आम्ही आणि होळकर ब्रिज - २

Submitted by रीया on 25 May, 2017 - 02:44

http://www.maayboli.com/node/62657 पुढे चालू

**** हा भाग थोडासा लहान आहे कारण पुढील भाग मला एक सलग टाकायचा आहे.. यातच अ‍ॅडलं तर मज्जा जाईल***

अशातच तो दिवस आला...

आता त्या दिवसाबद्दल आठवून काहीच वाटत नाही पण त्या दिवशी आणि त्यानंतर महिनाभर असलेली आमची अवस्था भयंकर वाईट होती.

रोज बाबा रात्री अडीचच्या दरम्यान 'तो' ड्रॉप झाला की फोन करून कळवायचे. ते जरी कधी स्पष्ट बोलले नाहीत तरी तो फोन मी सुखरूप आहे हे सांगायलाच केलेला असायचा हे ही तितकंच खरं.

त्या दिवशी काही बाबांना फोन आला नाही. मी आणि आई एकमेकींशी एक शब्दही बोलत नव्हतो. दोघींच्या हृद्याचे ठोके ऐकु येतील इतकी ती शांतता! फार भयाण, भेसुर होती ती शांतता.! तिचा भंग करावा म्हणुन आणि काही तरी बोलायचं म्हणुन आई म्हणाली , 'मन्या, चल गॅलेरीत जाऊन बसुयात' आणि तिथेच चुकलो बहुदा आम्ही कारण इतका वेळ धरून ठेवलेला धीर बाहेर जाताच संपला होता. बाहेर जाताच नेहमी सारखी आम्ही आकाशाकडे मान वळवली आणि लक्षात आलं - आकाशात चंद्र नव्हता.

ती रात्र अमावस्येची होती...!

अक्षरश: धाय मोकलून रडायला लागलो आम्ही. जणू काही आमचे बाबा आता पुन्हा आम्हाला दिसणार नव्हते. किती वेळ एकमेकांना बिलगून रडत होतोत ते आत्ता आठवत नाही पण बेल वाजली तेंव्हा पहाटेचे ६ वाजले होते. दारात बाबा उभे होते.

समोर बाबा होते ते पण त्यांची नजर नेहमीची ओळखीची नव्हती.लाल भडक डोळे, बाबांना दारूची सवय नव्हती.डोळे इतके लाल भडक असण्याचं कारण आमच्या लक्षात येईना. "मन्या" बाबांनी हाक मारली. हा आवाज नक्कीच बाबांचा नव्हता. इतका घोगरा?
आईने मला मागे खेचलं आणि बाबा धाडकन जमिनीवर कोसळले. आईने ताबडतोब मामाला फोन केला. मामा आला.त्याने बाबांना अंगारा लावला. त्यांना उचलून बेडवर टाकायला म्हणुन त्यांच्या अंगाला हात लावला तर थंडगार शरीर..

बाबा २ दिवसांनी शुद्धीवर आले. तापाने फणफणलेले. २ दिवसांमधे बाबांचं वजन ८४ किलोचं ४५ किलो झालं होतं. कोणाशी बोलत नव्हते, काही खात नव्हते. शुन्यात नजर. २ दिवसांपुर्वी धडधाकट असलेला माणुस स्वत:च्या हाताने पाण्याचा ग्लास धरू शकत नव्हता...आम्ही सगळेच काळजीत होतो. अंगारे धुपारे सगळं चालू होतं. जो उपाय जी व्यक्ती सांगेल ते प्रत्येक उपाय आम्ही करत होतोत.साधारण ५व्या दिवशी बाबांनी सगळ्यांना त्या दिवशी जे घडलं ते सांगायला सुरुवात केली.

नेहमी प्रमाणे बाबा त्यांचा ड्रॉप करून होळकर ब्रिज क्रॉस करत होते. इतक्यात त्यांना भर रस्त्यात केस सोडून बसलेली एक बाई दिसली. बाबांची गाडी जवळ येताच तीने मान वळवून बाबांकडे पाहिलं. लाल भडक डोळे. भेसुर हसली. हसतच सुटली.

बाबांनी गाडी रिव्हर्स केली तशी चटकन उठुन त्यांच्या दिशेने चालत यायला लागली. बाबांनी गाडी मागे वळवली तशी जोरात ओरडली ' एक बेसहारा औरत को अकेला छोड के जा रहा है और खुदको मर्द कहता है. छोडुंगी नही तुझे'

पुढंचं बाबांना आठवत नव्हतं. त्यांना डायरेक्ट आठवलं ते त्यांना शुद्ध आलेली.

"झालं उजु! संपलं सगळं... काळजी घे पिल्लांची... सॉरी मी तुम्हाला या परिस्थीत ढकलं... माझ्यासोबत संपेल हे सगळं.... ऐकायला हवं होतं आपण त्या पिंगळ्याचं.... आता काय करायचं गं" बाबा जीव तोडुन बोलत होते... आई भयंकर रडत होती... मी प्रितीला जवळ घेऊन शांत बसले होते.... करणार काय होते दुसरं?

हो आणखी एक - जेंव्हा बाबांना ती बाई दिसली तेंव्हा गाडीतला टेप आपोआप बंद झाला आणि स्तोत्र बंद पडलं होतं ..

लोकं भेटायला येऊन उपाय सांगत होते, आम्ही सगळे उपाय करून थकलो होतो... पण हार कशी मानणार?

अशातच बाबांचा एक जवळचा मित्र भेटायला आला. राजूकाका पक्का नास्तिक माणुस... देव आणि भुत दोन्ही न मानणारा. सगळी घटना ऐकून तोही चक्रावला होता.

"वहिनी, तुम्ही तुमचे उपाय सुरू ठेवा पण प्लिज मला एकदा त्याला घेऊन डॉक्टर कडे जाऊ देत" तो आईला सतत विनवत होता.

त्यावेळेला आम्ही बाबांना ज्या मांत्रिकाकडे नेलं होतं त्याने कसला तरी ताविज दिला होता आणि स्पष्ट सांगितलं होतं की यांना घरा बाहेर पडू देऊ नका. या ताविजची शक्ती घराबाहेर काम करणार नाही आणि मग आपण त्यांना वाचवू शकणार नाही. त्या मांत्रिकाने हे ही सांगितलं की त्यांना एकटं सोडू नका, ती बाई किंवा ही कुठलीतरी शक्ती त्यांना केंव्हा घेऊन जाईल ते कळणारही नाही. अर्थातच आईने स्पष्ट नाही म्हणुन सांगितलं..

ती घटना घडून आता ७ दिवस झालेले. बाबांच्या हाता पायाच्या काड्या झालेल्या. वजन ४० किलोवर आलेलं. बाबा फार क्व्चित एखादा शब्द बोलायचे. तेही त्यांच्या आवाजत नाहीच. आम्ही होप्स सोडायला लागलेलो.

त्या काळात नाही नाही त्या ठिकाणी गेलो, होतं नव्हतं सगळं विकलं. बाबांवर उपाय करायचे म्हणुन. आई शाळेत जातच होती.. मी आणि प्रिती बाबांना एकटं सोडुन कुठेही जात नसूत.

एके दिवशी मला एक फोन आला. "आई शाळेत चक्कर येऊन पडलीये. तिला न्यायला ये"

माझा जीव खाली वर. बाबांना एकटं सोडायची भिती वाटत होती त्याहुनही जास्त भिती प्रितीला बाबांजवळ सोडून जायची वाटत होती. मनाचा हिय्या केला. प्रितीला घेऊन आईला आणायला निघाले. बाबांना सांगितलं काळजी घ्या.

शाळेत पोहचले तशी आई समोरून चालत आली. "तुम्ही काय करताय इथे? त्यांना एकटं का सोडलं?"

आईच्या प्रश्नांनी मी सुन्न्न झाले. तिला आलेल्या फोन बद्दल सांगितलं. अर्थातच तो कॉल फेक होता. आम्ही तिघी तडक घराकडे निघालो.

घरी पोहचलो तर घरात बाबा नव्हते. घर सताड उघडं होतं. घरात कोणीही नव्हतं.

आईने ताबडतोब सगळ्या नातेवाईकांना फोन केला.हताश होऊन मला तुफान मारणारी आणि नंतर जवळ घेऊन ढसाढसा रडणारी आई मला आजही आठवते. सगळे ओळखी पाळखीतले लोकं जमा झाले. बाबांना शोधायचा प्रयत्न करायला लागले.प्रत्येक प्रयत्न वाया जात होता.

इतक्यात फोनची रिंग वाजली

क्रमशः!

http://www.maayboli.com/node/62678

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे! सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं हे किती खरं आहे! एरवी कुठे असं काही वाचलं असतं तर मी विश्वासच ठेवला नसता. पण तू लिहीलंयस तर हे खरं असलं पाहिजे.

बापरे..
आता पुढचा भाग कधी...लवकर टाक..

बाप रे!
त्या नास्तिक मित्राचे तर कारस्थान नव्हे ना हे, त्यांना डॉक्टरकडे नेण्यास?

बापरे! सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं हे किती खरं आहे! एरवी कुठे असं काही वाचलं असतं तर मी विश्वासच ठेवला नसता. पण तू लिहीलंयस तर हे खरं असलं पाहिजे. >>>> +१११११

धन्यवाद लोकहो Happy
मी हा किस्सा मैत्रिणींना सांगताना वॉट्सअप वर टाकला होता.. तसाच उचलून इथे टाकतेय त्यामुळे शुलेच्या प्रचंड चुका असतील Happy
सांभाळून घ्या

पुढचा भाग येऊद्यात लौकर....
(पिंचीमधेच असुनही तेव्हा २०१० मध्ये आपली ओळख नव्हती ना? मी जर चुकत नसेन तर आपण पहिल्यांदा भेटलो तेच २०१२ मध्ये.... )

लिंबुदा, २०१० मधे मी मायबोलीवर नव्हते Happy आपण पहिल्यांदा भक्ती शक्तीला भेटलोत, तेंव्हा कचा आलेला भेटायला आपल्याला..

छान आहे हा भाग पण. पुढील भागाच्या प्रतिक्षेत!!

लिखाण शैली छान ओघवती अन् उत्कंठा वाढवणारी आहे. >>> +१

बापरे! सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं हे किती खरं आहे! एरवी कुठे असं काही वाचलं असतं तर मी विश्वासच ठेवला नसता. पण तू लिहीलंयस तर हे खरं असलं पाहिजे. >>>> +१११११

हा भाग पण उत्कंठावर्धक आहे एकदम. उगिच पाल्हाळिक नाही लिहिलंस ते एक योग्य केलंस.
पुढचा भाग कधी टाकणार आहेस? उद्या का?
वीकेन्ड पुर्वी संपव बाई प्लिज. उगिच डोक्याला भुंगा सोमवार पर्यंत.

वीकेन्ड पुर्वी संपव बाई प्लिज. >> खरच!
जिद्न्यासा ++
बापरे!
तुम्ही लोकं कशातून गेला असाल!
म्हणजे आम्ही उत्कंठावर्धक म्हणून गोष्ट वाचू शकतो. पण कुणाच्या आयुष्यात घडलेल असेल तर नको रे देवा वाटतय!
काका ह्यातून लवकर बाहेर पडूदे - फक्त वाचताना सुद्धा!

नानबा Happy
पुढच्या भागात सगळं क्लिअर होईल Happy

तरी बराच काळ गेलाय आणि बर्‍याच गोष्टी विसरल्या गेल्यात.. पण मला बाबा लख्ख आठवतात तेंव्हा कसे दिसायचे ते
हातापायाच्या काड्या, डोळे लाल आणि खोबणीतून बाहेर आलेले ऑलमोस्ट, आवाज विचित्र ४ शब्द बोलले की दम लागायचा Sad
फार डेंजर काढलेत ते दिवस आम्ही

Pages