या. तेव्हाचे पंचवीस हजार म्हणजे आताचे लाखभर रुपये. असे म्हणायची एक पद्धत असते. मग बार्गेंनिंग सुरू झाली. वॉऽव. यातही बार्गेनिंग. एकामागोमाग एक धोक्याच्या घंटा वाजत होत्या. पण आम्हाला घंटा काही ऐकू येत नव्हते. पंचवीस हजाराचा आकडा उतरत उतरत सात हजारांवर आला. एवढे भाव दणकन अत्तराचेही कोसळत नसावेत, पहिल्या पावसात.. त्यातही गंमत म्हणजे घरात कॅश तीन ते चार हजारच होती. हे देखील एक सुदैवच म्हणावे. वरना डुबने के लिये हम तैयार थे गालिब, पर हमारी नाव जहा गोते खा रही थी, वहा पाणी ही कम था.

मग एक अभुतपुर्व फिल्मी सौदेबाजी झाली. आधा काम होने से पहले, आधा काम होने के बाद. असे म्हणत आम्ही तीन हजार पाचशे रुपये त्या नंदूच्या हातावर टेकवले. कारण राजाबाबू पैसे स्वतःच्या हातात घेत नाहीत. भले पोशाख भरजरी घालतात पण त्यांना पैश्यांचा मोह नाही. सात हजार बहुधा बैलाच्या चार्‍यासाठी मागितले होते.

आणि मग उपायाला सुरुवात झाली. आम्हा सर्व कुटुंबियांना गोलाकार बसवले. तसेही कितीसे ते मोठे कुटुंब. हम दो हमारा एक. ऊस मे से भी सिर्फ दो बंदे नेक. माझ्या वडिलांनी आधीच त्या बाबाला सांगितले की या पोराचा यावर फारसा विश्वास नाही, त्याला काही करायला सांगू नका. मागणी चटकन मान्य झाली. मग झटपट काहीतरी विधी झाले. सगळे काही आठवत नाहीत. पण तुळशीची पाने तोडून, त्यांनी आमची नजर उतरवून, पुन्हा ती त्याच तुळशीच्या कुंडीत पुरायला सांगितली. हे एक एवढे आठवतेय कारण तुळशीच्या पानांची ने आण करायचे काम मलाच करायला सांगितले होते. मी अनिच्छेनेच उठल्याचे मला आठवतेय म्हणून हे लक्षात. आणि हो, एक मंतरलेला धागा जो मला हातात घालायचा होता पण मी विनम्र नकार दिल्याने तो माझ्या डोक्यावरून फिरवून जाता जाता त्याच तुळशीत तो पुरून गेला. जणू तो तिथून माझी रक्षा करणार होता.

त्या धाग्याला गंडा का बोलतात हे त्या दिवशी मला समजले. गंडा घालणे हा वाक्यप्रचार कुठून आला हे देखील समजले. कारण तो आम्हाला साडेतीन हजारांचा गंडा घालून गेला होता. तेव्हाचे साडेतीन हजार म्हणजे आताचे... सोडा, जे असतील ते असतील.. पण ते त्या भामट्याच्या हातात जात होते आणि मी काही करू शकत नव्हतो, काही बोलू शकत नव्हतो.. कारण उफ्फ हमारे ये उसूल, हमारे ये संस्कार.. जो हमे मां बाप के सामने कुछ बोलने की ईजाजत नही देते.

पण पुढचे काही दिवस मात्र मी बोलत होतो. माझ्या आईवडीलांनी मला दिलेले स्वातंत्र्य, ज्याचा लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केला आहे ते विसरून कृतघ्नपणे त्यांना सतत या प्रसंगाची आठवण करून देत टोमणे मारत होतो. पण त्यांचे तरी काय असे चुकले होते. एकदा तुम्ही कश्यावर श्रद्धा ठेवली तर अध्येमध्ये अंधश्रद्धेची धूसर रेष ओलांडणे स्वाभाविक असते. आणि अंधश्रद्धा म्हणजे तरी काय असते. ज्या श्रद्धेला सर्वसामान्यांकडून मान्यता मिळत नाही ती अंधश्रद्धा. अन्यथा पहिल्या भागातील नागबली नारायण आणि या बाबाने केलेला चुटपूट विधी यात तार्किकदृष्ट्या फरक तो काय...

त्या रात्री कट्ट्यावर सारे मित्र जमले तेव्हा कोण कसे फसले याच्याच चर्चा चालू होत्या. काही किस्से उघड झाले होते, तर काही बचावलेले आम्ही कसे हुशार याच्या फुशारक्या मारत होते. त्या मारतानाही त्यांच्या हातातील पंधरा-वीस हजारांचे खडे खुदकन चमकत होते. मी मात्र आज झोपायला जाण्यापूर्वी कुंडीतला गंडा हळूच उचलून कचराकुंडीत कसा टाकावा याचा विचार करत गपचूप बसलो होतो.
ना तेव्हा कोणाला हे सांगितले, ना कालपर्यंत कोणाला माहीत होते. पण आज हा किस्सा ईथे लिहीला आणि हलके वाटले Happy

पण पण पण .....
एवरीथिंग ईझ फेअर ईन लव्ह अ‍ॅण्ड वॉर ..

असे म्हणत आयुष्याच्या एका गोड वळणावर पुन्हा एकदा मी स्वखुशीने हा गंडा आपल्या अकलेवर बांधून घेणार होतो..

क्रमशः आणि धन्यवाद,
ऋन्मेष

-------------------------------------

नक्षत्रांची शांती ३ - प्रेम आणि मृत्यु
https://www.maayboli.com/node/80854

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पतीपश्चात परिस्थितीशी समायोजन करून जीवन कंठणे प्रत्येकीला जमतेच असे नाही. आक्षेपार्ह काय वाटलं ते नेमकं नाही सांगता येणार पण काय माहिती नाही पण वाचून एक बिटर आफ्टरटेस्ट वाटली.
(लंचच्या वेळी लेख टाकावे ही णम्र विनंती! आज लवकर लेख आला. भिंतीवरच्या घड्याळात बॅटरी नसेल तर कंप्यूटरचे घड्याळ बघा.)

म्हाळसा धन्यवाद,

@ सीमंतिनी,
मला आधी समजलेच नाही की त्या बाबाच्या किश्यात नक्की काय आक्षेपार्हसदृश्य वाटले असावे. मग पुन्हा तो पतीपश्चात शब्द वाचला आणि ट्यूब पेटली हे त्या विधवेच्या संदर्भात आहे.
ती बाई मुळातच भांडकुदळ स्वभावाची होती. यात तिच्या विधवा असण्याचा काही संबंध नव्हता. त्याआधीपासूनची तिची आमची ओळख आहे. जिथे चाळीत मुळातच भांडकुदळ असण्याचा बेंचमार्क हाय असतो तिथे त्यांची फॅमिली त्याचसाठी प्रसिद्ध होती. आमच्याच चाळीत तिने जन्म घेतलेला. चाळीतल्याच मुलाशी लग्न झालेले. तो व्यसनांमुळे दोन पोरांना वार्‍यावर सोडून गेल्यानंतर हिने त्याच्या आईलाही फार छळले, त्यात ती बाईही गेली. मग घर हिचे झाले. ज्यात ती आपल्या आईवडीलांसोबत राहू लागली. तिचे किस्से लिहिले तर स्वतंत्र लेख बनेल. पण कश्याला एखाद्याच्या दुर्गुणांचे लेख लिहा. पण तिच्या सासूबद्दल मात्र नक्की लिहावेसे वाटेल. कारण ती गेली तेव्हा चाळ हळहळलेली, कारण ती बाई स्वभावाने खूप छान होती. जर सहानुभुती दाखवायचीच असेल तर तिला दाखवणे गरजेचे. केवळ विधवा आहे या निकषावर तिच्या सूनेला नको _/\_

ईथे लेखात तिचा उल्लेख ईतक्यासाठीच आला की त्या बाबानेच तसे सांगितले. आणि ते साहजिकच होते. त्याने सर्व चाळीतल्यांची खबर काढलेली की कोणाचे कुठे भांडण आहे, तर कोणाचे कुठे प्रेमप्रकरण, आणि त्यावरच भूत वर्तमान ओळखून भविष्य सांगायचा दावा करत होता.

हे कथन बरेच प्रांजळ वाटले.
आपल्या लहानपणी, आणि आताही, पैसे जिथे कमी आहेत आणि योग्य प्रकारे वापरण्याची गरज आहे तिथे ते अश्या बाबीत कोणी भीती दाखवून वाया घालवलेले पाहिले की वाईट वाटतं.एखादा शाप, नजर, भानामती यावर सांगितलेले खर्चिक उपाय 'करणार नाही' म्हणण्याचा आत्मविश्वास त्यावेळी त्या गांजलेल्या व्यक्तीत/कुटुंबांमध्ये नसतो.कारण 'हे नाही केले तर..असे असे होईल.' म्हणून अजून काही काही भविष्यात येतील अश्या मोठा समस्यांचा पाढा त्या भविष्य सांगणाऱ्या माणसांनी वाचलेला असतो.

हा आत्मविश्वास यावा म्हणून लागणारं शिक्षण, समाज प्रबोधन समाजाच्या सर्व वर्गात व्हावं.
('विधवेच्या' वर टिप्पणी करत नाही.तो शब्द भविष्य सांगणाऱ्या कडून आला त्याच स्वरूपात इथे लिहिला असं समजून.बाकी उपजत भांडकुदळ असेल तर स्वभावाला अविवाहित, विवाहित, मुलं आहेत/नाहीत,पतीपश्चात अश्या कोणत्याही स्टेटस चं बंधन नसतं.)

सरांचा धागा आला. मालिका पूर्ण होऊ देत.
तो बैलच होता ना नक्की ? नाही तर पाघो असेल.
धाग्याला गेंडा का बांधला हे समजले नाही.

बोकलत
माझगावचा डोंगर - त्यावर एक लेख लिहितो लवकरच, फारच नयनरम्य जागा आहे. कधी आलात तिथे तर जरूर भेट द्या आमच्या डोंगराला. रोज आठवण काढतो. अगदी आजही सकाळी पोरीसोबत मॉर्निंग वॉकला गेलो होतो तेव्हा तिला तिथे गोगलगाय दिसली. त्यावरूनही डोंगराच्या आठवणी जाग्या झाल्या. तिथे आम्ही गोगलगायींशी खेळणे रोजचे होते.

अनु,
'विधवेच्या' वर टिप्पणी करत नाही.तो शब्द भविष्य सांगणाऱ्या कडून आला त्याच स्वरूपात इथे लिहिला असं समजून.
>>>>
हा शब्द खटकण्यासारखा आहे का? याला काही पर्यायी शब्द आहे का जो वापरणे योग्य आहे?
त्या बाबाने मात्र हाच शब्द वापरला होता. ते लख्ख आठवतेय..

<<<< 'करणार नाही' म्हणण्याचा आत्मविश्वास त्यावेळी त्या गांजलेल्या व्यक्तीत/कुटुंबांमध्ये नसतो.>>> याच्याशी मात्र सहमत. ईसी डर पे तो दुकान चलती है. समोरच्याशी बोलतानाच ते पाणी जोखत असतील की हा अश्या गोष्टींना किती मानतो आणि किती घाबरतो. त्यावरूनच आकडा फेकत असतील.

ऋ, शब्द साधाच आहे.पण बरेच वेळा सध्या सोशल मीडिया मध्ये तो 'गरीब, गरजू,लाचार' अश्या अर्थात वापरला जातोय.

व्यक्तिशः माझा या शब्दावर आक्षेप नाहीये, स्पेशली इथे तो कोणाच्या तरी दृष्टिकोनातून सांगताना आलाय.

छान झाला भाग.

विधवा, विधुर, विवाहिता, विवाहित, ब्रम्हचारी , घटस्फोटिता / घटस्फोटीत वगैरे अशी कुणाची तिसऱ्या व्यक्तीने ओळख करून देणे इष्ट वाटत नाही.

हो शब्द साधाच आहे. मी वापरला असता तरी हाच वापरला असता. कारण विधुर-विधवा हेच शब्द मला माहीत आहेत. या शब्दाने कोणाला वाईट वाटत असेल तर वापरणारही नाही कधी, पण मग पर्यायी शब्द हवा ईतकेच. तो बहुधा हिराच देऊ शकतात आता Happy

मानव +१
हो, व्यक्ती विवाहीत/ता आहे हे त्या व्यक्तीचे सध्याचे मॅरिटल स्टेटस झाले. हा ओळखीतला त्या व्यक्तीच्या दृष्टीने महत्त्वाचा असला तरी एक लहान भाग आहे त्याने ओळख करून देणे इष्ट नाही. उदा: ट्विंकलची ओळख विवाहिता किंवा अक्षयची बायको म्हणून करणे किंवा श्रीरामची ओळख विवाहीत किंवा माधुरीचा नवरा अशी करून देण्याने त्यांचे मुख्य कार्य जसे लेखिका, सर्जन हे झाकोळले जाते. व्यक्ती काही करत नसेल तरी 'होममेकर' अशी ओळख करून देतात. माझाही शब्दाला आक्षेप नाही पण वाचताना आवडत नाही. पटले तर बघ. आग्रह नाही.

हा ओळखीतला त्या व्यक्तीच्या दृष्टीने महत्त्वाचा असला तरी एक लहान भाग आहे त्याने ओळख करून देणे इष्ट नाही.
>>>>

पण लेखात असे माझ्याकडून झालेय का..
म्हणजे जिथे तो उल्लेख आलाय तो पॅराग्राफ आणखी योग्य पद्धतीने कसा लिहीला गेला असता हे कोणी सांगेल का..

अरे हो काल हे राहिलेले..
<<<< लंचच्या वेळी लेख टाकावे ही णम्र विनंती.. >>>>
काल धागा लवकर आला कारण मी चक्क २ वाजताच झोपलो.. कारण सकाळी साडेसहाला ऊठून मॉर्निंग वॉल्कला जायचे होते. आणि ते जमवलेही Happy

योग्य की नाही माहिती नाही पण मी असा लिहीला असता -

आणि मग ही साडेसाती अशीच कायम राहणार हे देखील सांगितले. कारण काय तर "विधवा" बाईची नजर लागली आहे.

बिल्डींगमधील्या एका काकूंचे मिस्टर वारले होते. आमचे बिलकुल पटायचे नाही. तसे तर त्या बाईचे अर्ध्या बिल्डींगशी पटायचे नाही. पण आमची कयामत से कयामत तक सारखी एका पिढीपासूनची दुश्मनी होती. नजर म्हणताच त्याच काकू डोळ्यासमोर आल्या. खरं तर त्यांचे मिस्टर वारले हे आधी मनातही नव्हते पण बैलवाल्याने सांगताच भूल पडल्यागत झाले. तिच्या बाबतीत हे बिलकुल शक्य आहे म्हणत ते पटलेही. मग काय, अकलेचा भाग पळाला आणि लागला मासा गळाला!
________________________________________
(अशा पद्धतीने लिहीण्यात बैलवाल्याचे मत आणि लेखक व त्या बाईंचे रहिवासी म्हणून व्यक्तिश: असणारे नाते यातला फरक लक्षात येतो.)

ओके Happy

@ शां मा, - ओळख! व्यक्तीचा पार्टनर मृत आहे ही माहिती झाली. विधवा आहे हे व्यक्तीला लेबल झाले. त्यात एक जीवनशैली अभिप्रेत आहे, एक कठीण काळ अभिप्रेत आहे ज्याचा मूळ कथानकाशी काही संबंध नाही.

१. समजा मी माझ्या कलीग / बॉस / शेजारच्या व्यक्तीबद्दल काही सांगत आहे. तर गरज नसताना ती व्यक्ती विवाहित आहे किंवा नाही, किंवा विधवा/विधुर/घटस्फोटीत/ब्रम्हचारी आहे हे मला का आठवावे आणि मी ते गरज नसताना इतरांना का सांगावे? किंवा इतरांना का त्यात रस असावा? त्या व्यक्तीच्या त्या स्टॅटस वरुन आपण आपले मत ठरवणार का?

२. विवाहित आहे की नाही हे सांगण्यास काय हरकत आहे असे म्हणाल. आणि तसा पायंडा पाडला. याचा अर्थ आपण ती व्यक्ती विवाहीत असेल तर तसे नमूद करु, जेव्हा तसे नमूद करत नसू म्हणजे तिचे स्टॅट्स अविवाहित/घटस्फोटीत/विधुर/विधवा आहे ही माहिती पुरवत आहोत. कशा करता?

समजा मला एखाद्या नवविवाहित व्यक्तीचा किस्सा सांगायचाय. त्यात ती व्यक्ती नवविवहीत म्हणजेच विवाहित आहे हे सांगितल्या शिवाय तो किस्सा सांगण्यात अर्थ नसेल.
किंवा एका स्त्रीचा नवरा वारला आणि तिने एकटीने मग मुलांना कसे वाढवले, शिकवले हे सांगायचे आहे तर तिथे तसे सांगावे लागेल

पण जर मला सांगायचंय की आमच्या बिल्डिंग मधली एक व्यक्ती खूप भांडखोर आहे. आणि मी सांगितले "आमच्या बिल्डिंग मधला एक विवाहीत खूप भांडखोर आहे." तर तिचे मॅरीटल स्टॅटस सांगून काय सुचवायचे आहे मला असे कुणाला वाटणार नाही का?

त्या नंदीवाल्याने केलेले विधान इथे लिहीणे चुकीचे नाही. केव्हा? जर तू हे दाखवून द्यायला ते लिहिलेस की बघा, या लोकांना वाटते की विधवा बायका इतरांना दृष्ट लावतात.
पण ते जर तू एका व्यक्तीची नजर लागली या अर्थाने सांगत असताना ती व्यक्ती विधवा आहे असा उल्लेख करत असशील तर वरचे दोन मुद्दे लागू होतील.

ओळख! व्यक्तीचा पार्टनर मृत आहे ही माहिती झाली. विधवा आहे हे व्यक्तीला लेबल झाले.
>>>>

ओके. असा कधी विचार नव्हता केला.

माहिती - त्याचा जॉब गेलाय / त्याला अजून नोकरी नाही मिळालीय / तो जॉब शोधतोय...

लेबल - तो बेरोजगार आहे

नेहमी प्रमाणे मी सावकाश लिही पर्यँत, त्यात मध्ये लोक माझ्याशी बोलत असताना, मध्ये बऱ्याच पोस्ट्स येउन गेल्या.

------
तू विचारले विधवा हा शब्द वापरणे चुकीचे आहे का?
त्यावर मी आधीची कॉमेंट केली.

त्यावर तू विवाहित/अविवाहितपण? असे विचारले, त्यावर मग दुसरी पोस्ट केली.

लेखात नंदीवाल्याने विधवा हा उल्लेख केला आणि मग त्यावरून तुला ती विधवा स्त्री आठवली असे सांगण्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही.

मुळात त्या नंदीवाल्याने तसा उल्लेख करायला नको. पण त्याने कदाचित तो उल्लेख मुद्दाम केला असेल, एखादी विधवा स्त्री दुसऱ्यांच्या सुखी घराला दृष्ट लावू शकते हे लोकांना लौकर पटते असा त्याचा अनुभव असेल.

एकदम करेक्ट, ऋन्मेष !!!! व्यक्तीला नोकरी मिळेल पण एकदा का ते 'अरे तो बेरोजगार ना, अरे हल्ली कारने फिरतो' असे लेबल मागे लागले की ते हटवणे कठीण असते. परिस्थितीत कितीही फरक पडला असेल तरी त्या बेरोजगारीच्या काळातले लोक त्याला पुढे सरकू देत नाहीत. लिहीतांना शक्य असेल तर आपण ते टाळावं. लहान-सहान गोष्टी असतात पण व्यक्तीला वर्तमानात जगू देणे ही मोठी माणूसकी आहे.

ओळख! व्यक्तीचा पार्टनर मृत आहे ही माहिती झाली. विधवा आहे हे व्यक्तीला लेबल झाले. >>> पोपट मेला आहे असे सांगायचे नाही असे वाटते. जर त्या व्यक्तीची वैवाहीक स्थिती सांगणे अयोग्य असेल तर पार्टनर मृत झाला आहे असे सांगणेही अयोग्यच.
पार्टनर मृत असणे असे न म्हणता विधवा हा शब्द वापरला जातो. दोन्हीही वैवाहीक स्टेटस सांगतात. लेबल म्हणणे अजून तरी झेपले नाही. एखाद्या स्त्रीचा नवरा मृत होणे ही स्थिती पचवायला कठीण असल्याने विधवा हा शब्द डाचतो. तो वापरायचा नाही असे ठरवले तरी त्याने स्थिती बदलत नाही. नवीन ओळख रूढ झाली तर ती ही डाचणारच.
अपंग म्हणायचे नाही दिव्यांग म्हणायचे तसे. शब्द नवा असे पर्यंतच सौम्य वाटतो.
कदाचित माझे मत नंतर बदलूही शकते.

नसेल पटत तर नका वापरू. कुणी सक्ती केलेली नाही. ज्यांना पटतं ते वापरतील.
दिव्यांग शब्द किंवा इंग्रजीत डिफरंटली एबल्ड शब्द प्रचलित झाला कारण हल्ली विज्ञानाच्या मदतीने खरचं तसे घडताना दिसते. ती एक शाब्दिक मलमपट्टी नाही. https://youtu.be/JQ0iMulicgg हा टेड टॉक जरूर बघा.

Pages