लागली कशी ही उ- च- की

Submitted by कुमार१ on 29 September, 2021 - 06:14

“मला, लागली कुणाची उचकी”, ही पिंजरा चित्रपटातील लावणी माहीत नाही असा मराठी गानरसिक विरळा. उषा मंगेशकर यांच्या स्वराने जगदीश खेबुडकरांच्या या चित्रगीताला अजरामर केलेले आहे. असो. आज ते गाणे हा आपला विषय नाही. तरीसुद्धा हे गाणे माझ्या ओठांवर यायचे कारण म्हणजे…….
.....
.....
आज त्या गाण्यातील ‘उचकी’ वर काही आरोग्यलेखन करीत आहे.

आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी उचकी लागते. ती अचानक येते व थांबतेही. अशा अचानक १-२ उचक्या लागल्या की, “कोण माझी आठवण काढतंय आज” असा पारंपरिक सुखद विचार मनात चमकून जातो खरा. जशी ही उचकी थांबते तसे आपण तिला विसरून आपल्या कामात गढून जातो. सटीसामाशी अशा किरकोळ उचक्या येणे व थांबणे हा एक सामान्य प्रसंग असतो. घटकाभर तो आपल्या आजूबाजूच्यांची करमणूकही करतो ! मात्र कधी कधी एखाद्याला लागलेली उचकी थांबता थांबत नाही. अक्षरशः ५-१० सेकंदांमागे एक अशा गतीने त्या उचक्या येतच राहतात. त्यातून उचकी लागलेला माणूस त्रासून जातो. मग त्या थांबण्यासाठी बरेच घरगुती उपाय करून पाहिले जातात. बऱ्याचदा त्यांना यश येते. काही वेळेस मात्र हे प्रकरण एवढ्यावरच निवळत नाही. उचक्यांवर उचक्या येतच राहतात आणि संबंधित माणूस अगदी अत्यवस्थ होतो. या स्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. अनेक आजारांचे उचकी हे एक महत्त्वाचे लक्षण आहे. न थांबणाऱ्या उचकीचे निदान होणे आवश्यक ठरते. ते झाल्यावर गरजेनुसार वैद्यकीय उपचार केले जातात. अशा या आपल्याला अधूनमधून ‘उचकवणाऱ्या’ उचकीचे अंतरंग या लेखात समजून घेऊ.

लेखाची विभागणी अशी करतो :
• व्याख्या व मूलभूत माहिती
• वैशिष्ट्ये
• कारणमीमांसा
• रुग्णपरीक्षा व तपासण्या
• उपचार

व्याख्या व मूलभूत माहिती
उचकीची शास्त्रशुद्ध व्याख्या अशी आहे :

‘कंठामध्यें सशब्द असा आचका बसणे’

आपली छाती व पोट यांच्या सीमेवर श्वासपटल (diaphragm) हा स्नायू असतो. तो जेव्हा अचानक वेगात आकुंचन पावतो, तेव्हा हवा तोंडाने आत खेचली जाते आणि स्वरयंत्र बंद होते. त्यातून जो ‘हिक’ असा आवाज येतो त्याला उचकी म्हणतात. योग्य इंग्लिशनुसार तो शब्द hiccup असा आहे (hic-cough हा चुकीचा अपभ्रंश आहे, कारण या घटनेचा खोकल्याशी अर्थाअर्थी संबंध नाही. सामान्य शब्दकोश हा फरक लक्षात घेत नाहीत). बरेचदा उचकी काही मिनिटात थांबते. जेव्हा ती ४८ तासांहून अधिक काळ चालू राहते तेव्हा ती ‘टिकून राहणारी’ म्हटली जाते. त्याहून पुढे, जर ती एक महिन्याहून अधिक काळ चालू राहिली तर तिला ‘अनियंत्रित’ म्हणतात. वैद्यकाच्या इतिहासात नोंदलेला प्रदीर्घ काळ उचकी टिकून राहण्याचा विक्रम तब्बल ६८ वर्षांचा आहे !! चार्ल्स ऑसबॉर्न नावाचे हे गृहस्थ ९६ वर्ष जगले. त्यांच्या वयाच्या ९५व्या वर्षी त्यांच्या उचक्या अचानक थांबल्या. या अभूतपूर्व घटनेमुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदलेले आहे.

वैशिष्ट्ये

जेव्हा एखाद्याला उचकी लागते तेव्हा दर मिनिटाला ४ ते ६० इतक्या प्रमाणात उचक्या लागू शकतात. दोन उचक्यांमधले अंतर संबंधित व्यक्तीसाठी साधारण समान असते. उचकीचे प्रमाण आणि त्या व्यक्तीच्या रक्तातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण यांचे नाते व्यस्त (inverse) असते. उचक्या जास्ती करून संध्याकाळी अधिक लागतात. तरुण स्त्रियांना येणाऱ्या उचक्या बर्‍याचदा मासिक पाळी सुरू होण्यापूर्वीच्या १-२ दिवसांमध्ये येतात.

कारणमीमांसा
उचकी या लक्षणावर वैद्यकाच्या इतिहासात अनेक शतकांपासून अभ्यास चालू आहे. परंतु आजही आपल्याला त्याची परिपूर्ण कारणमीमांसा समजलेली नाही. सन १८३३ मध्ये Shortt या वैज्ञानिकाला तिचा कार्यकारणभाव शोधण्यात प्रथम यश आले. श्वासपटलाला संदेश देणारी जी नर्व्ह असते तिच्या अतिरिक्त उत्तेजनामुळे (irritation) आपल्याला उचकी लागते. या मूलभूत शोधानंतर पुढे त्यावर अधिक अभ्यास होऊन १९४३मध्ये एक थिअरी मांडली गेली. त्यात संबंधित चेतातंतू, मज्जारज्जू व मेंदूतील विशिष्ट केंद्र यांची सांगड घातली गेली. या सर्व घटकांच्या समन्वयातून उचकीची प्रतिक्षिप्त क्रिया घडते. उचक्या कुठल्याही वयाच्या व्यक्तीला येऊ शकतात. एक नवलाईची गोष्ट म्हणजे गर्भातील जिवालासुद्धा त्या अधूनमधून येत असतात !

आता उचकीनिर्मिती होण्यास जबाबदार असलेल्या घटकांचा आढावा घेतो.
A. अल्पकाळ टिकणाऱ्या उचक्या :
प्रौढांमध्ये याची महत्त्वाची कारणे अशी :
१. अतिरिक्त खाद्य अथवा हवा जठरात जाऊन ते फुगणे
२. तापमानात अचानक झालेले मोठे चढ-उतार
३. बेसुमार मद्यपान अथवा तंबाखूसेवन
४. ताणतणाव अथवा अतिउत्तेजित अवस्था.

B. दीर्घकाळ टिकणाऱ्या उचक्या : विविध आजारांमध्ये वर उल्लेख केलेल्या चेतातंतूंवर परिणाम होतो. त्यामुळे उचक्या लागून राहतात. या संदर्भात 100 हून अधिक आजारांचा अभ्यास झालेला आहे. तरीसुद्धा एखादा आजार व उचकी लागून राहण्याचा कार्यकारणभाव अद्यापही अस्पष्ट आहे.
काही प्रमुख आजार/ स्थिती अशा आहेत:
१. विविध मनोविकार
२. मेंदू व मज्जारज्जूचे आजार
३. काही हृदयविकार

४. घसा व पचनसंस्थेचे दाहजन्य आजार
५. चयापचयातील बिघाड: यामध्ये रक्तातील सोडियम, पोटॅशियम किंवा कॅल्शियम कमी होणे, किंवा ग्लुकोजची पातळी वाढणे
६. काही औषधांचे दुष्परिणाम : विशेषतः गुंगी आणणारी औषधे आणि स्टिरॉइड्स.

आजारांमुळे येणाऱ्या उचक्या जर अनियंत्रित राहिल्या तर त्यांचे दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामध्ये मुख्यतः हे आहेत :
१. जठरातील अन्न व रस वारंवार अन्ननलिकेत येणे
२. हृदयताल बिघाड
३. निद्रानाश व शरीराचे वजन कमी होणे.

रुग्णपरीक्षा व तपासण्या

रुग्णाला लागलेल्या उचक्या तर सहज दिसतात. मग त्याची अंतर्गत तपासणी कशासाठी हा प्रश्न पडू शकेल. परंतु अनियंत्रित उच्चक्यांची असंख्य कारणे बघता बारकाईने रुग्णतपासणी करणे आवश्यक असते. यामध्ये डोके, कान, डोळे, तोंड, मान, छाती व पोट हे सगळे बारकाईने पाहिले जाते तसेच मज्जासंस्थेची रीतसर तपासणी होते.

अशाप्रकारे रुग्णतपासणी केल्यानंतर डॉक्टरांना एक प्राथमिक अंदाज येतो. त्यानुसार खालीलपैकी योग्य तेवढ्या चाचण्या केल्या जातात :
१. प्रयोगशाळा चाचण्या : सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम व ग्लुकोज यांची रक्तपातळी, यकृतासंबंधीच्या चाचण्या, रक्तातील पेशींची मोजणी, लघवी, थुंकी तपासणी इत्यादी.
२. प्रतिमा चाचण्या : छातीचा एक्स-रे, फ्लुओरोस्कोपी, गरजेनुसार मज्जासंस्थेच्या सखोल अभ्यासासाठी सिटीस्कॅन व एमआरआय तपासण्या.

उपचार
कोणत्याही मोठ्या आजाराविना आलेल्या सौम्य ते मध्यम प्रमाणातील उचक्यांसाठी घरगुती उपाय जरूर करावेत. या पारंपरिक उपायांमुळे उचकी प्रक्रियेच्या काही चेताघटकांवर परिणाम होऊन ती थांबू शकते. अशा सोप्या उपायांची यादी देखील भरपूर मोठी आहे ! ३ गटांत तिचा विचार करू :

. सोपे उपाय : बारीक केलेली खडीसाखर चघळणे, लिंबू चावत बसणे, पाण्याने गुळण्या करणे, बर्फाचे पाणी पिणे. पेल्यात पाणी घेऊन त्याच्या पलिकडील बाजूने पिणे असाही एक द्राविडी प्राणायाम करतात. पेल्यात पाणी घेऊन तो हातात धरायचा. असे धरल्यावर पेल्याची अंगठ्याकडची, म्हणजे जवळची बाजू टाळायची. उलट, जिथे पेल्यावर तर्जनी टेकली आहे तिकडे तोंड न्यायचे.

२. श्वसनासंबंधी उपाय : श्वास रोखून धरणे, जोरजोरात श्वास घेणे व सोडणे, वेदना झाल्यागत मोठा आ वासणे, कागदी पिशवी तोंडाभोवती बांधून त्यात श्‍वासोच्छ्वास करणे (या कृतीने रक्तातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढते)

३. लक्ष विचलित करण्याचे उपाय : प्रेमळ व्यक्तीची अथवा घटनेची आठवण काढणे, ध्यान, मनन, इत्यादी.
व्यक्ती आणि प्रकृतीनुसार वरीलपैकी १-२ उपाय करून पाहावेत. हे सर्व उपाय जरी काटेकोरपणे शास्त्रोक्त नसले तरीदेखील त्यांचा उपयोग झाल्याचे अनुभव आहेत.

अन्य काही उपचार प्रशिक्षित व्यक्तीकडून करवून घेता येतात. ते असे :
१. मानेच्या मागच्या भागावर विशिष्ट पद्धतीने चोळणे
२. तोंडातील पडजीभेला चमचा अथवा कापूसकाडीने चेतवणे
३. उलटी करायला लावून जठर रिकामे करणे
४. बर्फगार पाण्याने जठर धुऊन काढणे
५. गुदद्वारात बोट घालून मसाज करणे.

वरीलपैकी एक अथवा अधिक उपायांनी रुग्णास गुण न आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. डॉक्टरांच्या मते जर एखाद्या विशिष्ट आजारामुळे उचक्या येत असतील तर त्या आजारावर प्रथम उपचार केले जातात. तरीही उचक्या न थांबल्यास गरजेनुसार डॉक्टर विविध प्रकारचे औषधोपचार करू शकतात. यासाठी खालील प्रकारची औषधे वापरली जातात:

• मेंदूतील चेतारासायनिक क्रियांवर परिणाम करणारी
• ताणतणाव कमी करणारी
• पचनसंस्थेचे नियमन करणारी
• गुंगी आणणारी व भूल द्यायची औषधे
• स्नायूंचा ताण कमी करणारी

अशाप्रकारे उचकी-नियंत्रणासाठी अनेकविध उपाय उपलब्ध आहेत. तरीसुद्धा एक गोष्ट वैद्यकशास्त्राने मान्य केलेली आहे. या विषयावरील ज्ञान आणि माहितीचा साठा प्रचंड जमा झालेला आहे. परंतु त्या तुलनेत प्रभावी उपचारांच्या बाबतीत मात्र अद्यापही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.

समारोप
तर अशी ही उचकीगाथा. अचानक कुणीतरी आपली आठवण काढल्याने आपल्याला उचकी लागते, हा सुंदर कल्पनाविलास आहे ! लेखाच्या प्रारंभातील लावणीनुसार त्याकडे मनोरंजन म्हणून पाहता येते. प्रत्यक्षात उचकी लागण्यामागे बरीच शास्त्रीय कारणे आहेत. त्यांचा उहापोह या लेखात केला. सामान्य स्वरूपातील उचकीसाठी पारंपरिक घरगुती उपाय मोलाचे आहेत. ते सर्वांना नीट माहिती व्हावेत या उद्देशाने त्यांचे विवेचन केले. मात्र अनियंत्रित उचकी हा दुर्लक्ष करण्याचा विषय नाही. त्याप्रसंगी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.
…………………………………………………………………………………..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारख्या उचक्या लागण्यातून ॲसिडिटीचा त्रास निर्माण होऊ शकतो का ?
>>>
जेव्हा जठरकार्यात आम्लताधिक्य किंवा अन्य काही प्रकारचा बिघाड होतो त्यातून उचकी लागते, हे वर लेखात दिलेले आहे. इथे अजून एक रोचक भाग आहे. जठरकार्यातील बिघाड हे उचकीचे कारण आणि उचकीचा परिणाम असे दोन्ही असू शकते. त्यामुळे पचनकार्य नियंत्रणात ठेवणारे औषध घेतले की त्याचा फायदा उचकी कमी होण्यासाठी सुद्धा होतो.

छान लेख!!
हवा जठरात जाऊन जठर फुगणे यात एक महत्त्वाचे कारण हल्ली वाढलेली कार्बोनेटेड ड्रिंक्स (पेप्सी इ) आहेत. उचकी लागली तर पाणी मागवायचं पण हल्ली दुसरी कोलाची बॉटल मागवतात Happy

>>माझी आज्जी असच म्हणायची. आणि त्याला "वाढती लागली" असं म्हणायचं<< आमच्याकडेही "वाढती लागणे" हाच शब्दप्रयोग होता. किंबहुना उचकी म्हणजेच वाढती लागणे असं वाटत होतं. वाढती बाळाला असू शकते मोठ्या माणसांना नाही हे आता लक्षात आले Biggrin

उचकी ची वेगवेगळी कारणे आणि रक्तातील कार्बन डाय ओक्साईड कमी होणे याचा संबंध जरा समजावाल का डॉक्टर?
कारणमीमांसा विभागात CO2 चा उल्लेख अजिबातच का नाही?

पूरक माहिती आणि चांगल्या चर्चेबद्दल वरील सर्वांचे आभार !

व्यत्यय
कार्बन डाय-ऑक्साइड व उचकी यांच्या संदर्भात लेखामध्ये वैशिष्ट्ये सदराखाली हे विधान आहे :

उचकीचे प्रमाण आणि त्या व्यक्तीच्या रक्तातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण यांचे नाते व्यस्त (inverse) असते.

अर्थात हा वायू आणि ( ? )उचकी येणे / थांबणे यांचा संबंध खूप गुंतागुंतीचा आहे
त्यासंदर्भात जरा वेळाने स्वतंत्रपणे लिहितो

धन्यवाद डॉक्टर. पुढच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.
नेहमीप्रमाणेच हा ही लेख वाचनीय आहे. प्रत्येक लेखावर प्रतिसाद दिला नाही तरी सगळे लेख आवर्जून वाचतो.

व्यत्यय
उचकीची परिपूर्ण कारणमीमांसा आजही स्पष्ट झालेली नाही. कुठलाही मोठा आजार नसताना येणाऱ्या (किरकोळ) उचक्यांची कारणे लेखात दिलीत. त्या प्रत्येक वेळेस व्यक्तीच्या रक्तातील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण कमी नसते. त्यामुळे या वायूचे प्रमाण कमी होणे हे उचकीचे थेट कारण दरवेळेस म्हणता येत नाही.

जेव्हा उचक्या लागलेल्या असतात तेव्हा त्यांची वारंवारिता या वायूच्या कमी प्रमाणात निगडित आहे. जर का हे वायूप्रमाण बरेच कमी झाले तर त्यांची तीव्रता वाढते.

उपचार
म्हणून आपण जेव्हा कार्बन डाय-ऑक्साइड देऊ लागतो (श्वास रोखून धरणे, कागदी पिशवीत श्वसन किंवा कृत्रिम वायू देणे, इत्यादी ) तेव्हा या व्यक्तीमध्ये दोन गोष्टी होतात :

१. श्वासपटल आणि इतर स्नायुंचे आकुंचन रोखले जाते आणि
२. ‘जिंकू किंवा मरू’ (fight or flight) या स्वरूपाचा शरीर प्रतिसाद निर्माण होतो. त्यामुळे श्वसनमार्ग मोकळा ठेवला जातो. >>> यातून उचक्या थांबू शकतात.

उचकी लागली की सगळ्यात प्रथम एका ठिकाणी शांत बसायचं. तोंडात जेव्हड पाणी घेऊ शकतो तेव्हडं घ्यायचं. आणि आता हळूहळू त्या पाण्याचे एकदम लहान लहान घोट घ्यायाचे.त्या पाण्याचे जवळपास 20 घोट व्हायला पाहिजे. उचकी लागल्यावर जी हवा छातीतुन वर येते ती या घोटानी दाबली जाते, आपणाला ते जाणवतं पण. आणि उचकी लागायची थांबते.

मला काहीही गरम पिताना उचकी येते. ती उचकी अशी चालू राहत नाही. फक्त गरम पाणी/चहाचा घोट गिळताना तेवढ्यापुरती एक उचकी येते. पुन्हा दुसरा घोट घेईपर्यंत उचकी येत नाही. पेयाचा तापमान कमी झालं की गिळताना उचकी येत नाही. हे कधी लहानपणी नव्हतं, तरूणपणीच सुरू झालं.

, कागदी पिशवीत श्वसन म्हणजे कोव्हीड पसरायला सुरवात झाल्यापासून आता पर्यंत एकंदरीत उचकी लागण्याचे प्रमाण कमी झाले असावे. निदान मुखपट्टी लावलेली असताना.

साद, वावे
तुम्ही आणि मी एकाच गटातले आहोत ! ज्या लोकांना जठाराम्लता-अधिक्याचा त्रास असतो, किंवा जठरातील अन्न थोडेफार वर अन्ननलिकेत येण्याची प्रवृत्ती असते, त्यांच्या बाबतीत अशा उचक्या येतात.

जर बाहेर कुठे जेवायला बोलावले असेल, तर तिथे मी प्रथम लिंबाच्या अतिरिक्त फोडी मागून घेतो. मग त्या रस्सा किंवा कालवण असेल त्यात प्रथम पिळतो. आणि मग हळूच चाखून पाहतो.

जर का चुकून एखादा ‘तांबडा रस्सा’ अनवधानाने एकदम पिला गेला तर मग मात्र कम्बख्तीच !
…..

सर्व सहभागींचे चांगल्या चर्चेबद्दल आभार .

उचकी संदर्भातील एक वेगळा प्रकार लिहितो. शरीरातील घडामोडींमुळे लागणाऱ्या उचक्या आपण लेखात पाहिल्या. याव्यतिरिक्त मुद्दामून ‘उचक्या काढणे’ असाही एक प्रकार असतो. तो काही मनोरुग्णांत आढळतो. इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे किंवा सहानुभूती मिळवणे हा त्याचा हेतू असतो. अशा रुग्णाच्या बाबतीत डॉक्टरांना कौशल्याने त्या उचकीचा शोध घ्यावा लागतो.

यासंदर्भातील एक प्रसंग आठवतो.
असाच एक उचक्या काढणारा रुग्ण आमच्या रुग्णालयात आला होता. इतरांनी बरेच सांगून पाहिले होते. पण त्या उचक्या काढण्यात काही फरक नव्हता. शेवटी तज्ञांनी एक युक्ती केली.

तो रुग्ण साधारण अर्ध्या मिनिटाच्या अंतराने एक याप्रकारे उचक्या काढत होता. तज्ञांनी त्याला सांगितले, की तुझ्यासाठी मी एक बक्षीस ठेवणार आहे. त्याची अट अशी असेल,” तुला एकदा उचकी लागली की अजिबात न थांबता लागोपाठ १० उचक्या काढून दाखवायच्या. प्रत्येक उचकीमागे शंभर रुपये बक्षीस !”

मग काय, याचा अपेक्षित परिणाम लगेच दिसून आला. लागोपाठ उचक्या काढणे त्याला न जमल्याने त्या थांबल्या.

केया,
सैधव नस्या >>>
काहीच माहित नाही याबद्दल.
थोडक्यात सांगू शकाल का?

कुमार सर .. नस्य हे खांद्याच्या वर होणारे जे काही व्याधी आहेत जस की अर्ध शीशी,डोकेदुखी,सर्दी,केस गळती,उचकी इत्यादी साठी खूप उपयुक्त आहे.."नासा ही शिरसो द्वारम" असं म्हणतात.म्हणून उचकी मध्ये १ चमचा पाण्यात चिमुट भर सैंधव घालून २,२ थेंब दोन्ही नाकपुडीत सोडले तर आराम मिळतो..पण त्या बरोबरीने कारण मीमांसा शोधून त्याची पण औषधे घेतली पाहिजेत..बऱ्याचदा पोट साफ होत नसेल तेव्हा पण उचकी लागते...
सैंधव नस्य हे व्याधी प्रत्यानिक आहे..means symptomatic treatment for उचकी Happy

केया
उपयुक्त पूरक माहितीबद्दल मनापासून आभार !

मुखपट्टी ने तसे होत नाही >
ओके धन्यवाद. कागदी लिहिले असून ते कॉपी पेस्ट करूनही मी ते कापडी कसे समजलो कोण जाणे.

मानव
आणि मुख्य म्हणजे उचकी संदर्भात जी कागदी पिशवी आहे ती बऱ्यापैकी संपूर्ण चेहऱ्याभोवती आवळून थोडाच वेळ बंद केली जाते.
सध्या आपण जी कापडी पट्टी ती लावतो तिच्या बाजूने बरीच जागा असते. आणि मुळात कार्बन डाय ऑक्साईड आणि ऑक्सिजन वायू असल्यामुळे ते त्यातून आरामात आत-बाहेर जाऊ शकतात.

मुखपट्टीमुळे स्वतःच्याच सोडलेल्या कार्बन-डाय-ऑक्साइडचे श्वसन होऊन दुष्परिणाम होईल असा गैरप्रचार करणाऱ्या एका अमेरिकी डॉक्टरचा व्यावसायिक परवाना रद्द झालेला आहे :

https://www.businessinsider.in/international/news/a-doctor-from-oregon-w...

चांगले समजावलेत.
जेवताना वारंवार ठसका लागायची सवय असेल तर काय करता येईल?

आधी ठसका समजून घेऊ.

जेव्हा अन्नाचा घास घशात येतो तेव्हा तो गिळण्यापूर्वी क्षणभरासाठी श्वसन थांबते. या क्रियेमध्ये तिथल्या अनेक स्नायूंचा परस्परसंवाद (coordinated interaction) होतो. आणि त्यामुळे अन्न हे अन्ननलिकेतच जाते. स्वयंचलित निसर्गनियमनाचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

मात्र कधीतरी खाताना अनवधानाने अन्नाचे कण आपल्या श्वासनलिकेत शिरतात - विशेषता जर पण घासभरल्या स्थितीत बोलत राहिलो, तर हे व्हायची शक्यता बरीच वाढते. ज्या क्षणी अन्नकण श्वसनमार्गात जातात त्या क्षणी स्वसंरक्षणार्थ एक प्रतिक्षिप्त क्रिया उमटते (gag reflex). त्यामुळे ते अन्नकण बाहेर फेकले जातात व श्वसनमार्गाचे संरक्षण होते या क्रियेला आपण ठसका म्हणतो.

ठसका टाळण्यासाठी एक महत्त्वाची सूचना :

जेवताना शक्यतो कमीत कमी बोलावे. पण बोलायचे झाल्यास घास पूर्ण गिळल्यावर बोलून घ्यावे आणि नंतरच दुसरा घास घ्यावा.

नेहमीप्रमाणे छान माहिती डाॅ! दहा दिवस डीटाॅक्स करायला निसर्गोपचार केंद्रात गेले होते. माझ्या शेजारच्या रुममध्ये अर्धा मि.ला एक उचकी ह्या विकारावर उपचार करायला आला होता. त्याची उचकी पाहून/ऐकून मीच अस्वस्थ झाले होते त्याला होत असेल तोच जाणे. त्याच्या पत्नीशी बोलताना कळले की त्यांची इथे येण्याची सहावी वेळ आहे . मुंबई पुण्यातले अनेक तद्नन डाॅ ना भेटले व काहीही उपयोग झाला नाही मग शेवटी निसर्गोपचार केंद्रात आले. प्रथम आले तेव्हा आठ दिवस झाले तरी काही उपयोग नाही. पण तिथले डाॅ म्हणे मला अजून आठ दिवस द्या नाही बरं वाटलं तर जा. एवढे डाॅ पालथे घातले काही उपाय सापडला नाही तर डाॅ म्हणताहेत तर थांबू ... चौदाव्या दिवशी अखेर थांबली. मग अजून पंधरा दिवस थांबले. पण अॅन्टीबाॅयाॅटिक्स घेण्यात आले की परत सुरु उचकी लशी घेतल्यावरही तोच अनुभव ... ह्या खेपेस दोन दिवसातच उचकी थांबली. हायपरॲसिडिटी हे कारण निसर्गोपचारवाले म्हणतात. आता माझ्या लक्षात नाही कशाच ते पण आॅपरेशन करावं लागेल असं एॅलोपॅथिवाले म्हणतात.

मंजू ताई
खरं आहे
काही रुग्णांच्या बाबतीत हा विषय बऱ्यापैकी गुंतागुंतीचा असतो
धन्यवाद !

छान व्यवस्थित शंकानिरसन केलेत डॉक्टर. Happy
वावे, मला तर वडापावच्या पहिल्या घासाला बऱ्याच वेळा उचकी लागते. त्याचं असं होतं की अतिप्रिय पदार्थ असल्याने त्याची वाफ जिरण्याच्या आत खायला सुरुवात होते अगदी लहान मुलागत. मग हमखास उचकी ठरलेली.

चांगला लेख, डॉक्टर.
मला सुध्दा शंतनू म्हणतात तसं होतं. फक्त मी म्हणीन कि तरुणपणी होत नव्हतं. आता ( ५० नंतर) हमखास गरम काही प्यायलं कि उचकी येते, तिखट खाल्लं कि उचकी येते.

Pages